Tuesday, December 14, 2010

एक बाबा, दोन दादा!

ब-याच दिवसानंतर विधानसभेत चैतन्य असल्याचे सोमवारी जाणावले. जैतापूर प्रकल्पावर विधानसभेत चर्चा रंगली.

ब-याच दिवसानंतर विधानसभेत चैतन्य असल्याचे सोमवारी जाणावले. जैतापूर प्रकल्पावर विधानसभेत चर्चा रंगली. मंत्री असतानाही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कोकणच्या प्रेमापोटी, कोकणचे प्रतिनिधी म्हणून या चर्चेत भाग घेतला. कोकणातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या चर्चेच्या वेळी राणे पूर्ण वेळ सभागृहात बसून होते. या चर्चेमध्ये भाग घेणारा प्रत्येक वक्ता राणे यांच्या उपस्थितीची दखल घेत होता. इतकेच नव्हे तर त्यांचा ‘दादा’ असा आदराने उल्लेख करत होता. कोकणचे प्रतिनिधी नारायणदादा राणे, ऊर्जामंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा यांच्या भोवतीच चर्चा फिरत होती. मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी या तिघांच्या उपस्थितीचा मोठा मार्मिक उल्लेख केला. सभागृहात दोन दादा आणि एक बाबा उपस्थित आहेत. दोन्ही दादांच्या कामाचा आवाका मोठा आहे, हे सभागृहातील सगळेच जाणून आहेत, असे त्यांनी सांगताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले.


विशेष म्हणजे कणकणवली मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे प्रमोद जठार यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच नारायण राणे यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि आमचे सर्वाच्या लाडक्या ‘दादां’वर माझे विशेष प्रेम आहे आणि त्यांचेही माझ्यावर प्रेम आहे, असे सांगत राणे यांचा उल्लेख ‘लाडके, लोकप्रिय, कार्यसम्राट’ असा केला. त्यांनी जैतापूर प्रकल्पाबाबत असलेल्या अनेक तक्रारींचा पाढा वाचला. मनसेचे प्रवीण दरेकर यांनीही दोन दादा आणि एक बाबा यांना एक प्रकारे साकडे घातले.  दोन दादा या प्रकल्पाशी संबंधित असले तरी दादागिरीने प्रकल्प आणला, असे होऊ देऊ नका. लोकांचे म्हणणे समजून घ्या. लोकांचे समाधान करा, तोपर्यंत प्रकल्प उभा करू नका, असे ते म्हणाले.

दरेकरांच्या भाषणानंतर शिवसेनेचे सूर्यकांत दळवी उभे राहिले. त्यांचेही लक्ष नारायण राणे यांच्याकडेच होते. आपण उभे राहाताच दादा हसले आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानात त्यांनी काही तरी सांगितले. पण त्यांनी काय सांगितले ते मला समजले, असे सांगून भाषणाची सुरुवात केली. मात्र भाषणाच्या ओघात आपण काय बोलतोय याचे भान त्यांना राहिले नाही आणि  रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील, हा प्रकल्प सूडबुद्धीने आणणार असाल तर मुंबईसह कोकणचे वेगळे राज्य मागावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. दळवी यांची मागणी शिवसेनेलाही अनाकलनीय अशीच होती. उठताबसता संयुक्त महाराष्ट्राचा उदोउदो करणा-या शिवसेनेच्या आमदारानेच अशी मागणी केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते.

तत्पूर्वी शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांनीही कोकणातील प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप नोंदवून हा प्रकल्पच रद्द करण्याची मागणी केली. त्यांचीही मागणी एवढी फिकी पडली की मनसे, भाजप अथवा शेकाप आदी कोणत्याही पक्षाने त्यांच्या मागणीला समर्थन दिले नाही. त्यांनी केवळ स्थानिकांचे प्रश्न सोडवा, मग प्रकल्प आणा, असे सांगून प्रकल्पाला पाठिंबाच दिला.

कोकणचे प्रतिनिधी म्हणून कोकणच्या विकासावर तळमळीने बोलताना विकास प्रकल्पांना विरोध करणा-या शिवसेनेवर नारायण राणे चांगलेच तुटून पडले. तेव्हा त्यांच्या बोलण्याला आक्षेप घेण्यासाठी दोन-तीन शिवसेना आमदार उभे राहिले. पण राणे यांच्यासह काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या आमदारांनी त्यांचा आवाज बंद केला. या चर्चेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत सविस्तर आणि अभ्यासपूर्ण उत्तर दिले. त्यांचे उत्तर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी मनापासून ऐकले. कोणताही अडथळा आणला नाही. जणू काही त्यांना सर्व मुद्दे पटत होते. परंतु शेवटी शिवसेनेला विरोधासाठी विरोध म्हणून सभात्यागाचे नाटक करावे लागले आणि भाजपला त्यांच्यामागे फरफटत जावे लागले. त्यांच्या सभात्यागाकडे दुर्लक्ष करीत दोन दादा आणि एक बाबा आपापसात चर्चा करत राहिले.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP