ओसामा, बाबा-बुवा आणि बुद्ध
बुद्धाचे पंचशिल हा विश्वशांतीचा मार्ग भारताने स्वीकारला आहे. राजकारणात दोन मार्ग आहेत. एक युद्धाचा आणि दुसरा बुद्धाचा. ?त्यापैकी बुद्धाचा मार्ग आपण स्वीकारला आहे. जगभरातील सर्व देशांमध्ये युद्धाऐवजी बुद्धाचा मार्ग हाच लोककल्याणकारी मार्ग असल्याचे सर्वानी मान्य केले आहे. आशिया खंडातील देशांसह अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातही या धर्माचा झपाटय़ाने प्रसार होत आहे. विध्वंस, हिंसाचार, रक्तपात, जीवितहानी, वित्तहानी कोणालाच नको आहे.
दहशतवाद, भौतिकवाद आणि दैववाद यांचा समाजावर जो पगडा बसला आहे, त्यातून असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. ओसामा बिन लादेन या खतरनाक अतिरेक्याला अमेरिकी कमांडोंनी ठार केल्यानंतर जगभरात लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. कोणताही देश लोकशाहीवादी असो; साम्यवादी असो की धर्मवादी त्या देशांना अतिरेक्यांचा धोका आहेच. दहशतवाद हा अतिरेकी कारवाई करणा-यांचा नव्हे तर धनदांडग्यांचा, सत्ताधीशांचा आणि माफियांचाही आहे. त्यामुळे लोकांवर कायम भीतीचे सावट असते. आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाने अत्यंत वेगाने प्रगती केली आहे. त्यामुळे लोक भौतिक सुखाच्या मागे लागले आहेत. भौतिक सुखांसाठी स्पर्धा एवढी वाढली की, या काळाला लोक स्पध्रेचे युग म्हणू लागले आहेत. दहशवाद आणि भौतिक वादाने मन:शांती हरवून बसलेले लोक दैववादी बनत आहेत. त्यातूनच बाबा-बुवा-महाराजांची चलती झाली आहे. आजकाल जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेमुळे चंगळवाद वाढला आहे. जगभरात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच युद्ध नको, बुद्ध हवा अशी भावना व्यक्त केली जात आहे. उद्या मंगळवारी बुद्ध पौर्णिमा आहे. या दिवसाचे महत्त्व जाणून बुद्ध आणि त्याचा धम्म याचा गांभीर्याने विचार करणे औचित्यपूर्ण ठरेल. तथागत गौतम बुद्धांना वयाच्या 32व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला पिंपळ वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर त्यांनी धम्माची शिकवण लोकांना दिली.?कोणत्याही जाती-धर्म-पंथाचे लोक बुद्धाची पंचशील आणि अष्टांग मार्गाची शिकवण आचरणात आणून शांतीचा संदेश देऊ शकतात. त्याचीच आज खरी गरज आहे.
सामाजिक, राजकीय आणि धार्मिक पातळीवर भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे, ती पाहाता बौद्धिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून विचारमंथन होण्याची गरज आहे. भगवान गौतम बुद्ध ही भारत देशाची जगाला देणगी आहे. बुद्ध हा केवळ भारत देशाचा नव्हे; तर संपूर्ण जगाचा उद्धारकर्ता आहे. बुद्धाचा धम्म हा इतर धर्माना कमी लेखत नाही. तो कोणत्याही धर्माची अवहेलना करत नाही. त्याचा धम्म सर्व धर्माच्या पुढची पायरी आहे. हा सर्वाधिक उदार मतवादी आणि विज्ञाननिष्ठ धर्म आहे. हिंदू धर्म आणि बुद्ध धम्माची तुलनाच करायची झाली तर हिंदू धर्मात तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही. जे आहे ते मान्य करून चालावे लागते. याउलट बौद्ध धम्मात आपण जिज्ञासेने प्रश्न विचारू शकतो आणि सर्व प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळू शकते.
बुद्ध विचार हा समतेवर आधारित असून, लोकशाहीच्या मूळ संकल्पनेचे उगमस्थान भिक्खू संघ आहे. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक पातळीवर जेव्हा जेव्हा विषमता वाढीस लागून युद्धस्थिती निर्माण झाली. त्या त्या काळात असलेले सम्राट अशोकासह अनेक राजे बुद्धाला, धम्माला आणि भिक्खू संघाला शरण गेले. पराकोटीची विषमता आणि असुरक्षितता समाजात निर्माण होते तेव्हा लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी साधूसंत जन्माला येत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व हे अशा परिस्थितीतूनच उदयास आले. गरीब, दीनदुबळय़ांचा रक्षणकर्ता रयतेचे राज्य निर्माण करणारा राजा शिवाजी, स्त्री-पुरुष समतेसाठी लढा देणारे महात्मा फुले आणि उपेक्षित पीडित पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी देदीप्यमान कार्य करणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माला अभिप्रेत असलेली शिकवण आत्मसात केली होती. जातीभेदाच्या भिंती उभारून समाजाचे अध:पतन करणा-या हिंदू धर्मातील जुन्या बुरसटलेल्या रूढी व चालीरितींवर बाबासाहेबांनी आसूड ओढले. त्याचबरोबर ‘बुद्धीची आणि मानवतेची पूजा करा,’ अशी शिकवण देणा-या बुद्ध धम्माची दीक्षा त्यांनी स्वत: घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना दिली. सखोल अभ्यास आणि आत्मचिंतन केल्यानंतर बुद्धाचा धम्म जगाला तारू शकेल, याची खात्री असल्यामुळे आपण भारतीयांनी बुद्धाला स्वीकारले आहे. राष्ट्रध्वजावर अशोकचक्र घेण्यात आले आहे. तसेच सम्राट अशोकाची सिंहमुद्रा आपण राष्ट्रमुद्रा म्हणून स्वीकारली आहे. बुद्धाचे पंचशिल हा विश्वशांतीचा मार्ग भारताने स्वीकारला आहे. राजकारणात दोन मार्ग आहेत. एक युद्धाचा आणि दुसरा बुद्धाचा. ?त्यापैकी बुद्धाचा मार्ग आपण स्वीकारला आहे. जगभरातील सर्व देशांमध्ये युद्धाऐवजी बुद्धाचा मार्ग हाच लोककल्याणकारी मार्ग असल्याचे सर्वानी मान्य केले आहे. आशिया खंडातील देशांसह अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातही या धर्माचा झपाटय़ाने प्रसार होत आहे. विध्वंस, हिंसाचार, रक्तपात, जीवितहानी, वित्तहानी कोणालाच नको आहे. बुद्ध धम्मात शिल, समाधी, प्रज्ञा या तीन गुणांमध्ये येणाऱ्या अष्टांगिक मध्यम मार्गाचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. लोकांच्या आयुष्यात जास्तीत जास्त आनंद निर्माण होऊ शकेल, असा अनुभव या धम्माने दिला आहे.
आजकाल करोडो रुपयांची धनसंपत्ती गोळा केली जात आहे. पण त्याचा समाजाला उपयोग होत नाही. राजकारणात नित्यनवीन घोटाळे उघड होत आहेत. त्यावरून राजकारण्यांचे किती अवमूल्यन झाले आहे, याची कल्पना येते. भ्रष्टाचारामुळे अशा माणसांचे नैतिक अध:पतन झाले असल्याने त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करता येत नाही. परिणामी निवडणुकीमध्ये यश मिळेल, याची खात्री देता येत नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत टू-जी स्पेक्ट्रम घोटाळय़ामुळे द्रमुक पक्षाचा सफाया झाला.
धनसंपत्ती जमा करण्याच्या हव्यासातून माणसाला कोणतेही सुख मिळू शकत नाही; उलट दु:खच मिळते. एकमेकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले नाहीत तर माणसांना दु:खाशिवाय काही मिळत नाही. म्हणूनच बुद्धाने दु:खमुक्तीचा मार्ग सांगितला आहे. बुद्धाचा धर्म हा केवळ रानावनात फिरणाऱ्या भिक्खूसाठी असल्याचा अपप्रचार करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात आनंददायी जीवन जगण्याचा मार्ग बुद्धाने सांगितला आहे. भौतिक सुखाच्या मागे लागलेले लोक बेकायदेशीर मार्गाने संपत्ती गोळा करत आहेत. त्यामुळे असुरक्षितता निर्माण झाली की बाबा-बुवा-महाराजांकडे रांगा लावल्या जात आहेत. गोळा केलेल्या धनसंपत्तीचा लोकांना व समाजाला उपयोग होत नसतो. उलट ही संपत्ती बाबा-बुवांकडे दिली जाते. सत्यसाईबाबांसारखे लाखो अनुयायी लाभलेले गुरू निर्माण झाले आहेत. सत्यसाईबाबांनी चमत्कार करून लाखोंच्या संख्येत शिष्यगण तयार केले. अलीकडेच सत्यसाईबाबांचे निधन झाले. त्यांची लोकप्रियता एवढी की, प्रसारमाध्यमांनी त्यांच्या निधनाचे प्रसारण मेगा इव्हेंट समजून केले. त्यांच्या लोकप्रियतेबद्दल शंका नाही, परंतु शंका त्यांच्या चमत्काराबद्दल आहे.?गरीबांना विभूती आणि श्रीमंतांना, आमदार, खासदार, मंत्र्यांना सोन्याच्या अंगठय़ा चमत्काराने दिल्या जात होत्या,असा भेदभाव दैवशक्ती प्राप्त असणारे बाबा कसा काय करू शकतात? लाखो करोडो चाहत्यांच्या गळय़ातला ताईत असलेल्या क्रिकेटवीर सचिनला काय कमी आहे. भरपूर पैसा, संपत्ती, जागतिक मानसन्मान व कौटुंबिक सौख्य हे सगळे असताना,सत्यसाईबाबांना त्याला शरण जावे लागते, याचा अर्थ त्याला मन:शांतीची गरज आहे. अन्यथा सत्यसाईंपेक्षा अधिक लोकप्रियता असलेला सचिन सत्यसाईंच्या निधनाने एवढा अस्वस्थ आणि दु:खी झाला नसता. या पार्श्वभूमीवर गौतम बुद्धाच्या जीवनाकडे पाहिले तर तो राजा होता. सगळी सुखे त्याला लाभली होती.?पण त्यात मन रमले नाही म्हणून त्याने आत्मक्लेश करून घेतले. मात्र हे सर्व मिथ्या आहे, याची जाणीव झाल्यानंतर त्याने तपश्चर्या केली, आत्मचिंतन केले. त्यातून बुद्धी वृद्धिंगत झाली. ज्ञानाच्या कक्षा वाढल्या. जीवन जगण्यासाठी समतोल विचारांची व मध्यम मार्गाची आवश्यकता आहे. कोणत्याही प्रकारचा अतिरेक नको, याची प्रचिती आली. स्वतंत्र प्रज्ञेने विचारपूर्वक समजूतदारपणे वर्तन ठेवणे व समतोल राखणे धम्मात अभिप्रेत आहे.?त्यामुळे अंधश्रद्धा आणि अविवेकी, अविचारी वर्तन होऊ शकणार नाही. धम्माप्रमाणे वर्तन ठेवले तर दहशतवाद, अतिरेक आणि बुवाबाजी टाळता येऊ शकेल.
0 comments:
Post a Comment