Friday, May 29, 2009

पश्चिम महाराष्ट्र तुपाशी

28 May, 2009

केंद्रीय मंत्रिमंडळाची बातमी महाराष्ट्रात पोहोचताच पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, तर अन्य विभागांवर मात्र अन्याय , अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बातमी महाराष्ट्रात पोहोचताच पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, तर अन्य विभागांवर मात्र अन्याय,अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.मंत्रिमंडळात महाराष्ट्राला नऊ मंत्रिपदे मिळाली असली तरी पश्चिम महाराष्ट्राच्या पदरात झुकते माप आहे. पश्चिम महाराष्ट्रात १० जागा असताना चार, तर तितक्याच जागा असलेल्या विदर्भाला दोन मंत्रिपदे मिळाली.

मुंबईला दोन मंत्री पण ठाण्याचा एकही नाही, कोकणासह उत्तर महाराष्ट्रात आठ, तसेच मराठवाडय़ातही आठ खासदार असून केवळ मराठवाडय़ालाच मंत्रिपद, याकडे लक्ष वेधले जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील चार जागांपैकी काँग्रेसचे सुरेश टावरे यांनी भिवंडीची जागा जिंकली, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ काँग्रेसचे डॉ. निलेश राणे यांनी जिंकला. तळकोकणात शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढून काँग्रेसला प्रथमच जागा मिळाली असल्याने, कोकणाच्या विकासावर अधिक लक्ष देण्यासाठी कोकणाला प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक होते. विधानसभा निवडणुकांचा विचार केल्यास, कोकण व ठाणे भागात ३९ विधानसभा जागा आणि मुंबईत ३६ जागा असताना मुंबईतील सहा खासदारांपैकी दोघांना मंत्रिपदे मिळाली. मुरली देवरा दुस-यांदा मंत्रिपद देण्यात आले, तर गुरुदास कामत हे पाचव्यांदा खासदार झाले असताना त्यांची बोळवण राज्यमंत्रिपदावर करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन मराठवाडय़ाला महत्त्व तर दिले आहेच, पण माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचा पत्ता कट झाला आहे. देशमुख आणि पाटील या दोघांनाही २६/११च्या पार्श्वभूमीवर आपापल्या पदांचे राजीनामे द्यावे लागले होते. पण विलासरावांनी दिल्लीत जोरदार लॉबिंग करून पाटील यांचा पत्ता कट करण्यात यश मिळवले. मुख्यमंत्रीपद गमावण्याची कारवाई झाली असताना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रधान समितीच्या अहवालात राज्य सरकारला क्लीनचिट मिळाली आणि विलासरावांचा समावेश झाला. मात्र याच कारणावरून पद गमवावे लागलेल्या शिवराज पाटील आणि आर. आर. पाटील यांचा मात्र वनवास कायम राहिल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शरद पवार यांचा काँग्रेसने मान राखला आणि त्यांच्या मागणीनुसार राष्ट्रवादीला तीन मंत्रिपदे देण्यात आली. प्रतीक पाटील हे दुस-यांदा लोकसभेवर गेले आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अजित घोरपडे यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली असूनही ते विजयी झाले, त्याचे हे बक्षीस मानले जाते.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP