Monday, February 27, 2012

जड झाले ओझे..

उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेनेची सूत्रे आल्यापासून शिवसेना-भाजपमध्ये सुसंवाद राहिला नव्हताच. उलट दूरध्वनीवरदेखील संवाद होत नव्हता. गडकरी-मुंडे यांचे फोन बाळासाहेबापर्यंत पोहोचत नव्हते. उद्धव यांनी बाळासाहेबांना नजरकैदेत ठेवले आहे, अशी चर्चा भाजप गोटात होत होती. अखेर अत्यंत सरळ आणि स्पष्टवक्ते असलेल्या गडकरींची सहनशीलता संपली. शिवसेनाप्रमुखांना केलेले फोन त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तसेच ‘सामना’ दैनिकातून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सतत टीका छापून येत असते, असे जाहीर वक्तव्य करून गडकरींनी शिवसेनेला धक्क्याला लावू शकतो, असा संदेश दिला आहे.


शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीची घोषणा होताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि डाव्या बाजूला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले व्यासपीठावर उभे आहेत. महायुतीची घोषणा करण्यात आली आहे. अशा वेळी या तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या हातात हात गुंफून आणि हे गुंफलेले हात उंचावून महायुती झाल्याचे सर्वाना दाखवत आहेत, असे दृष्य दिसेल अशी लोकांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांनी आपला उजवा हात आपल्या डाव्या हाताला असलेल्या रामदास आठवलेंच्या हातात दिला आणि सुधीर मुनगंटीवारांनी उजव्या बाजूने वाकून त्या दोघांचा हात हातात घेतला. याचा अर्थ डाव्या हाताला असलेल्या आठवलेंच्या हातात उजवा हात देताना उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. हे दृश्य वृत्तवाहिन्यांवर उभ्या महाराष्ट्राने पाहिले. खरे तर डाव्या विचारांच्या आठवलेंच्या हातात डावा  हात चालला असता आणि उजव्या विचाराच्या मुनगंटीवाराच्या उजव्या हातात पूर्वीप्रमाणेच हात देता आला असता. पण आठवले भेटल्याबरोबर शिवसेनेने उजव्यांना डाव्याची वागणूक देणे सुरू केले. त्यामुळे भाजपमध्ये चांगलीच नाराजी पसरली. या पूर्वीदेखील वेळोवेळी शिवसेनेने भाजपला कमी लेखून आपलीच शिरजोरी दाखवली आहे.

शिवसेनाप्रमुखांपासून ते संजय राऊतांपर्यंत सगळेच भाजप आणि त्यांच्या नेत्यांची खिल्ली उडवत होते. गेली 25 वर्षे अधूनमधून हा प्रकार सहन करणाऱ्या भाजपचा कडेलोट झाला आहे. शिवसेनेचे हे जड झालेले ओझे आता उतरवावे अशा मनस्थितीत भाजप असल्याचे नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने दाखवून दिले आहे.

शिवसेना-भाजप युती यापूर्वीदेखील अनेकदा तुटण्याच्या मार्गावर होती. पण भाजपने कमीपणा घेऊन जमवून घेतले होते. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून शिवसेनेचे खासदार कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सतत भाजप आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध लिखाण सुरू ठेवले होते. जेव्हा जेव्हा युती धोक्यात आली तेव्हा युतीचे शिल्पकार असलेल्या प्रमोद महाजनांनी जुळवून घेतले होते. गेल्या सप्ताहात अशी वेळ आली तेव्हा गोपीनाथ मुंडेंनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. महाजनांच्या भूमिकेत मुंडे शिरले असले तरी नितीन गडकरी कितपत प्रतिसाद देतील याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. गडकरींनी शिवसेनेची भाजपबाबत असलेली भूमिका आणि भाजपबाबत शिवसेनेची बदलेली वर्तवणूक पाहता युती ठेवायची की नाही, यासंबंधी भाजपने गांभीर्याने विचार केलेला दिसतो. त्यामुळेच गडकरींनी त्यांच्याबाबत रोखठोक वक्तव्य केले. भाजपला मनसेच्या रूपाने नवा मित्र मिळणार असल्याने शिवसेनेशी युती मोडू शकते, याचा अंदाज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आला असावा त्यामुळे ठाकरेंनीच भाजप नेत्यांना पाचारण केले असावे. या बैठकीला नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे दोघेही उपस्थित नव्हते. त्यामुळे इतरांच्या समवेत युतीचा खुंटा हलवून घट्ट करावा असा पोक्त विचार शिवसेनाप्रमुखांनी केलेला दिसतो. बाळासाहेबांनीदेखील भाजपला फटकारले आहे. कमळाबाई असे संबोधून त्यांची अवहेलना केली आहे. अटलबिहारी वाजपेयी वगळता इतरांवर त्यांनी वेळोवेळी टीका केली आहे. मनसे संबंधांमुळेदेखील भाजपची कानउघाडणी त्यांना करता आली असती. पण शिवसेनेची गेल्या विधानसभा आणि यावेळी झालेल्या महापालिका निवडणुकांतील घसरण झालेली पाहता भाजपशी दोस्ती मोडणे महागात पडेल यांची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी भाजपच्या हातात आपला उजवा हात देण्याचे ठरविले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची मोठी पडझड झाली. नारायण राणे यांच्यापाठोपाठ राज ठाकरे बाहेर पडले होते. त्याचा जोरदार धक्का बसून शिवसेनेचे बुरूज ढासळले. शिवसेना-भाजप युतीच्या निवडणूक फॉम्र्युल्याप्रमाणे शिवसेनेने 171 जागा लढवून त्यांच्या 45 जागा निवडून आल्या तर भाजपने केवळ 117 जागा लढवून त्यांच्या शिवसेनेपेक्षा दोन जास्त म्हणजे 47 जागा आल्या. साहजिकच विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे गेले. विधानसभेबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपददेखील भाजपकडे आहे. महानगरपालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेची घसरण झाली असून भाजपने मात्र आपल्या जागा कायम राखत काही ठिकाणी आपली ताकद वाढवली आहे. मुंबई महापालिकेत शिवेसनेच्या जागा कमी झाल्या असून भाजपच्या जागा वाढल्या आहेत. नागपूरमध्ये नितीन गडकरींनी भाजपला चांगले यश मिळवून दिले आहे. तेथे भाजपच्या सहा जागा वाढून एकूण संख्या 62 झाल्या आहेत. तर शिवसेनेच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. अकोल्यामध्ये शिवसेनेला केवळ एक जागा अधिक मिळाली आहे. तर भाजपच्या सात जागा वाढल्या आहेत. सोलापूर  आणि पुण्यामध्येदेखील भाजपच्या जागा वाढून शिवसेनेच्या कमी झाल्या आहेत.

नाशिक महापालिका निवडणुकीत तर शिवसेना-भाजप स्वतंत्र लढले आणि भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळवल्या. शिवसेनेच्या सहा जागा कमी झाल्या. एवढेच नव्हे तर मनसेबरोबर आघाडी करून सत्ता स्थापन करण्याच्या हलचालीही भाजपने सुरू केल्या. शिवसेनेला हा मोठा धक्का होता. किंबहुना यापुढील निवडणुकांमध्ये शिवसेनेला बाजूला सारून मनसेबरोबर जाण्याची ही नांदीच आहे, हे ओळखून बाळासाहेबांनी  जमवून घेण्याचे ठरवले. ‘तुझे-माझे जमेना पण तुझ्या वाचून करमेना’ अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे.

शिवसेनेने जरी कमळाबाईचा अनुनय केला असला तरी भाजप मात्र वेगळा घरोबा करण्याचा मन:स्थितीत आहे. एवढे दिवस शिवसेनेच्या मागे फरफटत जाणा-या भाजपने नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानाने पुढे जाण्याचे ठरविलेले दिसते.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात चहासाठी गेले. राज ठाकरेंनी गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांच्या कारभाराचे केलेले कौतुक आणि निवडणुकीआधी नितीन गडकरी यांची विमानात भेट घेऊन केलेली चर्चा यावरून भाजप मनसेचे सूर जुळू लागल्याचे स्पष्ट दिसू लागले. त्यामुळे नाशिकमध्ये मनसेशी घरोबा करण्याच्या हालचाली सुरू करून गडकरींनी शिवसेनेला खिजवण्याचा पवित्रा घेतला. उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेनेची सूत्रे आल्यापासून शिवसेना-भाजपमध्ये सुसंवाद राहिला नव्हताच. उलट दूरध्वनीवरदेखील संवाद होत नव्हता. गडकरी-मुंडे यांचे फोन बाळासाहेबापर्यंत पोहोचत नव्हते. उद्धव यांनी बाळासाहेबांना नजरकैदेत ठेवले आहे, अशी चर्चा भाजप गोटात होत होती. अखेर अत्यंत सरळ आणि स्पष्टवक्ते असलेल्या गडकरींची सहनशीलता संपली. शिवसेनाप्रमुखांना केलेले फोन त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत तसेच सामना  दैनिकातून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सतत टीका येत असते, असे जाहीर वक्तव्य करून गडकरींनी शिवसेनेला धक्क्याला लावू शकतो, असा संदेश दिला आहे. मनसेच्या रूपाने नवा मित्र मिळण्याची शक्यता असल्याने शिवसेनेला पर्याय असल्याचे संकेत गडकरींनी एक प्रकारे दिले आहेत.  शिवसेनेने कमळाबाई संबोधून उडवलेली खिल्ली आणि केलेली टीका-टिपण्णी यांचे मणामणाचे ओझे उतरवून टाकू शकतो, अशी मानसिक तयारी झाली असल्याचा इशाराच गडकरींनी शिवसेनेला दिला आहे. 

Read more...

Wednesday, February 22, 2012

महाराष्ट्रात काँग्रेस आहे कुठे?


केंद्रामध्ये काँग्रेसचा पंतप्रधान आणि महाराष्ट्रात काँग्रेसचाच मुख्यमंत्री असताना राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील महापालिकेत शिवसेनेचा महापौर तर नागपूर या उपराजधानीत भाजपचा महापौर, पुणे या राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर तसेच उद्योगधंद्यांमध्ये आघाडीवर असलेल्या नाशिकमध्ये कदाचित मनसेचा महापौर, अशा प्रमुख शहरांचा कब्जा काँग्रेसेतर पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस आहे कुठे, हा प्रश्न उपस्थित होतो.

सा-या भारत देशाचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले होते. शिवसेनेने पुन्हा एकदा भावनिक आवाहन करत बाळासाहेब नावाचे शस्त्र उपसले. काँग्रेसने विकासाचा सेतू बांधण्याचे आश्वासन दिले, तर सहाच वर्षापूर्वी जन्मलेल्या मनसेने रेल्वे इंजिनमधून फक्त विकासाचा आणि मराठी माणसाच्या भल्याचा धूर निघणार, याची ग्वाही दिली. आरोप-प्रत्यारोप, चारोळ्या, कविता आणि घोषणांच्या तोफा थंडावल्यानंतर निकालाकडे प्रत्येकाचे डोळे लागले होते. अखेर, 17 फेब्रुवारीला महापालिकांचे निकाल जाहीर झाले आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन मुंबईच्या खड्डय़ातून आघाडीची गाडी हाकणा-या काँग्रेसच्या चाकातील हवाच गुल झाली. शिवसेनेची सत्ता घालवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी मुंबईतील सत्तापालट सहज शक्य असल्याचा आभास निर्माण केला. मनसेमुळे मराठी मतांचे विभाजन होईल. त्याचा काँग्रेसबहुल मतदारसंघात तर फायदा होईलच पण राष्ट्रवादीच्या साथीची जोड मिळाल्यामुळे मतदारराजा आघाडीच्याच बाजूने कौल देईल, अशी सत्तेची गणिते मांडण्यात आली. पण सत्तेच्या सारीपटावर आघाडीच्या नेत्यांनी टाकलेले फासे उलटे फिरले. राजकीय प्रतिष्ठा बनलेल्या मुंबई महापालिकेत आघाडीचा सफाया झाला. जिल्हा परिषदेमध्येही काही जिल्हे वगळता अन्य ठिकाणी काँग्रेसच्या हाताला साथ देणारे निष्ठावंत कार्यकर्ते मिळाले नाहीत तर फोडाफोडीचे राजकारण करून राष्ट्रवादीने घडय़ाळाचे काटे नगरपालिकांप्रमाणे जिल्हा परिषदेतही यशाच्या दिशेने फिरवल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
   
विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याचा इशारा
 
या निकालावरून काँग्रेसचे वर्चस्व कमालीचे कमी झाल्याचे दिसते. केंद्रामध्ये काँग्रेस प्रणीत पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार आणि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही वर्चस्व निर्माण करण्यासाठी काँग्रेसने सुनियोजित प्रयत्न करणे अपेक्षित होते. आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने आणि विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हाच क्रमांक एकचा पक्ष बनवून आपण राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, अशी महत्त्वाकांक्षा बाळगली आहे. त्यासाठी साम-दाम-दंड-भेद अशा सर्व नीतींचा अवलंब करत त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका होण्याआधी झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसपेक्षा 12 जागा अधिक मिळवल्या. यावेळी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्येदेखील एकूण 1639 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. राष्ट्रवादीला 526 तर काँग्रेसला 458 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला 255, भाजपला 198 तर मनसेने केवळ 19 जागांवर खाते उघडले आहे. शिवसेना-भाजपला ग्रामीण भागात जनाधार तर नाहीच पण तो वाढविण्यासाठी नेत्यांनी प्रयत्नही केले नाहीत. त्याचा फायदा काँग्रेसला घेता आला नाही. मोठय़ा महापालिकांमध्ये आणि बहुसंख्य जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसची पीछेहाट झाली असल्याचे चित्र या निवडणुकीने समोर आले असून 2014 मध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे मानले जात आहे.
   
राष्ट्रवादीशी आघाडी अंगलट

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपने रामदास आठवलेंच्या रिपाइंबरोबर महायुती केली तसे काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर प्रथमच आघाडी केली आहे. युतीने रिपाइंशी महायुती केल्याचे ढोल बडवले असले तरी दलित जनतेने मात्र महायुतीला नाकारले असल्याचे निकालाने दाखवून दिले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये ताकद नसताना राष्ट्रवादीशी आघाडी करणे काँग्रेसच्या चांगलेच अंगलट आले. काँग्रेसच्या जागा वाढण्याऐवजी कमी झाल्या. याचाच अर्थ मुंबईतील नागरिकांनी आघाडीला प्रतिसाद दिला नाही. काँग्रेससोबत राहून राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबेही फोल ठरले. गेल्या वेळी असलेल्या केवळ 14 जागा टिकविण्यापलीकडे राष्ट्रवादीची ताकद वाढू शकली नाही. शरद पवारांनी सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांशी ताळमेळ जमवला नाही. उलट हे मुख्यमंत्री लोकांमधून निवडून आलेले नसल्याने त्यांना आपण गांभीर्याने घेत नाही, असे जाहीरपणे सांगून पवार यांनी मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केले. त्याचाही विपरित परिणाम झाला. मुंबईत राष्ट्रवादीची ताकद नव्हतीच, पण काँग्रेसचे सहापैकी पाच खासदार आणि 34 पैकी 17 आमदार असतानाही आपसांतील मतभेद आणि जागावाटपावरून निर्माण झालेला असंतोष यामुळे काँग्रेसची कामगिरी निष्प्रभ ठरली. सर्वाना एकत्र ठेवून निवडणूक लढवील, असे नेतृत्व काँग्रेसजवळ नसल्याचे जाणवले.
 
सत्ता संपादनाची संधी वाया
 
गेली 15 वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप युतीने मुंबई शहराला बकाल करून टाकले आहे. खड्डय़ात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. जागोजागी कच-यांचे ढीग पडले असून दरुगधीने रोगराई फैलावत आहे. सांडपाण्याची व्यवस्था सुरळीतपणे कार्यान्वित झालेली नाही. शहरातील मंडईमध्ये स्वच्छता व उत्तम व्यवस्थापनाचा अभाव आहे. रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. उद्याने आणि स्मशानभूमी यांची व्यवस्था नाही. शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष करून केवळ कंत्राटदारांकडून टक्केवारी वसूल करण्यावर सगळा भर देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर बनवण्याऐवजी टक्केवारीचा मलिदा खाण्यातच सत्ताधारी मश्गूल होते. या परिस्थितीचा एकजुटीने लाभ घेण्याची आयती आलेली संधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आणि मतदारांनीही दवडली.
 
मुंबईची नाडी ओळखणारा नेता हवा

आजपर्यंत मुंबई शहराची नाडी ओळखणारा एकही नेता मुख्यमंत्री बनला नाही. शरद पवारांपासून ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत आणि त्याआधी आलेले सर्व मुख्यमंत्री ग्रामीण भागातले असल्यामुळे त्यांचा ग्रामीण भागाकडेच अधिक ओढा होता. त्यामुळे शहराकडे दुर्लक्ष होत राहिले. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे या माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसने उपयोग करून घेतला नाही, केंद्रात गेल्यापासून त्यांचा राज्यातील हस्तक्षेप कमी करण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे कोणत्याही वादविवादात व घोटाळ्यांमध्ये नसूनही त्यांना मुंबईतील प्रचारापासून दूर ठेवण्यात आले. राणे हे मूळचे कोकणचे असल्याने आणि मुंबईत वाढले असल्यामुळे या विभागाच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण तर आहेच. त्याशिवाय मराठी माणसांशी त्यांचे जवळचे नाते आहे. निवडणूक जिंकण्याची क्षमता असूनही त्यांचा योग्य उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी काँग्रेसने दाखवली नाही. राणेंच्या झंझावाताचे उत्तम उदाहरण म्हणून पुण्याकडे पाहता येईल. पुण्यामध्ये सुरेश कलमाडी तुरुंगात गेल्याने काँग्रेसची परिस्थिती नाजूक बनली होती. तेथे काँग्रेस नेतृत्वाचा अभाव असताना राणे यांच्या काही सभा व रोड शो यांमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. परिणामी काँग्रेसशी आघाडी केल्याशिवाय राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करणे अवघड झाले. याउलट मुंबईत झालेली आघाडी कागदावरच राहिली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलीच नाही. राणे यांच्या पुण्याप्रमाणेच मुंबईत सभा आयोजित केल्या असत्या तर वातावरण बदलले असते, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात होऊ लागली आहे. प्रचाराचे अत्यंत ढिसाळ नियोजन, बंडखोरी आणि प्रसारमाध्यमांना हाताळण्यामध्ये अपयश आल्यामुळे पराभव झाल्याची रास्त प्रतिक्रिया सर्वप्रथम नारायण राणे यांनी दिली. काँग्रेसच्या प्रचारात कोणतेही नियोजन नव्हते. लालबाग-परळ-दादर परिसरात मराठी वस्ती मोठय़ा प्रमाणात असून तेथे राणे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे वातावरण तापवण्यासाठी आणि मराठी माणसांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांच्या सभा या परिसरात देणे आवश्यक होते. तेवढेही काँग्रेस पक्षाला करता आले नाही. त्याशिवाय तिकीटवाटपामध्ये पक्षपातीपणा करण्यात आला आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचाही फटका बसला.



प्रचारादरम्यान मतभेद चव्हाटय़ावर

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या हाती निवडणुकीची सूत्रे असल्याने त्यांच्यावर शिवसेनेने गंभीर आरोप केले. पण काँग्रेसकडून त्याचे स्पष्टीकरण मिळाले नाही. कृपाशंकर सिंह आणि खासदार गुरुदास कामत यांच्यातील मतभेद चव्हाटय़ावर आल्याचा फायदा विरोधकांनी घेतला. मुख्यमंत्री चव्हाण यांनी गटबाजी दूर करण्यावर भर देण्याऐवजी कृपाशंकर सिंह आणि राजहंस सिंह यांच्यावर सर्व भिस्त ठेवून निवडणूक लढवली खरी, पण या सिंहांनी अमराठी मतदारांना बाहेर काढण्याचे काम मात्र केले नाही. त्यादृष्टीने काँग्रेसची यंत्रणा अस्तित्वात होती की नाही, असा प्रश्न पडतो. या उलट शिवसेना-भाजप आणि मनसे यांनी मतदारांना बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी यंत्रणा निर्माण करून तिचा चांगला उपयोग करून घेतला. शिवसेनेप्रमाणे काँग्रेसची यंत्रणा सक्षम नसल्याची कबुली काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिली. मुख्यमंत्री हे स्वच्छ प्रतिमेचे असल्यामुळे निवडणुकीत काँग्रेस पैशाचा वापर करीत नाही, असा प्रचार करण्यावर पक्षाने भर दिला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये उमेदवारांना पैसे नसल्याचेच सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात पैसे घेऊन तिकीटवाटप झाल्याचा आरोपही केला जात होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीला सलग चौथ्यांदा सत्ता उपभोगण्याची संधी आयती चालून आली असून काँग्रेसची चांगलीच पीछेहाट झाली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीत पराभव झाला असल्याने त्याची दखल काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेण्याची दाट शक्यता आहे.



शरद पवारांचा गनिमी कावा

मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीने काँग्रेसशी आघाडी केली खरी, पण या आघाडीचा काँग्रेसऐवजी शिवसेनेलाच फायदा झाला. याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे परममित्र शरद पवार यांचीही पडद्यामागची खेळी जबाबदार ठरली आहे. पवारांनी काँग्रेसचे गोडवे गाऊन मतदारांना आकर्षित करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य तर केलेच, पण उद्धवपेक्षा राज किती सक्षम आहे, अशी तुलना करून या दोघांचीच मते पक्की केली. काँग्रेसला फसवण्याच्या प्रयत्नात स्वत:ही अडकले. अजित पवारांना आपल्या काकांप्रमाणे गनिमी कावा जमला नाही, त्यांनी काँग्रेसला थेट आव्हान दिले. महापालिका निवडणूक जाहीरनामा प्रकाशनावेळी शिवाजी पार्क मैदानावरील प्रचारसभेच्या मुद्दय़ावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मतभेद वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून जनतेसमोर आले.



पक्षाच्या पुनर्बांधणीची गरज



मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर या महापालिकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली असताना उर्वरित महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले. कुठे आघाडी तर कुठे स्वबळावर, कुठे हातात हात तर कुठे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, अशा प्रकारे मतदारांचा गोंधळ उडवून देणारी ही निवडणूक ठरली. त्यातच अजित पवारांनी काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांना पराभूत करण्याचा चंग बांधला होता. नारायण राणे यांच्यासारख्या ताकदवान नेत्याला आव्हान देण्यासाठी अजित पवार सिंधुदुर्गात पोहोचले. शरद पवारांनी 1995 च्या विधानसभा निवडणुकीत विलासरावांना पराभूत केले होते. तसे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ताब्यात घेऊन राणेंचे राजकीय वजन कमी करण्याचा डाव अजित पवारांनी रचला होता. पण राणेंनी व्यवस्थित मोर्चेबांधणी करून तो हाणून पाडला आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत निर्विवाद बहुमताने काँग्रेसची सत्ता आणली. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह या तिघांनीच उचलली होती. सर्व नेत्यांना बरोबर घेऊन आणि सर्वाशी समन्वय राखून निवडणूक लढवली असे चित्र दिसले नाही. या पुढील काळात काँग्रेस पक्षाला योग्य दिशा देऊन,नेत्यांना विश्वासात घेऊन पक्षाची पुनर्बाधणी करावी लागेल. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूक निकालाबाबत आत्मचिंतन करून येणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी आतापासून प्रयत्न करणे, त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करणे गरजेचे आहे.

Read more...

Monday, February 20, 2012

मुंबईची सुभेदारी, महाराष्ट्रात बेजारी

शिवसेना-भाजपने रामदास आठवले यांच्या रिपाइंशी महायुती केल्याचे ढोल बडवले असले तरी महायुतीचा फायदा युतीला होऊ शकला नाही. आठवलेंकडे असलेली दलितांची मते शिवसेना-भाजप उमेदवारांकडे आणि शिवसेना-भाजपची मते आठवलेंच्या रिपाइं उमेदवारांकडे परावर्तीत होऊ शकली नाहीत. त्यांचा सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग अयशस्वी झाला असल्याचे दिसून आले.

मुंबई आणि ठाणे महापालिकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसे या पक्षांपेक्षा चांगले यश मिळविल्याबद्दल शिवसेना-भाजप युतीचे अभिनंदन केले पाहिजे. निवडणूक प्रचारात प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपच नव्हे तर चांगलीच चिखलफेक सुरू होती. बंडखोरीचे ग्रहण सर्व पक्षांना अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही लागले होते. तरीदेखील शिवसेना-भाजप आणि मनसे या पक्षांनी केंद्रात आणि राज्यांत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मागे सारले आहे. मात्र, या यशाने हुरळून गेलेल्या शिवसेना-भाजप आणि मनसेने असा काही जल्लोष सुरू केला आहे की, तो पाहून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांना धडकी भरली आहे. मुंबई-ठाणे या दोन विभागात विधानसभेच्या 60 जागा असून सरकार स्थापनेवर परिणाम घडवून आणणा-या या जागा असल्याने त्यांनी याची धास्ती घेणे साहजिकच आहे. परंतु दहा महापालिका27 जिल्हा परिषदा आणि 309 पंचायत समित्यांचे निकाल पाहता शिवसेनेने मुंबईत सुभेदारी मिळवली असली तरी ठाण्यासह राज्यात सर्वत्र बेजारीच असल्याचे चित्र समोर आले आहे.
 
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नसतानाही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आघाडी, त्या आघाडीने काँग्रेस अंतर्गत नाराजी वाढवून मोठय़ा प्रमाणात झालेली बंडाळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेली टीका आणि त्यामुळे शिवसेनेला झालेली अप्रत्यक्ष मदत याचा पुरेपूर फायदा उठवत शिवसेना-भाजपने प्रचाराचे चांगले नियोजन केले आणि आघाडीला मागे सारून युती पुढे गेली. युतीला मिळालेल्या जागा पाहता शिवसेनेची घसरण काही थांबलेली दिसत नाही. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्यापासून शिवसेनेच्या जागा कमी होत गेल्या, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. 1992 मध्ये काँग्रेसने मुंबई महापालिका ताब्यात घेतली होती. त्यानंतर सलग 15 वर्षे युतीचीच सत्ता आहे. 1997 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले असताना शिवसेनेने 103 जागा मिळवून महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर 2002 मध्ये शिवसेनेत प्रचंड असंतोष पसरला. उद्धव ठाकरेंना सर्वानीच टीकेचे लक्ष्य केले होते. उत्तर भारतीयांचे मुंबईत महत्त्व वाढू लागले होते. या परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा बाजूला सारून मी मुंबईकरअशी घोषणा दिली. तरीदेखील शिवसेनेच्या जागा कमी होऊन 98 वर आल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे शिवसेनेची सर्व सूत्रे हाती घेतलेल्या उद्धव ठाकरेंनी 2007 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या जागा आणखी कमी करून 84 वर आणल्या. तर यावेळी शिवसेनेची घसरण चालूच असून जागा 76 पर्यंत खाली आलेल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्व नेमके काय, हे प्रश्नचिन्ह कायम राहिले आहे.
 
शिवसेनेच्या 1985 मध्ये 112 असलेल्या जागा 1997 मध्ये 103 आणि 2012 मध्ये 76 पर्यंत खाली आलेल्या आहेत, हेच नव्या नेतृत्वाने करून दाखवले आहे. नव्या नेतृत्वाचे आणखी एक कर्तृत्व म्हणजे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रचारात उतरवले आणि अजूनही आपण शिवसेनाप्रमुखांवर अवलंबून आहोत, हेही दाखवून दिले. मनसेने मतांसाठी शिवसेनेसह सर्व प्रमुख पक्षांमध्ये केलेली घुसखोरी पाहता निवडणूक अत्यंत अटीतटीची बनली होती. अशा वेळी बाळासाहेबांशिवाय तरणोपाय नव्हता. बाळासाहेबांसह उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अशा तीन पिढय़ा निवडणूक प्रचारात उतरूनही आधीच्या जागा राखणे शक्य झाले नाही. याउलट मुंबई महापालिकेतील मनसेच्या जागा सातवरून 27 वर गेल्या आहेत. मात्र मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे या महापालिकांमध्ये किंग होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणा-या राज ठाकरेंना कुठेच किंगमेकरही होता आले नाही. केवळ नाशिकमध्ये किंगमेकर बनण्याचा मान मिळाला आहे. एक मात्र खरे की, जेमतेम सहा वर्षे वयाच्या या पक्षाला महापालिकेमध्ये मिळालेल्या जागा पाहता राजकीय पक्षांचे लक्ष्य मनसेने वेधून घेतले आहे. मुंबईत भाजपने त्यांच्या जागा 28 वरून 32 वर नेल्या असल्याने शिवसेनेला सत्ता स्थापन करणे शक्य झाले आहे. खरे तर भाजपमध्येदेखील प्रचंड बंडखोरी झाली असतानाही प्रचाराचे योग्य नियोजन केल्याने भाजपला यश मिळू शकले. अन्यथा बडे नेते उत्तरेतील निवडणुकांमध्ये व्यस्त तर राज्यातील नेते एकमेकांशी भांडण्यात गर्क अशी परिस्थिती असताना यश मिळणे कठीण होते. मात्र कोणताही गाजावाजा न करता भाजपने शांततेने प्रचार करून आपली परंपरागत मते टिकवली.
 
शिवसेना-भाजपने रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी महायुती केल्याचे ढोल बडवले असले तरी महायुतीचा फायदा युतीला होऊ शकला नाही. आठवलेकडे असलेली दलितांची मते शिवसेना-भाजप उमेदवारांकडे आणि शिवसेना-भाजपची मते आठवलेंच्या रिपाइं उमेदवारांकडे परावर्तीत होऊ शकली नाहीत. त्यांचा सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग अयशस्वी झाला असल्याचे दिसून आले. त्यामुळे मुंबई महापालिकेतदेखील या तथाकथित महायुतीला सत्ता स्थापन करताना अपक्षांची गरज भासू लागली आहे, निर्विवाद सत्ता आणणे शक्य झाले नाही. मुंबईसह ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेतही भगवा फडकवल्याचा दावा करण्यात आला असला तरी तेथेही युतीची दमछाक झाली आहे.
 
उल्हासनगर पालिकेतही त्रिशंकू अवस्था झालेली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीला जुनी संस्थाने टिकवून ठेवणे कठीण बनले आहे. पुणे महापालिकेत गेल्या वेळी राष्ट्रवादीने काँग्रेसला बाजूला सारून शिवसेना-भाजप युतीबरोबर सत्ता स्थापन केली होती. मात्र यावेळी या तिन्ही पक्षांची पीछेहाट झाली असून राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन केल्याचा फटका युतीला बसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला यावेळी काँग्रेसबरोबर आघाडी करावी लागणार आहे.

ज्या काँग्रेसबरोबर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली होती, एकमेकांवर शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले झाले होते, त्याच पक्षांना एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे. नाशिकमध्ये गेली दोन दशके असलेली शिवसेना-भाजप युतीची सत्ता संपुष्टात आली आहे. शिवसेना-भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. त्यात शिवसेनेचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या जागा घटल्या आहेत. मात्र, भाजपने आपल्या जागा राखण्यात यश मिळवले. त्यामुळे मुंबई महापालिकेत आघाडीतील बंडाळीने कसाबसा भगवा फडकला असला तरी ठाणे-उल्हासनगर पुणे-नाशिकमध्ये युतीची पीछेहाट तर झाली आहेच पण शिवसेनेच्या जागाही घटल्या आहेत. नागपूरमध्ये मात्र भाजपने सत्ता राखली आहे. नागपूर जिल्हा परिषदेतही भाजपला चांगले यश मिळाले आहे. या यशामागे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचाच करिश्मा असल्याचे दिसत आहे. महापालिका क्षेत्रांमध्ये शहरी उमेदवारांनी शिवसेना -भाजप आणि मनसेला चांगला प्रतिसाद दिला असला तरी ग्रामीण महाराष्ट्रात मात्र युतीसाठी निराशाजनक चित्र दिसत आहे.

Read more...

Wednesday, February 15, 2012

काँग्रेसचा हात, मुंबईकरांची साथ!


काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता मुंबईकरांची काँग्रेसच्या विकासाला साथ देण्याची मानसिकता बनली असल्याचे चित्र आहे.

मुंबई- मुंबई महापालिकेची सत्ता गेली 15 वर्षे उपभोगणा-या शिवसेना-भाजप युतीमध्ये पडलेले अंतर आणि रिपाइंला युतीशी जोडल्यामुळे निर्माण झालेला असंतोष तसेच, मनसेमुळे शिवसेनेच्या मराठी मतांचे झालेले विभाजन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पथ्यावर पडले आहे. 

काँग्रेसला त्यांची परंपरागत दलित-मुस्लिम मते तसेच अमराठी मते तर मिळतातच पण मराठी मतेही त्यांच्याकडे वळली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता मुंबईकरांची काँग्रेसच्या विकासाला साथ देण्याची मानसिकता बनली असल्याचे चित्र आहे.

मुंबई शहरात पाच खासदार काँग्रेसचे तर एक राष्ट्रवादीचा मिळून सर्व सहा खासदार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आहेत. एकूण 36 आमदारांपैकी आघाडीचे 19 आमदार आहेत. मुंबई महापालिकेत मागील निवडणुकीत काँग्रेसचे 79 नगरसेवक होते. 102 ठिकाणी काँग्रेस दुस-या क्रमांकावर होती. यावेळी प्रथमच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यामुळे काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. आघाडीवर विश्वास ठेवून सलग तीन वेळा राज्याची सत्ता जनतेने आघाडीच्या हाती दिली आहे. निवडून आल्यानंतर मतदारसंघातील विकासकामांवर आमदार-खासदारांनी भर देऊन लोकांचा विश्वास मिळवला आहे. मेट्रो व मोनो रेल प्रकल्प दोन वर्षात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहेत. 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एमएमआरडीएने पायाभूत सुविधा व विकास प्रकल्प यशस्वीरीत्या राबवले आहेत. लंडनच्या धर्तीवरच मुंबईतही रिंग रोड करण्याची योजना मुख्यमंत्र्यांनी आखली आहे. केंद्राने भरपूर निधी देऊनही महापालिकेच्या अखत्यारीत असलेले ब्रिमस्टोवॅड, मलवाहिनी प्रकल्प, मिठी नदी प्रकल्प पाच वर्षात पूर्ण झाले नाहीत. मूलभूत नागरी सुविधांपासून मुंबईला वंचित ठेवणा-या युतीला कंटाळलेली जनता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला कौल देईल, अशी चिन्हे दिसत आहेत.

Read more...

Monday, February 13, 2012

सोळावं वरीस धोक्याचं.. भाजपसाठीही!

मतांचे घोटाळे, पक्षांतर्गत बंडाळी व शिवसेनेने केलेली लूटमार सहन न झाल्याने त्यांच्यासोबत राहायचे की नाही, अशी चर्चा भाजपमध्ये आहे.

मुंबई- शिवसेना-भाजप युतीने 15 वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगली. आलेल्या ब-यावाईट अनुभवांमुळे त्यांच्यातील प्रेम कमी झाले आहे. शिवसेनेने महापालिकेत केलेली लूटमार सहन न झाल्याने त्यांच्याबरोबर राहायचे की नाही, अशी चर्चा भाजपमध्ये आहे. त्यातूनच मनसेबरोबर सलगीचा प्रयत्न होतो आहे. दुसरीकडे भाजपमध्येही लाथाळ्या, बंडाळीचे प्रकार वाढले आहेत. मतांचे घोटाळे, पक्षांतर्गत बंडाळी, पालिकेतील लूटमार तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमुळे पालिकेत सत्तांतराची शक्यता वाढली असून सत्तेतील सोळावे वर्ष भाजपला धोक्याचे ठरणार आहे.
 
सुमारे 25 वर्षे महाराष्ट्रात एकत्र राहिलेल्या शिवसेना-भाजप युतीला घरघर लागली आहे. भाजपत शिवसेनेबद्दलच्या नाराजीला धुमारे फुटले आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र नसतील, असे संकेतही आहेत. त्यातूनच भाजपने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर मैत्री वाढवली आहे. दोघांमधील प्रेम आता उघड झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला बाजूला सारून मनसेबरोबर जाण्याचा भाजपचा विचार दिसतो आहे. त्यांच्यातील प्रेमानेच महापालिकेतही गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
पक्षांतर्गत बंडखोरी आणि मनसेकडील ओढा यामुळे भाजप उमेदवारांच्या मतांवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे मुंबई महापालिकेतील 28 नगरसेवक आहेत. ते 18 वर जाण्याचा अंदाज आहे. ही शक्यता दिसताच, रिपाइंचीही संख्या वाढू नये म्हणून भाजपने कंबर कसली आहे. रामदास आठवले यांना मिळालेल्या 29 जागांवर अधिक उमेदवार निवडून आल्यास आपले वर्चस्व कमी होण्याची भाजपला धास्ती आहे. महायुतीमुळे भाजपला नगरसेवक निवडून आलेल्या जागाही रिपाइंला सोडाव्या लागल्या. तेथील पदाधिकारी असंतुष्ट असल्याने रिपाइं उमेदवारांना मदत करायची नाही, असा छुपा कारभार चालला आहे. 

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपची मैत्रीपूर्णयुती आहे. पण तिसरा भिडू आल्याने या मैत्रीमध्ये अंतर पडले आहे. भाजपला विश्वासात न घेता शिवसेना परस्पर निर्णय घेते आहे. बहुतेक निर्णय लूटमारीचे असल्यामुळे ते वारंवार अडचणीत येतात. मग युती टिकवण्यासाठी भाजपचे महापालिकेतील गटनेते अ‍ॅड. आशीष शेलार व भालचंद्र शिरसाट प्रशासनाला कोंडीत पकडून शिवसेनेला सोडवतात. भाजपने सर्वतोपरी मदत करूनही शिवसेनेत सुधारणा होत नसल्याने भविष्यात एकला चलो रेवा मनसेच्या इंजिनामागे धावणे हे दोनच पर्याय भाजपपुढे असतील.

Read more...

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच आघाडीवर

एका राज्याचे बजेट असलेल्या महानगरपालिकेने शहराचा विकास करणे सहज शक्य असताना हा पैसा मातोश्रीतील भूमिगत दालने भरून ठेवण्यासाठी जमवण्यात आला असल्याचे सर्रास बोलले जाऊ लागले आहे. महानगरपालिकेचा मलिदा खाताना ज्यांनी इतकी वर्षे निवडून दिले त्या मराठी माणसाकडे दुर्लक्ष करणा-या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी दंड थोपटून मैदानात उतरली आहे.

महानगरपालिकांच्या निवडणुकीतील ढोल-नगा-यांचा आवाज वाढत चालला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांचे बॉम्बगोळे फुटू लागले आहेत. महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र असलेल्या मुंबई शहराची प्रतिष्ठा जागतिक नकाशावर वाढविण्याऐवजी या शहराला गलिच्छ, बकाल करून टाकणा-यांना तसेच, लोकांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवणा-यांना सत्तेतून हद्दपार करण्याची वेळ आली आहे. एका राज्याचे बजेट असलेल्या महानगरपालिकेने शहराचा विकास करणे सहज शक्य असताना हा पैसा मातोश्रीतील भूमिगत दालने भरुन ठेवण्यासाठी करण्यात आला असल्याचे सर्रास बोलले जाऊ लागले आहे. महानगरपालिकेचा मलिदा खाताना ज्यांनी इतकी वर्षे निवडून दिले त्या मराठी माणसाकडे दुर्लक्ष करणा-या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी दंड थोपटून मैदानात उतरली आहे. स्टार प्रचारकांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकजण जीव ओतून प्रचार करीत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर लगेच महापालिका निवडणुका आल्याने प्रचाराला वेळ कमी पडत आहे. मोठमोठय़ा नेत्यांच्या सभा आपल्याच विभागात व्हाव्या यासाठी उमेदवार आणि तेथील स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची विमाने-हेलिकॉप्टर आकाशात घिरटय़ा घालत आहेत. वृत्तवाहिन्यांवर नेत्यांच्या मुलाखती आणि वादविवाद यांचा मारा चालला आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, अकोला या सहा महापालिकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती, सोलापूर या चार महापालिकेत मात्र आघाडीची बिघाडी झाली असून हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहे. तरीही सर्वाचे लक्ष मुंबईच्या भल्याकडे लागले आहे. मुंबई महापालिकेत गेली सोळा वर्षे शिवसेना-भाजपची युतीची सत्ता आहे. परंतु युतीने करून दाखवलेनसल्याने सत्ता परिवर्तन घडविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. केंद्रात आणि राज्यात आघाडीची सत्ता असल्याने महापालिकेतही आघाडीची सत्ता आली तर, कारभारामध्ये समन्वय ठेवणे सोयीचे होईल, असे वास्तवाचे भान आणि राजकीय शहाणपण आघाडीच्या नेत्यांनी दाखवले आहे.

जिल्हा परिषद निवडणूकांच्या प्रचारासाठी एक सभादेखील न घेणारे शिवसेना-भाजप नेते मुंबई, ठाणे, पुणे या शहरांसाठी जिवाचे रान करू लागले आहेत. या मोठय़ा महानगरपालिका हातात ठेवल्या तर, पैसाही खुळखळत राहील आणि त्यामुळे पक्षही चालवता येईल. केवळ हाच उद्देश ठेवून भावनिक आवाहने करीत युतीने सत्ता काबीज केली होती. पण, आता मात्र सर्वाचे डोळे सताड उघडले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी तर, शिवसेनेला मालमत्ता जाहीर करा, असे थेट आव्हानच दिले आहे. एकही उद्योगधंदा नसताना ठाकरे कुटुंबीयांचे भागते कसे, ही शंका सर्वसामान्य माणसांच्या मनात होतीच. राणे यांनी त्यांच्या वर्मावरच बोट ठेवल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही कमालीचे अस्वस्थ झाले असून लोकांना पटेल असा खुलासा करणे त्यांना अशक्य झाले आहे. 

काँग्रेस - राष्ट्रवादीने समंजसपणा दाखवत जसे एकजुटीने काम केले तसेच महापालिकेतील युतीचा भ्रष्ट कारभार चव्हाटय़ावर मांडण्यात नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानसंघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली. दिनदर्शिकेच्या माध्यातून मुंबईचे बकालपण त्यांनी लोकांसमोर आणलेच परंतु निवडणुकीचा प्रचार ऐन टिपेला पोहचला असताना स्वाभिमान संघटनेने पथनाटय़ाच्या माध्यातून केलेली लोकजागृतीही अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. अशी चोहोबाजूंनी खंबीर मोर्चेबांधणी झाल्याने येत्या 16 फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रावर गेलेला मतदार आघाडीलाच मतदान करील असे वातावरण आहे. हे मतदानच मुंबईमध्ये सत्तांतर घडवील, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. धर्म आणि जातीच्या नावावर तसेच मराठीच्या मुद्दय़ावर मते मागणा-या जातीयवाद्यांच्या हातातून मुंबईची सुटका करायची असेल तर पहिल्यांदा धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळले पाहिजे, हे दोन्ही काँग्रेसच्या लक्षात आले. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन युतीची सत्ता सलग तिस-यांदा महापालिकेत आली. यावेळी मात्र निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासूनच दोन्ही बाजूंनी आघाडीसाठी गांभीर्याने प्रयत्न झाले.
 
शिवसेना-भाजपने रिपाइंशी महायुती करून निवडणूक रिंगणात उडी घेतली. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शिवसेनेच्या मराठी मतांमध्ये झालेली घुसखोरी पाहता शिवसेनेची चांगलीच घसरण होण्याची शक्यता दिसत आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या मनसेचे गेल्या निवडणूकीत सात नगरसेवक निवडून आले होते. पाच वर्षात मनसेची ताकद वाढली असल्याने त्याचा फटका शिवसेनेलाच बसणार आहे. जे मुद्दे घेऊन शिवसेनेने राज्य केले तेच मुद्दे अधिक प्रभावीपणे मांडून शिवसेनेची परंपरागत मते आकर्षित करण्यास राज ठाकरे यांना यश येत आहे. मराठी भाषा, स्थानिकांचे प्रश्न आणि बिनधास्त वाणी याच्या बळावर राज यांनी शिवसेनेकडे आकर्षित होणारा वर्ग आपल्याकडे वळविला आणि म्हणून 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेनेपेक्षा मनसेचे जास्त आमदार निवडून आले.
 
मनसे आणि शिवसेना-भाजप रिपाइं महायुतीमध्ये मतांचे विभाजन होईल. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीची परंपरागत धर्मनिरपेक्ष एकगठ्ठा मते आघाडीला मिळतील. विकासाची दृष्टी असणारा डोळस मतदारही यावेळी आघाडीच्या बाजूनेच मतदान करण्याची शक्यता आहे. गेली सोळा वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना-भाजप युतीकडे असताना त्यांनी मुंबईच्या विकासासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. रस्ते, गटारे, पाणी यांची कंत्राटे ठराविक लोकांना देऊन टक्केवारी घेण्यातच युतीचे नेते गुंग होते. नागरी सुविधांची कामेही नीट करता आली नसल्यामुळे लोकांमध्ये युतीबद्दल प्रचंड नाराजी पसरली आहे. जग झपाटय़ाने बदलत चालले आहे, नव-नविन सुधारणा होत आहेत, प्रमुख शहरांचा वेगाने विकास होऊ लागला आहे, रस्ते सुधारले, दळणवळणाची साधने अत्याधुनिक झाली, उद्याने, वाहतूक बेटे आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारी साधने वाढली. पर्यटकांना आकर्षित करणारी मनोरंजन स्थळे विकसित झाली. म्हणून त्या-त्या शहरांचा नावलौकिक होऊन तेथे पर्यटकांची संख्या वाढली आणि त्या माध्यमातून शहरांचा विकासही झाला.

मुंबई ही एकेकाळी जगातील अत्यंत नावलौकिक असणारे शहर होते. भारतात येणारे 54 टक्के पर्यटक मुंबईला भेट दिल्याशिवाय परत जात नव्हते. मात्र बदलत्या जगाबरोबर मुंबई शहर बदलले नाही. इथले रस्ते सुधारले नाहीत. उलट दर पावसाळय़ात रस्ते खड्डय़ात की, खड्डे रस्त्यात हेच कळेनासा झाले. खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदारांना पैसे वाढवून दिले जातात. पण, सुधारणा दिसत नाही. प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती पाहावयास मिळते. मुंबईत वाढणारी झोपडपट्टी तसेच पदपथावरील झोपडय़ा हटवण्यास युतीच्या नेत्यांना यश आले नाही. मुंबईकडे पर्यटक आकर्षित व्हावा, असे एकही विरंगुळय़ाचे ठिकाण गेल्या सोळा वर्षात युतीच्या नेत्यांनी बनविले नाही. खरेतर चोहोबाजूने लाभलेल्या समुद्र किना-याचे शहर हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अत्यंत पोषक आहे. ही बाब मतदारांच्या लक्षात आणून देण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी एकजुटीने प्रयत्न केल्याने मतदार जागा झाला आहे.

Read more...

Sunday, February 12, 2012

मतांचे घोटाळे करी महायुतीचे वाटोळे

साक्षात शिवसेनाप्रमुखांना प्रचार यात्रेत उतरवले असले तरी मतांच्या घोटाळ्यांमुळे या महायुतीचे वाटोळे होण्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत.

मुंबई- शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने प्रचाराची राळ उडवून दिली असली आणि साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रचार यात्रेत उतरवले असले तरी मतांच्या घोटाळय़ांमुळे या महायुतीचे वाटोळे होण्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत. या तिन्ही पक्षांच्या मतांचे एकमेकांच्या पायात पाय अडकवण्याचे उद्योग सुरू असल्यामुळे महायुतीचे नेते अस्वस्थ असल्याचे समजते.

महायुतीला अंतर्गत राजकारणाने ग्रासले असल्यामुळे कोणाची मते, कोणाकडे जाणार याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये प्रचंड बेबनाव असून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजपमध्ये कायमच असंतोष आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संधान बांधून शिवसेना गोटात अस्वस्थता निर्माण केली आहे. राज ठाकरे यांनी देखील भाजप कार्यालयाला भेट देऊन आणि नरेंद्र मोदींचे निमंत्रण स्वीकारून सलगी वाढवली. त्यामुळे भाजपची मते शिवसेना उमेदवाराला मिळण्याऐवजी मनसेच्या पारडय़ात पडतील. आणि शिवसेनेची मते, भाजप ऐवजी पूर्वीच्या मैत्रीशी इमान राखून मनसेकडेच वळतील. त्यामुळे मनसेचे इंजिन शिवसेना-भाजपच्या मतदारसंघात जोरात धडधडण्याची शक्यता मनसे नेते व्यक्त करत आहेत.

मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांच्यामते, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नसताना राष्ट्रवादीची मते मोठय़ा प्रमाणात मनसेकडे आली होती. मात्र, यावेळी आघाडी झाली असली तरी आम्हाला चिंता नाही. शिवसेना-भाजपची मते इंजिनाकडेच आकर्षित होतील, अशी खात्री आहे.
 
रिपाइंकडील दलित मते युतीकडे वळणार नाहीत आणि युतीची मते रिपाइंकडे जाणार नाहीत. त्यामुळे महायुती असली तरी मतांची विभागणी मोठय़ा प्रमाणात होण्याची चिन्हे दिसत आहेत. युतीचा महापालिकेतील भ्रष्ट कारभारही त्यांचे चांगलेच वाटोळे करेल. सलग 15 वर्षे युतीची सत्ता असूनही शाळा, पाणी, उद्याने, मैदाने, मलवाहिन्या, कचरा या प्राथमिक नागरी सुविधा पुरवल्या नसल्याची एक प्रकारे कबुली युतीने वचननाम्याद्दारे दिली आहे. त्यातच मनसेने विधानसभा निवडणुकीत युतींच्या मतांवर डल्ला मारला असल्यामुळे यावेळी सत्ता येईल की नाही, याबद्दल युतीच्या नेत्यांना शंका आहे. त्यामुळेच गेल्या 2-3 वर्षात तिजोरीची लूटमार हा एककलमी कार्यक्रम त्यांनी राबवला आहे.

शिवसेनेचे अष्टप्रधान मंडळ जाऊन त्यांची जागा मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई यांच्यासारख्या प्रशासकीय मंडळींनी घेतली असल्याने केवळ चिरकूट उद्घाटने करण्याची वेळ कार्याध्यक्षांवर आली आहे. मग वाटोळे होणार नाहीतर काय?

Read more...

Saturday, February 11, 2012

शिवसेनेच्या मतांवर मनसेचे आक्रमण


मराठी माणसांना भावणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांची प्रतिमा सांभाळण्यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अपयश आल्यामुळे शिवसेनेच्या मतांवर मनसेचे आक्रमण होण्याची शक्यता वाढली आहे.

मुंबई- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा आवाज चिडीचूप झाला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज वाढला आहे. मराठी माणसांना भावणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांची प्रतिमा सांभाळण्यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अपयश आल्यामुळे शिवसेनेच्या मतांवर मनसेचे आक्रमण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांची पूर्ण स्टाईल तसेच प्रचारामध्ये शिवसेनेचेच प्रसिद्धितंत्र अवलंबिले असल्याचा परिणाम शिवसेनेच्या मतांवर होईल. या दोन पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या मतविभाजनचा फायदा काँग्रेस-आघाडीला झाल्याने मुंबईत सत्तांतर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

गेल्या निवडणुकीवेळी मनसे एक वर्षाचे बाळ होते. तरीही मनसेने सात नगरसेवक निवडून आणले होते. पहिल्याच निवडणुकीत मिळालेल्या यशाने मनसेचा आत्मविश्वास वाढला. राज ठाकरेंनी त्यानंतर वारंवार मराठी भाषा, मराठी माणूस,महाराष्ट्राची संस्कृती ही शिवसेनेची समजली जाणारी सर्व प्रचारसाधने वापरत सतत प्रसिद्धी झोतात राहण्याचे तंत्र अवगत केले.

परप्रांतीयांबाबत टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेकडे आकर्षित होणार तरुणवर्ग मनसेकडे आकर्षिला गेला आणि 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये उमेदवार उभे केले. पहिल्याच लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी दीड-दीड लाख मते मिळविली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेने जोरदार मुसंडी मारत 14 आमदार निवडून आणले. त्यापैकी सहा एकट्या मुंबईतील आहेत.  

शिवसेनेला मात्र जोरका झटका बसला आणि त्यांचे केवळ चारच आमदार निवडून आले. तेदेखील पश्चिम उपनगरातच. शिवसेनेची मते मनसेकडे वळल्याने शिवसेना पूर्ण गलितगात्र झाली. या वेळी 227 मतदारसंघात मनसेने आपले उमेदवार उभे केले असून किमान 65 जागा निवडून येतील, असा दावा त्यांच्याकडून केला गेला. मात्र जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तसा हा आकडा 40 पर्यंत खाली आला आहे. राज वगळता मनसेकडे मुंबईत सर्वमान्य असेल असा एकही नेता नाही, बाळा नांदगावकर, शिशीर शिंदे, प्रवीण दरेकर यांनी काही प्रमाणात लोकप्रियता मिळवली असली तरी नेत्यांची मोठी फळी त्यांच्याकडे नाही त्यामुळे 40 चा आकडा खाली आला असून प्रत्यक्षात सुमारे 25 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. 

निवडणुका जाहीर झाल्यापासून राज ठाकरे यांनी नियोजनबद्धतेने प्रसिद्धी माध्यमांच्या झोतात राहण्याचा प्रयत्न चालविला आहे. निवडणूक आयोगाचे लोणचे घालण्यापासून ते शिवाजी पार्कचे मैदान मिळाले नसल्याने रस्त्यावर सभा घेण्याची घोषणा करण्यापर्यंत बिनधास्त वक्तव्य करून प्रसारमाध्यमांना खाद्य पुरविले. शिवसेनाप्रमुख जशी कोणाचीही पर्वा न करता बेधडक विधाने करीत तशीच विधाने करीत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या मतांवर आक्रमण केले आहे. मात्र या दोन पक्षांत मताचे विभाजन होऊन त्याचा फायदा आघाडीला होण्याची शक्यता आहे.

Read more...

Friday, February 10, 2012

रिपाइंला ‘हाता’चा फटका, ‘हत्ती’चा झटका


शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती प्रचाराचे ढोल बडवत असले तरी, आठवले यांची आरपीआय दलित मतांपासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत.

मुंबई- शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती प्रचाराचे ढोल बडवत असले तरी, रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दलित मतांपासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत. दलितांची परंपरागत एकगठ्ठा मते काँग्रेसकडे असून दलितबहुल मतदारसंघामधील रिपाइंकडे जाणारी मते बहुजन समाज पार्टीकडे वळण्याची शक्यता आहे. या मतविभाजनाचा फायदा यावेळी काँग्रेसलाच मिळणार असून, यावेळी हाताचा फटका आणि हत्तीचा झटका बसेल की काय, याची धास्ती रिपाइं कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
 
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी, अखिल भारतीय सेना या लहान पक्षांच्या अस्तित्वालाच धक्का बसला आहे. बसपच्या धारावीतील प्रभाग क्रमांक 175 मध्ये पारुबाई कटके या एकुलत्या एक नगरसेविका होत्या. त्यादेखील काँग्रेस पक्षात गेल्यामुळे बसपाचे पालिकेतील अस्तित्वच संपुष्टात आले होते. परंतु आठवलेंच्या रिपाइंने महायुतीत प्रवेश केल्यामुळे बसपच्या आशा पल्लवीत झाल्या. रिपाइं मतांची जागा आपण भरून काढू, असा विश्वास वाटल्याने या पक्षाने 140 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याउलट रिपाइंला शिवसेना-भाजप युतीने केवळ 29 जागा दिल्या आहेत.

त्यामुळे या जागांवरील मतांचे विभाजन तसेच अन्य जागांवरील दलित मते काँग्रेस, बसप, भारिप बहुजन महासंघ तसेच, पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांच्यामध्ये विखुरली जातील. आठवलेंचे तीन नगरसेवक होते, त्यापैकी दोघांना काँग्रेसने उमेदवारीही दिली. मात्र बाबा बनसोड हे एकमेव निष्ठावंत रिपाइंसोबत राहिले. मात्र त्यांना महायुतीत उमेदवारी दिली नाही. हा प्रभाग महिला राखीव झाल्याने पत्नीला उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र तेही हाती न पडल्याने त्यांच्या पत्नीने बंडखोरी करत आठवलेंना झटका दिला आहे. सपच्या सात नगरसेवकांपैकी आस्मा शेख या राष्ट्रवादीमध्ये गेल्याने त्यांची संख्या सहा झाली आहे. सपचे अस्तित्व केवळ मानखुर्द-गोवंडी, या अबू आझमींच्या मतदारसंघात असले तरीदेखील त्यांनी 125 उमेदवार उभे केले आहेत

Read more...

Monday, February 6, 2012

घड्याळाला हाताचाच आधार

कोकणात नारायण राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत संघर्ष पेटलेला असताना विलासराव देशमुख यांनी लातूरमध्येही राष्ट्रवादीविरोधात दंड थोपटले. राज्यात एकत्र काम करणा-या या दोन पक्षांमध्ये कलगी-तुरा रंगलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुंबई गाठली आणि पत्रकार परिषद घेऊन माध्यमांद्वारे आपल्या लोकांना सबुरीचा सल्ला दिला. काँग्रेसच्या हाताची साथ असेल तरच सत्तेची ऊब मिळेल, हात नसेल तर घडय़ाळ लावणार कुठे हे पक्के ठाऊक असलेल्या पवारांनी काँग्रेस नेत्यांवर वैयक्तिक टीका करू नका असे आवाहन आपल्या नेत्यांना केले.

महाराष्ट्रातील 27 जिल्हा परिषदा आणि मुंबईसह10 महानगरपालिकांच्या प्रचाराची रणधुमाळी टिपेला पोहोचली आहे. या निवडणूक प्रचारात खरी टीका आणि टिप्पणी होत आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये. राज्यात एकत्र सरकार चालविणारे हे दोन पक्ष एकमेकांविरूद्ध संघर्षाच्या पावित्र्यात उभे ठाकले आहेत. त्यातही दिवसाढवळ्या मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार अधिक आक्रमकपणे काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत. आपल्या राजकीय वाटचालीत मुख्य अडसर काँग्रेसचे ज्येष्ठ आणि आक्रमक नेते नारायण राणे यांचाच होण्याची भीती अजित पवारांना वाटत असावी म्हणूनच त्यांनी कोकणात जाऊन राणे यांना आपले लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केला. राज्यातील बोलके पोपट गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही कोकणात जाऊन राणे यांच्यावर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या कर्मभूमीत येऊन आपल्यावर गुरगुरणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हा आगाऊपणा अर्थातच नारायण राणे यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे खपवून घेतला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वस्त्रहरणअशी जाहिरात देऊन राणे यांनी रणशिंग फुंकले. कुडाळ येथील प्रचारसभेत त्यांनी अजित पवार, आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कोकणातील राजकारणात राणे एकटे पडतील, अशी राष्ट्रवादीची अटकळ पुरती फोल ठरवून राणेंनी या नेत्यांनाच उघडे पाडले. त्यांनी कोकणात जे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वस्त्रहरणकेले ते एवढे बिनतोड होते की त्याचे समर्थन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही केले. कोकणात जाऊन कुणी राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न करीत असेल, त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करीत असेल आणि राणे यांनी त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले असेल तर त्यात चुकीचे कायअसा सवालच या नेत्यांनी केला.
 
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोकणात जाऊन राणे यांच्यावर मोघम आरोप केले. मात्र वस्त्रहरण करता राणे यांनी वस्तुनिष्ठ पुरावेच हातामध्ये ठेऊन या बिनबुडाच्या आरोपांचे खंडन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आपण निधी दिल्याच्या डरकाळ्या अजितदादांनी फोडल्या होत्या. राणे यांनी आपण मागितलेल्या निधीमध्ये अर्थमंत्री अजित पवारांनी कसा खोडा घातला तसेच गेल्या वर्षापेक्षा यावर्षी कमी निधी देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यावर कसा अन्याय केला हे राणे यांनी दाखवून दिले. सिंधूदुर्ग जिल्ह्यात दहशतवाद असल्याच्या वल्गना करणा-या गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर राणे जोरदार हल्ला चढविताना सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात आणि आर. आर. पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातच गुन्हेगारी कशी वाढलेली आहे, हे आकडेवारीसह दाखवून दिले. एवढय़ावरच राणे थांबले नाहीत, तर पुण्यामध्ये होत असलेल्या जमीन गैरव्यवहाराचे पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. वस्त्रहरणचा दुसरा भाग पुण्यात करणार असल्याचा इशारा देऊन राणे यांनी पवार कुटुंबियांना चांगलीच धडकी भरवली. नारायण राणे यांच्यासोबत त्यांचे सुविद्य सुपुत्र, रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार डॉ. निलेश राणे आणि स्वाभिमान या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनीही निवडणूक प्रचारात मुसंडी मारली असून बिनबुडाचे आरोप करणा-यांना चोख प्रत्त्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात शिवसेना, भाजप, रिपाइं आणि राष्ट्रवादी या अभद्र युतीने काँग्रेसला डिवचण्याचा कसा प्रयत्न केला याचा पर्दाफाश पत्रकार परिषद घेऊन केला तर निलेश राणे यांनी अजितदादांना जशास तसे प्रत्त्युत्तर देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठय़ा प्रमाणात काँग्रेस पक्षात प्रवेश दिला.
 
कोकणात नारायण राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत संघर्ष पेटलेला असताना विलासराव देशमुख यांनी लातूरमध्येही राष्ट्रवादीविरोधात दंड थोपटले. राज्यात एकत्र काम करणा-या या दोन पक्षांमध्ये कलगी-तुरा रंगलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुंबई गाठली आणि पत्रकार परिषद घेऊन माध्यमांद्वारे आपल्या लोकांना सबुरीचा सल्ला दिला. काँग्रेसच्या हाताची साथ असेल तरच सत्तेची ऊब मिळेल, हात नसेल तर घडय़ाळ लावणार कुठे हे पक्के ठाऊक असलेल्या पवारांनी काँग्रेस नेत्यांवर वैयक्तिक टीका करू नका असे आवाहन आपल्या नेत्यांना केले. मात्र आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याचे भान ठेवताना त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. काका जर मुख्यमंत्र्यांवर टीका करीत असतील तर पुतणे कसे मागे राहतील? मग अजितदादा मुख्यमंत्र्यांवर घसरले. दुस-या पक्षाच्या लोकांना फोडाफोडी करून आणल्यामुळे डोक्यात हवा शिरलेल्या अजितदादांचा तोल सुटला आहे हेच दिसून येत आहे. फोडाफोडीने पक्ष वाढत नसतो उलट नव्यांची खोगीरभरती झाली की जुन्यांची नाराजी वाढत जाऊन बंडखोरी वाढते हे दादांना सांगणार कोण? काँग्रेस नेत्यांवर टीकास्त्र सोडणा-या दादांना पक्षांतर्गत संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे.
 
केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहायचे असेल तर काँग्रेसच्या आधाराशिवाय पर्याय नाही, हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीतच पवारांच्या लक्षात आले. सोनिया गांधींच्या विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करीत पवार यांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. मात्र सत्तेच्या जवळपास पोहचण्याइतकेही आमदार त्यांना निवडून आणता आले नाहीत. अखेर ज्या काँग्रेसवर टीका करीत निवडणुका लढविल्या त्याच काँग्रेसबरोबर सत्तेसाठी हातमिळवणी करीत नमते घेण्याची वेळ पवारांवर आली आणि तेव्हापासून त्यांची काँग्रेसबरोबर राज्यात आघाडी आहे. एकीकडे मैत्रीचा हात पुढे करीत असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे खच्चीकरण करून आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मतदारांनी त्यांचे मनसुबे तडीस जाऊ दिले नाहीत2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या घटली आणि काँग्रेसचे आमदार मोठय़ा संख्येने वाढले.

काँग्रेसच्या बाजूने लोकांनी कौल दिलेला असला आणि राज्यातील जनता काँग्रेसच्या बाजूने असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्यानेच अजित पवारांनी पक्ष वाढविण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे. दुस-या पक्षात अकार्यक्षम ठरलेल्या कार्यकर्त्यांना आमिषे दाखवून फोडण्याचा सपाटा लावला आणि आपली खूप शक्ती वाढत असल्याचा भास अजित पवार आणि आर. आर. पाटील यांच्यासारख्या नेत्यांना झाला. काँग्रेसवर तोंडसुख घेऊन त्यांच्या नारायण राणे यांच्या सारख्या प्रभावी नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मात्र शरद पवार यांना परिणामांची जाणीव झाली. सत्तेवर जर राहायचे असेल तर काँग्रेस नेत्यांशी पंगा घेणे घातक ठरू शकते हे ओळखून पवारांनी जुळवून घेण्याचे ठरविले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यापासून राष्ट्रवादीचे राजकारण काँग्रेसच्या आधारानेच चालेले आहे. हे पुढे टिकवायचे असेल तर कटुता वाढू नये यासाठी नारायण राणे यांच्यावर कोणतीही टिपण्णी करण्याचे त्यांनी टाळले.

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP