आदिवासी-धनगरांच्या कात्रीत सरकार!
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होण्याआधी मराठा-मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मार्गी लावला. आता धनगर, लिंगायत या जाती पुढे आल्या आहेत. धनगरांनी तर मंत्रालय हादरून टाकणारे आमरण उपोषण आंदोनल सुरू केले आहे. मराठी-अमराठी, हिंदू-मुस्लीम या वादांनी राजकारण वादग्रस्त बनून समाजा-समाजामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. या पुढील काळात जाती-जातींमध्ये आरक्षणाच्या मुद्दय़ावरून विद्वेष पसरू लागला आहे. ही प्रकरणे वाढली तर जाती-जातींमध्ये यादवी माजून तुंबळ युद्धे होतील की काय, असे वाटू लागले आहे. सर्वच जातींना आरक्षणाचे जास्तीत जास्त लाभ पदरात पाडून घ्यायचे आहेत. त्यामुळे सर्वजण एकमेकांविरुद्ध उभे राहून महाराष्ट्रात भडका उडेल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शासकीय सेवा भरती आणि शिक्षणाबरोबरच राजकीय आरक्षणावर डोळा असल्यामुळे सगळा आटापिटा चालला आहे.