Wednesday, March 9, 2016

अमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा

उद्या आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन महाराष्ट्रभर साजरा होत आहे़; परंतु या दिवसाचे औचित्य साधून एक मार्च पासूनच ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले आहे़ कार्यक्रमांमध्ये नेहमीप्रमाणे महिलांचे स्वातंत्र्य, महिलांचे सबलीकरण, महिलांची प्रगती, गगनभरारी यावर चर्चासत्रे झडू लागली आहेत़ पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये महिलांना दुय्यम स्थान देण्यात आले़ त्यांच्या प्रगतीचे रोखलेले रस्ते खुले व्हावे यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत़ भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे व त्यानुसार तयार झालेली न्यायव्यवस्था विविध कायदे यांना अधिन राहून मिळणारे हक्क स्त्रियांना हवे आहेत़ त्यासाठी समाजाने जागे होण्याची होण्याची सरकारने दक्ष राहण्याची आवश्यकता आहे़

Read more...

हे ‘प्रभू’, महिला प्रवाशांचे प्रश्न कायमच!

रेल्वे सेवेचा ‘प्रभू’ मार्ग हा खाचखळगे, अडीअडचणी यावर उपाययोजना करत देशभर सुविधांचे जाळे विणण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाने उभे केले आहे़ कोणतीही भाडेवाढ नाही, नव्या रेल्वे मार्गांच्या पोकळ घोषणा नाहीत, अपूर्ण योजना पूर्ण करण्यावर भर, रेल्वे स्टेशनवर वाय­फाय सुविधा, प्रवाशांसाठी सुविधा आणि सुरक्षितता असा संयमित; पण रेल्वेचा पाया मजबूत करणारा अर्थसंकल्प रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मांडला असला तरी महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या अर्थसंकल्पाने कोणतीही नवी उपाययोजना केलेली नाही़ महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहता या अर्थसंकल्पाने महिलांचा अपेक्षाभंग केला आहे, असेच म्हणावे लागेल़

Read more...

मेक इन मराठवाडा, प्लीऽऽज!

‘मेक इन इंडिया’ उत्सवाने पूर्ण मुंबई शहर उजळून निघाले असताना मुंबईबाहेर महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात दुष्काळाच्या झळांनी गावे होरपळून निघत असल्याचे विदारक चित्र दिसू लागले आहे़ मुंबई शहरात नळ उघडताच धो धो पाणी सुरू होते. कित्येकदा नळ उघडे राहिले तर सारे पाणी वाहून जाते;पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून कित्येक आठवडे गावात पाणीच येत नाही. पण शहरातील सर्व सोयीसुविधांनी युक्त वातानुकूलित खोल्यांमध्ये बसणाºयांना या परिस्थितीची जाणीव होऊ शकत नाही़ महाराष्ट्राची आर्थिक उन्नती करण्यासाठी जागतिक पातळीवर गुंतवणूक झाली पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे यजमानपद स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक राजधानीत नेत्रदीपक उत्सवाचा बार उडवून दिला़ गिरगाव चौपाटीवरील मनोरंजन कार्यक्रमाचा संपूर्ण मंच आगीत जळून खाक झाल्यामुळे असुरक्षिततेचा संदेश गेला असला तरी मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि नियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पार पडले़

Read more...

बुवा तेथे राजकारणी

धर्मसंस्थेने समाजव्यवस्थेवर अतिक्रमण केल्यामुळे या देशातील सामाजिक पर्यावरणावर विपरित परिणाम झाला़धर्माच्या ठेकेदारांनी जातव्यवस्था आणि त्याचबरोबर माणसा­माणसांमध्ये विषमतेची बिजे घट्ट रोवली़ अत्याधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि समानतेसाठी अथक प्रयत्न करणाºया पुरोगामी नेत्यांमुळे वातावरण बदलत असताना दुसरीकडे धर्माचा प्रभाव वाढवण्याचेही काम होत राहिले़ इतकेच नव्हे तर या देशाने स्वातंत्र्यानंतर जात, धर्म, पंथ, लिंग, भेदविरहित समानतेवर आधारलेली लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारली, तरी देखील धर्म आणि जातीचा राजकारणासाठी पुरेपूर वापर करून घेतला जात आहे़ देशातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा अजेंडा लपून राहिलेला नाही़ दुसरा प्रमुख राजकीय पक्ष व सर्वाधिक वर्षे सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्षही वेगळा नाही़ या पक्षानेही मतांच्या राजकारणासाठी जाती­धर्माला महत्त्व दिले आहे़ भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे झुगारून देत धर्म व जातीय राजकारणच प्रभावी ठरत आहे़ अर्थात सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी जाती­धर्माचा वापर केला जात आहे़

Read more...

भ्रष्टाचाराला जातकारणाचा मुलामा कशासाठी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे भाजपाशी, विशेषकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलेच सूत जमले आहे़ आजवर कोणी केली नसेल एवढी पवारांची भरभरून स्तुती मोदी करत आहेत़ सरकार चालवताना पवारांचे रोज सकाळी आपण मार्गदर्शन घेत असतो, अशा प्रकारचे राजकारणातले एक अफलातून वाक्य मोदींच्या नावावर फिक्स झाले आहे़ अर्थात मोदींनी अशा आशयाचे वाक्य उच्चारले तो दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उडालेली झोप परत आणण्यास चांगलाच लाभदायक ठरला़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय वाट्टेल त्या चौकशा करू देत, आपल्याला थेट त्यांच्या हायकमांडचा वशिला मिळू शकतो, या भ्रमात सगळे गाढ झोप घेऊ लागले़; पण तपास यंत्रणांनी आपले काम सुरू ठेवले होते़ कोणतेही नवे सरकार आले की, आधीच्या सरकारची काही लफडी­कुलंगडी असतील त्यांचे पुरावे मिळवण्याचे काम पहिल्यांदा हाती घेत असतात़ पुराव्यांचा अंदाज आला की, विरोधकांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार ठेवली जात असते़ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबतीत असेच घडले असून, त्यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे़ भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी भुजबळांना लक्ष्य करून त्यांचे कथित अपराध चव्हाट्यावर मांडले असले तरी ‘आप’ कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे़ सोमय्यांनी मात्र भुजबळांवरील आरोपांचा जाहीर भडिमार सुरू ठेवल्याने भुजबळांच्या चारित्र्यहननामागे भाजपाच असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे़

Read more...

शनिपीडेपासून कायमची मुक्ती मिळवा!

शनिदेवाची स्त्रीच्या गर्भावर विपरित परिणाम करण्याची ताकद असल्याने त्याच्या चौथºयावर महिलांनी जाऊ नये, अशी भीती दाखवण्यात आली आहे़ याला प्रखर विरोध करत आम्हालाही शनिदर्शन घ्यायचेच आहे, असा निर्धार करून पुण्याच्या भूमाता ब्रिगेडने शनिशिंगणापूरला धडक मारली़ अर्थात पोलिसी बळाने त्यांना अटकाव केला़ ही गोष्ट निराळी़ मात्र, गर्भावर विपरित परिणाम होतो, हे अमान्य करण्याइतपत महिलांची मानसिक तयारी झाली आहे़ हेही नसे थोडके़ अर्थात शनीची ही अरेरावी झुगारून देण्याऐवजी त्याला नको असताना त्याचे दर्शन घेण्याचा आटापिटा तरी का करावा?

Read more...

नेतृत्वाच्या पोकळीत गेला रोहितचा बळी

हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील जीवशास्त्राचा संशोधक असलेला अतिशय हुशार आणि संवेदनशील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येचे तीव्र पडसाद देशभरातच नव्हे तर जगभर उमटू लागले आहेत़ देश­विदेशातील आंबेडकरी विचारांची जनता मोर्चे­निदर्शने करू लागली आहे़ त्यात मुंबई विद्यापीठही मागे नव्हते़ मुंबई विद्यापीठातील सामाजिक बांधिलकी मानणारे अनेक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आणि काही सामाजिक संघटना अशा सर्वांनी एकत्र येऊन रोहित आत्महत्येप्रकरणी निदर्शने केली, घोषणा दिल्या़ हैदराबाद विद्यापीठात जे घडले ते येथे घडता कामा नये, असे म्हणत कुलगुरू संजय देशमुख यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले़ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेनुसार चालणारे विद्यापीठ दलित विद्यार्थ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा हल्ला त्यांनी चढवला़ बुद्धिवादी क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे जाणूनबुजून खच्चीकरण केले जात असून ओबीसी समाजाला भाजपाने वळवून घेतले़ आता डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांची ठिकठिकाणी स्मारके उभारून आणि १२५वी जयंती साजरी करून बौद्ध समाजालाही आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू आहे़ विशेषत: बौद्ध समाज हा संघ विचारसरणीचा विरोधक असल्याने साम, दाम, दंड, भेद यांचा वापर केला जात आहे़

Read more...

साहित्य संमेलनात होतोय स्त्रीशक्तीचा जागर

पिंपरी­चिंचवड येथील साहित्य संमेलन हे संपन्नता आणि शाहीपणा, याचा प्रत्यय देणारे असल्याने रसिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले आहे़ साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ़ पी़ डी़ पाटील यांनी संमेलनाचे आयोजन नेटकेपणाने करून महाराष्ट्राच्या साहित्य समृद्धीचेच जणू दर्शन घडवले़ त्यातच संमेलनाध्यक्ष प्रा़ श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाआधीच वादविवाद ओढवून घेतल्यामुळे हे संमेलन चांगलेच वाजत­गाजत आहे़ मात्र, सबनीसांनी सर्वसमावेशक धोरण ठेवतानाच स्वत:ची पुरोगामी मते तर मांडलीच; पण ती मांडताना सनातन्यांना चांगल्याच कानपिचक्याही दिल्या़ आजपर्यंत कोणत्याही संमेलनाध्यक्षाने महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची दिशा एवढ्या परखडपणे आणि स्पष्टपणे घेतली नसावी़ त्यामुळे त्यांचे भाषण विद्यमान राजकीय, सामाजिक परिस्थितीत महाराष्ट्रासाठी निश्चितच दिशादर्शक ठरले आहे़ याचा सर्वांनी खरोखर सखोलपणे आणि गांभीर्याने विचार करणे, ही आजची गरज आहे़ महाराष्ट्रातील सर्व घटक, सर्व प्रकारचे वाद आणि आव्हाने यांना स्पर्श करत असतानाच त्यांनी महिलांनाही तेवढेच प्राधान्य दिले आहे़ स्त्रीवादी विचारांच्या भारतीय व पाश्चात्त्य भूमिकांच्या पार्श्वभूमीवर स्त्रीवादी साहित्याचे मूल्यमापन कोणत्या दिशेने व्हायला हवे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत़

Read more...

कर्जबुडव्या उद्योगपतींवरही कारवाईची हिंमत दाखवा



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार क्षेत्रामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचे पहिले पाऊल उचलले आहे़ ‘विनासहकार, नाही उद्धार’ असे म्हणणाºयांनी ‘कुंपणंच शेत खातं’ ही म्हण सार्थ ठरवली़ सहकाराच्या माध्यमातून आपल्या सात पिढ्यांचे भले करून ठेवण्याच्या हेतूने आपली घरे भरली़ त्यामुळे लोकशाही राज्यव्यवस्थेचा प्रत्यय देणारे हे क्षेत्र बदनाम झाले़ या क्षेत्राची तळापासून साफसफाई करण्याची गरज असून मुख्यमंत्र्यांनी त्याची सुरुवात केली असल्याने या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे़ मात्र, सहकारी बॅँका बुडवणाºयांवर कारवाई करीत असताना अन्य राष्ट्रीय आणि खाजगी बॅँकांची लुटमार करणाºयांनाही चाप लावावा लागेल़ अदानी, अंबानी, विजय मल्ल्यांसारखे बडे उद्योगपती लाखो करोडोंची कर्जे थकवतात, त्यांच्यावरही कारवाईची हिंमत दाखवली पाहिजे़; परंतु अशी हिंमत दाखवणे राहिले बाजूला उलट त्यांचे करोडो रुपयांचे व्याज माफ केले जाते, मुद्दलाची रक्कम भरण्यात सवलत देण्यात येते आणि त्यांच्यावर करसवलतींची वारेमाप उधळण केली जाते, याचाही तेवढ्याच गांभीर्याने विचार झाला पाहिजे़
यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवल्यापासून सरकारच्या पाठिंब्यावर सहकार क्षेत्राची झपाट्याने वाढ होऊ लागली़ सत्तेतून सहकारासाठी पैसा आणि सहकाराच्या पैशातून सत्ता असे गणित इथल्या राजकारण्यांच्या चांगलेच अंगवळणी पडले होते़ त्यातूनच सहकारसम्राट, साखरसम्राट, दूधसम्राट अशा सम्राटांचे गावागावांत पेव फुटू लागले, शासनाच्या जमिनी पटकावून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये उभी राहिली आणि बघता बघता शिक्षणसम्राट निर्माण झाले़ संचालक मंडळांवर तहहयात अध्यक्ष असणाºयांची कमी नव्हती़ कायद्यातून पळवाट काढून गैरव्यवहाराची प्रकरणे प्रलंबित ठेवायची आणि पैसा व सत्तेच्या जोरावर पुन:श्च निवडून यायचे, हे दुष्टचक्र चालू होते़ अशा संचालकांना बॅँकेची निवडणूक दहा वर्षे लढवण्यास बंदी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या़ विरोधी पक्षनेत्यांपासून शरद पवारांपर्यंत सगळेच संतापले़ पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना राज्य शिखर बॅँकेवर प्रशासकीय मंडळ बसवण्याची कारवाई करण्यात आली होती़ त्यामुळे पुढील कारवाई करण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतल्यामुळे पृथ्वीराज बाबा भलतेच खूश झाले असतील, याबाबत शंका नाही़ बहुसंख्य सहकारी बॅँका राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यामुळे राष्ट्रवादीला शह देण्यात त्या वेळी पृथ्वीराज बाबा यशस्वी झाले होते़ तसे या वेळी मुख्यमंत्री फडणवीसदेखील राष्ट्रवादीवर दबाव वाढवण्यात यशस्वी झाले आहेत़ मात्र, या निर्णयाने ‘बाधित’ झालेल्या नेत्यांनी लोकशाहीवर आघात असल्याची टीका सुरू केली आहे़
सहकारामध्ये मनमानी एवढी वाढली की, साफसफाईची गरज होतीच, सहकाराच्या नावाखाली सरकारकडून किती पैसा उकळायचा याला मर्यादाच राहिली नव्हती़ सहकारी साखर कारखाने दिवाळखोरीत काढायचे, त्यांचा लिलाव करायचा, आपल्याच चेलेचपाट्यांना तो कारखाना घ्यायला लावायचा आणि त्याच्या उभारणीसाठी पुन्हा सरकारकडून अनुदान घ्यायचे़ काही अपवाद वगळता हाच उद्योग सुरू होता़ दिवाळखोरीत गेलेले कारखाने खाजगी उद्योजकांना विकण्याचेही प्रकार घडू लागले़ सहकाराच्या माध्यमातून अब्जोपती होणारे बागायतदार कारखाने दिवाळखोरीत काढत असतात, गरीब शेतकºयांचा विचारही करत नाहीत. कॉँग्रेस­राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार बड्या बागायतदारांवर मेहेरनजर ठेवण्यात तसूभरही कमी पडले नाही़ मात्र, बॅँकांनी दिलेली कर्जे सहकारी साखर कारखाने आणि सूतगिरण्यांनी थकवल्यामुळे बॅँका अडचणीत आल्या़ राज्य सहकारी बॅँकेवर नेमलेल्या प्रशासकीय मंडळांच्या चौकशी अहवालानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाई केली असल्याने आपला निर्णय राजकीय नसल्याचा दावा त्यांनी केला आहे़ त्यांनी कारवाईचा बडगा उचलला त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेससह शिवसेना भाजपा नेत्यांचाही समावेश असल्याने त्यांच्या दाव्याला पुष्टी मिळत असली तरी त्यात राजकारण नाही, असे म्हणता येणार नाही़ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे त्यात बहुसंख्य संचालक असून त्यांच्यावर कारवाई करण्याचा मुख्य हेतू तर आहेच; पण अंतर्गत राजकारणाचाही भाग आहे़; अन्यथा जळगाव जिल्हा सहकारी बॅँकेवर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असताना त्यांच्या अनुपस्थितीत त्या बॅँकेवर कारवाई का झाली, हे सामान्य कार्यकर्तेही जाणून आहेत़ मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या संचालकांवर होणार असलेल्या कारवाईबाबत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे़ वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या कार्यक्रमात पवार आणि फडणवीस यांची जुगलबंदी झाली़ पवारांनी चुकीच्या कामाचे समर्थन करणार नाही, हे सांगत आयडीबीआय बॅँकेत पंधरा हजार कोटींचे कर्ज थकीत असताना संचालकांवर कारवाई झालेली नाही, याकडे लक्ष वेधून चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवण्याचा प्रयत्न केला़ तर ही कारवाई सहकाराला शिस्त लावण्याच्या हेतूने असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी चांगलीच टोलेबाजी केली़ मुख्यमंत्री फडणवीस हे प्रामाणिक आहेत, एखादा निर्णय राजकीय असेलही; परंतु त्यामुळे सहकार क्षेत्रात वाढलेला भ्रष्टाचार निपटून काढता येत असेल तर त्या निर्णयाचे समर्थन करावे लागेल़ ज्या सहकार क्षेत्राने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली त्याचे जतन झाले पाहिजे.
खाजगी उद्योजकांना भरमसाट सवलती देऊनही हे उद्योजक बॅँकांना लुटण्याचा धंदा करत आहेत, बॅँकांची कर्जे थकवत आहेत़ तेव्हा शरद पवार म्हणतात त्यातही तथ्य आहेच़ खाजगी उद्योगांच्या प्रवर्तकांकडून बॅँकांना ३०­५० टक्के भांडवली गुंतवणूक फुगवून दाखवली जाते़ प्रवर्तक आणि बॅँका हातमिळवणी करून कर्जावरच्या व्याजाचे अनेकदा भांडवलीकरण करत असतात़ देशातील उद्योगपतींनी बॅँकांचे कोट्यवधी रुपये थकवले आहे़ त्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही़ एकट्या विजय मल्ल्याने राष्ट्रीकृत स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे हजारो कोटी रुपये थकवले आहेत़ विजय मल्ल्या, अदानी, अंबानी यांच्यासह काही मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांकडे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे़ महाराष्ट्र सरकारवर असलेल्या कर्जाइतकीच ती रक्कम मोठी आहे. मल्ल्या यांचे कॉँग्रेसशी तर अदानी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध असल्यामुळे बॅँकांची त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत होत नाही़ या वेळी झालेल्या संसदेच्या अधिवेशनात कंपनी दिवाळखोरीविषयक कायदा करण्याचे ठरवले असून या कायद्यानुसार दिवाळखोरीत गेलेल्या कंपनीची विक्री करून भांडवल मोकळे करता येऊ शकते; पण ज्याप्रकारे उद्योगपतींना पायघड्या घातल्या जात आहेत त्यावरून या कायद्याची अंमलबजावणी होईल का? ही शंकाच आहे़ रिझर्व्ह बॅँकेच्या एका अहवालानुसार बॅँकांच्या अनुत्पादक मालमत्तेच्या प्रमाणवाढीतील ९० टक्के वाटा या मोठ्या कर्ज थकवणाºयांचा (विलफुल डिफॉल्टर) आहे़ रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर डॉ़ रघुराम राजन यांनी वारंवार सांगूनही कॉर्पोरेट क्षेत्रातील विलफूल डिफॉल्टरवर कारवाई केली जात नाही़ केंद्र सरकारच्या अप्रत्यक्ष दडपणामुळेच ही कारवाई होत नाही़ अशा उद्योगपतींवर करसवलतींची पाच लाख कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे, त्यांना  एवढी भरमसाट करसवलत कशासाठी? खाउजा धोरण आल्यापासून गेल्या २५ वर्षांत अब्जाधीपतींची संख्या वाढली आहे, तसेच सहकारी चळवळीत मूठभर बागायतदार अब्जाधीपती झाले; पण श्रीमंत­गरीब ही दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्याकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही़ सहकार क्षेत्रातील साफसफाईबरोबरच खाजगी उद्योजकांना लाल गालिचे अंथरून त्यांच्यावर सवलतींची खैरात केली जाते़ मात्र, हे उद्योजक बँकांना लुटण्याचा धंदा करत आहेत़ त्यांचीही चौकशी झाली पाहिजे़

Read more...

नवे वर्ष, नव्या आशा, नवी आव्हाने

सरत्या वर्षाला निरोप देऊन २०१६चे स्वागत झाले़ नव्या आशा, नव्या आकांक्षा, नवी स्वप्ने घेऊन नववर्षाचे संकल्प केले गेले़ नववर्षाची सुरुवात गोड व्हावी, असे सर्वांनाच वाटत असते़ त्यामुळे सर्वसामान्य माणसेही नववर्षाचा नवा संकल्प उराशी बाळगून भविष्याला गवसणी घालण्यासाठी स्वप्ने पाहत ती सत्यात उतरवण्यासाठी सिद्ध होत असतात़
सर्वसामान्य नागरिक जिथे हे संकल्प करतात तिथे राजकारणी मागे कसे राहणार? त्यामुळेच तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बलशाली, समृद्ध, प्रगतशील, महाराष्ट्र करण्याचा संकल्प सोडला आहे़ फडणवीसांच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे़ त्यांनी ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवले असल्यामुळे जनतेच्या आशा, आकांक्षांचे मोठे ओझे फडणवीस यांच्या खांद्यावर आले आहे़ एक वर्ष हा कालावधी कोणत्याही सरकारला स्थिरस्थावर होण्यासाठी पुरेसा आहे़ या कालावधीत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कामाचा आवाका नक्कीच आला असेल़ त्यामुळे नववर्षात मुख्यमंत्री जोमाने कामाला लागतील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही़
प्रारंभीच्या काळात त्यांचा सहकारी शिवसेना हा पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरत होता़ प्रत्येक प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन भाजपाला कोंडीत पकडण्याचा शिवसेना प्रयत्न करत असे़ त्यातून आपले वेगळे अस्तित्व व अस्मिता दाखवण्याचा त्या पक्षाचा प्रयत्न असे. राज्यातील दुष्काळ असो, शेतकºयांच्या मागण्या असोत, विरोधी पक्षाची भूमिका शिवसेनेनेच घेतली होती़ हा विरोध मुंबई महानगरपालिका व पुणे महानगरपालिका निवडणुकीपर्यंत केला जाईल़; परंतु नंतर मात्र ही धार राहणार नाही़ सत्तेत योग्य वाटा मिळवण्यासाठीच शिवसेनेची ही आदळआपट चालू होती; परंतु फडणवीस सरकार स्थिर होत चालले, तसतसा विरोध मावळत चालला आहे़ फडणवीसांनी शिवसेनेला अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळले आहे़ घटक पक्षांनाही मंत्रीपदाची आमिषे दाखवत झुलवत ठेवण्याचे काम गेले एक वर्ष चांगल्या पद्धतीने केले गेले आहे़ मित्रपक्षांची नाराजी वाढली की, मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या पेरून त्यांना आशेवर ठेवण्याचे काम भाजपाने केले आहे़ अलीकडे तर केंद्र सरकारमध्ये रामदास आठवलेंना घेणार, अशा बातम्या पसरवल्या गेल्या़
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारला कोंडीत पकडण्याइतके काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ नाहीत़ मात्र, गेल्या वर्षात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेतृत्वहीन काँग्रेसला चांगले यश मिळाले़ धुळे, नंदूरबार, भंडारा या जिल्ह्यातील जिल्हा परिषदा काँग्रेस आघाडीने जिंकल्या आहेत़ राज्यात भाजपा सत्ताधारी मोठा पक्ष असूनही त्याच्या जागा वाढल्या तरी सत्ता फारच कमी ठिकाणी मिळाली़ औरंगाबाद, कल्याण, नवी मुंबई, कोल्हापूरमध्ये भाजपाच्या जागा वाढल्या तरी या शहरामध्ये कोठेही सत्तेत वाटा मिळाला नाही़ शिवसेनेने अजूनही आपले वर्चस्व कायम राखले आहे़ नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी राष्ट्रवादीची बºयाच ठिकाणी पिछेहाटही झाली आहे़ विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवल्या़ भाजपाकडे राज्याची सत्तास्थाने असतानाही पक्ष फारसा वाढत नसल्याचे दिसत आहे़ काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन असला तरी तळागाळात त्यांची बिजे रूजली असल्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांना अजूनही यश मिळत आहे़ राज्यातील या निवडणुकांमध्ये काँग्रेस नेतृत्वाचा प्रभाव फारसा दिसला नाही़ प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे­पाटील, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे असे नेते असले तरी त्यांच्यात एकजूट दिसत नाही़ राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची हीच परिस्थिती आहे़ नरेंद्र मोदींसारख्या ताकदवान नेतृत्वापुढे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व फिके पडत आहे़ विरोधी पक्षातील नेत्याचा झुंजारपणा अजूनपर्यंत त्यांनी दाखवला नाही़ आतापर्यंत नरेंद्र मोदी सरकारने उद्योगपतीधार्जिणे निर्णय घेतले आहेत़ खरे तर ‘अच्छे दिना’चे पोस्टमार्टम काँग्रेस पक्षाने करायला हवे होते; परंतु पक्षपातळीवर सामसूम दिसून येत आहे़ मात्र, बिहारच्या निवडणुकीनंतर या पक्षात आशा निर्माण झाली आहे़ गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या पक्षाला चांगले यश मिळाले असल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत़
गुजरातमध्ये २५ जिल्हा परिषद व पंचायत समित्यांपैकी २० समित्या काँग्रेसने जिंकल्या आहेत़ मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा निवडणूकही या पक्षाने जिंकली आहे़ येथील आठपैकी पाच नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत़ छत्तीसगडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही चांगले यश मिळाले आहे़ हळूहळू काँग्रेस पक्ष अपयशाच्या भयातून सावरत आहे़ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीपासून पिछाडीवर गेला आहे़ शरद पवारांची राजकीय वाटचाल सावध असून त्यांची कधी भाजपाबाबत मवाळ, तर कधी काँग्रेससोबत आघाडी, ही तळ्यात मळ्यात भूमिका स्पष्ट करावी लागेल; पण सध्या तरी दबावाचे राजकारण करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय दिसत नाही़ त्यामुळे फडणवीस यांचे सरकार अधिक स्थिर झाले आहे़ राज्यापुढे अनेक संकटे आ वासून उभी राहिली आहेत़ शेतकºयांच्या आत्महत्या, दुष्काळ, आर्थिक स्थिती ही महाराष्ट्रापुढील तीन प्रमुख आव्हाने आहेत़ मध्य प्रदेश, बिहार आणि गुजरातच्या शेती विकासाची गती सरासरी पाच टक्क्यांहून अधिक असते़ महाराष्ट्रात मात्र ती उणे आहे़ दुष्काळी पार्श्वभूमीवर शेती विकासाचा वेग अजून कमी होण्याचा अंदाज आहे़ शेतकºयांना वेगवेगळी पॅकेजेस देऊनही आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हायला तयार नाही़ दुष्काळी परिस्थिती आणि शेतकºयांच्या आत्महत्यांवर कायमचा उपाय शोधणे, हे सरकारपुढील मोठे आव्हान आहे़
जसजसा उन्हाळा सुरू होईल तसतसा पाणीसाठा संपत जाईल. पाणीटंचाईचाही भीषण प्रश्न आ वासून उभा राहील. राज्यावर तीन लाख दहा हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे़ आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे विकासाच्या कामांना कात्री लावावी लागत आहे़ २० टक्के निधीला कात्री लावण्यात आली आहे़ सातव्या वेतन आयोगामुळे राज्यावरचा बोजा आणखी वाढणार आहे़ महसूलवाढीला मर्यादा आणि खर्च जास्त, अशी स्थिती निर्माण झाली आहे़
दोन महामंडळेवगळता उर्वरित महामंडळे व साई संस्थान, यासारख्या मोठ्या संस्थांवर अजून नियुक्त्या झालेल्या नाहीत़ विनायक मेटे, महादेव जानकर, राजू शेट्टी, रामदास आठवले यांना सत्तेत वाटा किती व कसा द्यावा, हा प्रश्न बहुधा भाजपाला सतावत आहे़ नोकरशाही अजून सहकार्य करत नाही, ही तक्रार मुख्यमंत्र्यांनी करून चालणार नाही तर त्यांना वठणीवर आणण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे़ एलबीटी रद्द केल्याने याची वित्तीय तूट कशी भरून काढणार? विकासकामांना पैसा देतानाच समाजकल्याण निधीला कात्री लागणार नाही़ स्मार्ट सिटीचा उदो उदो सुरू आहे, तो केवळ भुलभुलैया असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. प्रत्येक स्मार्ट सिटीसाठी वेगळी कंपनी स्थापन करून ही कंपनी शहराचा विकास करणार आणि विविध करांच्या माध्यमातून पुढे अनेक वर्षे लुटत राहणार, अशी टीका होत आहे़ तेव्हा नवे वर्ष अनेक आशा, आकांक्षांबरोबर अनेक आव्हानेही घेऊन आले आहे, याचे भान सरकारला ठेवावे लागेल़ तरुण, तडफदार आणि त्याचबरोबर प्रश्नांची जाण असणारे अभ्यासू नेते, अशी मुख्यमंत्री फडणवीस यांची ख्याती आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे़

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP