विघ्नहर्त्यांचाच आता दिलासा..
विलासरावांची भाषा अण्णांना अवगत असल्यामुळे ते समजून चुकले आणि त्यांनी उपोषण सोडले. त्याचबरोबर राजकारणी सुटले. विघ्नकर्त्यांने उभी केलेली सारी विघ्ने दूर करण्याकरिता तमाम राजकारणी विघ्नहर्ता गणपतीसमोर नतमस्तक झाले आहेत. इतके दिवस टीव्हीवर अण्णाच दिसत होते. आता गणपतीबरोबर राजकारणीही दिसणार असल्याने सर्व जण मनोमन सुखावले असणार याबद्दल शंका नाही. गांधीगिरी, अण्णागिरीचा मुखवटा धारण करणा-यांसमोर राजकारण्यांनी संविधानाची ढाल धरल्यामुळे आता विघ्नहर्त्यांकडूनच दिलासा मिळेल, असे प्रत्येकाला वाटू लागले आहे.
तब्बल बारा दिवस जननायक बनलेल्या अण्णांच्या मागे लोक धावत होते. सरकार, सत्ताधारी, राजकारणी यांच्या भ्रष्टाचाराला अण्णागिरी वेसण घालणार असल्याचे चित्र प्रसारमाध्यमांनी रंगविले असल्याने अण्णांच्या रूपात लोकांना जननायक गवसला होता. पण आता खरेखुरे गणनायक अकरा दिवसांसाठी वास्तव्यास आले असल्याने त्यांच्या दर्शनासाठी गर्दी उसळली आहे. अण्णागिरीने भ्रष्टाचाराच्या भीतीचा ब्रह्मराक्षस निर्माण केला असून त्याने राजकारण्यांचा पाठलाग सुरू केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्र अस्वस्थ झाले. पण गणनायक,गणाधिपती, गणाधीश, गणराय तुम्हा-आम्हा सर्वाचा आणि अर्थात राजकारण्यांचासुद्धा गणपती विघ्नहर्ता आला आणि सर्वांना दिलासा मिळाला. रामलीला मैदानावर गांधीगिरी नव्हे अण्णागिरी करणारे उच्चरवात काहीही म्हणोत, गणनायकाच्या साक्षीने केंद्रीय मंत्रिमंडळाने आपली मालमत्ता जाहीर केली आणि भ्रष्टाचाराचा ‘वारा ना शिवे माझ्या मना’ असे म्हणत आपल्या मनावरचे मणामणाचे ओझे दूर केले खरे. भ्रष्टाचारात राजकारणी आकंठ बुडाले असल्याचे दिल्लीत जनसागराच्या साक्षीने सांगून अण्णांनी आपल्या आंदोलनाने सर्वाची झोप उडविली होती. त्या अस्वस्थ मनावर गणनायकाने मायेची फुंकर घातली. कोणी कितीही विघ्ने निर्माण करो, यापुढे एवढा मोठा जनसमुदाय आंदोलनाला लाभेल की नाही, याचीही शंका वाटू लागली आहे. मात्र विघ्नकर्त्यांवर जालीम उपाय विघ्नहर्त्यांचा असल्याची खात्री पटली आहे.
आता सगळे राजकारणी सत्ताधीश गणाधिशाला साकडे घालू लागले आहेत. या देशात नेमके काय चालले आहे ते गणरायाने अंतज्र्ञानाने शोधून काढावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गणपती आला आणि नाचूनी गेला असे होता कामा नये. गणपती येताना कसा वाजत, गाजत, नाचत येतो तसेच रामलीला मैदानावर घडले होते. गणपती आला आणि नाचून गेला एवढय़ापुरते हे आंदोलन राहील की काय, अशी शंका अनेकांना वाटते आहे. सध्या घरोघरी, गल्लीबोळात, रस्त्यारस्त्यांवर,अंगणात, पटांगणात येऊन बसलेले गणपती लाखो-करोडोंच्या मनामनात अकरा दिवस नाचणार आहेत आणि पुढच्या वर्षी लवकर येईपर्यंत त्याची आरती गाणार आहेत. कोणी उपोषण करो की अण्णागिरी करो, विघ्नहर्ता गणपती सर्व अपराध पोटात घालणार आहे. अपराध पोटात घालून-घालून त्याचे पोट मोठे झाले आहे. पण त्याला त्याची चिंता नाही. भक्तांचे रक्षण हेच त्याचे आद्यकर्तव्य आहे. भक्तांची गुणवत्ता बदलली तरी सुबुद्धीचा आशीर्वाद देण्यासाठी त्याचा एक हात कायम वर असतो. स्वातंत्र्यलढय़ात जनजागृतीसाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला. कार्यकर्त्यांनी पदरमोड करून हे उत्सव साजरे केले. पण आज गणेशोत्सव मंडळे विविध पक्षांचे कार्यकर्ते घडवत आहेत. आपल्या पायावर उभे राहण्यासाठी कार्यकर्ते स्वत:ला सक्षम बनवत आहेत. त्यासाठी वर्गणीपासून खंडणीपर्यंत त्यांची मजल गेली आहे, पण गणपती कान टवकारून कोणतीही गजागिरी करीत नाही. आपल्या भक्तांना सोंडेवर घेऊन आपटत नाही.
अण्णागिरीने मात्र कमाल केली. काँग्रेसवाल्यांची गांधी टोपीदेखील त्यांच्याकडे ठेवली नाही. अण्णा समर्थकांनी गांधी टोपी हायजॅक केली. सफेद टोपीवर गांधी नाव लिहिण्याची गरज भासली नाही. या टोपीला गांधीटोपीची मान्यता आपोआप मिळाली होती. पण आता सगळी गंमत सुरू आहे. टोपी कोणाची आणि रॉयल्टी कोणाला, असा प्रकार घडला आहे. गांधीटोपीवर अण्णांचे नाव लिहून ती अण्णा ब्रँडने बाजारात आणली. स्वातंत्र्यानंतर 60 वर्षाच्या काळात काँग्रेसवाल्यांनी लोकांना टोप्या घातल्या आणि स्वत: सफारीत फिरू लागले, याचा प्रत्यय उपोषणस्थळी सर्वांना आलेलाच आहे. अण्णांच्या डोक्यावर गांधीटोपी आणि विलासराव देशमुख कडक सफारीत हे दृश्य देशाने पाहिले. अर्थात सफारी घालणे चुकीचे मुळीच नाही, जग अत्याधुनिकतेकडे जाताना नेत्यांनी गांधीटोपी घालण्याची किंवा पंचा नेसण्याची अपेक्षा कोणी करणार नाही, त्यात विलासराव झाले आहेत विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री, त्यामुळे त्यांनी आधुनिक दृष्टिकोन बाळगण्याचीच अपेक्षा आहे. पण गांधींचा वसा घेतल्याची बतावणी करणा-या अण्णांनी ‘मी अण्णा’, ‘मै अण्णा हू’, ‘आय एम अण्णा’ असे लिहिलेल्या टोप्या देशातल्या लहान-थोरांच्या डोक्यावर घातल्या. महात्मा गांधींच्या टोपीला अण्णांच्या टोपीच्या रूपाने एक कमर्शिअल स्पर्धक निर्माण झाला. गांधीटोपीची रॉयल्टी अण्णांनी खेचून घेतली आणि काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभे करून दुस-या स्वातंत्र्याची हाक दिली. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह सर्व मंत्री आपली मालमत्ता जाहीर करू लागले आहेत. आपल्याकडे जाहीर करण्यासारखे काही नाही, ‘मी फकीर’ आहे असे त्यांनी जाहीर केले आहे. ज्या माणसाला घरसंसार नाही, मुलाबाळांचे शिक्षण करायचे नाही, अॅडमिशनसाठी डोनेशन द्यायचे नाही, नोकरीसाठी वशिला लावायचा नाही, ज्यांना पैसे द्यावे लागतात, ज्यासाठी पैसे घ्यावे लागतात असे काही अण्णांना करावे लागत नाही. प्रवासासाठी गाडी दारात हजर असते. विमानाची तिकिटे येतात. सगळी बडदास्त राखली जाते. वारेमाप प्रसिद्धीही मिळते. यापैकी काही झाले नाही तर राळेगणसिद्धीला येऊन यादवबाबांच्या मंदिरात राहता येते.
अरविंद केजरीवाल, किरण बेदींसारख्या आयएएस, आयपीएस अधिका-यांच्या हुशार डोक्यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साथीने असा काही माहोल निर्माण केला की भ्रष्टाचारात या ना त्या मार्गाने बुडालेली जनता आपल्या लेकराबाळांसह गांधी नव्हे अण्णाटोप्या घालून रस्त्यावर उतरली आणि अण्णांनी जाहीर केलेल्या उपोषणाचा बेमालूम उपयोग करून घेतला. लोकांचा उत्साह पाहून अण्णांना बळ चढत होते. बारा दिवसाचे उपोषण असताना लाल किल्ल्यावर भाषण करत असल्याच्या जोशात ते बोलायचे आणि प्रसारमाध्यमे शूटिंग करायचे. सरकार, कायदा, संसद, संविधान या सगळय़ांची आपण तोडमोड करीत आहेत याचेही भान त्यांना नसायचे.
लालूप्रसाद यादव, शरद यादव यांनी संविधानाचेच महत्त्व पटवून देऊन अण्णागिरीचा पर्दाफाश करून दाखविला आणि सर्वसामान्य जनता विरोधात जाऊ शकते याची जाणीव करून दिली. तेव्हा कुठे अण्णांना बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाची आठवण झाली.
अण्णांचे उपोषण सोडण्याकरता मात्र त्यांच्या दहा-बारा उपोषणाचा अनुभव असलेल्या महाराष्ट्रातील विलासराव देशमुखांची नियुक्ती करण्यात आली. शरद पवारांची जाहीर मालमत्ता कमी असली तरी त्यांच्याभोवती संशयाची वलये भरपूर असल्यामुळे त्यांनी अण्णांच्या उपोषणाबद्दल अवाक्षर काढले नाही. एरव्ही राजकीय पेचप्रसंगांत प्रथम प्रफुल्ल पटेलांना अहमद पटेलांकडे पाठविले जाते. त्यांना अण्णांकडे पाठविण्याची सरकारची हिंमत झाली नाही. विलासरावांवर ती जबाबदारी आली. विलासरावांची भाषा अण्णांना अवगत असल्यामुळे ते समजून चुकले आणि त्यांनी उपोषण सोडले. त्याचबरोबर राजकारणी सुटले. विघ्नकर्त्यांने उभी केलेली सारी विघ्ने दूर करण्याकरता तमाम राजकारणी विघ्नहर्ता गणपतीसमोर नतमस्तक झाले आहेत. इतके दिवस टीव्हीवर अण्णाच दिसत होते. आता गणपतीबरोबर राजकारणीही दिसणार असल्याने सर्व जण मनोमन सुखावले असणार याबद्दल शंका नाही. गांधीगिरी, अण्णागिरीचा मुखवटा धारण करणा-यांसमोर राजकारण्यांनी संविधानाची ढाल धरल्यामुळे आता विघ्नहर्त्यांकडूनच दिलासा मिळेल, असे प्रत्येकाला वाटू लागले आहे.
0 comments:
Post a Comment