विधिमंडळात आमदारांचा स्टंटबाजीवर जोर
दत्ताजी ताम्हाणे यांची वैचारिक उंची, अभ्यासू वृत्ती आणि जनहिताची आंतरिक तळमळ या वयातही कायम आहे. त्यांच्याकडे पाहून आमदारांना आपल्या वागणुकीबद्दल खेद वाटला पाहिजे पण दत्ताजींचा सत्कार सोहळा आटोपताच बेशिस्त वर्तनाबद्दल निलंबित झालेल्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर निलंबन रद्द करण्याची मागणी करण्यासाठी फलक फडकावत उभे राहून जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. विधानभवनात एकाच दिवशी हे परस्परविरोधी चित्र दिसले आणि आज विधिमंडळाचा दर्जा खरोखरच किती घसरला आहे त्याचे प्रत्यंतर आले.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये एक आदर्श लोकप्रतिनिधी अशी ख्याती मिळवलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हाणे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा सत्कार विधानभवनात गेल्या शुक्रवारी करण्यात आला. अभ्यासू, शिस्तप्रिय आणि जागरूक लोकप्रतिनिधी असलेले दत्ताजी विधानभवनात आले, त्यांनी तरुणाला लाजवेल अशा खणखणीत आवाजात आमदारांच्या बेशिस्त वर्तनावर बोट ठेवून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना खडे बोल सुनावले. दत्ताजी ताम्हाणे यांची वैचारिक उंची, अभ्यासू वृत्ती आणि जनहिताची आंतरिक तळमळ या वयातही कायम आहे. त्यांच्याकडे पाहून आमदारांना आपल्या वागणुकीबद्दल खेद वाटला पाहिजे पण दत्ताजींचा सत्कार सोहळा आटोपताच बेशिस्त वर्तनाबद्दल निलंबित झालेल्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर निलंबन रद्द करण्याची मागणी करण्यासाठी फलक फडकावत उभे राहून जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. विधानभवनात एकाच दिवशी हे परस्परविरोधी चित्र दिसले आणि आज विधिमंडळाचा दर्जा खरोखरच किती घसरला आहे त्याचे प्रत्यंतर आले.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न, तसेच आमदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्यासाठी आणि कायदे करण्यासाठी सभागृहाच्या वेळेचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे, परंतु मूळ प्रश्न राहिले बाजूला, जनहिताच्या प्रश्नांना बगल देऊन सवंग प्रसिद्धीसाठी भावनिक आणि राजकीय मुद्द्यांचे भांडवल करण्यावर विरोधी पक्षाचा भर दिसत आहे. दिवेआगर येतील सुवर्ण गणेशमूर्ती चोरी प्रकरणाचा त्वरित तपास करावा, या मागणीसाठी सभागृहात बेशिस्त वर्तन करणा-या शिवसेनेच्या तेरा आणि भाजपच्या एका आमदाराला निलंबित करण्यात आले होते. त्यांचे निलंबन एक वर्षासाठी असल्याचे घोषित करण्यात आले होते, पण निलंबनाचा कालावधी कमी करावा आणि याच अधिवेशनात निलंबन रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेसह भाजप, मनसे यांनी केली होती, शुक्रवारी निलंबन मागे घेतल्याची घोषणा होईल, असा विरोधी पक्षाचा अंदाज होता पण तसे घडले नाही. शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांनी सभागृहात आणि बाहेर निलंबन रद्द करण्याची आग्रही मागणी केली. उघडपणे आक्रमकपणा दाखवला असला तरी प्रत्यक्षात युतीचे नेते सत्ताधा-यांची आणि विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची मनधरणी करीत होते. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असून देवांच्या मूर्तीही चोरल्या जात आहेत. याबाबत सरकारवर प्रखर हल्ला चढवला, टीकेचे आसूड ओढले, चोराचा तपास लावण्यास विलंब लागत असल्याबद्दल सरकारविरोधी घोषणा देणे समजू शकते पण सभागृहात महाआरती करणे आणि गृहखात्याला जाग आणण्यासाठी महाआरती केली असे समर्थन करणे मुळात चुकीचेच होते.
आमदारांनी अशा प्रकारचे नियमबाह्य वर्तन करून निलंबन ओढवून घेतले आणि जेव्हा एक वर्षासाठी निलंबन झाले तेव्हा पायाखालची वाळू सरकली आणि निलंबन मागे घेण्यासाठी सरकारच्या दारात उभे राहण्याची वेळ आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांना वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा का, हा प्रश्न उभा राहिला. आमदाराला मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी तेथील लोकांनी निवडून दिलेले असते, निलंबन ओढवून घेण्यासाठी नाही, याचे भान ठेवले जात नाही. आमदाराला मतदारसंघाचे काम करता आले पाहिजे, या भूमिकेतून निलंबनाचा कालावधी कमी केला पाहिजे, एक वर्षाचा निलंबन कालावधी जास्त आहे, चालू अधिवेशन काळापुरते निलंबन असावे, अशी सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या आमदारांची भावना आहे, पण आमदारांनीही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि सरकारनेही किती ताणायचे याचे भान ठेवले पाहिजे.
यापूर्वी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शिवसेना-भाजप आमदारांनी सभागृहात कापूस आणला होता आणि विधानभवनाच्या प्रवेशद्वारापाशी कापसाच्या झाडांना आग लावली. कापूस जाळल्याप्रकरणी आमदारांना निलंबित करणे भाग पडले, ठिणग्या उडून विजेच्या तारांवर पडल्या असत्या तर शॉर्टसर्किट होऊन विधानभवनाला आग लागण्याचा धोका होता, अशी भीती खुद्द अध्यक्ष वळसे पाटील यांनी व्यक्त केली होती.
मनसेविरुद्ध सपा हा वाद तर 2009 ची विधानसभा अस्तित्वात येण्याआधीपासून बनला होता. पहिल्याच अधिवेशनात सदस्यांचा सभागृहात शपधविधी सुरू असताना सपाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी हिंदीत शपथ घेण्याबाबत मनसे आमदारांनी आक्षेप घेतला आणि आझमी शपथ घेत असताना त्यांच्यावर चाल करून गेले. शपथ घेऊन आझमी खाली उतरले तेव्हा धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे गदारोळ झाला आणि मनसेच्या चार आमदारांना निलंबित करावे लागले. परंतु विधान परिषद निवडणुकीसाठी मांडवली करून सरकारने त्यांचे निलंबन रद्द केले. दिवेआगर गणेशमूर्ती चोरी प्रकरणी महाआरती केल्याचे समर्थन शिवसेनेने केले तसे मराठी अस्मितेसाठी आझमींचा अवमान केला, असा तात्त्विक मुलामा देऊन आपल्या कृत्याचे मनसेने समर्थन केले होते.सभागृहात बेशिस्त वर्तन करणा-यांवर निलंबनाची कारवाई केली पाहिजे. अशा प्रकारची कारवाई संसदेतदेखील केली जाते परंतु तिथे निलंबनाचा कालावधी जास्त नसतो, तसा इथेही कमी असावा, मात्र बेशिस्तीची पुनरावृत्ती होऊ नये याची समज दिली जावी. आज राजकारणात सवंग प्रसिद्धीसाठी सभागृहात बेशिस्त वर्तन केले जाते. निलंबित आमदारांची छायाचित्रे वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असतात,वृत्तवाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात, बेशिस्त वर्तन करणा-यांना प्रसिद्धी मिळते. त्यांचा खरा चेहरा त्यांच्या मतदारसंघातील लोकांना दिसला पहिजे हे खरेच. पण शिस्तप्रिय, अभ्यासू आणि कामकाजात सतत सहभागी होत असलेल्या आमदारांना प्रसिद्धी मिळत नाही. दत्ताजी ताम्हाणे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, ‘पत्रकार चांगल्या गोष्टींचे वार्ताकन करीत नाहीत त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला विधिमंडळात काय काम चालले आहे हे कळत नाही.’ आमदारांच्या बेशिस्त वर्तनाबरोबरच आजच्या पत्रकारिते-वरदेखील त्यांनी ताशेरे ओढले आहेत.
आमदारांनी विविध आयुधांचा वापर करून मतदारसंघातील प्रश्न सोडवून घेतले पाहिजे, गडबड गोंधळ करून सभागृहाचा वेळ वाया घालवू नये, अधिवेशनावर करोडो रुपयांचा खर्च होतो याची जाणीव ठेवावी, कामकाज गांभीर्याने करावे, अशी त्यांच्या मतदारसंघातील लोकांची रास्त अपेक्षा असते. परंतु राजकीय मुद्द्यांवर वादावादी, भावनिक मुद्द्यांवर गोंधळ आणि प्रश्नांबाबत गांभीर्याचा अभाव अशी युतीच्या आमदारांची प्रतिमा बनत चालली आहे. स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याकडे कल वाढला आहे. आझमींनी िहदीत शपथ घेतली, गणेशमूर्तीची चोरी झाली अथवा विधानभवनाच्या आवारात कापूस जाळला म्हणून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. विधिमंडळात सगळेच बेशिस्त वर्तन करतात असे म्हणणे योग्य ठरणार नाही, आजही गणपतराव देशमुख यांच्यासारखे 50 वर्षे विधानसभेत निवडून येणारे ज्येष्ठ सदस्य सभागृहात अत्यंत पोटतिडकीने प्रश्न मांडत असल्याचे दिसते, प्रश्न सोडवून घेतल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. काही तरुण आमदारही कामकाजात रस घेत असल्याचे दिसून येते. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, नाना पटोले, बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर,शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, प्रशांत ठाकूर, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, पंकजा मुंडे पालवे असे अनेक तरुण आमदार राज्यासमोरील प्रश्नांसह मतदारसंघातील प्रश्न हिरीरीने मांडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे विधिमंडळाचा खालावलेला दर्जा सुधारण्याची जबाबदारी कामाची तळमळ असणारे आमदार घेतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नसावी.
0 comments:
Post a Comment