राजकारणात विरोध असावा, वैर नसावे
आजकाल विरोध हा वैराच्या पातळीवर पोहोचल्याचे दुर्दैवाने पाहायला मिळते. यशवंतराव चव्हाण व बाळासाहेब देसाई, शंकरराव चव्हाण-शिवाजीराव निलंगेकर पाटील, वसंतदादा पाटील- शरद पवार यांचे राजकीय वाद चांगलेच गाजले. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर पराकोटीचा हल्ला चढविला. पण मुंडेंनी सहकारी साखर कारखाने काढले आणि विधायक कामासाठी पवार, मुंडे अनेकदा एकत्र बसले. नारायण राणे हे विरोधी पक्षनेते असताना विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदी होते. राणेंनी देशमुख सरकारला सळो की पळो करून सोडले होते. परंतु मुख्यमंत्री असूनही विलासराव हे राणेंच्या विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात जेवायला जात आणि विलासरावांच्या खास आवडीचे माशांचे मालवणी पदार्थ राणे त्यांना खाऊ घालत.? एवढी परिपक्वता महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये निश्चितच आहे.
राजकारणात वावरत असताना एका पक्षाचे दुस-या पक्षाशी वैचारिक मतभेद असतात. कार्यकर्ते एकमेकांवर टीकास्र् सोडत असतात. आजकाल लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी उदासीन असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यातून विरोधकांमध्ये आक्रमकता वाढत चालली आहे. ज्या शरद पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा आहे त्यांच्या बालेकिल्ल्यात बारामतीमध्ये ऊस कामगारांचे प्रश्न घेऊन स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी सरळ घुसतात आणि आंदोलन, उपोषण सुरू करतात हा खरे तर सत्ताधा-यांसाठी मोठा इशारा आहे. राजू शेट्टींनी सत्ताधा-यांच्या तोंडाला फेस आणला. अशा पद्धतीने राजकारणात आक्रमकता वाढत चालली असताना सत्ताधा-यांनी अधिक जबाबदारीने वागून वैचारिक भूमिकेवरच विरोध करण्याचे धोरण ठेवले पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. काँग्रेस,राष्ट्रवादी आघाडीतील नेत्यांचे एकमेकांवर जाहीर आरोप-प्रत्यारोप होत असल्याने आघाडीची लोकप्रियता ओसरू लागली असल्याचे चित्र आहे. विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळे सत्ताधा-यांचे फावले असले तरी ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. पूर्वी विरोध केवळ वैचारिक पातळीवर असायचा. सभागृहात एकमेकांच्या विरोधात बाह्या सरसावून बोलणारे,एकमेकांचे वाभाडे काढणारे दोन नेते सभागृहाबाहेर पडत तेव्हा एकमेकांच्या हातात हात घालून कँटीनमध्ये चहा घेण्यासाठी एकत्र जात.
वेगवेगळय़ा पक्षात काम करीत असताना मतभिन्नता असणे स्वाभाविक असते. मात्र त्याचा परिणाम वैयक्तिक संबंधांवर होणार नाही याची काळजी घेतली जायची. आजकाल घडत असलेल्या राजकीय घटना पाहिल्या की, विरोध हा वैराच्या पातळीवर पोहोचल्याचे दुर्दैवाने पाहायला मिळते. यशवंतराव चव्हाण व बाळासाहेब देसाई, शंकरराव चव्हाण-शिवाजीराव निलंगेकर पाटील, वसंतदादा पाटील- शरद पवार यांचे राजकीय वाद चांगलेच गाजले. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर पराकोटीचा हल्ला चढविला. पण मुंडेंनी सहकारी साखर कारखाने काढले आणि विधायक कामासाठी पवार,मुंडे अनेकदा एकत्र बसले. नारायण राणे हे विरोधी पक्षनेते असताना विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदी होते. राणेंनी देशमुख सरकारला सळो की पळो करून सोडले होते. परंतु मुख्यमंत्री असूनही विलासराव हे राणेंच्या विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात जेवायला जात आणि विलासरावांच्या खास आवडीचे माशांचे मालवणी पदार्थ राणे त्यांना खाऊ घालीत.? एवढी परिपक्वता महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये निश्चितच आहे.
राजकारणातील ही निखळ मैत्री आता हळूहळू लोप पावू लागली आहे की काय, अशी शंका येते. विरोधाचे रूपांतर अनेकदा वैरात झाल्याचे पाहायला मिळते. सत्ताधारी पक्षात नेतृत्वबदलाची चर्चा सुरू होताच एकमेकांचे प्रतिस्पर्धी सक्रिय होतात आणि एकमेकांवर उघड टीका होऊ लागते. नारायण राणे यांच्या नावाची राज्याची नेतृत्वाबाबत चर्चा होऊ लागली की, पक्षांतर्गत विरोधक सक्रिय होऊ लागतात, याचा अनेकदा प्रत्यय आला आहे. अलिकडे सिंधुदुर्गात विजय सावंत आणि पुष्पसेन सावंत या काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी राणेंबाबत उघड उघड मतभेद दाखविले. तेव्हा त्यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याची चर्चा काँग्रेस पक्षात रंगली. त्यामुळे त्या दोघांना कोणी गांभीर्याने घेतले नाही. ज्या नेत्याने या दोघांना फितवले त्याची दखल मात्र पक्षश्रेष्ठांनी घेतली असल्याची माहिती मिळते.
विरोध आणि वैराच्या घटना विरोधी पक्षातच घडत नाहीत, तर त्या आता आघाडीत असलेल्या मित्रपक्षांत घडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. उद्योगमंत्री नारायण राणे आणि नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यात अलिकडेच घडलेल्या चकमकींची सध्या जोरदार चर्चा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि तेथील पालकमंत्री भास्कर जाधव यांच्याकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल नारायण राणे यांनी टीका केली होती. राणे यांनी केलेली टीका वैयक्तिक स्वरूपाची नव्हती तर जाधव यांच्या वागण्याविषयी होती. अधिकार नसताना जाधव करीत असलेल्या विधानांविषयी होती. राणे यांनी अचूक मर्मावर बोट ठेवल्याने जाधव यांचा संयम सुटला आणि ते थेट वैयक्तिक पातळीवर घसरले. खरे तर जाधव आणि राणे यांच्यात अत्यंत चांगले संबंध होते. दोघांनीही शिवसेनेत एकत्र काम केले आहे. त्यावेळी राणे हे जाधवांचे नेते होते. पुढे जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर राणे काँग्रेसमध्ये गेले तरी त्यांच्या संबंधांना बाधा आली नव्हती. गेल्या निवडणुकीत जाधव यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली तेव्हा आघाडीचा धर्म आणि जुने स्नेहसंबंध लक्षात घेऊन राणे यांनी जाधव यांना निवडून आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्नही केले. पुढे जाधव राज्यमंत्री झाले. त्यानंतरही त्यांचे संबंध चांगले होते. मात्र रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून जाधव यांच्या डोक्यात मंत्री पदाची हवा गेली आणि त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सापत्नभावाची वागणूक द्यायला सुरुवात केली.
जिल्हा नियोजन मंडळाचे पालकमंत्री म्हणून अध्यक्षपद भूषविताना काँग्रेसच्या विभागांना कमी निधी दिला जाऊ लागला. त्यातून खासदार डॉ. निलेश राणे आणि जाधव यांच्यात वैचारिक चकमकी घडल्या. काँग्रेस पदाधिका-यांबरोबरच जाधव त्यांच्याच पक्षातील जुन्या लोकांनाही दुखवू लागले. अलिकडेच उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. या दौ-यादरम्यान राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आले. त्यावेळी जाधव यांच्या कार्यपद्धतीवर राणे यांनी टीका केली. जाधव यांनी आपल्या अधिकाराचा अतिरेकी वापर सुरू केला. त्यांना आपल्याला किती अधिकार आहेत आणि ते कसे वापरावेत, याचे अनेकदा भान राहत नाही. राज्यमंत्र्याला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना त्यांनी विधानसभेत गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याची घोषणा करून आणि मुंबई महानगरपालिकेची सीआयडी चौकशीची घोषणा करून सरकारला अडचणीत आणले होते. राणे यांनी जाधव यांना अधिकार नसताना ते कसे वागतात हे आपल्या सभांमधून मांडले. मात्र जाधव यांच्या ते जिव्हारी लागले. राणे हे वैचारिक टीका करीत असताना तोल सुटलेले जाधव मात्र वैयक्तिक टीकेवर उतरले. विक्षिप्त हावभाव करीत त्यांनी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन शब्दप्रयोग केले. त्यांचा विरोध हा वैराच्या दिशेने जाताना दिसला. जाधव यांचे बोलणे त्यांच्याच पक्षातील वरिष्ठांना रुचले नाही. त्यांनी जाधव यांची कानउघाडणी केल्याचे कळते. त्यानंतर जाधव यांना आपल्या चुकीची जाणीव झाली असावी. त्यातून त्यांनी मग मंत्रालयातील प्रेसरूममध्ये येऊन झालेला प्रकार कथन केला. राणे यांना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता. आपली चूक झाली, असा कबुलीजबाब देत असतानाच त्यांनी राणे यांना आपण आजही दादा म्हणतो आणि त्यांची मुले आपल्याला काका म्हणतात, असा खुलासा केला. जाधव यांना झालेली ही उपरती कायम राहावी. शब्दाने शब्द वाढतो, वैराने वैर वाढते. राणे हे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले ज्येष्ठ नेते आहेत, याचे भान ठेवण्याची परिपक्वता भास्कररावांनी दाखविली नाही. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. त्यासाठी व्यक्तिगत मैत्रीचे नाते कायम राहिले पाहिजे. ते ठेवण्यासाठी जाधव यांनी कोकणच्या मातीचा गोडवा आत्मसात करायला हवा. त्यांचा वैराकडे जाणारा प्रवास थांबून तो विरोधांपर्यंतच राहावा.
0 comments:
Post a Comment