दादांची फटकेबाजी
अर्थसंकल्पावर भाषण करताना टीकाटिपण्णी करणा-या विरोधकांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी चोख उत्तर दिले.
अर्थसंकल्पावर भाषण करताना टीकाटिपण्णी करणा-या विरोधकांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी चोख उत्तर दिले. दादा गुरुवारी एकदमच फॉर्मात होते. अर्थसंकल्पावरील चर्चेला दोन्ही सभागृहांत उत्तर देताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.विधानसभेतील उत्तराची सुरुवात करतानाच दादांनी विरोधी पक्षनेते खडसे यांची टोपी उडवली. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते म्हणतात राज्यात चार कोटी ट्रॅक्टर आहेत, असे अर्थसंकल्पात म्हटले आहे.खडसेसाहेब स्वत: नीट वाचत जा. देवेंद्र तुमची फजिती व्हावी म्हणून चुकीचे ब्रिफिंग करतो. ट्रॅक्टरची संख्या चार कोटी नाही, तर चार लाख आहे, असे दादांनी म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
राज्यात वाढलेल्या कर्करोगाचे भयानक स्वरूप लक्षात घेऊन तंबाखूजन्य पदार्थ खाणा-या सदस्यांची त्यांनी चांगलीच फिरकी घेतली.विधान परिषदेत तर त्यांची प्रतिभा फारच फुलली होती. जैतापूर प्रकल्पाला विरोध करणा-या रामदास कदम यांची खिल्ली उडवताना दादा म्हणाले, रामदास कदम हे गॅलरीमध्ये भेटले की म्हणतात, आम्हालाही हा प्रकल्प हवा आहे. त्यावर रामदास कदम अहो, असं मी बोललोच नाही, असा खुलासा करू लागले. त्यावर दादा म्हणाले, मला तुमची अडचण माहिती आहे हो. तुम्ही इथे कबूल केले तर,मातोश्रीवरून फोन येईल, याची मला कल्पना आहे. अर्थ विभागाच्या संकेतस्थळावर अद्याप सुनील तटकरे यांचाच फोटो असल्याचा मुद्दा बुधवारी विनोद तावडे यांनी मांडला होता. त्यावर मिष्किल प्रतिक्रिया व्यक्त करताना दादांनी शेकापचे जयंत पाटील यांची फिरकी घेतली.ते म्हणाले मी माझा फोटो तेथे टाकणार होतो. मात्र जयंत पाटीलच म्हणाले, अजित तू माझं सगळं ऐकतो मग, त्या वेबसाइटवर सुनीलचा फोटो राहू दे. त्यामुळे मीच आमच्या अधिका-यांना सांगितलं की, तटकरे यांचं खातं गेलं आहे, निदान फोटो तरी संकेतस्थळावर राहू द्या. त्याचवेळी समोरच्या बाकांवरून विचारणा झाली की, कोणत्या जयंत पाटलांनी सांगितले. त्यावर अजितदादा म्हणाले, हे आमचे शेकापचे जयंत पाटील. आमच्या जयंत पाटलांचा फोटो आबांना आवडतो. जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील संघर्षाची त्याला पार्श्वभूमी असल्याने सभागृहात पुन्हा हास्यकल्लोळ झाला.
नेहमी थेट बोलणा-या दादांची काव्यप्रतिभाही फुलली होती. त्यांनी सांगितले की विरोधक म्हणतात, सांगा कसं, जगायचं, कण्हत कण्हत जगायचं की गाण गातं जगायचं. मी म्हणतो, ते ज्याचं त्याने ठरवायलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हीच ठरवा, शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं..
दादांच्या या काव्यपंक्तीवर सत्ताधा-यांसह विरोधी बाकांवरील सदस्यांनीही बाके वाजवून प्रतिसाद दिला.
0 comments:
Post a Comment