Monday, November 7, 2011

अडवाणी म्हणतात, प्रधानमंत्री व्हायचंय मला..


जनचेतना यात्रेच्या निमित्ताने भाजपमधील भ्रष्टाचार, काळा पैसा, त्यांच्या सत्ता काळात वाढलेली महागाई, संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला याचीच एवढी चर्चा झाली की जनचेतना यात्रा आपोआपच चैतन्यहीन बनली. अडवाणींना स्वत:लाच पंतप्रधान व्हायचंय. संघाने गडकरींना करायचे ठरविल्याची चर्चा सुरू होताच सुषमाजी बाशिंग बांधून बसल्यात आणि नरेंद्र मोदींना उभे करताच अरुण जेटली पुढे सरसावले. तिकडे येडियुरप्पांच्या तुरुंगवासाच्या अपशकुनामुळे सगळे अस्वस्थ झाले असून अडवाणींना बंगळुरात जनचेतना यात्रा घेऊन जाणे अवघड झाले. अडवाणींच्या सगळय़ा यात्रा फेल झाल्या असून भ्रष्टाचार आणि गटबाजीने पोखरलेल्या भाजपचे पंतप्रधानपद हे दिवास्वप्न ठरले आहे. ‘बाजारात तुरी आणि सगळेच करताहेत पंतप्रधानपदाची तयारी’ असा विनोदी प्रकार या पक्षात पाहावयास मिळतो आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भ्रष्टाचार, स्विस बँकेतील काळा पैसा आणि महागाई या विरोधात सुरू केलेली जनचेतना यात्रा मुंबई महाराष्ट्रात येऊन थडकली खरी, पण त्या थडकेमध्ये जान नसल्याने आवाज उठलाच नाही. जनचेतना यात्रेच्या स्वागताला गेलेल्या शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी उथळ आणि भडक विधाने करून आवाज उठविण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे बॉम्बही फुसकेच निघाले. महाराष्ट्रातील जनतेमध्ये चेतना निर्माण करण्याऐवजी यात्रा चैतन्यहीन ठरली. बिच्चारे अडवाणी, त्यांना एक दिवस तरी या देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे, त्यामुळे त्यांचा आटापिटा सुरू आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी रथयात्रा काढल्यानंतर काही काळ सत्ता मिळावी, यात्रेत मिळालेले सत्तेचे गाजर अजूनही समोर असल्याने एक दिवस तरी पुन्हा सत्ता मिळेलच, अशी दिवास्वप्ने त्यांना पडत आहेत. त्यामुळेच यात्रा काढण्यावर त्यांनी भर दिला आहे. धर्मभोळय़ा हिंदू मानसिकतेने राममंदिरासाठी अडवाणींना पाठिंबा दिला, तसा पाठिंबा नंतरच्या 7-8 यात्रांना मिळू शकला नाही. उलट यात्रांचा विपरित परिणाम आला, भाजपची सदस्यसंख्या निवडणुकीनंतर कमी होत गेली, असे का घडले? त्यांच्या यात्रांबाबत जनमानस काय आहे हे जाणून घेऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज अडवाणींना भासत नाही, कारण‘पंतप्रधान व्हायचंय मला’ हेच  गाणं त्यांच्या मनात रुंजी घालत असावं, पण अडवाणी पंतप्रधान होणार कसे? त्यांना कितीही वाटत असले तरी त्यांच्या पक्षाला आणि त्यांच्या पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तसे वाटले पाहिजे. तशी परिस्थिती मात्र दिसत नाही. रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपच्या पक्षाध्यक्षपदी नागपूरच्या नितीन गडकरी यांची नेमणूक केली, दुसरीकडे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बळ दिले,जगात त्यांच्यासारखा उत्तम प्रशासक दुसरा कोणी नाही अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्यात आली. त्यामुळे अडवाणी यांच्या स्पर्धेत दोन उमेदवार अलगद उभे करण्यात आले आहेत. अडवाणींच्या पंतप्रधानपदासाठी जनजागृती आणि जनचेतना निर्माण होण्याची शक्यता धूसर झाली असताना गडकरी-मोदींमध्ये मात्र पंतप्रधानपदाचे स्फुल्लिंग चेतविण्यात आले आहे. तेव्हा जनचेतना यात्रेचा अडवाणींना राजकीय लाभ होण्याची सूतराम शक्यता दिसत नाही.
 
मुळात अडवाणींनी भ्रष्टाचार आणि काळा पैसा या विरोधात यात्रा काढणेच हास्यापद आहे. त्याहून जास्त हास्यास्पद काँग्रेसवर केली जाणारी टीका आहे. अडवाणी स्वत:च म्हणत आहेत की, काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून मंत्र्यांना तुरुंगात टाकले. वास्तविक पाहता आपल्याच मंत्र्यांना काँग्रेसने तुरुंगात टाकले. याचा देशभर चांगला संदेश गेला आहे. उलट कर्नाटक आणि उत्तराखंडच्या भाजप मुख्यमंत्र्यांवर योग्य कारवाई वेळीच केली नाही म्हणून भाजप भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालत असल्याचा संदेश गेला आहे. त्यामुळे भ्रष्टाचारविरोधात जनचेतना निर्माण करण्यात अडवाणी यशस्वी होऊ शकत नाही. त्याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांच्यासह अनेकांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले असल्याचे देशाने यापूर्वीही अनेकदा पाहिले आहे. खरे तर भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ांवरून राजकारण्यांनी नाकाने कांदे सोलू नयेत असा सार्वत्रिक समज आहे. आजची निवडणूकच इतकी महाग झाली आहे की, या  निवडणुकीत एका उमेदवाराला करोडो रुपये खर्च करावे लागतात. निवडणूक जिल्हा परिषदेची, महानगरपालिकांची असो अथवा विधानसभा, लोकसभेची, करोडो रुपयांचा चुराडा  केल्याशिवाय ती जिंकता येत नाही. त्यामुळे  संसदीय राजकारणाचा श्रीगणेशाच भ्रष्टाचाराने होत असल्याने त्याविरोधात  बोलण्याची नैतिकता राजकारण्यांनी गमावली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राजकारणी नसल्याने त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला. त्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अण्णांना यात्रा काढून लोकांकडे जाण्याची गरज पडली नाही. त्यांनी हाक दिली  आणि जनचेतना निर्माण होऊन  जनता त्यांच्याकडे आली. अर्थात, अण्णांच्या संस्था आणि अरविंद केजरीवाल, किरण बेदी  यांच्यासारख्या टीम अण्णातील  सदस्यांचे गैरव्यवहार  उघड झाल्याने  अण्णा एकदम मौनात गेले ती गोष्ट निराळी. पण सगळेच आजकाल भ्रष्टाचाराविरोधात बोलत असल्याने हे सगळे शिष्टाचारी आणि आमजनता भ्रष्टाचारी आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. भ्रष्टाचाऱ्यांनीच वरच्या आवाजात भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे  स्विस बँकेतला काळा पैसा परत येणार कसा आणि पैशावर नियंत्रण कोण कसे ठेवणार, हा प्रश्नच आहे. त्यामुळेच कान्समधील जी-20 परिषदेत काळय़ा पैशाविरोधात सर्वानी  एकत्र आले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग  यांनी केले आहे. एक मात्र खरे की, परदेशात सुरक्षितपणे ठेवल्या जाणा-या काळ्या पैशाची सर्वानाच उत्सुकता आहे. केंद्र  सरकारकडे  देशातील  राजकारणी आणि उद्योगपतींची यादीसुद्धा आहे. मग कारवाई का केली जात नाही, याविषयी  लोकांच्या मनात अनेक शंका-कुशंका आहेत. एकीकडे  सामान्य जनतेवर करांचा बोजा वाढत आहे. त्याचबरोबर महागाईचा भस्मासूर  जगणे असह्य  करीत आहे. अशा वेळी अब्जावधी  रुपये परदेशी  बँकांत  ठेवले जात असतील तर त्याविषयी  लोकांमध्ये संताप निर्माण होणारच. 
 
अडवाणींची जनचेतना यात्रा ही केवळ त्यांची अस्तित्वाची लढाई असल्याचे दिसते. भाजपही भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे,भाजपवाल्यांचाही काळा पैसा परदेशी बँकांमध्ये आहे. कदाचित संघाचा काळा पैसा नसावा. कारण काळय़ा  पैशाच्या खाणी असलेल्या गुजराती, मारवाडी,  उद्योगपतींकडून त्यांना हवा तेवढा पैसा मिळू शकतो. आता तर अडवाणींना आव्हान  म्हणून  गडकरी लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. क्रमांक एकचे पद भाजपकडे जाण्याची शक्यता नसली  तरी लॉटरी लागली तर.. असा अंदाज बांधून  स्पध्रेत उतरण्यासाठी गडकरींना संघाने आशीर्वाद दिला आहे. पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत  उतरण्याची तयारी करणाऱ्यांना आपले घर आधी  मजबूत असले पाहिजे याची जाणीव नाही. या पदासाठी ते अजून लहान आहेत. घरातल्या  भांडणात अडकले आहेत.

या पदासाठी आवश्यक ती प्रगल्भता असती तर  पुण्यात अडवाणींचे स्वागत करताना मुंडे - गडकरींनी गटबाजीचे प्रदर्शन घडविले नसते. जनचेतना यात्रेच्या निमित्ताने भाजपमधील  भ्रष्टाचार, काळा पैसा, त्यांच्या सत्ता काळात वाढलेली  महागाई, संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला याचीच एवढी चर्चा झाली की जनचेतना यात्रा आपोआपच चैतन्यहीन बनली. अडवाणींना स्वत:लाच  पंतप्रधान व्हायचंय. संघाने गडकरींना  पंतप्रधान करायचे ठरविल्याची चर्चा सुरू होताच सुषमाजी बाशिंग बांधून बसल्यात आणि नरेंद्र मोदींना उभे करताच अरुण जेटली पुढे सरसावले. तिकडे येडियुरप्पांच्या अटकेच्या अपशकुनामुळे  सगळे अस्वस्थ झाले. अडवाणींना बंगळुरात जनचेतना यात्रा घेऊन जाणे अवघड झाले. अडवाणींच्या सगळय़ा यात्रा फेल झाल्या असून भ्रष्टाचार आणि गटबाजीने पोखरलेल्या भाजपचे पंतप्रधानपद हे दिवास्वप्न ठरले आहे.   ‘बाजारात तुरी आणि सगळेच करताहेत पंतप्रधानपदाची तयारी’ असा विनोदी प्रकार पाहावयास मिळत आहे. मात्र अडवाणींची इच्छाशक्ती एवढी जबरदस्त आहे की, उघड बोलत नसले तरी त्यांची पंतप्रधानपदाची इच्छा लपून राहिलेली नाही.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP