ब्रेकिंग न्यूजला राणेंचा ब्रेक
नगरपालिका निकालांनी वृत्तपत्रांची पाने रंगलेली असतानाच सोमवारप्रमाणे मंगळवारीही तीच चर्चा विधान भवन परिसरात होती.
नगरपालिका निकालांनी वृत्तपत्रांची पाने रंगलेली असतानाच सोमवारप्रमाणे मंगळवारीही तीच चर्चा विधान भवन परिसरात होती. मुंबई कोकणापासून विदर्भापर्यंत आणि मराठवाडय़ापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सर्व विभागांतून आलेल्या पत्रकारांच्या तोंडीही निवडणुकीचे विश्लेषण सुरू होते. त्यात अर्थातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निकाल आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांचा उल्लेख वारंवार येत होता. चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज त्याच झळकत होत्या. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी विधान भवन परिसरात काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयातच पत्रकार परिषद घेऊन ब्रेकिंग न्यूजला ब्रेक दिला. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच राणे यांनी पत्रकारिता आणि माध्यमांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला. कधी उपरोधानेचिमटा, तर कधी उपहासात्मक टीका, तर कधी वस्तुनिष्ठ मते मांडत त्यांनी आजच्या पत्रकारितेवर भाष्य केले.
आयबीएन लोकमत, झी 24 आणि स्टार माझा यांसारख्या वृत्तवाहिन्यांनी राणे यांच्याबाबत अत्यंत आकसाने वृत्ते दिली होती. ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकीवरच त्यांनी सर्व लक्ष केंद्रित केले होते. राणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी तसेच काँग्रेसमधील एका गटासह सर्व विरोधक एकत्र येऊन त्यांनी षड्यंत्र रचले होते. दहशत निर्माण करायची, गाडय़ांची मोडतोड करायची, काचा फोडायच्या, असे प्रकार घडवून राणे यांच्या नावाने बिल फोडायचे प्रकार सुरू असताना वृत्तवाहिन्या ‘राणेंचा राडा’ अशी निखालस खोटी वृत्ते प्रसारित करत होती. त्याचप्रमाणे सोमवारी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर वेंगुर्ले नगरपालिकेत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसल्याने वृत्त वाहिन्यांनी ‘राणे यांना दणका’अशी वृत्ते पसरवली. या ब्रेकिंग न्यूजचा राणे यांनी जोरदार समाचार घेतला.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच वृत्तपत्रे आणि माध्यमांनी दिलेली वृत्ते आणि आयोजित केलेल्या चर्चा पाहून काही जणांना आनंदाच्या उकळय़ा फुटल्या, असे सांगून पत्रकारितेला आज जे स्वरूप आले त्याचे पोस्टमार्टेमच राणे यांनी केले. पत्रकारितेचे आज जे अवमूलन झाले आहे, ते खरोखरच गंभीर आहे. त्याला राणे यांनी वाचा फोडली. ‘तुम्हा सर्वाचे अभिनंदन करण्यासाठीच मी स्वत: पत्रकार परिषद घेतली,’ असा टोला त्यांनी लगावला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची वृत्ते आणि निकाल यांना वृत्तपत्रे आणि वाहिन्यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे महत्त्व दिले. खरे पाहता आम्हालाच प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रात अनेक नेते आहेत. पण आपण सर्वानी माझे नाव छापले आणि माझ्या बातम्या दिल्या. त्याबद्दलही मी आपले अभिनंदन करतो, असा आणखी एक टोला त्यांनी लगावला.
नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या. शिवसेना-भाजप भुईसपाट झाले. तरी आपला पराभव विसरून राणेंच्या जागा कमी झाल्याच्याच त्यांना उकळय़ा फुटत होत्या. शिवसेना-भाजपचे अस्तित्वही कोकणात राहिले नाही. त्याच्या ब्रेकिंग न्यूज मात्र माध्यमांनी दिल्या नाहीत. कारण राणे यांचे नाव घेतल्याशिवाय वृत्तपत्रांचा खप आणि वृत्तवाहिन्यांचा टीआरपी वाढणार नाही, याची सर्वाना खात्री आहे. टीआरपीच्या मोहापायी धादांत खोटी वृत्ते दाखवली जातात. दोन-चार काचा फुटल्या, चार-दोन दगड मारले की,त्याच्या ब्रेकिंग न्यूज होतात आणि तेथे त्यांना राणेच दिसतात.
आपले ‘प्रहार’ दैनिक आहे. मात्र त्यात असला सवंगपणा केला जात नाही. भविष्यात आपले चॅनेल आले तरी ‘प्रहार’चीच परंपरा कायम राहील, असे सांगत राणे यांनी ब्रेकिंग न्यूजवाल्यांना चांगलाच ब्रेक लावला. पण राणे यांच्या नावाने टीआरपी वाढवणा-यांनी या पत्रकार परिषदेच्याही ब्रेकिंग न्यूज केल्याच.
0 comments:
Post a Comment