ठाकरेंनी केली आठवलेंची गोची
शिवशक्ती भिमशक्तीचे हाकारे देणाऱ्या बाळासाहेबांनी रामदास आठवलेंना खडय़ासारखे उचलून बाजूला ठेवले. त्यांना मेळाव्याला बोलावले तर नाहीच पण इंदू मिलची जमीन व दादर स्थानकाचे नामांतर याबाबत भडक विधाने करून आठवलेंची गोची केली. आठवलेंना जवळ घेऊन शिवशक्ती भीमशक्ती या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी शक्ती उभी राहील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. पण हे सगळेच बोगस काम असून यात कसलाही गंभीर विचार झालेला दिसत नाही अशी शंका शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्याने खरी ठरली आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा हा महाराष्ट्रातील जनतेचा औत्सुक्याचा विषय असायचा, बाळासाहेबांचे भाषण नेहमी प्रमाणेच शिवराळ आणि उथळ असले तरी लोकांना त्याची मजा वाटायची पण आता तेच तेच भाषण ऐकून आणि तेच तेच घाणेरडे विनोद ऐकून लोक कंटाळले आहेत.?त्यामुळेच मेळाव्याची उपस्थिती रोडावली आहे. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या भाषणात कशाचा कशाशी संबंध नव्हता, सगळेच विस्कळीत मुद्दे होते. प्रत्येक वेळी निवडणुक जवळ आली की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही, अशी राणाभीमदेवी घोषणा करण्याची बाळासाहेबांची सवय जुनी आहे. यावेळी पुन्हा तिच घोषणा करताना हातात पिस्तुल घेण्याची तयारी त्यांनी दाखवली. तेव्हा लोकांना हसू आवरले नाही. मुंबई वेगळी करायला कोण निघाले आहे हे त्यांनाच माहित. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची प्रतिक्रिया गंमतीदार होती, त्यांनी मेळाव्यातील भाषणाचा समाचार घेताना या वयात साहेबांना पिस्तुल उचलण्याचे कष्ट देऊ इच्छीत नाही. मुंबई कधीही महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही. अशा शब्दात एकीकडे त्यांची खिल्ली उडवत दुसरीकडे त्यांना आश्वस्त केले आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची पुडी त्यावेळचे काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सोडली त्यामुळे मराठी माणसांच्या मतांचे लांगुलचालन करणाऱ्या शिवसेनेला ताकद मिळाली. हे सर्वश्रृत आहे.?या ताकदीच्या जोरावर शिवसेनेने महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते. पण वसंतदादांची ही पुडी कायम उपयोगात येईल या भ्रमात राहण्याचे त्यांचे दिवस संपले आहेत. शिवसेनेने महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचा अड्डा बनविला असल्याने मुंबई उच्च न्यायालयानेही शिवसेनेला फटकारले आहे. तरी देखील ‘खोटे बोल पण रेटून बोल’ या उक्ती प्रमाणे ठाकरेंनी दसरा मेळाव्यात मुक्ताफळे उधळली. मुंबईतील खड्डय़ांविरोधात असलेल्या लोकभावनेला बाजूला सारून खड्डे विरोधी भूमिका घेणा-यांवरच ठाकरे घसरले. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी खड्डय़ांचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा अशी मागणी मंत्री असतानाही धाडसाने केली होती. पण ठाकरेंनी त्याकडे दुर्लक्ष करीत पालिकेच्या भ्रष्ट कारभारावर पांघरून घालण्याचा दुबळा प्रयत्न करून सिंधुदुर्गात खड्डे नाहीत का असा विसंगत प्रश्न केला. हे हास्यास्पद होते.
शिवशक्ती भिमशक्तीचे हाकारे देणा-या बाळासाहेबांनी रामदास आठवलेंना खडय़ासारखे उचलून बाजूला ठेवले. त्यांना मेळाव्याला बोलावले तर नाहीच पण इंदू मिलची जमीन व दादर स्थानकाचे नामांतर याबाबत भडक विधाने करून आठवलेंची गोची केली. आठवलेंना जवळ घेऊन शिवशक्ती भीमशक्ती या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी शक्ती उभी राहिल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. पण हे सगळेच बोगस काम असून यात कसलाही गंभीर विचार झालेला दिसत नाही अशी शंका शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्याने खरी ठरली आहे. रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांना बाळासाहेबांनी ‘मामा’ बनवले आहे. या ‘मामू’ला अपेक्षीत असलेले खासदारपद मिळण्याची शक्यता दिसत नाही, अशी चर्चा आठवलेंचे भिमसैनिक करु लागले आहेत. शिवशक्ती भिमशक्ती एकत्र येणार आणि आपण एकटे का होईना पण सत्तेत सहभागी होणार या कल्पनेने आठवलेंनाही आपल्या अंगात महाभारतातल्या भीमाचे बळ संचारल्या सारखे वाटत होते. ते अवसान बाळासाहेबांच्या वक्तव्याने गळून पडले असावे. असे जहरी वक्तव्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतिर्थावर केले. दादरचे चैत्यभूमी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर होऊ देणार नाही आणि इंदू मिलची संपूर्ण जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या राष्ट्रीय स्मारकाला मिळू देणार नाही. अशी वल्गना करून ठाकरेंनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामांतर करण्यास ठाकरेंनी विरोध केला, शरद पवारांनी नामांतराचे भरपुर राजकारण केले. आणि दलितांच्या अस्मितेचा विषय असलेला नामांतराचा हा प्रश्न 14 वर्षे लोंबकळत ठेवला. त्या लढय़ात अनेकांचे बळी गेले. जाळपोळीत दलितांचे अनेक संसार होरपळून निघाले. शिवसेना-भाजप वगळता आठवले तसेच काँग्रेस राष्ट्रवादीसह सर्वांनी इंदू मिलची जमीन बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी मिळावी तसेच दादर स्थानकाला बाबासाहेबांचे नाव द्यावे अशी मागणी लावून धरली असताना ठाकरेंनी या विरोधात भूमिका घेऊन या सर्वांच्या तसेच दलितांच्या भावना दुखविण्याचे काम केले आहे. त्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
शरद पवारांवर निष्ठा ठेवून आपला रिपब्लिकन गट आमदारकी खासदारकीसाठी त्याच्या दावणीला बांधणा-या रामदास आठवलेंना मागील निवडणुकीत पवारांनी ‘मामा’ बनवले. शिर्डीची हरणारी जागा काँग्रेसच्या कोटय़ात देवून त्यांचा पराभव घडवून आणला. काँग्रेसने पाडले अशी उलटी बोंब राष्ट्रवादीने ठोकली. आणि बलाढय़ांच्या राजकारणात घाबरलेल्या या पिल्लाला चुचकारून शिवसेनेच्या तथाकथीत वाघाच्या तोंडी दिले. शिवसेनेबरोबर गेलेल्या रामदासांनी दलित बौद्ध समाजाची सहानुभूती गमावली. बाबासाहेबांचे गोडवे गात शिवशक्ती भिमशक्तीचा आव आणणा-यांचे प्रेम पुतना मावशीचे आहे हे त्यांनी दाखवून दिले. सापाचे पिल्लू सापच असते हे कायम दुस-यांच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या रामदास आठवलेंना कोण समजून सांगणार. ‘शिवसेनेत लोकशाही नाही ठोकशाहीच आहे’ असे दसरा मेळाव्यात ठासून सांगणा-या ठाकरेंना जाब विचारण्याची हिम्मत आठवलेंमध्ये नाही. ज्या बाबासाहेबांचे नाव घेऊन रिपब्लिकन पक्षाचे गट-तट आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. त्या बाबासाहेबांनी या देशाला जगातील सर्वांत मोठी लोकशाही राज्यव्यवस्था दिली. त्या लोकशाहीलाच सुरुंग लावण्याची भाषा ठाकरेंसारख्या प्रवृत्ती करत आहेत. त्याचा निषेध करण्याची हिम्मत या लाचारांमध्ये नाही. युतीचे सरकार असताना इंदू मिलची जागा घेवून नाना शंकर शेठ यांचे स्मारक का केले नाही. त्यावेळी नानांच्या स्मारकाची आस्था तुम्हाला नव्हती का, असे आठवले विचारु शकत नाहीत. नामांतरावरून वातावरण बिघडविण्याऐवजी तसेच सत्तेच्या वाटाघाटी करून आठवलेंना काय देणार हे जाहीरपणे सांगण्याऐवजी भावना भडकावण्याचे काम ठाकरेंनी केले आहे. त्यामुळे खऱ्या भिमसैनिकांचा भ्रमनिरास झाला आहे.
लालबाग माहिम पट्टय़ातील गिरणी कामगारांना चुचकारण्याचा प्रयत्नही ठाकरेंनी केला आहे. ज्यांच्या मतावर मुंबई महानगर पालिका जिंकली त्या गिरणी कामगारांसाठी ठाकरेंनी चाळीस वर्षात काय केले. याचा जाब गिरणी कामगारांच्या संघटनांनी विचारला पाहिजे. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि त्यावेळी शिवसेनेत असलेले राज ठाकरे यांनी कोहिनुर मिल विकत घेतली. आणि कामगारांना वाऱ्यावर सोडले आणि कामगारांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. आता कामगारांचा प्रश्न सुटतो आहे हे लक्षात आल्याने आणि महापालिका निवडणुका तोंडावर आला असल्याने त्यांना गिरणी कामगारांचा पुळका आला आहे. आजवर गिरणी कामगारांनी स्वबळावर लढा दिला त्यांना राजकीय नेते नकोच होते पण प्रश्न सुटणार आहे म्हणून श्रेय घेण्यासाठी कामगारांच्या पुढे लोटांगण घालू लागले आहेत.
0 comments:
Post a Comment