मोदींचे उपोषण आणि अनेकांचे कुपोषण
सर्वधर्मसमभाव नसल्यामुळे अटकेपार झेंडा फडकविण्यासाठी मोदींनी घातलेल्या पेशव्यांच्या पगडीचा सकारात्मक परिणाम या देशात होईल अशी शक्यता नाही. एकीकडे मुस्लिम दुखावले गेले असतानाच अल्ला हो अकबराचा नारा व्यासपीठावरून दिल्याबद्दल संघ परिवारही नाराज झाला असल्याची चर्चा आहे. मोदींनी प्रतिमा उंचावण्यासाठी कितीही आटापिटा केला तरी संघाचा खरा चेहरा जातीयवादी असल्याने ओबीसी नेता भाजपचा पंतप्रधान होऊ शकेल यावर कोणी विश्वास ठेवत नाही. उपोषणाचे महत्त्व कमी करण्यासाठी संघाने तातडीने अडवाणींच्या रथयात्रेला हिरवा कंदील दाखवला यावरून मोदींच्या कुपोषणाची प्रक्रिया सुरू झाली असे समजण्यास हरकत नसावी.
देशात कुपोषणांचे बळी वाढत आहेत. ज्याला उपवास घडतो त्याचे कुपोषण होते, हे आतापर्यंत माहीत होते. मात्र गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या तीन दिवसांच्या सद्भावना उपोषणाने त्यांचे कुपोषण झाले नाही तर पक्षात ते अधिक सुदृढ झाले. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून थेट ते भावी पंतप्रधान होऊन बसले. अर्थात एकदा भावी शब्द मागे लागला की तो जन्मभर पाठ सोडत नाही. लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कायमचे भावी पंतप्रधान राहिले. मोदींच्या नावामागील भावी शब्द किती दिवस टिकून राहतो हेच आता पाहायचे. मोदींनी उपोषण केल्याने त्यांचे राजकीय वजन वाढले असले तरी अनेक राजकीय नेत्यांचे कुपोषण झाले. कुपोषणाची ही साथ केवळ गुजरात आणि भाजपपुरती मर्यादित राहिली नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात येऊन धडकली. आधीच कुपोषित आणि शक्तिहीन झालेल्या शिवसेनेला मोदींच्या उपोषणाचा झटका बसला. डोकेदुखी, जळजळ, मळमळ असे अनेक विकार एकाच वेळी सुरू झाले. मनसेच्या व्हायरसने शिवसेनेला अधिकच झटका बसला आणि कुपोषित कार्याध्यक्षांचा तोलच ढासळला.
मोदींनी उपोषण करीत पक्षातील आपले वजन वाढविण्याबरोबरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनाही साद घातली. अकाली दलापासून ते जयललितांपर्यंत काहींनी या उपोषणाला शुभेच्छा दिल्या. मात्र शेजारच्याच महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेनेला हे उपोषण फारसे भावले नाही. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तिकडे पाठ फिरवली. मोदींच्या उपोषणाने या मित्राच्याच पोटात जळजळ होत असल्याचे दिसून आले. ही जळजळ शिवसेनेच्या मुखपत्रातून व्यक्त झाली.‘उपोषण मोदीचे की गादीचे’ या शीर्षकाच्या अग्रलेखात ‘ऐंशी टक्के जनता रोजच उपाशी असते. भूक व बेरोजगारीची ती बळी आहे. त्यामुळे मोदींच्या उपोषणाला इतके महत्त्व का द्यायचे’, असा सवाल करण्यात आला. इतकेच नव्हे तर मोदींना शुभेच्छा देताना महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी जे गुजरातचे गोडवे गायले आणि महाराष्ट्रावर टीका केली, त्याबद्दल शिवसेनेतून नाराजी व्यक्त करण्यात आली. दुस-या राज्यात जाऊन महाराष्ट्राच्या तोंडाला काळे फासण्याचे धंदे थांबवावेत, असा खडसेंना खडसावण्यात आले. यावरून शिवसेनेच्या पोटात मोदींच्या उपोषणाने किती जळजळ झाली हेच दिसून आले.
शिवसेना कार्याध्यक्षांनी या उपोषणाकडे पाठ फिरविली असली तरी मनसेचे अध्यक्ष गुजरात मित्र राज ठाकरे यांनी मात्र उपोषणस्थळी जाऊन मोदींना शुभेच्छा दिल्या. इतकेच नव्हे तर शिवसेनेच्या मुखपत्रातून एकनाथ खडसे यांच्यावर जी टीका केली होती, त्याला परस्पर उत्तर देऊन टाकले. ‘दुस-या राज्यात जाऊन बोलायचे नाही म्हणजे काय. तुम्ही इथे वाटोळे करून ठेवायचे आणि ते बोलायचे नाही, मुंबईची जी वाट लावलीत, सर्वत्र खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे त्याचे दर्शन रोज लोकांना होतेय. ते बोलायचे नाही? आता काय स्किम काढलीय तर खड्डय़ाचे फोटो पाठवा आणि मग आम्ही खड्डे भरू. तिकडे तुम्ही जंगलात जाऊन जे जनावरांचे चित्र काढता ना, त्याऐवजी मुंबईच्या खड्डय़ांची छायाचित्रे काढा. खड्डय़ांमुळे मुंबईची जी माती झाली आहे तीही दिसेल आणि आपला फोटोग्राफीचा छंद जोपासला जाईल,’ अशा शब्दात शिवसेना कार्याध्यक्षांना खडसावून मुंबईतील खड्डे बुजविताना कशी टक्केवारी चालते याचा पाढाच राज ठाकरे यांनी वाचला.
राज यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या पोटात होत असलेली जळजळीचे मळमळीत रूपांतर झाले. राज यांनी घातलेला घाव शिवसेना कार्यप्रमुखांच्या इतका जिव्हारी लागला त्यांचा पार तोल सुटला. आपल्याच भावावर त्यांनी ज्या त-हेने गरळ ओकली ती सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी होती. पापी, बेईमान, कपटी, जनावर, नमकहराम अशी जेवढी विशेषणे देता येतील तेवढी विशेषणे त्यांनी राज ठाकरे यांना दिली. मोदींचे उपोषण गुजरातमध्ये, ठाकरे बंधूंची भांडणे मुंबईत असा प्रकार घडला. दोघांचा शिमगा इतका रंगला की त्यात शिवसेनेचे कुपोषण झाले. राज-मोदी यांच्या मैत्रीने भविष्यात शिवसेना-भाजप युतीही कुपोषित होण्याची चिन्हे दिसत आहेत.
एकंदरीत, मोदींच्या उपोषणाचे परिणाम केवळ गुजरात आणि भाजपमध्येच नव्हे तर मित्रपक्षातही दिसू लागले आहेत. उपोषणाच्या कुपोषणाचा सर्वाधिक फटका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधानपदाचे कायम उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांना बसला. वेगवेगळय़ा यात्रा काढून सतत चर्चेत राहणा-या अडवाणी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून नाव चर्चेत ठेवण्यासाठी अलिकडेच भ्रष्टाचाराविरोधात रथयात्रा काढण्याची घोषणा केली होती. त्याची हवा तापायला सुरुवात होण्यापूर्वीच मोदींनी हा उपोषणाचा इव्हेंट घडवून आणला आणि आपली ताकद दाखवून दिली. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून त्यांचे नाव थेट देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत गेले. लालकृष्ण अडवाणी तिथे पोहोचले तेव्हा त्यांना मोदी हेच पंतप्रधानपदाचा योग्य उमेदवार असल्याचे जाहीर करावे लागले. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आपले शारीरिक वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेतली असली तरी त्यांचे राजकीय वजनही मोदींच्या उपोषणाने आपोआपच कमी झाले. राष्ट्रीय अध्यक्षांपेक्षा मोदींचे वजन जास्त असल्याची चर्चा माध्यमातून होऊ लागली. म्हणूनच गडकरी यांनी‘पंतप्रधानपदासाठी लायक अनेक उमेदवार भाजपात आहेत. योग्य वेळी नाव जाहीर केले जाईल’ असे सांगत मोदींच्या उमेदवारीवर काट मारण्याचा प्रयत्न केला. गडकरींना मोदींच्या भेटीस जाणे शक्य झालेले नसले तरी ते आपल्या मर्जीतील एखाद्याला पाठवू शकत होते. उलट विनोद तावडेंसह एकही गडकरी समर्थक मोदींच्या भेटीला गेला नाही हे विशेष.
उपोषणाने वजन वाढलेले मोदी जर खरोखर केंद्रीय राजकारणात आले तर आपल्या अस्तित्वाचे काय होईल, या शंकेने सुषमा स्वराज, अनंतकुमार, अरुण जेटली यांच्यासारख्या अनेकांचे चेहरे पडले. भाजपतील ओबीसींचा चेहरा म्हणून ख्याती पावलेल्या मुंडेंनाही या उपोषणाचा झटका बसण्याची भीती आहे. गडकरींशी असलेल्या मतभेदाने त्यांचे वजन सतत कमी करण्याचाच प्रयत्न होत असतो. मुंडेंचा ओबीसी चेहरा लक्षात घेऊन पक्षाने त्यांना पहिल्यांदा लोकसभेत आलेले असताना त्यांना उपनेतेपद देण्यात आले. मोदी जर केंद्रात आले तर मुंडेंचे आणखी कुपोषण होईल, अशी चर्चा होऊ लागली. उपोषणाने असे ज्ञात अज्ञात अनेक बळी घेतले असले तरी मोदींचेही वजन कायम राहण्याची शक्यता दिसत नाही. या उपोषणाच्या निमित्ताने आपला सर्वसमावेशक चेहरा निर्माण करण्यासाठी मोदींनी उपोषण स्थळी वेदमंत्रांच्या घोषाबरोबरच अल्ला हो अकबरचा नाराही दिला. मात्र असा नारा देत असताना आपली हिन्दुत्ववादी प्रतिमा कायम राहिली पाहिजे याची काळजी घेण्यासही ते विसरले नाहीत, त्यांनी मुस्लिमांची गोल टोपी घालणे नाकारले, मात्र पगडी तत्परतेने घातली. त्यामुळे मुस्लिम बांधव संतापले, सर्वधर्मसमभाव नसल्यामुळे अटकेपार झेंडा फडकविण्यासाठी मोदींनी घातलेल्या पेशव्यांच्या पगडीचा सकारात्मक परिणाम या देशात होईल अशी शक्यता नाही. एकीकडे मुस्लिम दुखावले गेले असतानाच अल्ला हो अकबराचा नारा व्यासपीठावरून दिल्याबद्दल संघ परिवारही नाराज झाला असल्याची चर्चा आहे. मोदींनी प्रतिमा उंचावण्यासाठी कितीही आटापिटा केला तरी संघाचा खरा चेहरा जातीयवादी असल्याने ओबीसी नेता भाजपचा पंतप्रधान होऊ शकेल यावर कोणी विश्वास ठेवत नाही. उपोषणाचे महत्त्व कमी करण्यासाठी संघाने तातडीने अडवाणींच्या रथयात्रेला हिरवा कंदील दाखवला यावरून मोदींच्या कुपोषणाची प्रक्रिया सुरू झाली असे समजण्यास हरकत नसावी.
0 comments:
Post a Comment