विरोधकांची बोलती बंद
आज विधानसभेतील प्रश्नोत्तराचा तास राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी चांगलाच गाजवला. त्यांची समयसूचकता आणि सतर्कता पाहून विरोधकांची बोलतीच बंद झाली.
आज विधानसभेतील प्रश्नोत्तराचा तास राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी चांगलाच गाजवला. त्यांची समयसूचकता आणि सतर्कता पाहून विरोधकांची बोलतीच बंद झाली. हा त्यांचा प्रभाव प्रश्नोत्तराच्या तासातील पहिल्या प्रश्नापासूनच जाणवू लागला. भाजपच्या एका आमदाराने प्रश्न मांडताना नमनाला घडाभर तेल, घालण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याची ही लांबलचक पूर्वपीठिका ऐकत असलेल्या नारायण राणे यांनी त्या आमदाराला मुद्दय़ावर येण्याचे फर्मान सोडले असता, त्याने एका मिनिटात कसाबसा प्रश्न मांडला आणि उत्तर ऐकून त्याचा आवाजच बंद झाला. आपल्या प्रश्नावर एकही उपप्रश्न विचारण्याचे धाडस त्या आमदाराला आणि त्याच्यासोबत प्रश्न मांडणा-या दुस-या आमदारालाही झाले नाही.
राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात चर्चिले जातात. 45 दिवस आधी प्रश्न दिला जातो आणि सरकारकडून संपूर्ण माहितीसह त्यावर उत्तर दिले जाते. पण, त्या माहितीने समाधान झाले नाहीतर प्रश्नकर्ते आमदार उपप्रश्न विचारून प्रश्नाची सोडवणूक करून घेत असतात. अनेकदा एकेका प्रश्नावरील चर्चा अर्धा-पाऊण तासदेखील चालते. पण काहीवेळेला प्रश्नांचे गांभीर्य लक्षात न घेताच आणि अभ्यास न करताच प्रश्न मांडला गेला तर, नामुष्की ओढवून घेण्याची वेळ सदस्यांवर येत असते. त्याचा प्रत्यय आज सभागृहात आला.
कुडाळचे भाजप आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्गातील अनधिकृत नौकांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी पाठिंबा दिला होता. या दोघांच्या नावाने प्रश्नोत्तराच्या यादीवर आलेला हा प्रश्न उपस्थित करताना जठार यांनी अनधिकृत नौकांबाबत पूर्वपीठिका सांगण्यास सुरुवात केली असता, राणे यांनी मध्येच हस्तक्षेप करून त्यांना मुद्दय़ाचे बोला, असे सुनावले.
त्यावर मंत्र्यांची सूचना शिरसावंद्य मानून आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे जठार यांनी मुद्दय़ाचा प्रश्न विचारला. या प्रश्नाला राणे यांनी नेमके उत्तर दिले आणि एका मिनिटात प्रश्नाची चर्चा संपली. राणेंच्या उत्तरावर त्यांच्याकडे एकही उपप्रश्न नव्हता. त्यांच्यासोबत असलेले प्रश्नकर्ते रवींद्र वायकर हे तर प्रश्न विचारण्यास उठलेच नाहीत. त्यांची बोलती आधीच बंद झाली होती. खरेतर, राणे यांनी या प्रश्नाचे सविस्तर लेखी उत्तर दिलेच होते. त्यामुळे उपप्रश्नांचा प्रश्नच उद्भवत नव्हता. तरीदेखील जठार यांनी प्रश्न विचारताना पूर्वपीठिका सुरू केली होती.
दुस-या एका प्रश्नावरही असेच घडले. जवळजवळ अध्र्या तासाहून अधिक वेळ एका प्रश्नावर सुरू असणारी चर्चा पाहून नारायण राणे यांनी विरोधकांचा आवाज बंद केला. बेस्ट फाइव्ह सूत्र अंमलात आणण्यासंदर्भातील प्रश्नावर शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आणि राज्यमंत्री फौजिया खान यांच्याकडून योग्य उत्तर मिळत नसल्याचा आरोप करून प्रश्न राखून ठेवण्याची मागणी विरोधकांनी केली आणि सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राणे यांनी ज्येष्ठ मंत्री या नात्याने हस्तक्षेप करून शिक्षणमंत्र्यांनी तुम्हाला अनुकूल असे उत्तर दिले पाहिजे, असे बंधनकारक नाही, असे ठासून सांगितले. तसेच शिक्षणमंत्र्यांनी प्रश्नांची दिलेली उत्तरे योग्य असल्याचे सांगून प्रश्न राखून ठेवण्याची विरोधकांची मागणी फेटाळून लावली. त्यांनी दिलेले रोखठोक उत्तर ऐकून विरोधकांची बोलतीच बंद झाली आणि सभागृहातील वातावरण शांत झाले. एका लक्षवेधी सूचनेवर नारायण राणे यांना लक्ष्य केले जात असल्याचा मुद्दा मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला. पत्रकार हल्ला विरोधी कायदा मसुदा समितीच्या अध्यक्षांवर अविश्वास दाखवण्यात येत असून, त्यांना बदलण्यात यावे, अशी मागणी काही पत्रकारांकडून केली जात आहे. याकडे नांदगावकर यांनी लक्ष वेधले. या समितीच्या अध्यक्षपदी नारायण राणे आहेत. त्यावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राणे यांना बदलण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट नकार दिला असल्याचे सांगून, हा विषय बंद करून टाकला. त्यावर विरोधकांनीही आवाज उठवला नाही.
0 comments:
Post a Comment