मनपा निवडणुकीसाठी आघाडीचे डब्ल्यू डब्ल्यू एफ
राज्यातील विरोधी पक्ष निष्प्रभ झालेले असताना आणि विरोधकांचा झंझावात येण्याची शक्यता नसताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक राजकीय प्रगल्भता दाखवणे आवश्यक आहे. पण आघाडीमध्ये असलेल्या आक्रमक घटकांनी, आघाडी तुटेल कशी यावर लक्ष ठेवून काँग्रेसबरोबर कुस्तीचे आव्हान दिले आहे. सध्या शिवसेना-भाजप युतीमध्ये मतभेद वाढू लागले आहेत. शिवसेनेच्या मतांवर डल्ला मारण्यासाठी मनसे टपून बसली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या तंबूत जाऊन शिवसेनेला वाकुल्या दाखवल्या असल्याने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा तीळपापड झाला आहे. त्यांच्यातील डब्ल्यू डब्ल्यू एफचा प्रयोग नुकताच पार पडला आहे.
राज्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन महाकाय पेहेलवानांमध्ये फ्री स्टाइल कुस्त्यांची दंगल सुरू झाली आहे. मीच कसा सामर्थ्यशाली आहे, हे दाखवण्यासाठी स्वबळाच्या डरकाळय़ा सुरू झाल्या आहेत. खरंतर हे दोन्ही मित्र पक्ष, तेव्हा यांच्यातील लढाई लुटुपुटूची असेल असे कोणाला वाटू शकते. पण राजकारणातील वास्तव मात्र निराळे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ म्हणजे अधिक ताकदवान. पण धाकटा राष्ट्रवादीच जोरजोरात आव्हान देत सुटला आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजकाल अधिक आक्रमक झाले असून, स्वबळाची भाषा सर्व प्रथम त्यांनीच केली. काँग्रेस पक्ष हा कितीही ताकदवान असला आणि त्याचा दर्जा मोठय़ा भावाचा असला तरी आपण त्याला चितपट करू शकतो, अशी भाषा अजितदादांनी सुरू केली. जणू काही मुंबई-ठाण्यासह सर्व निवडणुकांत राष्ट्रवादीची सरशी होणार अशा जबरदस्त आत्मविश्वासाने आणि आक्रमकपणाने आपण काँग्रेसला लोळवू शकतो, असा त्याचा अविर्भाव आहे. पण केवळ डरकाळय़ा फोडून चालत नाहीत. वास्तवाचे भान ठेवावे लागते, अशी समज त्यांना देण्याकरता दस्तुरखुद्द त्याचे काका आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार पुढे आले. काँग्रेस हा आपला मोठा भाऊ आहे, असे अजितदादांच्या मनावर रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण शरद पवारांवर तरी विश्वास ठेवणार कसा. उक्तीप्रमाणे कृती करतील तर त्यांना शरद पवार कसे म्हणायचे. त्यामुळे आपण मोठा भाऊ आहोत, हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसने संपूर्ण दारूगोळय़ासहित लढाईच्या साधनांची तयारी करून ठेवली आहे.
निवडणुकांत एकमेकांना आव्हान देऊन विजय मिळवणे तेवढे सोपे राहिलेले नाही. त्यासाठी आघाडीच मजबूत ठेवावी लागेल. खरेतर राज्यातील विरोधी पक्ष निष्प्रभ झालेले असताना आणि विरोधकांचा कसलाही झंझावात येण्याची शक्यता नसताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक राजकीय प्रगल्भता दाखवणे आवश्यक आहे. पण आघाडीमध्ये असलेल्या आक्रमक घटकांनी, आघाडी तुटेल कशी, यावर लक्ष ठेवून काँग्रेसबरोबर कुस्तीच्या डरकाळय़ा सुरू केल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीमध्ये मतभेद वाढू लागले आहेत. शिवसेनेच्या मतांवर डल्ला मारण्यासाठी मनसे टपून बसली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या तंबूत जाऊन शिवसेनेला वाकुल्या दाखवल्या असल्याने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा तीळपापड झाला. त्यांच्यातील डब्ल्यू डब्ल्यू एफचा प्रयोग नुकताच पार पडला. त्याचबरोबर काँग्रेसने दलित मागासवर्गीयांसाठी राबवलेल्या कार्यक्रमामुळे काँग्रेसची व्होटबँक कायम राहण्याची शक्यता असल्याने रामदास आठवल्यांचे काय करायचे आणि शिवशक्ती-भीमशक्तीचे काय होणार?या विवंचनेने या नव्या मित्रांमध्ये देखील डब्ल्यू डब्ल्यू एफचा सामना रंगण्याची शक्यता आहे. या नामी संधीचा उपयोग करण्याऐवजी काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीने जणू काही डब्ल्यू डब्ल्यू एफचा आखाडा तयार करून महाराष्ट्रातील तमाम जनतेला तिकडेच आकर्षित करून घेतले आहे.
अजितदादांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवील, असे जाहीर करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण मुंबई, ठाणे महानगरपालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेस या महापालिका क्षेत्रात स्वत:ची ताकद कितपत दाखवू शकेल, याबाबत स्वत: पक्षाध्यक्ष पवार साशंक आहेत. त्यामुळेच या दोन महानगरपालिकांमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या ठाणे शहरात काँग्रेससोबत आघाडी केल्यास आघाडीची सत्ता येऊ शकेल, याचा पुरेपूर अंदाज त्यांना आला आहे. गेल्या सप्ताहात ठाणे महापालिकेचा आढावा घेऊन तसेच कार्यकत्यार्ंशी चर्चा करून आघाडीची भूमिका त्यांनी घेतली. ठाण्यातील काँग्रेसच्या नेत्यांशीही त्यांनी चर्चा केली असून, आघाडी करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास पुढाकार घेतला आहे. काकांच्या या भूमिकेने पुतण्याचे अवसान गळून गेले असले तरी जेथे राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. तेथेच आघाडी करावी याला अजितदादांनी दुजोरा दिला आहे. अजितदादा हे परखड स्वभावाचे असल्याने तसेच कावेबाजपणा त्यांच्या स्वभावात नसल्याने काकांच्या सर्वच निर्णयांशी ते सहमत होतील, असे नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने तेथे स्वबळावर लढायचे आणि मुंबई-ठाणे महापालिकेत काँग्रेसच्या कुबडय़ा घेऊन लढायचे हे अजितदादांना मान्य दिसत नाही. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली असून, उपमुख्यमंत्रीपद तसेच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती आल्यानंतर पक्ष अधिक बलवान झाला असल्याचा भास त्यांना होऊ लागला आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसला आरपार करून टाकण्याचे मनसुबे त्यांनी रचले आहेत. पण काका हे पुतण्याच्या मागे फरफटत कसे जातील? आजवर काँग्रेसबरोबर हवी तेथे आघाडी करून हवे ते पदरात पाडून घेण्याची धूर्त खेळी त्यांनी खेळली. आघाडी करण्यासाठी काँग्रेसनेही अनुकूल वातावरण तयार करून दिले. टू-जी स्पेक्ट्रम घोटाळय़ासंदर्भात नेमलेल्या उच्चाधिकार समितीमध्ये पवारांचा समावेश केला असून, पवारांनीही या प्रकरणात तथ्य नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळेच अजितदादांनी स्वबळाची भाषा केल्याबरोबर शरद पवार मुंबई-ठाण्यात येऊन धडकले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काका-पुतण्यांची चाल ओळखून राज्यात काँग्रेसने आपली ताकद दाखवण्याची तयारी केली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केवळ मुंबई-ठाण्यापुरता नव्हे तर महाराष्ट्राचा विचार करून आघाडीसंबंधी निर्णय घेतला जाईल, अशी ठाम भूमिका घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर फरफटत जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दुर्बल असेल तिथे काँग्रेसला मोठा भाऊ म्हणायचे आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व जिथे असेल तिथे मोठय़ा भावाला बाजूला सारून डरकाळय़ा फोडायच्या हा दुटप्पीपणा चालवून घेणार नाही, असा इशारा माणिकरावांनी दिला आहे.
0 comments:
Post a Comment