Tuesday, June 30, 2009

पॉवर नाही! पॉवरचा शॉक

(
दरवाढीच्या प्रस्तावाची सुनावणी असते त्यावेळी शिवसेना तिकडे फिरकत नाही. वाढीव बिले आल्यानंतर भरणा केंद्रांची मोडतोड केली जाते. पण रिलायन्सचा परवानाच रद्द करावा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली असून विरोधकांच्या आंदोलनातली हवाच काढून घेतली आहे.


विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने शिवसेना-भाजप युतीवर मात करण्याचे पद्धतपशीर प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या सप्ताहात सरकारने जाहीर केलेले कोकण पॅकेज आणि वीजदरवाढीवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणा-या शिवसेनेला चपराक यामुळे शिवसेना-भाजप युतीचीच सरकारने कोंडी करून टाकली आहे. शिवसेनेच्या आंदोलनाची धार बोथट झाली आहे. मुंबई आणि कोकण हे एके काळी शिवसेनेचे बालेकिल्ले होते. इथल्या गडांनाच खिंडारे पडली असून, डागडुजी करण्याचीही ताकद उरलेली नाही. पॉवर तर नाहीच, शॉक मात्र बसला आहे.

Read more...

Tuesday, June 23, 2009

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा रिप्ले


राष्ट्रवादीचे अनेक निर्णय चुकले. निवडणुकीत जातीयवाद उफाळून येण्याचे प्रमुख कारण मराठा आरक्षण हेच होते. निवडणुकीच्या दोन दिवस आधी त्यांनी मेटेंचे निलंबन मागे घेतले. मराठा मुद्दा उफाळून वर आल्यामुळे ओबीसी व दलित-मुस्लिम पक्षापासून दूर गेले.


लोकसभा निवडणुकीतील यशाने काँग्रेसजनांचा आत्मविश्वास वाढला आहे, तर अपेक्षित यश मिळाले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीला केवळ तीन महिने उरले असल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राज्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे. प्रदेश काँग्रेसने जिल्हावार आढावा बैठका घेतल्या असून, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे संपर्क दौ-यावर निघणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मपरीक्षण सुरू केले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री, सर्वांच्या गेल्या आठवडय़ात चिंतन बैठका आयोजित केल्या.दोन्ही पक्षांनी निवडणूक तयारी सुरू केली असताना काँग्रेसशी आघाडी करायची की नाही, यावर तू तू मैं मैंदेखील सुरू झाले आहे. शिवसेना-भाजप युती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना दूर ठेवायचे असेल, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अपरिहार्य आहे, असे या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना वाटत आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आघाडी करण्याची भूमिका मांडली ती पवारांनी मान्य केली आहे. काँग्रेसचे नेते उद्योगमंत्री नारायण राणे यांनीही सत्ता राखायची तर आघाडी झालीच पाहिजे, असे जाहीरपणे सांगितले आहे. या भूमिकेला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही दुजोरा दिला आहे. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख आणि बाळासाहेब विखे-पाटील यांनी ताणून धरले आहे. काँग्रेसने स्वबळावर लढावे, असा आग्रह त्यांनी धरला असल्याने राष्ट्रवादीनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीआधी ताणातणीचे आणि दबावतंत्राचे जे चित्र होते, त्याचाच रिप्ले सुरू झाला आहे.
 
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जो फटका बसला, त्याची कारणे पवारांनी प्रथम शोधली. चूक उमगल्यानंतर आणि आत्मपरीक्षण केल्यानंतरच पक्षाला मार्गदर्शन करण्याकरिता त्यांनी बैठकांचे आयोजन केलेले दिसते. पवारांना पंतप्रधान करण्याचा ध्यास घेतलेले काही नेते सकाळी उठल्यापासून अब की बार शरद पवार असा नारा देत होते. ही मोठी चूक त्यांनी मान्य केली आहे. जेव्हा या घोषणेचा अतिरेक झाला, तेव्हाच त्यांनी संख्याबळ असल्याशिवाय पंतप्रधान होता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नव्हती. देवेगौडा, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल नगण्य संख्याबळावर पंतप्रधान होऊ शकले, असे अनेकदा सांगून, आपण का नाही होऊ शकत, असेच त्यांनी सुचवले होते. जनमानस काय आहे, आपल्या बाजूने आहे की नाही, याचा विचार तेव्हा केला नाही. जनमानस बाजूने नव्हते; याचे कारण पक्षात सत्तेची धुंदी आणि पैसा यामुळे मस्ती आणि गुर्मी वाढली होती त्यमुळे लोक दुरावले. याचीही जाणीव पवारांनी पक्षातील नेत्यांना करून दिली, हे बरे झाले; अन्यथा काही जणांचे पाय जमिनीवर नव्हतेच. जमिनीच्या दोन फूट उंचावरून चालण्याची त्यांना सवय झाली होती.
 
राष्ट्रवादीचे अनेक निर्णय चुकत गेले. निवडणुकीत जातीयवाद उफाळून येण्याचे प्रमुख कारण मराठा आरक्षण हेच होते. त्या कारणावरून विनायक मेटेंना पक्षातून निलंबित केले होते. पण निवडणुकीच्या दोन दिवस आधी त्यांनी मेटेंचे निलंबन मागे घेतले. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐन निवडणुकीत उफाळून वर आल्यामुळे ओबीसी व दलित-मुस्लिम पक्षापासून दूर गेले. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची प्रतिष्ठेची असलेली नाशिकची जागा कशीबशी राखली आणि समीर भुजबळला निवडून आणले. मराठा मतांचे ध्रुवीकरण झाल्याने दिंडोरीची हक्काची जागा गमावली.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्व सहा आमदार आहेत, पण राष्ट्रवादीचे उमेदवार नरहरी झिरवळ निवडून येऊ शकले नाहीत. भुजबळांसारखे सामर्थ्यवान नेते असूनही त्यांची दमछाक झाली. म्हणूनच चिंतन बैठकीत त्यांनी, मराठा आरक्षणाने जातीयवाद वाढवून पक्षाला फटका बसल्याचे स्पष्टपणे सांगितले. हीच परिस्थिती राहिली तर विधानसभा निवडणुकीत काही खरे नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
पक्षात ही परिस्थिती असताना विलासरावांच्या स्वबळाच्या ना-याला, आम्हीही स्वबळावर लढू, असे हाकारे दिले जात आहे. स्वबळावर लढण्याच्या विलासरावांच्या ना-याचा बंदोबस्त करण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठी समर्थ आहेत. पण राष्ट्रवादीच्या हाका-यांचा बंदोबस्त करणे पवारांच्या हाताबाहेर गेले आहे. मराठा सरंजामदारांना बळ देऊन जातीयवाद पोसण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. फुले, आंबेडकर, शाहू महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या पवारांनी हे रोखले नाही.

जे आदर्श समोर ठेवून (किमान दिवसा तरी) आपण राजकारण करतो, ते मराठा समाजात रुजवण्यास ते कमी पडले. त्याचा गैरफायदा पक्षातील जातीयवाद्यांनी घेतला आणि पवारांना कमीपणा आणला; तरी त्यांना व्यासपीठावर पवारांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा सन्मान मिळू शकतो, हे विशेष.पक्षातील मतभेद वाढण्यास काहीअंशी पवार जबाबदार असल्याची चर्चा त्यांच्याच पक्षाचे जुनेजाणते नेते करीत आहेत. सुरुवातीला पवार म्हणत होते, आपण निवडणूक लढवणार नाही,राज्यसभेवर जाऊ. नंतर कार्यकर्त्यांचा दबाव आला असल्याने निवडणूक लढवण्यास तयार झालो असे म्हणाले.त्यानंतर कार्यकर्ते म्हणाले शिरूरमधून लढवा. शिरूरमध्ये शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव निवडून येणारच, अशी हवा असल्याने त्यांनी थेट माढा गाठले.

कदाचित पुढील राजकीय गणित मांडून आढळरावांशी पडद्याआड जमवून घेतले असण्याची शक्यता आहे. माढय़ात मोहिते-पाटलांच्या घरात तिकिटावरून आग लागली होती, ती विझवायला गेले आणि रामदास आठवलेंचा पत्ता कट केला. एका दगडात दोन पक्षी मारले. मोहिते-पाटलांचे घरातले भांडण पवारांनी आपली उमेदवारी जाहीर करून मिटवले; पण कोल्हापुरात सदाशिवरावल मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यातले भांडण त्यांना मिटवता आले नाही. पवारांवर निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव होता, तसा मंडलिकांवरदेखील होता. मात्र त्याचा विचार झाला नाही. कोल्हापूर व कागल या दोन हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या. त्याच वेळी मंडलिकांना तिकीट दिले असते, तर मतभेद वाढले नसते आणि आठवलेंचा मतदारसंघ पूर्वीचा पंढरपूर,आताचा माढा झाला असला, तरी त्यांना माढातून निवडून आणले असते, तर सामाजिक न्यायाची भूमिकाही दिसली असती.

तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना-भाजपशी राष्ट्रवादीचे सतत फ्लर्टिग सुरू असते. अजूनही तोच प्रकार चालू आहे. पनवेल नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुणे पॅटर्न प्रमाणे राष्ट्रवादी, शिवसेना-भाजप, शेकाप युती केली. एकीकडे मराठय़ांची स्वबळाची भाषा, दुसरीकडे भुजबळांची निराशा आणि तिसरीकडे शिवसेना-भाजपशी आघाडीची आशा अशा संभ्रमावस्थेत राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा काँग्रेसकडे ओढा वाढत चालला आहे. काँग्रेसशी आघाडी केल्याशिवाय पर्याय नाही, असेच कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे विलासरावांचा प्रतिवाद करण्यासाठी राष्ट्रवादीला सर्व मार्ग खुले असल्याचे पवार म्हणत असले, तरी काँग्रेसशी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही.

Read more...

Sunday, June 14, 2009

महिला आरक्षणाचा ठराव महाराष्ट्राने करावा

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पुरोगामी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेच्या धर्तीवर विधानसभेत आरक्षण देण्याचा ठराव केला पाहिजे व केंद्राकडे सर्वप्रथम ठराव पाठवण्याचा मान मिळवला पाहिजे.


महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुरुषांइतकीच लोकसंख्या असलेल्या महिलांना सत्तेचा योग्य प्रमाणात वाटा मिळाला पाहिजे, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे विधानसभा आणि लोकसभेतही महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी महिला विधेयकाचा पाठपुरावा वेळोवेळी करण्यात आला; परंतु अद्यापि ते मंजूर होऊ शकले नाही. या वेळी काँग्रेसला ब-यापैकी बहुमत आहे आणि तीन यादवांचा पाठिंबा विधेयकाला नसला तरी भाजपचा पाठिंबा आहे, तेव्हा विधेयक मंजूर करण्यास अडचण दिसत नाही. केंद्रामध्ये विधेयकाला खो बसणार असेल तर महाराष्ट्राने पुढाकार घेवून आपल्या राज्यात ते करून दाखवावे. विधिमंडळाने या संबंधीचा एकमताचा ठराव करून केंद्राला पाठवावा. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना महिलांबद्दल विशेष आदर आहे तर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ओबीसींसह महिलांबद्दल आस्था आहे. फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा चालवणा-या महाराष्ट्र शासनाला ख-या अर्थाने पुरोगामित्त्व सिद्ध करण्याची संधी चालून आली आहे. यापूर्वी महाराष्ट्राने केलेल्या अनेक योजना केंद्राने स्वीकारल्या आहेत. महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्थांना ३३ टक्के आरक्षण दिले असून ते यशस्वीपणे राबवले आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी महिलांसाठी आरक्षण आहे. त्याच धर्तीवर महिला आरक्षण विधेयकाचा ठराव करण्यात महाराष्ट्राने पुढाकार घेण्यास हरकत नसावी. केंद्राच्या महिला विधेयकात तीन महत्वाच्या त्रुटी आहेत. एकतर ओबीसी महिलांसाठी आरक्षण नाही, आरक्षणाशिवाय धनगर, माळी, वंजारी, तेली, तांबोळी, कोष्टी आदी समाजाच्या महिला संसद व विधिमंडळात जाऊ शकत नाहीत. तिसरे महिलांसाठी तीन टर्ममध्ये एकदाच आरक्षणाची तरतूद आहे. या तरतूदीचा फेरविचार होणे आवश्यक आहे. आरक्षण किमान दोन टर्म तरी मिळाले पाहिजे. जेणेकरून त्यांना मतदार संघाचा विकास करता येईल व स्वत:च्या कर्तृत्वावर आरक्षण नसतानाही निवडणूक जिंकता येईल. त्याचबरोबर मूळ प्रस्तावामध्ये राज्यसभा व विधानपरिषदेत ३३ टक्के आरक्षणाची तरतूद नव्हती, ती सुधारित विधेयकात होईल, अशी अपेक्षा आहे.
 
महिला विधेयकास मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव आणि शरद यादव या तीन यादवांनी विरोध केला असून ३३ टक्के आरक्षणात ओबीसी महिलांसाठी आरक्षण असावे, अशी मागणी लावून धरली आहे. ओबीसी महिलांसाना आरक्षण मिळाले तर महिलांचे महत्त्व वाढेल व पुरुषांचे वर्चस्व राहणार नाही, असा स्वार्थी हेतूदेखील यामागे असू शकेल; परंतु त्यांच्या मागणीत अगदीच तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही.  आरक्षणाशिवाय ओबीसी महिला येणार नाहीत. ओबीसी महिलांचा कळवळा असल्याचे दाखवणा-या ओबीसी नेत्यांनी आजपर्यंत घटनादुरुस्तीचा आग्रह मात्र धरलेला नाही.
 
राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी राज्य घटनेच्या कलम ४० चा आधार घेऊन ७३वी आणि ७४वी घटना दुरुस्ती केली आणि २४३ कलमान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांच्यासाठी असलेल्या आरक्षणात या समाजाच्या महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्यात आले. त्यामुळे उपेक्षित घटकातील महिलांना सत्तापदे मिळाली. उपेक्षित, मागास समाजातील सर्व जाती-जमातींना जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती तसेच महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिकांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले. सुरुवातीच्या काळात सरपंचपदी ग्रामपंचायतींचे काम पाहत असत; पण पहिल्याच टर्ममध्ये महिला इतक्या धाडसी बनल्या, त्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की, त्या स्वसामर्थ्यांवर कारभार करू लागल्या, महिला ग्रामसभांमधून हिरीरीने गावचे प्रश्न मांडू लागल्या, वर्षानुवर्षे मुक्या असलेल्या महिलांना ३३ टक्के आरक्षणाने वाचा मिळवून दिली. अनुसूचित जातींना १५ टक्के तर अनुसूचित जमातींना ७ टक्के आरक्षण आहे, हे आरक्षण घटनेनेच दिलेले आहे. याच आरक्षणात त्या त्या समाजातील महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. आरक्षण रोटेशन पद्धतीने दिले जात आहे. त्यात कोणत्याही अडचणी नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांचे काम ३३ टक्के आरक्षणानंतरही सुरळीत चालू आहे. ओबीसींची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ५० टक्के आहे; परंतु त्यांना २७ टक्केच आरक्षण मिळाले आहे, याचे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही. अनुसूचित जाती-जमातीचे मिळून २२ टक्के आरक्षण होत असल्याने ओबीसींना २७ टक्केच आरक्षण द्यावे लागत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण नसतानाही ओबीसींनी विरोध दर्शवलेला नाही. परंतु लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देणा-या  महिला विधेयकात ओबीसींसाठी आरक्षण ठेवलेलेच नाही. वास्तविक हे आरक्षण ठेवण्याची नितांत गरज आहे, त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. अन्यथा उपेक्षित घटकांमधील महिलांना या संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळणारच नाही. सगळय़ा जागा उच्चवर्णीय महिलांनाच जातील.
 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या महिला निवडून आल्या, त्यातील बहुसंख्य महिलांना राजकीय वारसा लाभलेला आहे. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या काँग्रेसचे दिवंगत नेते जगजीवनराम यांच्या कन्या आहेत, श्रुती चौधरी या बन्सीलाल यांच्या, ज्योती मिर्धा या नथुराम मिर्धा यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या, आगाथा संगमा या पी. ए. संगमांच्या कन्या आहेत. या वेळी १५व्या लोकसभेत ५४३ खासदारांमध्ये ५९ महिला निवडून आल्या. त्यामध्ये ओपन जागांवर ४१ महिला उच्चवर्गीय आहेत, केवळ ५ महिला ओबीसी आहेत, उर्वरित १३ महिला अनुसूचित जाती-जमातीच्या असून त्या राखीव जागांवरून निवडून आलेल्या आहेत. १९५२ साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजतागायत महिला सदस्यांची संख्या सरासरी ६ टक्क्यांपर्यंतच राहिली आहे. १९५२ साली लोकसभेत ४९९ सदस्य होते, त्यापैकी २२ महिला होत्या. त्यांची सरासरी टक्केवारी ४.४ टक्के आहे. १९८० साली एकूण ५४४ सदस्य होते, त्यात महिला २८ (५.१५ टक्के), १९९८ साली ५४३ सदस्यांपैकी महिला ४३ (७.९ टक्के), यंदा २००९ साली ५४३ सदस्य, पैकी महिला ५९ (सुमारे १० टक्के) एवढे अल्प प्रमाण महिलांचे आहे.

पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रात परिस्थिती फारशी निराळी नाही. १९५२ साली महिलांचे प्रमाणे १.९ टक्के, ६० साली ४.९, ७० ते ७५मध्ये ९.३ टक्के, ९८ ते ९९ मध्ये ४.२ टक्के व यंदा ४.१ टक्के एवढेच महिलांचे प्रमाण आहे. त्यात मागास जाती-जमातींमधील महिलांचे प्रमाण नगण्य आहे. महिलांना जर खरोखर पुरुषांच्या बरोबरीचे स्थान द्यायचे असेल तर संसद व विधिमंडळात त्यांचे प्रतिनिधित्व वाढले पाहिजे आणि ज्या मागास समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के एवढी आहे, त्या ओबीसी समाजाला व त्यांच्या महिलांनाही योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. एकूण लोकसंख्येत निम्मी लोकसंख्या असलेल्या महिलांचे १९५२पासून जे नगण्य प्रमाण आहे, ते अन्यायकारक आहे. ५० टक्के महिलांची मते हवीत; पण त्यांना प्रतिनिधित्व नाही, ही परिस्थिती बदलली पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पुरोगामी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेच्या धर्तीवर विधानसभेत आरक्षण देण्याचा ठराव केला पाहिजे व केंद्राकडे सर्वप्रथम ठराव पाठवण्याचा मान मिळवला पाहिजे.

Read more...

Sunday, June 7, 2009

आघाडी सरकारचे `सब जोडो' अभियान

शेतक-यांची कर्जमाफी केली तशी सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या महामंडळांनी दिलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घोषित करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या प्रयत्नामुळे अर्थसंकल्पाला सामाजिक न्यायाचा चेहरा देण्यात वळसे-पाटील यशस्वी झाले.


राज्यात विधासनभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षपातळीवर निवडणुकीचा आढावा आणि मोर्चेबांधणी यासंदर्भात बैठका सुरू केल्या आहेत. मतदारसंघनिहाय संशोधन सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार कोणत्या मतदारसंघात पडले, कोणामुळे पडले, पक्षांतर्गत स्पर्धेतून कोणी कोणाला पाडले याचा लेखाजोखा एकीकडे घेतला जात असताना सरकार पातळीवरदेखील आगामी निवडणुकीचा गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. गेल्या गुरुवारी ४ जून रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून काही महत्त्वपूर्ण निर्णय घोषित करण्यात आले आहेत. त्या दृष्टीने पैशाची तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली नसताना आणि डोक्यावरील कर्जाचा बोजा एक लाख ८५ हजार कोटींवर जाण्याची शक्यता असताना समाजातील सर्व वर्गाना न्याय देणारा समतोल अर्थसंकल्प सादर केला आहे. गोरगरीब, दलित, आदिवासी, मागासवर्गीय घटकांसाठी भरपूर तरतूद करून त्यांना खूश केले आहे. गेली दहा वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असल्याने सरकारविरोधी वातावरण निर्माण होणे साहजिक आहे. मात्र केंद्रात आलेले काँग्रेस प्रणीत आघाडीचे सरकार आणि त्या सरकारने जाहीर केलेला १०० दिवसांचा समाजाभिमुख कार्यक्रम राज्यातील आघाडी सरकारसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास पूरक ठरला आहे. या पार्श्वभूमीवर वळसे-पाटील यांनी मतदारांना अधिक आश्वस्त करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी कोणतीही शोबाजी केली नाही. कोटाला लाल गुलाबाचे फूल लावून आणि शेरोशायरीची बरसात करून लोकांना भुलवण्याचा प्रकार त्यांनी टाळला व सरकार राज्यकारभाराबाबत गंभीर आहे, असा संदेश राज्यभर पोहोचवला.


सरकारविरोधी वातावरण तयार होण्यास गावपातळीपासूनच सुरुवात होते. गावाच्या विकासासाठी पुरेसा निधी नाही, सरपंचांना वेळेवर मानधन मिळत नाही, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना प्रशासकीय खर्चासाठी निधी मिळत नाही, अशी ओरड केली जाते. या तक्रारीला सरकारने जागा ठेवली नाही. सरपंच, अंगणवाडी सेविकांचे मानधन, बैठकीचे भत्ते दुप्पट करण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व महिलांना एसटीच्या मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. कापूस उत्पादक शेतक-यांची मालाचे पैसे न मिळाल्याची तक्रार असते, ती तक्रार यंदा राहिली नाही, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या नाफेडमार्फत कापूस खरेदी केली गेली व गतवर्षीप्रमाणे याही वर्षी सरकारने मार्जिन मनी म्हणून १०० कोटी रुपयांची तरतूद केली. सर्वसामान्य माणसांच्या धार्मिक भावनांची कदर करून सर्वधर्मीयांच्या तीर्थस्थळांच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली.


शेतक-यांची कर्जमाफी केली तशी सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या महामंडळांनी दिलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घोषित करण्यात आला आहे. शेतक-यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळामार्फत उद्योग-व्यवसायासाठी दिलेले कर्ज माफ करण्याची मागणी गेले कित्येक दिवस पडून होती, त्याचप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निर्णयही प्रलंबित होता. त्यामुळे या वर्गामध्ये असंतोष वाढत चालला होता. अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी, मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाज हा मोठय़ा प्रमाणात काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे, या वर्गाला दुखवून चालणार नाही. यासाठी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी सतत पाठपुरावा केला, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मान्यता घेतली व वळसे-पाटील यांनी विविध मागास घटकांची ११०० कोटी रुपयांची कर्जे माफ केली. त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचा ३०० कोटी रुपयांचा अनुशेष आणि यंदा शैक्षणिक वर्षासाठी ५०० कोटी रुपये अशी एकूण ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सामाजिक न्याय विभागाचे सचिव एन. आरुमुगम यांनी मेहनत घेऊन योग्य प्रस्ताव सादर केले. या विभागाच्या प्रयत्नामुळे अर्थसंकल्पाला सामाजिक न्यायाचा चेहरा देण्यात वळसे-पाटील यशस्वी झाले. निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे का होईना पण मागास घटकांसाठी चांगले निर्णय झाले आहेत.
 
दुर्बल मागास घटकांना न्याय देण्याची ही परंपरा सरकारने कायम राखणे आवश्यक आहे. कर्जे माफ केली म्हणून मागासवर्गीयांची आर्थिक उन्नती झाली असे म्हणता येणार नाही. त्यांनी व्यवसायासाठी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे, यासाठी त्यांना योग्य रकमेचे कर्ज मिळाले पाहिजे, सतरा ठिकाणी हेलपाटे घालून हाती काहीच लागत नाही, अशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवू नये याकरिता एक खिडकी योजना असली पाहिजे. प्रत्येक माणसाला व्यक्तिश: स्वत:च्या पायावर उभे राहता आले पाहिजे, याकरिता विविध मागास  महामंडळांमार्फत कर्जपुरवठा केला जातो, तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनादेखील दलित मागास वस्त्यांचा विकास व त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आखल्या जात आहेत. अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद केली जाते. राज्याची वार्षिक योजना  २६ हजार कोटी रुपयांची असल्याने अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १० टक्के लोकसंख्या गृहित धरून २६०० कोटी रुपयांची तरतूद केली जात आहे. प्रत्यक्षात अनुसूचित जातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात १६ टक्के आहे. परंतु त्यातून नवबौद्धांना वगळण्यात आले असून केवळ १० टक्के लोकसंख्या दाखविण्यात आली आहे. याचाही सरकारला गांभीर्याने विचार करावा लागेल.
 
मुस्लिम व अन्य अल्पसंख्याक समाजघटकांसाठीदेखील नवीन कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी, रोजगार व व्यवसायासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य माणसांना रोजगार मिळावा, यासाठी राज्याची रोजगार हमी योजना होती; ती आता बंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्याकरीता कोटय़वधी रुपये मिळू शकतात. परंतु सरकारी पातळीवर तसे प्रयत्न होताना दिसत नाही. राज्यातील रोजगार हमी योजनेप्रमाणे त्यात मलिदा मिळत नाही, त्यामुळे केंद्राकडून प्रयत्नपूर्वक निधी मिळवण्याबाबत लक्ष दिले जात नाही. केंद्राकडून विविध योजनांसाठी येणारा निधी वापराविना तसाच पडून राहतो व परत जातो. केंद्राच्या निधीचा अधिकाधिक वापर करून विकासकामात आपल्यामागे असलेली आंध्र, राजस्थानसारखी राज्ये पुढे गेली. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत ५-५ हजार कोटींची कामे त्यांनी घेतली. आपल्याला गतवर्षी तीन हजार कोटींची कामे सुरू करता आली असती; पण आपले गाडे ९०० कोटींवरच थांबले. केंद्राच्या निधीसाठी पाठपुरावा व त्याचा योग्य विनियोग यासाठी एका विशेष सक्षम अधिका-याची नेमणूक करणे आवश्यक आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाने सरकारसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे, एवढे निश्चित!

Read more...

Monday, June 1, 2009

प्रधान गोलमाल! अनामी मालामाल!!

मुंबई शहरावर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्याकरिता नेमलेला राम प्रधान समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला.


मुंबई शहरावर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्याकरिता नेमलेला राम प्रधान समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. एवढ्या मोठय़ा महाभयंकर हल्ल्याचा चौकशी अहवाल केवळ तीन महिन्यांमध्ये पूर्ण केल्याबद्दल प्रधान समितीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, अन्यथा अनेक वेळा एवढ्या चौकशी समित्या नेमल्या जातात, पण अहवाल कधी वेळेवर येत नाही. आला तर त्यामधील शिफारशींनुसार त्वरित कार्यवाही केली जात नाही. मात्र प्रधान समितीने केलेल्या शिफारशींची अमलबजावणी निश्चित मुदत ठरवून पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.


प्रधान समितीने राज्य शासन आणि पोलिस प्रशासन या दोहोंना क्लीन चिट दिली असल्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला आहे, याबद्दल शंकाच नाही. विशेष म्हणजे, दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले विलासराव देशमुख यांचा शपथविधी अहवाल सादर केला त्याच दिवशी झाला, हा निव्वळ योगायोग असावा काय? घाईगडबडीत सादर केलेला हा अहवाल म्हणजे योगायोग असूच शकत नाही, असे लोक म्हणतात. ते काही असो, पण हा अहवाल अपुरा, गोलमाल आणि निव्वळ मलमपट्टी करणारा असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.
 
राम प्रधान हे राज्याचे मुख्य सचिव व केंद्रीय गृहविभागाचे सचिव या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते, तसे समितीतील त्यांचे सहकारी व्ही. बालचंद्रन हेदेखील रॉ या केंद्रीय गुप्तहेर संघटनेचे वरिष्ठ अधिकारी तसेच मुंबई विशेष शाखाचे प्रमुख या पदांवर काम केलेले अधिकारी होते. या अधिका-यांनी राज्य शासनाची आणि पोलिसांची चूकच नव्हती, असा निष्कर्ष चौकशीअंती काढला आहे आणि सुरक्षा व पोलिस दल सुधारणांविषयक शिफारशी केल्या आहेत. बालचंद्रन यांचे वैयक्तिक मत मात्र निराळे आहे. स्थानिक गुप्तचर यंत्रणा बाहेरून येणा-या व्यक्तींचा शोध घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची माहिती मिळवू शकते, परंतु स्थानिक यंत्रणा आणि शासन यांनी आजवर चुकीचे निर्णय घेतले आहेत, असे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र अहवालात आपले मत नोंदवण्याचे धाडस त्यांनी दाखवलेले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून असंख्य शिफारशी विविध आयोगांनी व समित्यांनी सुचवल्या आहेत. पण त्यावर कार्यवाही झालेली नाही. स्वत: विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी पत्रकार परिषद घेऊन अनेक सुधारणा घोषित केल्या आहेत, त्यात प्रधानांनी नवीन काय केले?
 
केंद्रीय गुप्तचर विभागाने हल्ल्यासंदर्भात पूर्वसूचना दिली नसल्याची कबुली गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी देऊन दिलगिरी व्यक्त केली. एवढ्या एका कबुलीवर प्रधान समितीने शासनाला क्लीन चिट देऊन पोलिसांना उत्कृष्ट कामगिरीचे सर्टिफिकेट दिले आहे. त्यामुळे प्रधान समितीच्या या अहवालाबाबत अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. केंद्राच्या गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश असेल, तर राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला मोकळे सोडून कसे चालेल? अतिरेकी कारवाया स्थानिकांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाहीत. या अतिरेक्यांपैकी काही जण आधीच मुंबईत पाहणी करण्याकरिता आले होते. त्यांनी येथे कोणाची मदत घेतली, त्यांना पैसा कोणी पुरवला, त्यांची राहण्याची व्यवस्था कोणी केली, या सर्व बाबींची माहिती राज्य पोलिस गुप्तवार्ता विभाग किंवा मुंबई पोलिस विशेष शाखा या यंत्रणांनी घेतली का? दिल्लीहून माहिती आली, तरच हे कारवाई करणार का? इथल्या स्थानिक हालचालींचीपण माहिती मिळवणार नाही का?
 
अतिरेक्यांना मिळालेल्या स्थानिक मदतीबाबत कोणताही निष्कर्ष समितीने काढलेला नाही. प्रधान म्हणतात की, अचानक झालेला हल्ला आणि युद्धजन्य परिस्थिती कोणालाच हाताळता येणे शक्य नव्हते. मग केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना राजीनामे देण्याचीही गरज नव्हती. राज्याचे तत्कालीन पोलिस महासंचालक अनामी रॉय आणि मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्याप्रमाणे त्यांनीही उजळमाथ्याने पदावर राहावयास हवे होते. असा महाभयंकर प्रसंग ओढवला किंवा संकट आले, तर लोकक्षोभ शमवण्यासाठी समिती नेमून लोकांना शांत केले जाते. अतिरेक्यांनी या वेळी सागरी मार्गाने येऊन हल्ले केले. पुढच्या वेळी हवाई मार्गाने हल्ले केले जातील. त्यावेळीपण राम प्रधानांची समिती शासन नेमणार आहे का? आणि शासनाला क्लीन चिट देण्याचे काम प्रधान करणार आहेत का? शासनाला क्लीन चिट देण्यामागे प्रधानांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपलेली आहे, अशी चर्चा केली जात आहे. मुळात राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या व्यक्तींची समितीच नेमली जाऊ नये. त्या विषयातील तज्ज्ञ, सजग व सद्सदविवेकबुद्धी शाबूत ठेवून काम करणाऱ्यांची समिती नेमली पाहिजे, तरच त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतील. अतिरेक्यांचे हल्ले करण्याचे धाडस होणार नाही, असे वातावरण समितीच्या अहवालाच्या माध्यमातून तयार होणे आवश्यक आहे.
 
दहशतवादी हल्ल्याला राज्याचे पोलिस आयुक्त अनामी रॉय, मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर, गुप्तचर यंत्रणा व विशेष शाखा यांच्यातील मतभेदाने आलेली मरगळ आणि एकमेकांमध्ये असलेली स्पर्धा असे अनेक कंगोरे आहेत. परंतु राम प्रधान हे अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नावे घेण्यास नववधूप्रमाणे का लाजले आहेत? वास्तविक पाहता, जे अधिकारी या हल्ल्याच्या प्रसंगी शहीद झाले, त्यांच्या पत्नींची साक्षदेखील प्रधानांनी घेणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. ए. आर. अंतुले यांचीही साक्ष नोंदवून घेणे आवश्यक होते. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांची नोंद व्हावयास हवी होती. चौकशी र्सवकष झाली पाहिजे. शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी हृदयाला भिडेल असा एकच प्रश्न केला आहे : कोणाची जर चूक नव्हती, तर मी माझ्या पतीला का गमावले? प्रधानांकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे? शहीद अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनीही हा प्रश्न तर विचारलाच, पण त्याहीपुढे जाऊन त्यांनी, २६ नोव्हेंबरच्या रात्री पोलिस नियंत्रण कक्षात आलेल्या संदेशांचे रेकॉर्ड का वगळले, असा मार्मिक सवाल केला आहे. पोलिस जर संदेशांचे रेकॉर्ड करीत बसले होते, तर त्याच यंत्रणेद्वारे ते अतिरेक्यांची दिशाभूल करू शकत होते.

लष्कराप्रमाणे चुकीचे सिग्नल पाठवू शकत होते. त्यांना ट्रॅप करणे पोलिसांना शक्य होते. पण पोलिसांनी तसे केले नाही, या संदर्भात प्रधानांनी मौन बाळगले आहे. चौकशी अहवालात अशा अनेक ढोबळ त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे अहवाल अपूर्ण आहे. मात्र या अहवालाच्या मार्गदर्शनानुसार आता अनामी रॉय यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना पुनश्च लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेच्या निवडणुका समोर असल्याने राज्याचे जाणते राजे त्यांना सन्मानपूर्वक महासंचालकपदावर बसविण्यास उत्सुक असावेत. आता त्यांना इतर कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. त्यांच्या स्वागतासाठी राज्याने सज्ज राहायचे, एवढेच! रॉय यांच्या सुदैवाने जाब विचारणारे गोपीनाथ मुंडेही आता विधानसभेत नाहीत. ते लोकसभेत निवडून गेले आहेत. या अहवालाने खरोखर सत्य उघडकीला आले की लपवले, अशी शंका मात्र लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. 

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP