माहौल निवडणूक निकालांचा
विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्वाच्या नजरा राज्यात झालेल्या नगर परिषदांच्या निवडणूक निकालाकडे लागलेल्या होत्या.
विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्वाच्या नजरा राज्यात झालेल्या नगर परिषदांच्या निवडणूक निकालाकडे लागलेल्या होत्या. राज्यातील नगर परिषदा डोळय़ांसमोर ठेवून शिवसेना-भाजप या प्रमुख विरोधी पक्षांनी कापूस, सोयाबीन आणि धानाच्या भावाचे राजकारण केले होते. दिंडय़ा, मोर्चे आणि उपोषणाचे फड लावून घेतले होते. कापसाच्या भावाचे राजकारण आपल्या पथ्यावर पडतील आणि निकाल आपल्या बाजूने लागतील, अशी अपेक्षा विरोधकांना असल्यामुळे पहिल्या दिवशी सभागृहातील कामकाजापेक्षा सर्वाचे लक्ष निवडणूक निकालांकडेच होते.
शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी राज्यात झालेल्या विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विरोधक सभागृहात गोंधळ घालणार हे अपेक्षितच होते. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी काळे टी-शर्ट परिधान केले होते. त्यावर ‘आघाडी सरकार चले जाव,’ असे लिहिलेले होते. सभागृह सुरू झाले तेव्हा शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहाचे कामकाज एक तासासाठी तहकूब केले. पुन्हा कामकाज सुरू झाले तेव्हा दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शोकप्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर दोन्ही बाजूच्या सदस्यांची भाषणे झाल्यानंतर पुन्हा विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, सभागृहात सदस्य घोषणा देत असले तरी सर्वाचे लक्ष निवडणूक निकालांकडेच होते. अखेर कामकाज करणे अशक्य झाल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघातील निवडणूक निकाल जाणून घेण्यात गुंतून गेला. कुणाच्या किती जागा आल्या आणि कुणाच्या किती कमी झाल्या यापेक्षा सिंधदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपालिकांमध्ये काय निकाल आले, याचीच उत्सुकता सर्वाना लागली होती. खरेतर सावंतवाडी नगरपालिका काँग्रेसकडे नव्हतीच, राष्ट्रवादीकडे होती. वेंगुर्ले नगरपालिका या आधी त्रिशंकूच होती आणि मालवण नगरपालिकेत गेल्या वेळी काँग्रेसच्या नऊ जागा होत्या. या वेळी आठ आल्या आणि एक बंडखोराकडे गेली. एवढाच काय तो फरक झाला. मात्र प्रसारमाध्यमांनी नारायण राणे यांना केंद्रस्थानी ठेवून वृत्ते प्रसारित केली. पण काँग्रेस पक्ष त्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहिला आणि माध्यमांतील बातम्या योग्य नसल्याचे व अपु-या माहितीवर आधारित असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतही स्पष्ट केले.
विधान परिषदेतही वेगळी परिस्थिती नव्हती. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडला. त्यानंतर कापसाला भाव वाढवून देण्याच्या मुद्दय़ावर चर्चा मागून गोंधळ घालण्याची विरोधकांची रणनीती होती. मात्र सरकारने चर्चेची तयारी दर्शवल्याने गोंधळ घालण्याची संधीच विरोधकांना मिळाली नाही. कापासावरील चर्चेत दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी एकंदर शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतक-यांना भाववाढ मिळावी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या. या चर्चेदरम्यान भाजपचे पाशा पटेल आणि राष्ट्रवादीच्या उषा दराडे यांची उत्कृष्ट भाषणे झाली. कापसाच्या भावाचे राजकारण केल्यामुळे आपल्या बाजूने निकाल लागेल, या अपेक्षेने सकाळी खुललेल्या विरोधकांच्या चेह-यावरील उत्साह संध्याकाळी निकाल हाती पडताच सूर्याबरोबर मावळला.
0 comments:
Post a Comment