कुठे आहेत वार-करी?
गृहमंत्री आबा पाटलांनी एक पाऊल पुढे टाकत दारुडय़ाला वाहन चालक ठेवणा-या मालकाचीही चौकशी करू, असे सांगून निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमून टाकली. मालकाची चौकशी ऐकून सगळेच अवाक झाले. सगळी ‘मिलीजुलीभगत’ असल्याचे चित्र असून, सरकारवर हल्ला करणारे वार-करी कुठे आहेत, असा प्रश्न पडला आहे.
शेगावच्या गजानन महाराजांची पालखी-दिंडी नेहमीप्रमाणे निघाली होती. मजल-दरमजल करत त्यांना शेगाव गाठायचे होते. पंढरपूरहून परतीच्या मार्गाने शेगावकडे निघालेले वारकरी विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला बसले होते. हरिनामात मग्न असलेल्या बेसावध वारक-यांवर एक भरधाव कंटेनर गेला आणि त्याने अकरा वारक-यांचा जागीच बळी घेतला. अनेकांना जखमी केले. वारक-यांना असा भयानक अपघात घडल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. जवळच असलेल्या गावातील गावक-यांनी केलेली संतप्त दगडफेक, मोटारगाडय़ांची जाळपोळ असे प्रकार घडले आणि परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ लागली. लाठीमार, अश्रूधूर, गोळीबार या पोलिसी आयुधांचा वापरही झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. मात्र एवढय़ा मोठय़ा दुर्घटनेनंतर विधिमंडळात रणकंदन होईल आणि विरोधी पक्ष एकजुटीने सरकारवर तुटून पडतील, अशी अपेक्षा होती. ती संपूर्णपणे फोल ठरली. बॉम्बस्फोटाची चर्चा गांभीर्याने झाली नाही, तोच प्रकार या दुर्दैवी घटनेबाबतही घडला.
विरोधी पक्षांकडे या संबंधीच्या स्थगन प्रस्तावाबाबत कोणतेही डावपेच नव्हते. बॉम्बस्फोटासंबंधी दोन तासांच्या निश्चित कालावधीची चर्चा सरकारला मान्य करायला लावून मतदान घेण्याचा आग्रह विरोधकांकडून धरला जाईल अथवा किमान सभात्याग तरी केला जाईल, असे वाटले होते. पण तसे काही घडले नाही. उलट विरोधकांमध्ये फूट दिसली. एकटय़ा मनसेने हे प्रकरण लावून धरले. बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर, नितीन भोसले आदींनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. एवढा अपवाद वगळला तर अपघातप्रकरणी स्थगन प्रस्तावावर दोन तासांची चर्चा घेतली खरी पण त्यावर पोटतिडकीने बोलणे तर सोडाच मतदान मागण्यासाठीही विरोधी पक्षनेते उभे राहिले नाहीत. निरपराध, बेसावध लोक बॉम्बस्फोट होऊन ठार होतात. ट्रक, कंटेनर यासारखी अवजड वाहने त्यांना चिरडतात, राज्यात खून, दरोडे, बलात्कार अशा घटना राजरोस,दररोज घडत आहेत, लोकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. अशा वेळी लोकांची बाजू घेऊन तळमळीने उभा राहणारा आणि सरकारला जाब विचारणारा विरोधी पक्ष आहे तरी कुठे, असा प्रश्न पडतो.
0 comments:
Post a Comment