एका झंझावाताचा एकसष्टाव्या वर्षात प्रवेश
महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण, ते सोडवण्याची तळमळ, विकासाला गती देण्यासाठी अथक मेहनत करण्याची तयारी, गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावर घट्ट पकड, लोकांचे तसेच कार्यकर्त्यांचे संघटन करण्याचे कौशल्य, संसदीय कामकाजाचा सखोल अभ्यास, अत्यंत प्रभावी कर्तृत्व आणि वक्तृत्व असे नेतृत्वाचे सर्व गुण ज्यांच्या ठायी एकवटले आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे हे उद्या 10 एप्रिल रोजी एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण ते सोडवण्याची तळमळ, विकासाला गती देण्यासाठी अथक मेहनत करण्याची तयारी, गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावर घट्ट पकड, लोकांचे तसेच कार्यकर्त्यांचे संघटन करण्याचे कौशल्य, संसदीय कामकाजाचा सखोल अभ्यास, अत्यंत प्रभावी कर्तृत्व आणि वक्तृत्व असे नेतृत्वाचे सर्व गुण ज्याच्याठायी एकटवले आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे हे उद्या (दहा एप्रिल) एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. साठ वर्षाच्या आयुष्यात बालपणापासून एकापाठोपाठ आलेल्या अडचणींवर त्यांनी मात केली. लहानपणीच वडिलांचे कृपाछत्र हरपल्यानंतर आईच्या समवेत आपल्या मोठय़ा कुटुंबाची जबाबदारी त्यांनी पेलली. पुढे संसारात त्यांच्या सुशील पत्नी सौ. निलम राणे यांच्या सोबतीने समोर उभ्या राहिलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे शोधताना त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. संघर्षाची आव्हाने त्यांनी राजकारणातही समर्थपणे पेलली. एक शिवसैनिक म्हणून राजकारणात वावर सुरू केला असताना कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभावे.याकरिता उद्योजक बनून त्यांनी स्वत:ला आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी केले. अनेक राजकीय नेत्यांनी राजकारणाचा वापर वैयक्तिक आर्थिक स्वार्थासाठी केला. तसा आरोप राणे यांच्यावर होऊ शकत नाही. स्वत:चे उद्योग-व्यवसाय त्यांनी उभारले आहेत. राजकारण हे केवळ समाजहित आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी करीत असल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे. त्यामुळेच आज एकसष्टीच्या उंबरठय़ावर उभे असताना समृद्ध जीवन जगणारा, प्रगल्भ, मुसद्दी राजकारणी तसेच गोरगरीबांच्या व्यथा जाणणारा आणि राज्याच्या विकासाचा ध्यास असणारा लोकनेता, अशी त्यांची प्रतिमा बनली आहे.
राज्याच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या बोटावर मोजण्या इतक्या नेत्यांमध्ये आज राणे यांचे नाव घेतले जाते आहे. आपल्या सुमारे चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत चढ-उतारांचा अनुभव घेणारे नारायण राणे आयुष्याच्या एका संयमी, संयत, समतोल जाणिवेच्या टप्प्यावर उभे आहेत. राजकारणात राणे ते एक जबरदस्त मुसद्दी राजकारणी तर आहेतच पण लोकशाही राज्य व्यवस्थेमध्ये राजकीय नेता कसा असावा, त्याचा वस्तुपाठ त्यांच्या राजकीय कारकीर्दीने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निश्चित दिला आहे. गोरगरीबांचे राहणीमान उंचावण्यापासून महाराष्ट्राला जगाच्या नकाशावर एक समृद्ध राज्य बनवण्यापर्यंत योजनांची ब्लू पिंट्र त्यांच्या मनात आणि विचारात आहे.
त्यांची कार्यपद्धती पाहून ज्येष्ठ नेते स्वर्गीय वसंतदादा पाटील यांची आठवण येते. मदतीसाठी त्यांच्या दारात येणारा रिकाम्या हाताने परत जाणार नाही. याची काळजी त्यांनी सतत घेतली आहे. मदतीसाठी समोर आलेल्या हजारो हातांना त्यांनी बळ दिले आहे.महाराष्ट्राच्या पुनर्बाधणीसाठी आपल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देत असतानाच काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे हात बळकट करण्याच्या दिशेने त्याची राजकीय वाटचाल सुरू आहे. राजकारणातील हेवेदावे, द्वेष, मत्सर, शह-काटशह आणि कुरघोडय़ांचे राजकारण बाजूला सारून, सर्व प्रकारचे मतभेद दूर करून राज्याच्या हितासाठी मने जोडण्याचे ध्येय त्यांनी ठेवले असल्याचे त्यांच्या वैचारिक भूमिकेतून दिसून येत आहे.
राजकारणात नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते या सर्व पदांवर त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. उच्च विद्याविभूषित नसले तरी अभ्यासूवृत्तीने त्यांनी मोठमोठय़ा शिक्षणतज्ज्ञांना आणि अर्थतज्ज्ञांना मागे टाकतील,असे विचार आणि भूमिका वेळोवेळी मांडले. त्यानुसार धोरणे आखली, निर्णय घेतले आणि त्याच्या अंमलबजावणीवर भर दिला.सर्वसाधारण सामान्य कुटुंबातील गिरणी कामगाराचा मुलगा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावाने शिवसैनिक बनतो आणि त्यांच्या प्रगतीचा आलेख मुख्यमंत्रीपदापर्यंत उंचावत जातो.
त्यातून एक अनुभवसंपन्न राजकीय नेतृत्व उदयास येते. आणि त्याचे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचते. नारायण राणे यांचे असे आगळे-वेगळे व्यक्तिमत्त्व घडले कसे, याची उत्सुकता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच आहे.
मुंबई आणि कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. तळकोकणाचे मूळ रहिवासी असलेल्या राणे यांच्यासारख्या असंख्य शिवसैनिकांनी शिव छत्रपतींच्या नावाचा जयघोष करणा-या बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानले होते. मात्र शिवसेनेने पुत्र प्रेमापोटी पक्षातील समर्थ नेतृत्वाला बाजूला सारले. मात्र, शिवसेना नेतृत्वाबरोबरचे मतभेद टोकाला पोहोचलेले असतानाही नारायण राणे यांनी विधायक कार्य आणि विधिमंडळातील कामकाज यावर परिणाम होऊ दिला नाही. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत कार्यक्षमपणे पार पाडली. तत्कालीन विलासराव देशमुख सरकारला जनतेच्या प्रश्नावर पळताभुई थोडी करण्याची धडाडी राणे यांनी दाखवली होती. एकीकडे सरकारशी दोन हात करण्याची जिद्द आणि दुसरीकडे कामात व्यत्यय आणणा-या शिवसेना नेतृत्वाला शह, अशा दोन्ही बाजूंनी त्यांनी समर्थपणे लढा दिला.
एवढेच नव्हे तर शिवसेनेविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला असता, विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी त्यांनी संसदीय लढाईदेखील लढली.अखेर शिवसेनाप्रमुखांनीच त्यांना बाहेर काढले. शिवसेनाप्रमुख त्यांना वंदनीय असले तरी स्व:कष्टाने पुढे आलेला स्वाभिमानी नेता अपमान किती दिवस सहन करणार. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपदी नारायण राणे यांनी केलेल्या कामाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक वेळा कौतुक केले होते. राणे पक्षाबाहेर गेले आणि शिवसेनेची पडझड सुरू झाली. दरम्यानच्या काळात त्यांची भविष्यातील वाटचाल काय राहील, याविषयी तर्कवितर्क सुरू झाले. अखेर मुख्य राष्ट्रीय प्रवाहातील काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला. शिवसेनेत पळापळ सुरू झाली. मालवणच्या पोटनिवडणुकीत राणे यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना रस्त्यावर उतरवले होते. पण कोकणच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या राणे यांच्यासमोर शिवसेनेचा टिकाव लागला नाही. प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असते. नारायण राणे यांची महत्त्वाकांक्षा देखील लपून राहिलेली नाही आणि त्यात काहीही गैर नाही. राणे यांचे नेतृत्व बहरू लागले तसेच राजकारणात त्यांचे स्पर्धक वाढू लागले.त्यातूनच त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न होऊ लागले. मात्र, त्या सर्वाना राणे पुरून उरले.
काँग्रेसमध्ये आवश्यक असलेली कार्यपद्धती आणि मुसद्देगिरी त्यांनी आत्मसात केली आहे. राणे यांना काँग्रेस कळली नाही, ते खरे काँग्रेसी झालेच नाही, असे सुरुवातीपासून राजकीय वर्तुळात बोलले जात होते. मात्र, सोनिया गांधी यांना भेटून आल्यानंतर एकही शब्द न बोलणा-या राणे यांचे हल्ली काँग्रेस पक्षात कौतुक होत आहे. त्यांनी आपण पक्के काँगेसी झाल्याचे सिद्ध करून दाखवले आहे.सरळ स्वभाव, स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमकपणे प्रतिवाद करण्याचे कसब असलेले राणे आज आक्रमक नेते तर आहेतच पण विधायक कामासाठी मित्रपक्ष राष्ट्रवादीशी सलोख्याचे संबंध त्यांनी वाढवले आहेत. दिलखुलासपणा बरोबरच सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या नेते आणि कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत मैत्रीचे संबंध त्यांनी ठेवले आहेत. आजमितीस महाराष्ट्रात एक परिपूर्ण समतोल आणि तेवढेच आक्रमक राजकीय नेते, अशी त्यांची प्रतिमा बनली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्राला राणे यांच्यासारखे कणखर, धाडशी आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असलेले नेतृत्व हवे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत असते.त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा.
0 comments:
Post a Comment