Monday, May 2, 2011

हवेत विरल्या सा-या डरकाळ्या


शिवसेनाप्रमुखांनी आपले पद सोडण्याच्या डरकाळय़ा अनेकदा फोडल्या आहेत. शिवसैनिक उतले मातले, घेतलेला वसा त्यांनी टाकून दिला की शिवसेना भवनातून शिवसेनाप्रमुख पद सोडून देण्याची डरकाळी ऐकू येते. पण या वेळी निराळे घडले आहे. शिवसेना नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्यातील वादामुळे नव्हे; तर राणे यांच्या आरोपामुळे ही डरकाळी फोडली आहे. शिवसेनाप्रमुखांनी अप्रत्यक्षपणे राणे यांचे महत्त्व वाढविल्यामुळे शिवसेना नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.?नारायण राणे यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा राज्याच्या विकासासाठी कसा आवश्यक आहे, हे पटवून देतानाच शिवसेनेच्या विरोधाची हवा काढून टाकण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. यामुळेच आज ते राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या सुर्वणमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ उत्साहात साजरा करीत असताना राजकीय क्षेत्रामध्ये मात्र वाद-विवाद,  महाराष्ट्राची प्रतिमा यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील अशा दिग्गज नेत्यांच्या काळात एक प्रगतिशील राज्य अशी होती. त्यानंतरच्या काळात अतिमहत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या नेत्यांचे पक्षांतर्गत मतभेद एवढे टोकाला गेले की, प्रगतीचा आलेख खाली येऊ लागला. मराठी माणसाला उद्योजक बनवून राज्याचा विकास घडवून आणण्याऐवजी त्यांच्या हातात वडापावचा झारा देणारे कोणता विकास करणार? देशाच्या आणि राज्याच्या विकासाला अत्यावश्यक असणारी वीज निर्माण करणा-या प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका घ्यायची आणि जादूची कांडी फिरून ‘तडजोड’ कशी होईल, याची वाट पाहायची हा प्रकार शिवसेनेने  सुरू ठेवला आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचा पर्दाफाश केल्यामुळे निपचित पडलेला वाघ चवताळून उठावा तसे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संतप्त झाले आहेत.

जैतापुरात हिंसाचार घडविण्याचा कट शिवसेना भवनात रचला होता आणि अकरा खासगी वीज कंपन्यांनी हा प्रकल्प बंद पाडण्यासाठी पाचशे कोटी रुपये दिले असे दोन घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केले होते. त्यांनी केलेल्या या हल्ल्याने शिवसेना कार्यप्रमुखांपासून ते शिवसेनेच्या  पदाधिका-यांपर्यंत सर्वजण असे सैरभैर झाले की त्यांना प्रतिक्रिया द्यावी कशी,हेच समजेनासे झाले.  शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी पदाधिका-यांची बैठक बोलाविली आणि काही करून जाळपोळ करा,हिंसाचार करा, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असे आदेश रातोरात पोहोचविले आणि जैतापूर पेटविण्यात आले. त्यामुळे एका तरुणाचा बळी गेला, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायला कार्यप्रमुख महाराष्ट्रात राहिले नाहीत, ते जंगल सफरीला निघून गेले होते.  इकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आणि लोकप्रतिनिधी राणे यांचे अभिनंदन करत होते. 

शिवसेना भवनात हिंसाचाराचा कट शिजला असल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर नारायण राणेंनी दोन दिवसांनी आणखी एक बाँबगोळा टाकला, तो पाचशे कोटींच्या तोडपाणीचा, पण शिवसेनेतून कसलीही प्रतिक्रिया नाही. विधिमंडळात शिवसेनेची अब्रू घालवली तरी शिवसेना आमदारांकडून प्रतिकार झाला नाही. मुख्यमंत्री चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता राणेंकडे पुरावे असतील, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गृहखात्याकडे याबाबत माहिती नाही,असे सांगून राणेंना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. पण राणे आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई, प्रतोद रवींद्र वायकर यांना राणेंच्या आरोपाबाबत आक्रमक भूमिका घेण्याचे भान  राहिले नाही. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि नीलम गोऱ्हे यांनीही आवाज उठवला नाही.  उद्धव ठाकरेंचा आवाज चढू शकला नाही. शिवसेनेची उरलीसुरली अब्रू वेशीवर टांगण्याचे काम नारायण राणे करीत असताना सगळेच निपचित पडल्याचे पाहून उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना समोर आणले. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे आणि शिवसेना गोत्यात येते तेव्हा बाळासाहेबांना धाव घ्यावी लागते. राणेंच्या वक्तव्यावर आमदार आक्रमक झाले नाहीत म्हणून शिवसेनाप्रमुखांनी त्यांची एक बैठक बोलावून त्यांना झाप झाप झापले. यानिमित्ताने शिवसेनेतील अस्वस्थता प्रकर्षाने बाहेर आली.

शिवसेनेवरील आरोपांचा आमदार जर सामना करणार नसतील तर शिवसेना हवी कशाला, ती बरखास्त केलेली बरी, असा इशारा शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी दिला. त्याचबरोबर राणे आणि मुख्यमंत्र्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे; अन्यथा आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत आणि सिद्ध केले तर आपण शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा देऊ, अशी डरकाळी फोडली. त्यावर मुख्यमंत्री चव्हाण यांनीही बाळासाहेबांना निर्दोषत्व सिद्ध करण्याचे आव्हान दिले. मुख्यमंत्र्यांनी बाऊन्सर टाकल्यामुळे पेचात पडलेल्या शिवसेनाप्रमुखांनी मग आपल्या नेहमीच्या शिवराळ भाषेत ‘बिनडोक मुख्यमंत्री’ यासारखे अपमानकारक शब्द वापरले. आपले कुटुंब चांगल्या पद्धतीने चालवणारे चालक आणि दुसरीकडे उनाड, वात्रट, पुळचट, टारगट मुले असलेले कुटुंब यात जो फरक तो काँग्रेस आणि शिवसेनेत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या डरकाळय़ा अनेकदा ऐकल्या; पण त्यातून ठोस असे काही हाती लागले नाही. डरकाळय़ा हवेत विरून गेल्या.

 ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ ही घोषणा देत राजकारणात उतरलेल्या शिवसेनेने केले काय? लुंगीवाल्यांची शहरात मोठमोठी हॉटेल्स झाली आणि शिवसैनिक मात्र वडापावच्या गाडय़ा लावून बसले. दुसरी डरकाळी फोडली मराठी अस्मितेची. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी पाटय़ा अशा घोषणा झाल्या. परंतु मराठी माणूस पाटय़ा रंगवण्यापुरताच शिल्लक राहिला. ज्यांच्या दुकानांवर पाटय़ा लावल्या ते सगळे अमराठी, कोहिनूर सोडले तर मराठी माणसाच्या पाटय़ा सापडत नाहीत. एकदा मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर डोळा ठेवून ‘मी मुंबईकर’ अशी डरकाळी फोडली होती. त्यात यूपी, बिहारसह सर्वाना सहभागी करून घेण्याचे जाहीर केले, मराठी माणूस मात्र ‘मी बदलापूरकर’, ‘मी वसईकर’ बनून उपनगरात फेकला गेला. एन्रॉन अरबी समुद्रात बुडविण्याची अशीच डरकाळी फोडली आणि नंतर एन्रॉनच्या रिबेका मार्क यांच्याबरोबर ‘बंद कमरे मे’वाटाघाटी केल्या. त्या  युतीच्या वाटय़ासाठी आणि महाराष्ट्राच्या घाटय़ासाठी होत्या, हे राज्यातील जनतेच्या लक्षात आले. कोटी कोटी उड्डाणांचे प्रकल्प महामार्ग डांबरी करून गेले, पण सत्तेचा राजमार्ग मात्र युतीला त्यानंतर कायमचा बंद झाला. प्रकल्पांना प्रारंभी विरोध करायचा आणि नंतर दामदुपटीने प्रकल्प दामटायचे, ही महाराष्ट्राची विकासाची भ्रामक कल्पना, तिचे जनक युतीचे नेते होते.  जैतापूरचा प्रकल्पही शिवसेना अरबी समुद्रात बुडवायला निघाली आहे. शिवसेनेने जैतापूर प्रकल्प बुडविण्यासाठी सुपारी घेतल्याचा आरोप राणे यांनी करताच निपचित पडलेला वाघ चवताळून उठला आणि दोषी असलो तर शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा देईन, अशी आणखी एक डरकाळी फोडली. शिवसेनाप्रमुखांनी आपले पद सोडण्याच्या डरकाळय़ा अनेकदा फोडल्या आहेत. शिवसैनिक उतले मातले की सेना भवनातून शिवसेनाप्रमुख पद सोडून देण्याची डरकाळी ऐकू येते. पण या वेळी  शिवसेना नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्यातील वादामुळे नव्हे; तर राणे यांच्या आरोपामुळे त्यांनी डरकाळी फोडली आहे.


शिवसेनाप्रमुखांनी अप्रत्यक्षपणे राणे यांचे महत्त्व वाढविल्यामुळे शिवसेना नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.?नारायण राणे यांनी जैतापूर प्रकल्प हा  विकासासाठी कसा आवश्यक आहे, हे पटवून देतानाच शिवसेनेच्या विरोधाची हवा काढून टाकण्याचे काम केले आहे. यामुळेच आज ते राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत. प्रकल्पाला संपूर्ण ताकदीनिशी समर्थन आणि विरोधकांची झोप उडेल असे त्यांना दिलेले आव्हान अशी दुहेरी कामगिरी त्यांनी बजावली आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांना आपले पद पणाला लावावे लागले, हे राणे यांचे मोठे यश आहे. शिवसेनेला गुडघे टेकायला लावण्याचे नैतिक धर्य, राजकीय कसब आणि मुत्सद्देगिरी त्यांच्यामध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. शिवसेनेची झोप उडविण्याची ताकद असलेल्या राणे यांना या डरकाळय़ा किती खऱ्या किती खोटय़ा हे माहिती असल्यामुळे  उद्धव ठाकरे यांना त्यांनी पूर्णपणे उघडे पाडले आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP