साधेपणाचा सत्कार
आदराने एखाद्यासमोर नतमस्तक व्हावे, अशी व्यक्तिमत्त्वे आजच्या राजकारणात पाहायला मिळत नाहीत.
आदराने एखाद्यासमोर नतमस्तक व्हावे, अशी व्यक्तिमत्त्वे आजच्या राजकारणात पाहायला मिळत नाहीत. भ्रष्टाचार आणि घोटाळे करणारेच राजकारणी असले पाहिजेत अशी राजकारण्यांची ओळख बनत चालली आहे, राजकारणाचा दर्जा घसरत चालला आहे. अशा वातावरणात गणपतराव देशमुखांसारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आजही विधिमंडळात आहे, याचा सार्थ अभिमान महाराष्ट्रातील जनतेला निश्चितपणे आहे. 50 वर्षे अखंडपणे एकाच सांगोला या मतदारसंघातून निवडून येऊन अत्यंत साधेपणा जपत जनतेचे प्रश्न तळमळीने सोडवण्यासाठी अव्याहत झटणारे गणपतराव देशमुख हे असे आदरणीय व्यक्तिमत्त्व विधानसभेत आहे, हा महाराष्ट्राचा गौरव आहे असेच म्हणावे लागेल. आज तत्त्वनिष्ठ आणि सत्त्वनिष्ठ राजकारण राहिलेले नाही, राजकारण व्यक्तिकेंद्री होत चालले असून राजकारणात आयाराम गयाराम प्रवृत्ती वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षावर असलेली निष्ठा कायम ठेवून राजकरणात टिकून राहणे आणि सलग दहा वेळा निवडून येणे अत्यंत कठीण आहे, पण गणपतरावांनी केवळ कामावर भर देऊन अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली आहे. अशा या साध्या सरळ व्यक्तिमत्त्वाचा सत्कार मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाने केला.
महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना भाजप युती या प्रमुख पक्षांना जनाधार मिळाला असून तिसरी आघाडी अथवा धर्मनिरपेक्षतावादी लहान पक्षांना लोकांचा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. या पक्षांचे अस्तित्व तरी राहील की नाही अशी स्थिती आहे.राजकारणाची दिशा बदलली असून राष्ट्रीय पक्ष मागे पडत चालले आहेत, प्रादेशिक पक्ष वाढत आहेत. असे चित्र बदलले असतानाही गणपतराव शेतकरी कामगार पक्षातर्फे निवडून येत आहेत. ज्यांचा आदर्श डोळय़ांसमोर ठेऊन गणपतराव शेकापमध्ये आले, ते तुलसीदास जाधव यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र गणपतराव आपल्या विचारांपासून विचलित झाले नाहीत.विधानसभेत उपस्थिती कमी असल्याबाबतच्या वारंवार तक्रारी येतात. नवीन सभागृहात आलेले आमदारही विधिमंडळांच्या कामकाजात फारसे गांभीर्याने सहभागी होताना दिसत नाहीत. मात्र या वयातही गणपतराव सभागृहात जास्तीत जास्त काळ उपस्थित राहातात. एखाद्या विषयावर काही वाद निर्माण झाला, तर त्याचा निर्णय कसा व्हावा याचे 50 वर्षाचे दाखलेच ते देतात.
केवळ लोकहिताच्या प्रश्नांवरच तळमळीने बोलत असल्यानेच ते जेव्हा सभागृहात उभे राहात, तेव्हा इतर सर्व सदस्य आदराने त्यांचे सर्व बोलणे जिवाचे कान करून ऐकतात. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटीलही त्यांना संधी देतात, हे त्यांनीच आजच्या सत्काराच्या वेळी बोलताना सांगितले. गणपतरावांनी हात वर केला म्हणजे ते नक्कीच सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न मांडतील याची खात्री असते. ते खरेही ठरते. त्यांचा आदर्श आमच्यासारख्या तरुणांसमोर कायम राहील, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही गणपतरावांच्या कार्याचा गौरव करताना राजकारणात अनेक प्रवाह आले, मात्र गणपतराव आपल्या विचारांवर अढळ राहिले, असे सांगितले. एका ऋषितुल्य व्यक्तिचा गौरव होत असल्याची भावना सर्वच उपस्थितांच्या चेह-यावर होती.
0 comments:
Post a Comment