Monday, May 18, 2009

शिवसेनेच्या गडाला सुरुंग



17 May, 2009 10


ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी विजय मिळवून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला.


ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी विजय मिळवून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. कल्याणमध्ये मात्र युतीचे आनंद परांजपे यांनी यश मिळवून युतीची लाज राखली. पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी अनपेक्षित विजय मिळवला. तर रायगड मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार बॅ. ए. आर. अंतुले यांना पराभवाचा हादरा बसला. या ठिकाणी शिवसेनेच्या अनंत गिते यांनी विजय मिळवला. शिवसेनेला भोवला फाजील आत्मविश्वासअनेक वर्षे ठाणे लोकसभा मतदारसंघावर अधिराज्य गाजवत पारंपरिक मतदारांना गृहीत धरणा-या शिवसेनेला यंदा प्रथमच हक्काच्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले. आपलाच मतदारसंघ असल्याच्या आविर्भावात गाफील राहण्याचा फाजील आत्मविश्वास शिवसेनेला या निवडणुकीत चांगलाच नडला. येथील मतदारांनी संजीव नाईक यांना विजयी करताना मनसेच्या पारड्यातही भरभरून मते टाकली. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आले.


यातच ‘कॉस्मोपॉलिटीन’ झालेल्या मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वडापाव चारून मराठी बाण्याचा हाकारा द्यायला सांगितला. मात्र महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेने डम्पिंग ग्राऊंड, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. याचा परिणाम निवडणुकीत दिसला. याशिवाय युतीच्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमीही मतदारांची नाराजी ओढवून घेण्यास कारणीभूत ठरली. यात भरीस भर टाकत मनसेच्या राजन राजे यांनी मतांचे धुव्रीकरण केल्याने नाईक यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला. ठाणेकर आपल्याच तालावर नाचतात, हा शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा फुटला, हेही या निकालावरून स्पष्ट होते.


राखली युतीची लाज भूकंपाचे हादरे बसावेत आणि उत्तुंग इमारती क्षणार्धात जमीनदोस्त व्हाव्यात अगदी अशीच परिस्थिती युतीची ठाण्यात झाली असताना कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार आनंद परांजपेंनी परांजपे यांनी विजय मिळवून शिवसेना-भाजप युतीची आक्षरश: लाज राखली. खरे तर परांजपे यांचा ठाणे हा मतदारसंघ. तरी पक्षाने त्यांना कल्याण हा नवीन मतदाससंघ दिला. त्यामुळे त्यांनी मिळवलेला हा विजय महत्त्वाचा आहे. काही महिन्यांपासून डावखरे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारात दिग्गज नेत्यांना उतरवून सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती, परंतु या सगळ्या प्रयत्नांनंतरही त्यांना यश आले नाही. युतीच्या बालेकिल्ल्यात मनसे फॅक्टर प्रभावी ठरला.


मनसेच्या वैशाली दरेकर यांना एक लाख मते मिळाल्याने येथील युतीचे मताधिक्य घटले. मनसेमुळे सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मनसेच्या मराठीच्या मुद्दय़ावरील आंदोलनाची ठिणगी कल्याण-डोंबिवलीत चांगलीच धगधगली होती. नंतर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पसरले होते. मनसेने युतीच्या बालेकिल्ल्यात मिळवलेली मते म्हणूनच युतीला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी आहेत.संतोष गायकवाड मुस्लिम फॅक्टरच ठरला निर्णायकनव्याने निर्माण झालेल्या भिवंडी मतदारसंघात मुस्लिम फॅक्टर महत्त्वाचा होता. या ठिकाणी युतीने जगन्नाथ पाटील यांना उमेदवारी देऊन हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. खरे तर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. पण आर. आर. पाटील यांनी बंडखोरी करून सपची उमेदवारी मिळवल्याने मतविभाजन होण्याचे आखाडे काही जणांनी बांधले होते.


परंतु त्यानंतरही येथील मतदारांनी काँग्रेसलाच पसंती दिली. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथेही मनसे फॅक्टरचा फटका युतीच्या उमेदवाराला बसला. १९८४च्या दंगलीनंतर भिवंडी हे शहर संवेदनशील म्हणून देशात ओळखले जाऊ लागले. त्यामुळे मुस्लिमांचे खरे कैवारी आपणच आहोत, असे समजणाऱ्या समाजवादी पक्षाने येथे आपले पाय रोवण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. समाजवादीने अलीकडे कल्याणसिंग यांच्याशी जवळीक साधल्याने येथील मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावला. त्याचे स्पष्ट चित्र या निवडणुकीत दिसले. या साऱ्याचा परिपाक म्हणजे काँग्रेसशिवाय आपणास पर्याय नाही, अशी मतदारांची समजूत झाल्याने त्यांनी काँग्रेसलाच भरभरून मते दिली. त्यामुळे काँग्रेसचा येथील विजय अधिक सुकर झाला. गटातटाच्या राजकारणाचा जाधवांना फायदाबहुजन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार बळीराम जाधव यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातून विजयाची मोहोर उमटवत प्रस्थापितांना पराभूत केले.


काँग्रेसचे माजी खासदार दामू शिंगडा, युतीचे अ‍ॅड. चिंतामण वनगा आणि माकपचे लहानू कोम असे दिग्गज उमेदवार असूनही जाधव विजयी होणे हा आ. हितेंद्र ठाकूर यांचाच करिश्मा म्हणावा लागेल. येथे शिंगडा यांच्याविषयी काँग्रेसमध्ये नाराजी होती. भाजपचे चिंतामण वनगा व माकपच्या लहानू कोम यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध नसला तरी त्यांची ताकद कमी पडली. शिवसेना कार्यकर्त्यांची आ. ठाकूर यांच्याशी जवळीक होती. त्याचा फटका युतीला बसला. माकपच्या कोम यांना जनता दलाचा पाठिंबा होता. पण त्याचा फायदा झाला नाही. आ. ठाकूर यांनी वसई विकास आघाडीची सारी ताकद जाधव यांच्या मागे उभी केली होती. त्यामुळे एका बाजूला ठाकूर आणि दुस-या बाजूला युती, आघाडी आणि माकप असे चित्र होते. त्यात ठाकूर आपला उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी ठरल्याने त्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


पालघर, डहाणू, तलासरी, बोईसर इत्यादी भागांतील नव्याने मतदारसंघात आलेल्यांनाही आकृष्ट करण्यात यश आले. पक्षांतर्गत बंडखोरीचा काँग्रेसला फटकारायगड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. ए. आर. अंतुले यांना प्रवीण ठाकूर व सिद्धार्थ पाटील यांच्या बंडखोरीचा चांगला फटका बसला. याबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाचे एकनाथ पाटील, बहुजन समाज पक्षाचे किरण मोहिते व श्रमिक मुक्ती दलाचे सुनील नाईक या सर्वाच्या उमेदवारीमुळे अंतुले यांना मतविभाजनाचा फटका बसेल, अशी चर्चा होत होती. त्याचा नेमका फायदा गीते यांना झाला. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे व काँग्रेसचे रवींद्र पाटील यांनी अंतुले यांना पाठिंबा दिला असला तरी तरुण वर्गाला अंतुलेंची उमेदवारी मान्य नव्हती. पक्ष शिस्तीचा भंग करून आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र प्रवीण ठाकूर तसेच पेणचे काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार ए. टी. पाटील यांचे पुत्र सिद्धार्थ पाटील यांनीही अंतुले यांना आव्हान दिले होते. त्याचाही येथे परिणाम झाला. शिवसेनेचे अनंत गिते यांना शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला होता. त्याचा चांगलाच फायदा गितेंना झाला. या मतदारसंघात मोठय़ा संख्येने असलेला आगरी व कोळी समाज शेकापबरोबर असून त्यांची एकगठ्ठा मते गिते यांच्या पदारात पडली. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अंतुले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही परिणाम या निवडणुकीत झाला.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP