Wednesday, May 4, 2011

पिंगळा बोले मंत्रालयाच्या महाद्वारी


पिंगळा या पक्ष्याला राज्यपक्षी बनवण्याचा प्रस्ताव वनविभागाने तयार केला असून सध्या वन्यजीव मंडळाकडे पुढील प्रक्रियेसाठी देण्यात आला आहे. लवकरच मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव येईल आणि त्याला मान्यता दिली जाईल, असे समजते.


पिंगळा बोले महाद्वारी। बोली बोलतो देखा।।

शकुन सांगतो तुम्हा। हा एक ऐका॥

डुग डुग ऐका डुग डुग ऐका॥ धृ॥

पिंगळा बैसोनी कळसावरी। तेथेनि गर्जतो नाना परी।

बोलबोलती अति कुसरी। सावध ऐका॥

असे एकनाथ महाराजांचे एक भारुड आहे. पिंगळा रुपकाच्या माध्यमातून समाजामध्ये भविष्यात होणा-या बदलाचे संकेत एकनाथ महाराजांनी दिले होते. अर्थात, पिंगळा पक्षी भविष्य जाणणारा म्हणून परिचित असल्याने त्याचे रुपक एकनाथ महाराजांनी वापरले. हा पिंगळा आता मंत्रालयाच्या महाद्वारी बसून डुगडुग करत सरकारला विविध शकुन सांगणार आहे. रात्री अंधारात फिरून भविष्यवाणी करणा-या या पक्षाचे भविष्य मात्र उज्ज्वल आहे. तो आता महाराष्ट्राचा ‘राज्य पक्षी’ ठरणार आहे. तशा प्रकारचा प्रस्ताव वनविभागाने तयार केला असून सध्या वन्यजीव मंडळाकडे पुढील प्रक्रियेसाठी देण्यात आला आहे. लवकरच मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव येईल आणि त्याला मान्यता दिली जाईल, असे समजते.

राज्याची एकूण चार मानचिन्हे आहेत. वृक्षांमध्ये मोहरलेला आम्रवृक्ष, प्राण्यांमध्ये शेकरू, फुलांमध्ये जारूळ किंवा ताम्हण आणि पक्षांमध्ये हरोळी अशी ती आहेत. राज्याचे मानचिन्ह असलेल्या हरोळी पक्ष्यांची संख्या आता चांगलीच वाढली असून तो आता दुर्मीळ राहिलेला नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी आता पिंगळा या पक्ष्याला हा मान देण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.

पिंगळा पक्षी घुबडांच्या जातीतील लहान पक्षी असून तो निशाचर आहे. त्याच्या आवाजातून शकुन-अपशकुन समजतात,असा समज आहे. या पक्ष्यांच्या नावावरूनच माणसांतही एक जात आहे. तेही पहाटेच्या वेळी गावात फिरून भविष्य सांगतात. पिंगळय़ाला दिवस निषिद्ध आहे.

अंधारात फिरण्यासाठी त्याचे कान आणि डोळे अत्यंत तीक्ष्ण असतात. तो मान 180 अंशाच्या कोनात फिरवू शकतो. मनुष्यवस्तीत राहणारा हा पक्षी जुनी घरे, मोठय़ा वृक्षांच्या ढोलीमध्ये दिवसभर राहतो आणि रात्री शिकारीसाठी बाहेर पडतो. बेडूक, पाली, छोटे पक्षी हे त्याचे खाद्य आहेत.

हा पक्षी सध्या दुर्मीळ झालेला असल्याने त्याचे संवर्धन करण्यासाठी त्याचा समावेश राज्याच्या मानचिन्हांमध्ये करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव वनविभागाने तयार केला असून तो वन्यजीव विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तेथून मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर येईल आणि त्यानंतर त्याला मान्यता देण्यात येईल. पिंगळय़ाला मानचिन्ह करण्यासाठी सरकार अनुकूल असल्याने लवकरच तो महाराष्ट्राचा राज्य पक्षी होईल, असे सूत्रांनी सांगितले.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP