कोळसा उगाळावा तितका..
कोळसा उगाळावा तितका काळा या उक्तीप्रमाणे भ्रष्टाचाराची चर्चा करावी तितकी थोडी, याचा प्रत्यय बुधवारी सभागृहात आला.
कोळसा उगाळावा तितका काळा या उक्तीप्रमाणे भ्रष्टाचाराची चर्चा करावी तितकी थोडी, याचा प्रत्यय बुधवारी सभागृहात आला. भ्रष्टाचाराचा कोळसा उगाळावा तेवढा थोडा असे म्हणत असताना कोळसा व्यापा-यानेही भ्रष्टाचारामध्ये भर घातली असल्याची चर्चा विधानसभेत झाली. एक कोळशाचा व्यापारी इनोव्हा गाडीतून दीड कोटी रुपये घेऊन मंत्रालयात निघाला होता. तो कोणाकडे गेला, असा खळबळजनक सवाल विरोधकांनी केला. मनसेचे राम कदम यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी चांगलाच लावून धरला. प्रभाग रचना विधेयकावर चर्चा होताना निवडणुकीत कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याची कबुली आमदारांनीच नव्हे तर मंत्र्यांनीही दिली. सरकारचा एकही विभाग भ्रष्टाचारापासून मुक्त नसल्याचे सभागृहातील चर्चामधून वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.
निवडणुका लढवणे आजकाल सोपे राहिलेले नाही, हे तुम्हा-आम्हा सर्वानाच माहिती आहे, असे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले असता, केवळ स्मितहास्य करण्यापलीकडे सदस्यांची प्रतिक्रिया नव्हती. ही एक प्रकारची मूक कबुलीच होती. आपण सर्वजण कशापद्धतीने निवडून येतो, किती खर्च करतो हे आपणा सर्वाना माहितीच आहे,असे सांगून त्यांनी निवडणुकीतील भ्रष्टाचाराचीच जणू कबुली दिली. छोटे मतदारसंघ असले की, मतदारांना पैसे देऊन मॅनेज करण्याचे प्रकार होतात. मात्र मतदारांची संख्या वाढली तर भ्रष्टाचाराला आळा बसेल म्हणूनच तर सरकारने प्रभाग समितीची पुनर्रचना करून बहुसदस्यीय प्रभाग रचना केली असून, त्यासंबंधीचे विधेयक आणले आहे.
नागपूर येथील कोळसा व्यापा-याला दीड कोटी रुपयांसह मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इतके पैसे घेऊन हा व्यापारी कुठे चालला होता, यावर बरेच चर्वित-चर्वण झाले. मनसेचे राम कदम यांनी तसेच भाजपचे नाना पटोले यांनी हा व्यापारी मंत्रालयात पाचव्या मजल्यावर हे पैसे घेऊन चालला होता. त्यामुळे पाचव्या मजल्यावर कोणते मंत्री आहेत आणि त्यापैकी कोणाचा संबंध कोळशाशी आहे, याची खमंग चर्चा चांगलीच रंगली होती. विरोधी पक्षनेते खडसे यांनी हे पैसे कोणासाठी चालले होते, त्या मंत्र्याचे नाव कळलेच पाहिजे, अन्यथा सभागृह चालू देणार नाही, असा पवित्रा घेतला. भ्रष्टाचाराची ही चर्चा जोरात होत असताना आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या व्यतिरिक्त एकही मंत्री सभागृहात उपस्थित नव्हता. त्यामुळे यासंबंधी गुरुवारी गृहमंत्री आर. आर. पाटील निवेदन करतील, असे आश्वासन शेट्टींना द्यावे लागले.
0 comments:
Post a Comment