Friday, May 29, 2009

पश्चिम महाराष्ट्र तुपाशी

28 May, 2009

केंद्रीय मंत्रिमंडळाची बातमी महाराष्ट्रात पोहोचताच पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, तर अन्य विभागांवर मात्र अन्याय , अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बातमी महाराष्ट्रात पोहोचताच पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, तर अन्य विभागांवर मात्र अन्याय,अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.मंत्रिमंडळात महाराष्ट्राला नऊ मंत्रिपदे मिळाली असली तरी पश्चिम महाराष्ट्राच्या पदरात झुकते माप आहे. पश्चिम महाराष्ट्रात १० जागा असताना चार, तर तितक्याच जागा असलेल्या विदर्भाला दोन मंत्रिपदे मिळाली.

मुंबईला दोन मंत्री पण ठाण्याचा एकही नाही, कोकणासह उत्तर महाराष्ट्रात आठ, तसेच मराठवाडय़ातही आठ खासदार असून केवळ मराठवाडय़ालाच मंत्रिपद, याकडे लक्ष वेधले जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील चार जागांपैकी काँग्रेसचे सुरेश टावरे यांनी भिवंडीची जागा जिंकली, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ काँग्रेसचे डॉ. निलेश राणे यांनी जिंकला. तळकोकणात शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढून काँग्रेसला प्रथमच जागा मिळाली असल्याने, कोकणाच्या विकासावर अधिक लक्ष देण्यासाठी कोकणाला प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक होते. विधानसभा निवडणुकांचा विचार केल्यास, कोकण व ठाणे भागात ३९ विधानसभा जागा आणि मुंबईत ३६ जागा असताना मुंबईतील सहा खासदारांपैकी दोघांना मंत्रिपदे मिळाली. मुरली देवरा दुस-यांदा मंत्रिपद देण्यात आले, तर गुरुदास कामत हे पाचव्यांदा खासदार झाले असताना त्यांची बोळवण राज्यमंत्रिपदावर करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन मराठवाडय़ाला महत्त्व तर दिले आहेच, पण माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचा पत्ता कट झाला आहे. देशमुख आणि पाटील या दोघांनाही २६/११च्या पार्श्वभूमीवर आपापल्या पदांचे राजीनामे द्यावे लागले होते. पण विलासरावांनी दिल्लीत जोरदार लॉबिंग करून पाटील यांचा पत्ता कट करण्यात यश मिळवले. मुख्यमंत्रीपद गमावण्याची कारवाई झाली असताना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रधान समितीच्या अहवालात राज्य सरकारला क्लीनचिट मिळाली आणि विलासरावांचा समावेश झाला. मात्र याच कारणावरून पद गमवावे लागलेल्या शिवराज पाटील आणि आर. आर. पाटील यांचा मात्र वनवास कायम राहिल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शरद पवार यांचा काँग्रेसने मान राखला आणि त्यांच्या मागणीनुसार राष्ट्रवादीला तीन मंत्रिपदे देण्यात आली. प्रतीक पाटील हे दुस-यांदा लोकसभेवर गेले आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अजित घोरपडे यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली असूनही ते विजयी झाले, त्याचे हे बक्षीस मानले जाते.

Read more...

Sunday, May 24, 2009

रामदास आठवले को गुस्सा क्यों आता है?

साखरसम्राटांनी आठवलेंना पाडण्याचाच निर्धार केला होता. मात्र केवळ विखेच नव्हे, तर कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह येथील सगळेच साखरसम्राट व शिक्षणसम्राट त्यांच्या पराभवास जबाबदार असल्याचे दिसून येते. मराठा आणि बौद्ध दलित यांच्यातील वैमनस्यातून आठवलेंचा पराभव घडवून आणण्यात आला आहे.


रिपब्लिकन नेते रामदास आठवले भयंकर संतापले आहेत. त्यांच्या समर्थकांमध्येदेखील संतापाची लाट पसरली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव आठवले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. इतका की, काँग्रेस व राष्ट्रवादी या दोहोंनी जाणूनबुजून आपला पराभव केला, असा थेट आरोप आठवले यांनी केला आणि राज्यभर त्यांच्या कार्यकर्त्यांनी उग्र निदर्शने केली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व निवडणूक प्रचारप्रमुख बाळासाहेब विखे-पाटील यांच्या पुतळय़ांचे दहन करण्यात आले. आठवलेंचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिल्यानंतरच त्यांचे समर्थक शांत झाले. या प्रकाराने अनेक प्रश्न उपस्थित होतात. काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यामध्ये आठवलेंचा पराभव होतोच कसा? त्यांचा पराभव कसा झाला, कुणी केला, कशासाठी केला, पराभव करण्यामागे नेमकी कारणे कोणती, याचा अंदाज घेतला असता, आठवलेंच्या आरोपात तथ्य असल्याचे दिसून येते. आठवलेंचा पराभव जाणूनबुजून करण्यात आला, जातीय प्रवृत्तीमधून करण्यात आला, शिर्डी मतदारसंघातील साखरसम्राटांनी आठवलेंना पाडण्याचाच निर्धार केला होता. मात्र केवळ विखे-पाटीलच नव्हे, तर कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह येथील सगळेच साखरसम्राट व शिक्षणसम्राट त्यांच्या पराभवास जबाबदार असल्याचे दिसून येते. मराठा आणि बौद्ध दलित यांच्यातील वैमनस्यातून आठवलेंचा पराभव घडवून आणण्यात आला आहे.


काँग्रेस नेत्यांनी ठरवले, तर रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणणे त्यांना अशक्य नाही. १९९८ साली प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, आठवले व जोगेंद्र कवाडे या चौघांना काँग्रेसने निवडून आणले होते. हिंदुत्ववादी शिवसेना-भाजप युतीचे आव्हान परतवून लावण्यासाठी सर्वधर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन युतीचा सामना करण्याचा निर्णय घेतला होता. रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट तर एकत्र आले होते. परिणामी एकजुटीचा विजय झाला होता. १९९९ साली झालेल्या निवडणुकीत सर्वानी पुन्हा वेगळय़ा चुली मांडल्या आणि पराभूत झाले. गवई काँग्रेससोबत, तर आठवले राष्ट्रवादीसोबत गेले. वास्तविक पाहता रिपब्लिकन पक्षामध्ये एकजूट नसेल, तर त्यांच्या मतांची विभागणी होऊन त्यांची राजकीय शक्ती क्षीण होते. या मतांचा विजयासाठी फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे शिवसेना-भाजप उमेदवाराला फायदा मिळू शकतो, याची जाणीव असल्यामुळे दलित जनता काँग्रेस पक्षाला भरभरून मते देत असल्याचा अनुभव येतो. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने गवई-आठवले यांचा सन्मान ठेवला आहे. त्यांच्या नेत्यांना अनुक्रमे अमरावती व शिर्डी या दोन जागा सोडल्या. काँग्रेस पक्षात असलेल्या निष्ठावान दलित नेत्यांसाठी काँग्रेस कार्यकर्तेही निष्ठेने काम करीत असल्याचे मुकुल वासनिक आणि एकनाथ गायकवाड यांच्या विजयाने सिद्ध झाले आहे.


अहमदनगर आणि शिर्डी (राखीव) या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये शिजलेल्या अंतर्गत राजकारणाचा आठवले हे बळी ठरले आहेत. आठवलेंचा तर बळी गेलाच, पण काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांच्या असे पायात पाय घालून पाडले की, अहमदनगरमध्ये भाजप आणि शिर्डीत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला. नगर जिल्ह्यातील एका माजी आमदाराने शिर्डीच्या पराभवावर मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, पती मेल्याच्या दु:खापेक्षा सवत विधवा झाल्याचा आनंद अधिक आहे. यावरून कुरघोडीचे राजकारण अशा थराला गेले की, हम तो डुबेंगे सनम, लेकिन तुमको लेकर डुबेंगे असा प्रकार घडला. पवारांनी खेळी केली, विखे-पाटलांबरोबर असलेल्या दुश्मनीतून आठवलेंना काँग्रेसच्या गळी उतरवून त्यांच्या कोटय़ात टाकले व विखेंचा काटा काढण्याचे ठरवले. विखेंचा काँग्रेसचा हात मतदारसंघात जाऊच नये, अशी तजवीज करून ठेवली. त्यांनी शहाला काटशह देऊन आठवलेंचा शिर्डीत आणि नगरमध्ये राष्ट्रवादीच्या शिवाजी कर्डिलेंचा पत्ता कट केला. शिर्डीमध्ये साखरसम्राटांनी आठवलेंना ठरवून पाडले असल्याचे मतांच्या आकडेवारीवरून सिद्ध होते. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांपैकी शिर्डी हा काँग्रेसचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांचा मतदारसंघ. त्यात शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना २८ हजाराचे मताधिक्य आहे. काँग्रेसचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरातांच्या संगमनेरमध्ये २३ हजार, काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार जयंत ससाणे यांच्या मतदारसंघात ३० हजार, राष्ट्रवादीचे शंकरराव कोल्हे यांच्या कोपरगावमध्ये २५ हजार आणि राष्ट्रवादीचे मधुकर पिचड यांच्या अकोले मतदारसंघात ११ हजार असे मताधिक्य शिवसेनेचे वाकचौरे यांना मिळाले आहे. निवडणूक प्रचारासाठी आठवलेंनी आमदारांना दिलेले पैसे धनुष्यबाणासाठी वापरण्यात आले, अशी चर्चा होत आहे. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा तालुक्यांमध्ये दहा सहकारी साखर कारखाने आहेत. शिवसेनेच्या अशोक काळे यांचा कोपरगाव सहकारी साखर कारखाना वगळता नऊ कारखाने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत आणि त्या प्रत्येकाच्या शिक्षणसंस्था आहेत. प्रत्येक संस्थेत १० ते १५ हजार कामगार आहेत. सभासद शेतकरी आहेत. त्यांचे कुटुंबीय धरून प्रत्येकाची हक्काची किमान एक लाख मते आहेत. त्यांच्या जीवावर ते कुणालाही निवडून आणू शकतात, अथवा पाडू शकतात. कोल्हें,पिचड,रामदास धुमाळ, नरेंद्र घुले, थोरात,विखे, यशवंतराव गडाख या काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या अधिपत्याखाली कारखाने आहेत, तेवढय़ाच शिक्षणसंस्थाही आहेत. एकेकाळी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्हय़ात काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित मते मिळतील, अशी आठवलेंची अपेक्षा होती; परंतु विखेंना नगरची जागा मिळाली असती, तर विखेंनी काँग्रेसच्या कोटय़ात आलेल्या आठवलेंना मदत केली असती; परंतु आठवलेंना काँग्रेसकडे पाठवून नगरची जागा पवारांनी राष्ट्रवादीकडे ठेवण्यात यश मिळवले आणि राजकारण सुरू झाले. शिर्डी हा एकमेव मतदारसंघ आहे जेथे अ‍ॅट्रॉसिटीचा मुद्दा खूप चर्चिला गेला.नीळ हवी की गुलाल असा जातीय प्रचार झाला आणि मराठा समाज गुलालाच्या बाजूने भगव्याला साथ देण्यास एकवटला.शरद पवारांनी आठवलेंना माढातून उभे करायला हवे होते, या मतदारसंघातून (पूर्वीचा आठवलेंचा पंढरपूर राखीव मतदारसंघ) अकलूजच्या विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आठवलेंना निवडून आणले होते; पण नगरमधले साखरसम्राट बेजबाबदारपणे वागले. त्यात विखे आणि थोरातांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे आठवलेंना राग येणे स्वाभाविक आहे; पण पवारांनी आठवलेंना या राजकारणाच्या खाईत लोटणे योग्य नव्हते. आयुष्यभर पवारांच्या ओंजळीने पाणी पिणारे आठवले पवारांच्या खेळीचेही बळी ठरले आहेत.रिपब्लिकन नेते एकत्र येऊ शकत नाहीत, ऐक्याची ताकद दाखवू शकत नाहीत. त्यामुळे राजकीय दबाव आणता येत नाही, ही वस्तुस्थिती मान्य करून आठवलेंनी निदर्शने थांबवली पाहिजेत, अन्यथा बौद्ध-मराठा यांच्यातील वैमनस्य अधिक वाढेल  ते समाजस्वास्थ्यासाठी घातक ठरेल. 

Read more...

Monday, May 18, 2009

शिवसेनेच्या गडाला सुरुंग



17 May, 2009 10


ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी विजय मिळवून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला.


ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी विजय मिळवून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. कल्याणमध्ये मात्र युतीचे आनंद परांजपे यांनी यश मिळवून युतीची लाज राखली. पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी अनपेक्षित विजय मिळवला. तर रायगड मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार बॅ. ए. आर. अंतुले यांना पराभवाचा हादरा बसला. या ठिकाणी शिवसेनेच्या अनंत गिते यांनी विजय मिळवला. शिवसेनेला भोवला फाजील आत्मविश्वासअनेक वर्षे ठाणे लोकसभा मतदारसंघावर अधिराज्य गाजवत पारंपरिक मतदारांना गृहीत धरणा-या शिवसेनेला यंदा प्रथमच हक्काच्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले. आपलाच मतदारसंघ असल्याच्या आविर्भावात गाफील राहण्याचा फाजील आत्मविश्वास शिवसेनेला या निवडणुकीत चांगलाच नडला. येथील मतदारांनी संजीव नाईक यांना विजयी करताना मनसेच्या पारड्यातही भरभरून मते टाकली. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आले.


यातच ‘कॉस्मोपॉलिटीन’ झालेल्या मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वडापाव चारून मराठी बाण्याचा हाकारा द्यायला सांगितला. मात्र महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेने डम्पिंग ग्राऊंड, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. याचा परिणाम निवडणुकीत दिसला. याशिवाय युतीच्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमीही मतदारांची नाराजी ओढवून घेण्यास कारणीभूत ठरली. यात भरीस भर टाकत मनसेच्या राजन राजे यांनी मतांचे धुव्रीकरण केल्याने नाईक यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला. ठाणेकर आपल्याच तालावर नाचतात, हा शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा फुटला, हेही या निकालावरून स्पष्ट होते.


राखली युतीची लाज भूकंपाचे हादरे बसावेत आणि उत्तुंग इमारती क्षणार्धात जमीनदोस्त व्हाव्यात अगदी अशीच परिस्थिती युतीची ठाण्यात झाली असताना कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार आनंद परांजपेंनी परांजपे यांनी विजय मिळवून शिवसेना-भाजप युतीची आक्षरश: लाज राखली. खरे तर परांजपे यांचा ठाणे हा मतदारसंघ. तरी पक्षाने त्यांना कल्याण हा नवीन मतदाससंघ दिला. त्यामुळे त्यांनी मिळवलेला हा विजय महत्त्वाचा आहे. काही महिन्यांपासून डावखरे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारात दिग्गज नेत्यांना उतरवून सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती, परंतु या सगळ्या प्रयत्नांनंतरही त्यांना यश आले नाही. युतीच्या बालेकिल्ल्यात मनसे फॅक्टर प्रभावी ठरला.


मनसेच्या वैशाली दरेकर यांना एक लाख मते मिळाल्याने येथील युतीचे मताधिक्य घटले. मनसेमुळे सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मनसेच्या मराठीच्या मुद्दय़ावरील आंदोलनाची ठिणगी कल्याण-डोंबिवलीत चांगलीच धगधगली होती. नंतर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पसरले होते. मनसेने युतीच्या बालेकिल्ल्यात मिळवलेली मते म्हणूनच युतीला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी आहेत.संतोष गायकवाड मुस्लिम फॅक्टरच ठरला निर्णायकनव्याने निर्माण झालेल्या भिवंडी मतदारसंघात मुस्लिम फॅक्टर महत्त्वाचा होता. या ठिकाणी युतीने जगन्नाथ पाटील यांना उमेदवारी देऊन हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. खरे तर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. पण आर. आर. पाटील यांनी बंडखोरी करून सपची उमेदवारी मिळवल्याने मतविभाजन होण्याचे आखाडे काही जणांनी बांधले होते.


परंतु त्यानंतरही येथील मतदारांनी काँग्रेसलाच पसंती दिली. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथेही मनसे फॅक्टरचा फटका युतीच्या उमेदवाराला बसला. १९८४च्या दंगलीनंतर भिवंडी हे शहर संवेदनशील म्हणून देशात ओळखले जाऊ लागले. त्यामुळे मुस्लिमांचे खरे कैवारी आपणच आहोत, असे समजणाऱ्या समाजवादी पक्षाने येथे आपले पाय रोवण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. समाजवादीने अलीकडे कल्याणसिंग यांच्याशी जवळीक साधल्याने येथील मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावला. त्याचे स्पष्ट चित्र या निवडणुकीत दिसले. या साऱ्याचा परिपाक म्हणजे काँग्रेसशिवाय आपणास पर्याय नाही, अशी मतदारांची समजूत झाल्याने त्यांनी काँग्रेसलाच भरभरून मते दिली. त्यामुळे काँग्रेसचा येथील विजय अधिक सुकर झाला. गटातटाच्या राजकारणाचा जाधवांना फायदाबहुजन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार बळीराम जाधव यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातून विजयाची मोहोर उमटवत प्रस्थापितांना पराभूत केले.


काँग्रेसचे माजी खासदार दामू शिंगडा, युतीचे अ‍ॅड. चिंतामण वनगा आणि माकपचे लहानू कोम असे दिग्गज उमेदवार असूनही जाधव विजयी होणे हा आ. हितेंद्र ठाकूर यांचाच करिश्मा म्हणावा लागेल. येथे शिंगडा यांच्याविषयी काँग्रेसमध्ये नाराजी होती. भाजपचे चिंतामण वनगा व माकपच्या लहानू कोम यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध नसला तरी त्यांची ताकद कमी पडली. शिवसेना कार्यकर्त्यांची आ. ठाकूर यांच्याशी जवळीक होती. त्याचा फटका युतीला बसला. माकपच्या कोम यांना जनता दलाचा पाठिंबा होता. पण त्याचा फायदा झाला नाही. आ. ठाकूर यांनी वसई विकास आघाडीची सारी ताकद जाधव यांच्या मागे उभी केली होती. त्यामुळे एका बाजूला ठाकूर आणि दुस-या बाजूला युती, आघाडी आणि माकप असे चित्र होते. त्यात ठाकूर आपला उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी ठरल्याने त्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


पालघर, डहाणू, तलासरी, बोईसर इत्यादी भागांतील नव्याने मतदारसंघात आलेल्यांनाही आकृष्ट करण्यात यश आले. पक्षांतर्गत बंडखोरीचा काँग्रेसला फटकारायगड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. ए. आर. अंतुले यांना प्रवीण ठाकूर व सिद्धार्थ पाटील यांच्या बंडखोरीचा चांगला फटका बसला. याबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाचे एकनाथ पाटील, बहुजन समाज पक्षाचे किरण मोहिते व श्रमिक मुक्ती दलाचे सुनील नाईक या सर्वाच्या उमेदवारीमुळे अंतुले यांना मतविभाजनाचा फटका बसेल, अशी चर्चा होत होती. त्याचा नेमका फायदा गीते यांना झाला. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे व काँग्रेसचे रवींद्र पाटील यांनी अंतुले यांना पाठिंबा दिला असला तरी तरुण वर्गाला अंतुलेंची उमेदवारी मान्य नव्हती. पक्ष शिस्तीचा भंग करून आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र प्रवीण ठाकूर तसेच पेणचे काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार ए. टी. पाटील यांचे पुत्र सिद्धार्थ पाटील यांनीही अंतुले यांना आव्हान दिले होते. त्याचाही येथे परिणाम झाला. शिवसेनेचे अनंत गिते यांना शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला होता. त्याचा चांगलाच फायदा गितेंना झाला. या मतदारसंघात मोठय़ा संख्येने असलेला आगरी व कोळी समाज शेकापबरोबर असून त्यांची एकगठ्ठा मते गिते यांच्या पदारात पडली. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अंतुले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही परिणाम या निवडणुकीत झाला.

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP