Thursday, April 30, 2009

मायावतींच्या हत्तीवर राज्यातील दलित नाराज


29 April, 2009

दलित - मुस्लिम मतदारांवर भिस्त असलेल्या बहुजन समाज पक्षाने एकाही दलिताला उमेदवारी दिली नसल्याने      मुंबईतील आंबेडकरवाद्या मध्ये तीव्र संताप खदखदत आहे.

दलित - मुस्लिमांच्या मतदारांवर भिस्त असलेल्या बहुजन समाज पक्षाने एकाही दलिताला उमेदवारी दिली नसल्याने मुंबईतील आंबेडकरवाद्यांमध्ये तीव्र संताप खदखदत असून मतपेटीतून आपला हिसका ते बसपला दाखविण्याच्या तयारीत आहेत. बसपाच्या उमेदवारांचा काँग्रेस पक्षाला फटका बसेल, अशी हवा निर्माण केली जात असली तरी त्याचा कोणताही परिणाम परंपरागत मतांवर होणार नाही, असे चित्र मंगळवारी, प्रचाराच्या समारोपाच्या दिवशी स्पष्ट झाले.

बसपने मोठा गाजावाजा करीत महाराष्ट्रात ‘हत्ती’ घुसवण्याचा प्रयत्न केला. सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग उत्तर प्रदेशात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातही तोच प्रयोग सुरू केला. त्याचाच भाग म्हणून मुंबईतील सहा जागांवर त्यांनी उमेदवार दिले. मात्र ज्या दलित समाजाला केंद्रबिंदू मानून पक्षाची वाटचाल सुरू आहे, त्या समाजातील एकालाही मुंबईत उमेदवारी दिली नसल्याने दलित मतदारांत कमालीची नाराजी असून आम्ही काय केवळ मुस्लिम-ब्राह्मणांचा प्रचार करायचा काय, असा सवाल वस्त्यावस्तींतील तरुण विचारत आहेत. ज्या समाजाच्या विरोधात चळवळ उभी राहिली त्याच समाजाच्या पालख्या पुन्हा वाहव्या लागणार असतील तर मग राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसलाच मतदान केलेले बरे, अशी भावना या समाजात पसरली आहे. त्यामुळे बसपचा हत्ती मुंबईत चालणार नाही, असे चित्र आहे.

‘बसपचा जोर’ असल्याची हवा पसरली असली तरी महाराष्ट्रातील दलित- मुस्लिमांची पारंपरिक मते कायम काँग्रेसलाच मिळाली आहेत. श्रीकृष्ण आयोग, मुस्लिम संघटनांची आवाहने वा मौलवींचे फतवे यांचा काहीही परिणाम न होता ही पारंपरिक मते मिळतात. यंदा अन्य राज्यांतून आलेल्या मुस्लिमांची मते बसप- सपकडे जातील, पण त्यांचे विभाजन होईल. दक्षिण मुंबईत बसपचे शेख मोहम्मद अली यांनी जोरदार प्रचार केला; त्यांच्या समोर आव्हान होते समाजवादी पक्षाचे सय्यद अतहर अली यांचे. दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना बसप वा सपचे आव्हान नाही. बसपचे प्रवीण बर्वे यांच्याकडे मुस्लिम आणि दलित मते वळण्याची शक्यता नसल्याने गायकवाड यांचा मार्ग मोकळा दिसत आहे.

ईशान्य मुंबईत बसपने अशोक सिंग यांना उमेदवारी दिली, तेथील मुस्लिमांची पारंपरिक काँग्रेसी मते असून आजवर ही मते अन्य पक्षाला मिळालेली नाहीत. उत्तर-मध्य मुंबईमध्ये उत्तर भारतीय मुस्लिमांचा थोडाफार पाठिंबा बसपचे भाईजान यांना मिळण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघातील मुस्लिमांची पारंपरिक मते कायम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील दत्त यांच्या मागे राहिली आहेत; ती प्रिया दत्त यांच्याही पारडय़ात पडतील. उत्तर-पश्चिम मुंबईत सपाचे अबू आसीम आझमी यांनी जोर लावला, पण येथे मतांचे धृवीकरण झाले असून उत्तर भारतीय वगळता दलित-मुस्लिमांची मते काँग्रेसचे गुरुदास कामत यांच्या बाजूने संघटित झाली आहेत. उत्तर मुंबईत काँग्रेसचे संजय निरुपम यांनी प्रचारात जोरदार मुसंडी घेतली असून उत्तर भारतीयांचा कल त्यांच्याच बाजूने असल्याने बसपाचे लखमेंद्र खुराणा यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे निरुपम हे नाईक यांच्यासाठी दे धक्का ठरण्याचीच शक्यता दिसत आहे.

Read more...

Wednesday, April 29, 2009

राज-उद्धवच्या साठमारीत कॉंग्रेसशी सरशी

28 April, 2009

मागील लोकसभा निवडणुकीत मुंब ईतील सहापैकी पाच जागा जिंक णा-या काँग्रेस चा पंजा या निवडणुकीतही बाजी मारेल का, याचीच उत्कंठा राजकीय गोटात आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहापैकी पाच जागा जिंकणा-या काँग्रेसचा पंजा या निवडणुकीतही बाजी मारेल का, याचीच उत्कंठा राजकीय गोटात आहे. मनसेचा शिरकाव मोठय़ा प्रमाणावर झाल्याने यंदा परिस्थिती बदलली आहे. मात्र,शिवसेना-मनसेमध्ये सुरू झालेल्या साठमारीचा फायदा काँग्रेसलाच होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या मनसेने जिंकण्यापेक्षा शिवसेना व भाजपचे उमेदवार
पाडण्यावर अधिक भर दिला आहे. राज ठाकरे यांच्या प्रचारसभांचा प्रतिसाद पाहून शिवसेनेनेही गल्लीबोळांत
प्रचार सुरू करून गर्दी जमवण्याचा प्रयत्न चालवला आहे. दोघांनीही मराठी मतांचा अनुनय सुरू केल्यामुळे मराठी मतांचे विभाजन होणार असून काँग्रेसला मात्र त्यांची पारंपरिक मराठी मते मिळणारच आहेत.

मराठी अस्मिता, स्थानिक मराठी तरुणांना नोक-या, मुंबईत वाढणारे लोंढे हे शिवसेनेनेचे हक्काचे मुद्दे राज ठाकरे यांनी मांडल्यामुळे शिवसेनेच्या सभांना होणारी गर्दी मनसेकडे वळली आहे. शिवसेनेच्या सभांची गर्दी रोडावली असून पारंपरिक मतदार असलेल्या प्रौढ आणि वृद्धांना मारून मुटकून आणले जात आहे.

एकेकाळी छगन भुजबळांना मात देणारे बाळा नांदगावकर मनसेच्या वतीने मैदानात आहेत. त्यांना
शिवसेनेची कार्यपद्धती माहीत असल्यामुळे शिवसेना उमेदवार मोहन रावले यांच्या नाकी नऊ आले आहेत.

माझगाव, शिवडी, लालबाग, गिरगाव,कुलाब्यातील मराठी भागात मनसेने जोर लावल्याने शिवसेना उमेदवाराला मोठा फटका बसेल. दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात दादर, नेहरूनगर, कुर्ला, चेंबूरच्या मराठी पट्ट्यात शिवसेनेची चलती असणा-या भागात मनसेचा झेंडा फडकू लागला आहे. येथे मनसेच्या श्वेता परुळकर उभ्या आहेत. शिवसेनेचे उमेदवार सुरेश गंभीर यांची ओळख केवळ माहीमपुरतीच आहे. या सर्व परिस्थितीचा लाभ काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांनाच होईल.

उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांच्याविरोधात मनसेने शालिनी ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे आडनावाचा त्यांना लाभ होत असून शिवसेनेचा परंपरागत मतदार मोठ्या प्रमाणात मनसेच्या मागे उभा राहिला आहे. ईशान्य मुंबईतही किरीट सोमय्या यांची मनसेचे उमेदवार शिशिर शिंदे यांनी  दमछाक केली आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांना होईल. उत्तर मुंबईत मनसेचे सरचिटणीस  शिरीष पारकर मैदानात उतरल्यामुळे भाजपचे राम नाईक यांची झोप उडाली आहे. तर उत्तर-मध्य मुंबईत शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांच्या स्नुषा शिल्पा सरपोतदार मनसेच्यावतीने रिंगणात आहेत, त्याचा फटका भाजपच्या महेश जेठमलानी यांनाच बसणार आहे.अखेरच्या टप्प्यात मुंबईत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेऊन वातावरण ढवळून काढले आहे. त्यामुळे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय आघाडीच देशाला आर्थिकदृष्टय़ा स्थिर आणि मजबूत सरकार देऊ शकते, असा मतदारांना विश्वास देण्यात ते यशस्वी झाले आहेत.

Read more...

Sunday, April 26, 2009

युतीचे नेते मुद्द्यावरून गुद्द्यावर

सिंधुदुर्गात राणे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या संजय राऊतांना मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्यामुळे त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. पण नेते होण्याची खुमखुमी इतकी की, राणे यांच्याबरोबर मनमोहन सिंग आणि शरद पवारांवरदेखील ते घसरले.


मुंबई-ठाण्यामध्ये प्रचाराचा तोफखाना धडधडू लागला आहे. मुद्दे संपले की माणसे गुद्दय़ांवर येतात. त्यांचा तोल जातो आणि काहीही बरळू लागतात. प्रचारात शिवीगाळ आणि गलिच्छ, अश्लाघ्य भाषा वापरण्यापर्यंत त्यांची मजल जाते. अशा राजकारण्यांची संख्या वाढू लागली आहे. दुसरीकडे मुद्दे नाहीत आणि आरोपांतही तथ्य नाही, असे सप्रमाण सिद्ध करूनही खोटे बोल पण रेटून बोल या उक्तीप्रमाणे तथ्यहीन आरोप करण्यात मोठमोठे नेतेही मागे नाहीत. राजकारणातला हा खोटारडेपणा शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांमध्ये ठासून भरला असल्याचे गेल्या काही दिवसांत प्रकर्षाने पुढे आले आहे.
 
युतीच्या आरोपांना सडेतोड जबाब देऊन काँग्रेस नेत्यांनी या नेत्यांचे दात त्यांच्याच घशात घातले आहेत. त्यामुळे प्रचाराचे मुद्देच नाहीत, म्हणून विरोधासाठी विरोध, एवढेच त्यांच्या हाती उरले आहे. मुंबई-ठाण्यातील दहा मतदारसंघांमध्ये येत्या गुरुवारी मतदान होत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. युतीच्या नेत्यांचा आक्रस्ताळेपणाही वाढू लागला आहे.

शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी तर पुरती चव्हाटय़ावर आली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मिता आणि मी मुंबईकर हे दोन्ही मुद्दे राजकीय सोयीनुसार वापरले आणि सोडून दिले, तसेच मराठी माणूस पंतप्रधानपदी बसावा, यासाठी शरद पवारांना पाठिंबा दिला आणि नंतर काढून घेतला. त्यांच्या या धरसोडपणाबद्दल त्यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. त्यामुळे मातोश्रीच्या दिवाणखान्यात बसून काथ्याकूट करणा-या चौकडीतही अस्वस्थता पसरली आहे. आता उद्धव ठाकरेंकडे दहशतवादाशिवाय दुसरा मुद्दा नाही. हा मुद्दा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून नरेंद्र मोदींपर्यंत आणि यशवंत सिन्हांपासून  विनोद तावडेंपर्यंत सर्वानी लावून धरला आहे.

वास्तविक पाहता काँग्रेस नेत्यांनी या मुद्दय़ातली हवा काढून टाकली आहे. वाजपेयी सरकारमध्ये अडवाणी गृहमंत्री असताना दहशतवादी संसदेपर्यंत पोहोचले होते, त्याचे काय? या प्रश्नाचे उत्तर युतीच्या नेत्यांकडे नाही. अडवाणी गृहमंत्री असताना कंदाहार विमान अपहरण प्रकरणी खतरनाक अतिरेक्यांची सुटका करून त्यांना कंदाहारला सुखरूप पोहोचवले; परंतु या प्रकरणी आपल्याला काहीच माहीत नव्हते, असे सांगणारे अडवाणी खोटे बोलत आहेत, असा गौप्यस्फोट त्यांच्याच सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असलेले भाजप नेते जसवंतसिंह यांनी केला आहे.
 
रथयात्रा काढून बाबरी पाडण्याचे दुष्कृत्य करण्यापर्यंत आणि त्यानंतर गृहमंत्रीपदापर्यंतचा अडवाणींचा प्रवास पूर्णत: विरोधाभासाने भरलेला आहे. संसदेवरील हल्ला आणि कंदाहार प्रकरणी तर त्यांच्या गृहमंत्रीपदाचे मोठे अपयश आहे, असे असूनही त्यांच्या प्रचारात दहशतवाद आहेच. रथयात्रा काढून आणि बाबरी पाडून सामाजिक शांतता आणि सलोखा धोक्यात आणणारे आणि खतरनाक अतिरेक्यांना सोडून देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावणारे अडवाणी हे देशाचे पंतप्रधान कसे होणार? पण युतीच्या नेत्यांसह उद्धव ठाकरेदेखील अडवाणीच पंतप्रधान, असा मंत्र जाहीरपणे जपत आहेत.

मराठी माणूस पंतप्रधानपदी बसवण्यास निघालेल्या उद्धव ठाकरेंचे जागावाटपाच्या वेळी भाजपने नाक दाबले आणि तोंड उघडले, तेव्हा त्यातून अडवाणीच पंतप्रधान असे शब्द बाहेर पडले. या धरसोड वृत्तीमुळे शिवसेनेची आणि ठाकरेंची उरलीसुरली विश्वासार्हता निघून गेली आहे. त्यांना राज ठाकरेंच्या रूपाने पर्याय मिळतो का, याची चाचपणी सध्या लोक करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभांना गर्दी होत असली, तरी ही गर्दी मतांमध्ये कितपत परावर्तित होईल, याबाबत शंका आहे. पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांनाही अशीच गर्दी व्हायची; पण सत्तेत येण्यास ३५ वर्षे लागली. सत्तासुद्धा भाजपशी भागीदारी करून आली. यापुढे सत्ता मिळणे अशक्यप्राय झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
 
प्रचारामध्ये उद्धव ठाकरेंनी अत्यंत खालची पातळी गाठली. बाळासाहेबांचा आव आणण्याचा व त्यांची परखड शैली वापरण्याचा प्रयत्न त्यांनी केला; पण जमले नाही. बाळासाहेबांची भाषा वापरण्याचा प्रयत्न केला; पण परिणाम उलटाच झाला. उद्धव यांनी थेट पंतप्रधानांबद्दलच अपशब्द वापरले आणि गोत्यात आले. अत्यंत सज्जन माणूस अशी प्रतिमा असलेल्या मनमोहन सिंगांबद्दल त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिपण्णी केली. जनमानसात चांगली प्रतिमा असलेल्या व्यक्तींबद्दल वाईट बोललेले लोकांना आवडत नाही.
 
शिवसेनेत मोठे नेते असल्याचा आव आणणा-या संजय राऊत यांनी प्रचारात अत्यंत गलिच्छ भाषा वापरली म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ठाण्यातील नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री नारायण राणे या नेत्यांबद्दल त्यांनी अर्वाच्य भाषा वापरली, त्यांचा आघाडीच्या नेत्यांसह श्रोत्यांनीही निषेध नोंदवला. राऊत हे शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत; पण नेते होण्यासाठी सवंग लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करणा-या या व्यक्तीला पत्रकार कोण म्हणेल? शिवराळ भाषेत जनसमुदायाला संबोधित करून पत्रकारितेच्या क्षेत्राला काळिमा फासणारा हा तथाकथित संपादक, पत्रकार कसा होणार आणि नेता तरी कसा होणार?

सिंधुदुर्गात राणे यांच्यावर बेछूट आरोप करणा-या राऊतांना मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्यामुळे त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. पण नेते होण्याची खुमखुमी इतकी की, राणे यांच्याबरोबर मनमोहन सिंग आणि शरद पवारांवरदेखील ते घसरले. दिल्लीत सकाळ-संध्याकाळ शरद पवारांच्या दारात पडलेल्या राऊतांचा त्यांच्याबद्दल बोलतानाही तोल गेला. हे अध्र्या हळकुंडाने पिवळे होणारे कथित नेतेच शिवसेनेला रसातळाला घेऊन जाणार आहेत.

मोठय़ा नेत्यांना शिवीगाळ करणारे नेते ज्या शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी ठाण्यात गेले होते, ते उमेदवार विजय चौगुले हे खून, बलात्कार, अपहरण प्रकरणांत अडकले आहेत. ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरातून निवडून आलेल्या उच्चशिक्षित आनंद परांजपेंना डावलून गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या चौगुलेंना उभे करण्यात आले आहे. यावरूनच शिवसेनेची पातळी किती घसरली आहे, हेच दिसून येत आहे. ना नेत्यांना पातळी ना नेत्यांच्या पिलावळीला. असल्या लोकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारख्या नेत्याबद्दल गलिच्छ भाषा वापरावी, हे आश्चर्यकारक आहे. डॉ. मनमोहन सिंग यांची विश्वासार्हता कुठे अन् अडवाणींची कुठे? अडवाणींची विश्वासार्हता केव्हाच संपली असून, गोबेल्स नीतीचा ते उत्कृष्ट नमुना ठरले आहेत. मनमोहन सिंगांची त्यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. मनमोहन सिंग हे अत्यंत विश्वासू, पारदर्शी आणि सज्जन गृहस्थ आहेत, अशी त्यांची प्रतिमा आहे. जागतिक मंदी असताना त्यांनी देशावर आर्थिक संकट येऊ दिले नाही. याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनादेखील भारताची स्तुती करावी लागली. पण खोटे बोल पण रेटून.. अशा वृत्तीच्या नेत्यांना लोकच धडा शिकवतील.

Read more...

Monday, April 20, 2009

डॉ. आंबेडकरांवर भाजपचे बेगडी प्रेम

अनेक धर्म, पंथ, असंख्य जाती-पोटजाती असलेल्या या देशात विविधतेत एकात्मता साधण्याचा यशस्वी प्रयत्न काँग्रेसने केला. डॉ. आंबेडकरांनी सर्वधर्मसमभावाच्या विचाराचे अधिष्ठान ज्या भारतीय राज्यघटनेला दिले आहे, त्याच घटनेचे संपूर्ण पुनर्विलोकन करून घटनेचा ढाचा बदलण्याचा डाव भाजपने टाकला होता.



लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर जसजसा वाढू लागला, तसतसा आरोप-प्रत्यारोपांचा ताळतंत्रही सुटू लागला आहे. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी तर कमाल केली आहे. संपूर्ण देश आश्चर्याने थक्क होईल, अशी विधाने त्यांनी केली आणि ती त्यांच्यावरच बूमरँग होऊन त्यांना नामुष्की पत्करावी लागली. काँग्रेस पक्षाविरुद्ध दहशतवाद हा मुद्दा करून त्यांनी स्वत:चे हसे करून घेतले त्याचबरोबरकाँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अन्याय केला असे हास्यास्पद विधान केले. याचा काँग्रेसने असा रोखठोक प्रतिवाद केला की, भाजपला अक्षरश: बॅकफूटवर जाणे भाग पडले. काँग्रेसने त्यांचे दोन्ही मुद्दे असे खोडून काढले की, भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचे अवसान गळाले. भाजपचा एकही नेता त्यांची बाजू मांडण्यासाठी पुढे सरसावला नाही.
 
भाजपने मुंबई आणि देशात इतरत्र झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निवडणूक मुद्दा करण्याचे ठरविले; पण कंदहार विमान अपहरण प्रकरणी तत्कालीन भाजप सरकारने जी अक्षम्य चूक केली तसेच ते सत्तेत असताना अतिरेक्यांनी थेट संसदेवरच कसा हल्ला चढविला, या घटनांचा बिनतोड समाचार काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, पी. चिदंबरम या नेत्यांनी घेतला आणि भाजपवाल्यांना निरुत्तर करून टाकले. कंदहार विमान अपहरण प्रकरण झाले, तेव्हा खतरनाक दहशतवाद्यांची भाजप सरकारने सुटका केली. त्या अतिरेक्यांना सोडण्याचेच नव्हे, तर पैसे देण्याचेही मान्य करण्यात आले होते.

अतिरेक्यांसह पैशाच्या बॅगा घेऊन खुद्द परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह तिकडे गेले होते. काँग्रेसवर दहशतवादाच्या मुद्दय़ावरून तोफ डागणाऱ्यांनीच अतिरेक्यांना सोय-या-पाहुण्यांप्रमाणे वागणूक दिली होती. त्यामुळे दहशतवादावर बोलण्याचा नैतिक अधिकार भाजपने गमावला आहे. ज्या अडवाणींनी व भाजपने दहशतवादाचा मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न केला, ते अडवाणी गृहमंत्री असताना, अतिरेक्यांनी संसदेपर्यंत पोहोचण्याची हिंमत केली होती, हे या देशातली जनता विसरलेली नाही. दहशतवादावरून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा भाजपचा हेतू सफल होऊ शकत नाही. खरे तर, दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय प्रश्न असून, या प्रश्नाने जगभर उग्र स्वरूप धारण केले आहे. त्याचा एकत्रित मुकाबला करण्याची गरज असताना, आरोप-प्रत्यारोप करणेच मुळात चुकीचे आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे निमित्त साधून अडवाणींनी त्यांच्या नावाचा निवडणुकीसाठी वापर करण्याचा प्रयत्न केला. पण तो त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. निवडणूक प्रचारात आपल्या प्रतिस्पध्र्याला नामोहरम करण्यासाठी आरोप-प्रत्यारोप केले जातात, हल्ले-प्रतिहल्ले चढवले जातात, एकमेकांचे चारित्र्यहनन केले जाते; पण या दरम्यान नेतेच जर खोटारडेपणाची भाषा वापरत असतील, तर त्यांनाच त्याचा फटका बसतो. काँग्रेस असो की राष्ट्रवादी, या पक्षांनी धर्म व जातीयवाद्यांना दूर ठेवण्यासाठी भाजप-शिवसेना युतीवर सतत टीकास्त्र सोडले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचारप्रणालीचा अवलंब करीत सर्वधर्मसमभावाचे धोरण या पक्षांनी अवलंबिले आहे. हिंदुत्वाची भूमिका घेऊन भारताला हिंदू राष्ट्र करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजप-शिवसेनेवर त्यांनी कडाडून हल्ला चढविला आहे. अशा हिंदुत्ववाद्यांना ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उमाळा यावा यासारखी हास्यास्पद गोष्ट दुसरी नाही.
 
अनेक धर्म, पंथ, असंख्य जाती-पोटजाती असलेल्या या देशात विविधतेत एकात्मता साधण्याचा यशस्वी प्रयत्न काँग्रेसने केला. डॉ. आंबेडकरांनी सर्वधर्मसमभावाच्या विचाराचे अधिष्ठान ज्या भारतीय राज्यघटनेला दिले आहे, त्याच घटनेचे संपूर्ण पुनर्विलोकन करून घटनेचा ढाचा बदलण्याचा डाव ज्या भाजपने टाकला होता, तो काँग्रेस व अन्य धर्मनिरपेक्षतावादी पक्षांनी यशस्वी होऊ दिला नाही. ज्या हिंदुत्ववादी शक्तींनी डॉ. आंबेडकरांना कधी मानलेच नाही आणि त्यांच्या हिंदुत्ववादाला डॉ. आंबेडकरांनी कायम तीव्र विरोधच केला, त्या बाबासाहेबांचे नाव भाजपवाले आता निवडणुकीसाठी वापरत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना घटना-समितीत स्थान मिळू नये, अशी योजना करून नेहरूंनी त्यांच्यावर अन्याय केला. त्यांना मंत्रिमंडळात घेण्यास नेहरू तयार नव्हते. महात्मा गांधीजींनी नेहरूंना सांगितले- त्यांना मंत्रिमंडळात घ्या, तेव्हा नेहरूंचा चेहरा काय झाला असेल, याची कल्पनाच केलेली बरी.. असे वक्तव्य अडवाणींनी केले आहे. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली.
 
भाजप आणि संघ परिवाराचे बाबासाहेबांबद्दल हे जे प्रेम ऊतू चालले आहे, ते न समजण्याइतके लोक दूधखुळे नाहीत, हे अडवाणी आणि संघपरिवाराला कदाचित माहीत नसावे आणि असले, तरी त्याकडे हेतूपुरस्सरपणे कानाडोळा केला जात असावा. भाजपच्या थिंक टँकचे सदस्य असलेल्या अरुण शौरी यांनी बाबासाहेबांविरुद्ध वर्शिपिंग द फॉल्स गॉड हे पुस्तक लिहिले त्याचे बक्षीस म्हणून याच भाजपने शौरींना मंत्री केले होते, ही बाब या देशातली जनता विसरलेली नाही.

भाजपने शिवजयंती, म. फुले, डॉ. आंबेडकर यांची जयंती कधी साजरी केली नाही. संघाने तर रेशीमबागेतल्या मुख्यालयावर कधी तिरंगादेखील फडकवला नाही. या देशाचा झेंडा आणि घटना हिंदुत्ववाद्यांनी कधी मानलीच नाही. भारतीय घटनेतील तरतुदींनुसार होणा-या निवडणुका मात्र यांनी लढवल्या, त्याच आधारे ते सत्तेवर आले आणि सत्तेत येताच खायचे दात दाखवले, घटनाच बदलू म्हणाले. घटना बदलावी, असे त्यांना का वाटले? या देशात चातुर्वण्र्य आणि ब्राह्मण्यवाद आणून अडीच हजार वर्षापूर्वीचे आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करायचे आहे काय?


अडवाणींना महात्मा गांधींची महानता कळली आहे, बाबासाहेबांची महानता कळली आहे, काँग्रेसने बाबासाहेबांवर अन्याय केल्याची तीव्र जाणीव झाली आहे; पण शौरींनी लिहिलेले ..फॉल्स गॉड नाकारण्याची इच्छा मात्र झाली नाही. उलट त्यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. बाबासाहेबांवर काँग्रेसने अन्याय केला, असे त्यांना वाटते; पण अडवाणी आणि भाजपने केलेल्या अन्यायांची मोठी मालिकाच सर्वश्रुत आहे.

बाबासाहेबांचे नातू असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे करून शिवसेना-भाजप निवडून येण्यासाठी कायम अप्रत्यक्ष मदत केली, त्या प्रकाश आंबेडकरांना यांनी साधे राज्यसभेवर पाठवले नाही, असे यांचे आंबेडकरांवरील बेगडी प्रेम लोकांना ठाऊक आहे. मागास जातींच्या उत्थानासाठी बाबासाहेबांनी राज्य घटनेत आरक्षणाची तरतूद केली, या आरक्षणाला उच्चवर्णीयांनी कायम विरोध केला. डॉ. आंबेडकरांनी घटनेच्या ३४० कलमान्वये मागास आयोग नेमण्याची तरतूद केली. त्यानुसार नेमलेल्या मंडल आयोगातील ओबीसींच्या आरक्षणाला विरोध करून याच अडवाणींनी देशभर आगडोंब उसळवला आणि राममंदिरासाठी रथयात्रा काढली, अयोध्येतील मशीद पाडली, देशात फुटीरतेची बिजे रोवली. बाबासाहेबांची जातीअंताची लढाई अशा लोकांना कधी समजणार नाही. ज्यांना दोन टक्केही बाबासाहेब समजले नाहीत, ते बाबासाहेबांवर अन्याय झाल्याच्या बाता करीत आहेत.

Read more...

Monday, April 6, 2009

बुडत्याचा पाय खोलात

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकीकडे रंग भरू लागलेला असताना, दुसरीकडे शिवसेना-भाजपमध्ये मात्र दरबारी राजकारण आणि बारभाईंचे कारस्थान रंगू लागले आहे. अशा राजकारणात सर्वसामान्य माणसाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्थान नसते, पक्षाचा जनाधार तुटू लागतो. अशी शिवसेना-भाजप युतीची आज परिस्थिती असून, बुडत्याचा पाय खोलात जात असल्याने पक्षाचे लोकनेते व कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये नेते व कार्यकर्त्यांची उपेक्षा केली जात असल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत.


लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकीकडे रंग भरू लागलेला असताना, दुसरीकडे शिवसेना-भाजपमध्ये मात्र दरबारी राजकारण आणि बारभाईंचे कारस्थान रंगू लागले आहे. अशा राजकारणात सर्वसामान्य माणसाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्थान नसते, पक्षाचा जनाधार तुटू लागतो. अशी शिवसेना-भाजप युतीची आज परिस्थिती असून, बुडत्याचा पाय खोलात जात असल्याने पक्षाचे लोकनेते व कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये नेते व कार्यकर्त्यांची उपेक्षा केली जात असल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत.
 
कमळ चिखलात उगवते, पण फुलताना पाकळय़ांवर चिखल घेऊन उगवत नाही. प्रत्यक्ष कमळाचे असे हे सुस्वरूप. पण भाजपच्या कमळाचे रूप काही निराळेच रंग दाखवीत आहे! निवडणूक जसजशी जवळ येत चालली, तसतसे भाजपचे कमळ, पाकळय़ांवर चिखल घेऊनच उगवू लागले आहे. पाकळय़ांवरचा हा चिखल वेगवेगळय़ा प्रकारांचा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मालेगाव प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग, पुरोहित आदींनी कमळाच्या पाकळय़ा बरबटून टाकल्या आहेत, वरुणने तर चिखलाचे शिंतोडे सर्वदूर उडवले आहेत. या प्रकारांनी दहशतवादाचा भगवा चेहरा अधिक प्रकर्षाने समोर आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा चेहरा प्रफुल्लित कमळासारखा प्रसन्न असल्यामुळे त्यांचा चेहरा पाहून जेवढी मते भाजपला मिळणे शक्य होती, तेवढी मिळाली. यापुढील काळात तेवढी मते मिळू शकणार नाहीत आणि काही मित्र जोडले, तरी सत्ता मिळू शकत नाही, हे निर्विवाद सत्य आहे. पण अटलजींच्या कुटुंबवत्सल अस्सल चेहऱ्याच्या जागी लालकृष्ण अडवाणींचा अट्टलचेहरा भाजपने जनतेसमोर केल्यामुळे तिथेच पूर्वीची मते अर्धी झाली आहेत. अट्टलचेहरा पाहून मते मिळणार कशी? अट्टल हा शब्द व्यक्तीचे गुणविशेष दाखवणारा नाही, हे वेगळे सांगायला नको. अशा या पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणा-या म्होरक्याच्या नेतृत्वाखाली केंद्रात आणि राज्यात बारभाईंचे कारस्थान रंगले नाही तरच नवल.
 
पक्षाची तथाकथित साधनशूचिता बाजूला सारून जसवंतसिंग निवडणूक प्रचारात थेट पैसेच वाटताना रंगेहाथ पडकले गेले. दुसरीकडे सुषमा स्वराज एक बोलत आहेत, तर अरुण जेटलींचा आवाजच बंद होईल अशा घटना घडत आहेत. तिसरीकडे राजनाथसिंहांची मनमानी सुरूच आहे. केंद्रात अशी सुंदोपसुंदी सुरू असताना राज्यात मुंडे, गडकरी, तावडे तीन तिघाडे काम बिघाडेअशी प्रदेश भाजपची अवस्था झाली आहे. गोपीनाथ मुंडेंना बाजूला सारून नितीन गडकरी आणि विनोद तावडे राज्यातला भाजप चालवू लागले आहेत. काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले, पण भाजपच्या पाच जागांवरचा गुंता गडकरी-तावडे सोडवू शकले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते वाट सापडेल तिकडे धावत सुटले आहेत.
 
शिववडाफेम शिवसेनेचे यापेक्षा वेगळे चाललेले नाही. उलट तिथल्या दरबारी राजकारणाची तटबंदी अधिक कडेकोट होऊ लागली आहे. ऐननिवडणुकीत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे दरबारी कानडाआळवीत बसले आहेत. असा दरबारी कानडाराग आळवीत बसणे म्हणजे रोम जळत असताना निरो फिडल वाजवीत असल्यासारखेच आहे. दरबारी कानडाआळवीत असताना दोन-चार श्रोते असावे लागतात, तसे श्रोते मिलिंद नार्वेकर, नीलम गो-हे, विनायक राऊत आणि सुभाष देसाईंच्या रूपात उद्धव ठाकरेंना गवसले आहेत. माना डोलावणारे आणि कार्यकर्त्यांशी मनमानीपणे वागणारे हे कारस्थानी आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेणारे उद्धव ठकरे सर्वसामान्य शिवसैनिकांवर किती अन्याय करीत आहेत, कार्यकर्त्यांची कशी कुचंबणा होत आहे, हे आता लोकांना समजून चुकले आहे. शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याची मुभा कोणालाच मिळत नाही. मोठमोठे नेते त्यांच्या भेटीसाठी तिष्ठत राहिले, तरी त्यांची भेट होत नाही. बाळासाहेबांना दुरूनसुद्धा पाहू दिले जात नाही. नेत्यांची ही अवस्था, तर सामान्य शिवसैनिकांची काय कथा? सर्व जण उपेक्षेचे धनी होत चालले आहेत.
 
हे झाले त्या त्या पक्षाचे, पण शिवसेना-भाजप युतीमध्ये परिस्थिती वेगळी नाही. हे दोन पक्ष नावापुरतेचे एकमेकांचे मित्रउरले आहेत. मित्र कसले? भाजपच्या महाराष्ट्रातल्या नव्हे; तर राष्ट्रीय नेत्यांनाही उद्धव ठाकरेंना भेटता येत नाही. मिलिंद नार्वेकर यांच्या बरोबरीने विलेपाल्र्याच्या विनायक राऊतांची भर पडली आहे. कार्याध्यक्षाला राजसिंहासनावर बसवून हे दोघे मातोश्रीवरून राजशकट चालवीत आहेत. नीलम गो-हेंचे त्यांना उपदेशाचे डोस आणि सुभाष देसाई होय बाअसला प्रकार तिथे चालत आहे. शिवसेनेसाठी हाडाची काडे करणारे मनोहरपंत जोशी, दत्ताजी नलावडे, लीलाधर डाके यांच्यासारखे ज्येष्ठ त्यांच्या खिजगणतीतच नाहीत, तिथे मित्रपक्षाच्या नेत्यांना विचारतो कोण? उद्धव आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये विस्तव जात नाही. निवडणुकीचे ढोल-ताशे मतदारसंघांमध्ये वाजू लागले आहेत. पण युतीच्या नेत्यांची तोंडे विरुद्ध दिशेला असल्याचेच दिसत आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेल्या रामदास कामत यांचा तर वडाच करून टाकला आहे. पक्षाच्या कोणत्याही कामात त्यांना कोणी विचारत नाही.

आणखी एक मजेशीर प्रकार सर्वाना पाहावयास मिळत आहे. निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कधी युद्ध न केलेले संजय सध्या धृतराष्ट्राला महाभारत सांगत आहेत. कर्ण आपलाच आहे, हे बिंबवण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. संजय उवाचआले की, कर्ण कोण, हे आपोआपच समजेल. सगळी हयात ज्यांनी राजकारण-समाजकारणात घालवली, त्यांना जणू आपण चार युक्तीच्या गोष्टीच सांगत आहोत, असा त्यांचा आविर्भाव असतो. पण राज्यात निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सरशी होईल, तेव्हा साहेबांनी आपल्यालाच कात्रजचा घाट दाखवला, असे पुटपुटत बसण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरणार नाही आणि मातोश्रीगडाचे दरवाजेही बंद झालेले असतील.


केवळ शिववडय़ाचे मिशन असून भागत नाही. राजकीय पक्षाला राज्याच्या आणि देशाच्या विकासाचे व्हिजन असावे लागते. ही विकासाची दृष्टी मंदिर वही बनायेंगेयासारख्या भावना भडकवणाऱ्या घोषणांनी येणार नाही किंवा हिरव्या रंगाचा द्वेष करून मालेगावात बॉम्बस्फोट घडवल्याने तर अजिबात येणार नाही.


देशापुढील समस्या साध्वी, पुरोहित, वरुणचा कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करून सुटणार नाहीत, याचे भान युतीच्या नेत्यांनी ठेवलेले नाही. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे. संपूर्ण जग एका वेगळय़ा आर्थिक विवंचनेत असताना, हिंदुत्वाचा मुद्दा तीव्र करून पाकिस्तानच्या अतिरेकी मार्गाने जायचे, हे देशाला घातक आहे. या अतिरेकी शक्तींचा मतदारच बंदोबस्त करतील.
     

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP