निमित्त आबा, लक्ष्य दादा
अपेक्षेप्रमाणे मावळ गोळीबाराचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. कामकाज सुरू होण्याआधीच विधानभवनाच्या दारात सरकारविरोधी घोषणा देऊन विरोधकांनी दिवसाची सुरुवात केली.
अपेक्षेप्रमाणे मावळ गोळीबाराचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. कामकाज सुरू होण्याआधीच विधानभवनाच्या दारात सरकारविरोधी घोषणा देऊन विरोधकांनी दिवसाची सुरुवात केली. तोच जोश आणि आवेश त्यांनी सभागृहातही ठेवला. सभागृहाचे कामकाज गोंधळ, गदारोळाने अनेकदा तहकूब करण्याची वेळ आणली. पोलिसांनी केलेल्या लाठीमार आणि गोळीबाराची नैतिक जबाबदारी गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांच्यावर येत असल्याने विरोधकांनी आबांना लक्ष्य करून त्यांचा राजीनामा मागणे अपेक्षित होते. पण आबांचे निमित्त करून त्यांनी अजितदादांनाच लक्ष्य केल्याचे दिसले.
आबा गृहमंत्री असले तरी त्यांच्या नेतृत्वाखालील पोलिस दलावर त्यांचा अजिबात अंकुश नाही, नियंत्रण नाही आणि त्यांचे कोणी ऐकत नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागून तरी काय होणार, अशी त्यांची खिल्ली विरोधी सदस्य आपल्या भाषणात उडवत होते. त्यामुळे संतापलेल्या आबांनी विरोधकांवर बेछूट आरोप केले. पण विरोधकांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यांचे लक्ष्य होते केवळ दादा.
उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनीच मावळच्या पवना धरणाचे पाणी जलवाहिनीतून पिण्यासाठी नेण्याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. परंतु, जलवाहिनी होणारच, असा आक्रमक पवित्रा अजितदादांनी घेतल्यामुळे शेतकरी चिडले आणि चिडलेल्या शेतक-यांच्या असंतोषाचा राजकीय फायदा घेण्यासाठी शिवसेना-भाजप हे विरोधी पक्ष पुढे सरसावले. ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून याच दिवशी सरकारला धडा शिकवायचा, या निर्धाराने आंदोलन आक्रमक करण्यात आले. मात्र आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. गोळीबारात निष्पाप माणसांचे बळी गेले. काही जण जखमी झाले, त्याबद्दल विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांच्यासह शिवसेना, मनसे,शेकापच्या सदस्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. जलवाहिनीला विरोध केला तर पोलिस बळाचा वापर केला जाईल, अशी धमकी अजितदादांनीच दिल्याचा थेट आरोपही विरोधकांनी केला. दादांनी मनमानीपणे घेतलेल्या निर्णयाचा समाचार घेताना त्यांच्या ‘टगेगिरीचा’ वारंवार उल्लेख त्यांनी केला. त्यांची टीका आबा-दादांनी शांतपणे ऐकून घेत प्रसंगाचे गांभीर्य कायम राखले. पण जेव्हा चर्चेला उत्तर देण्याची वेळ आली तेव्हा दादांनी आपला दांडपट्टा असा काही सुरू केला की त्याचे फटके अनेकांना चांगलेच झोंबले.
भाजपचे विधान परिषदेचे सदस्य विनोद तावडे यांनी डान्सबार सुरू असताना आर. आर. आबांनी ते बंद असल्याचे कालच सांगितले. पण काल रात्रीच सुरू असलेल्या डान्सबारची सीडी आपण आणली असून ती पाहावी, असा गौप्यस्फोट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. तसेच अजितदादा सगळे झोपेत असताना गुपचूप सकाळी सहा वाजता घटनास्थळी भेट देण्यास गेले, अशी टीका विरोधकांनी केली होती. त्यावर रात्रभर डान्सबारमध्ये जाऊन चित्रीकरण करणारे सकाळी कसे उठतील, असा सणसणीत टोला लगावून विरोधकांची त्यांनी बोलतीच बंद केली. जलवाहिनी करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार असताना गजानन बाबर यांनीच केली होती, असा गौप्यस्फोट करून आपल्यावर होत असलेल्या आरोपांना त्यांनी सडेतोड उत्तर दिले.
विधानसभेत अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी तर विधान परिषदेत उपसभापती वसंत डावखरे यांनी सदस्यांची चांगलीच कानउघाडणी केली. विधानसभेत सर्व विरोधी सदस्य अध्यक्षांसमोर वेलमध्ये घोषणा देताना मावळचे भाजप आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी व्यासपीठावर जाऊन अध्यक्षांसमोरील राजदंड उचलून घेतला. त्यांना अध्यक्षांनी चांगलाच दम भरला. राजदंड आणून ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी सुनावताच एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांनी राजदंड जागेवर नेऊन ठेवला आणि अध्यक्षांनी आपण हेडमास्तर असल्याचे सिद्ध केले.
0 comments:
Post a Comment