विधेयकांची ऐशीतैशी
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी सदस्यांनी आज तिस-या दिवशीही प्रचंड गदारोळ करून कामकाज ठप्प करून टाकले. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणून गोंधळ, गदारोळ उडवून दिला की, सत्ताधा-यांचे चांगलेच फावते. विरोधकांचे राजकारण यशस्वी होत असताना दुसरीकडे ते सरकारच्याही पथ्यावर पडते.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी सदस्यांनी आज तिस-या दिवशीही प्रचंड गदारोळ करून कामकाज ठप्प करून टाकले. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणून गोंधळ, गदारोळ उडवून दिला की, सत्ताधा-यांचे चांगलेच फावते. विरोधकांचे राजकारण यशस्वी होत असताना दुसरीकडे ते सरकारच्याही पथ्यावर पडते. काल आणि आज दोन्ही दिवशी असेच घडले. विरोधकांनी मावळ गोळीबार प्रकरणी जोरजोरात घोषणाबाजी, गोंधळ, गदारोळ सुरू केला, सरकारने कामकाज काहीवेळा तहकूब केले. पण विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचा पुरेपुर फायदा उठवला. विरोधकांच्या गोंधळात सरकारने महत्त्वाची विधेयके चर्चेविना मंजूर केली. विधिमंडळ अधिवेशनात सर्वात महत्त्वाचे काम कायदे करण्याचे असून, या कायदे मंडळात कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास, चिंतन आणि विचार विनिमय करून कायदा केला जातो. सहकारी संस्था कायदा, महानगर पालिका कायदा आणि खासगी विद्यापीठाचा कायदा करण्यासाठी मांडण्यात आलेली विधेयके सरकारने गोंधळात कोणत्याही चर्चेविना मंजूर केली.
खासगी विद्यापीठ अर्थात स्वयंअर्थसहाय्य विद्यापीठ विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडून सुधारणेसह आलेले चर्चेविना मंजूर झाल्याबद्दल दोन्ही सभागृहातील दोन्ही बाजूच्या अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेचे सदस्य कपिल पाटील यांनी तर या विषयावर आपले भाषण सुरू असताना आणि आपण ऑनलेग असताना भाषण संपल्याशिवाय विधेयक मंजुरीसाठी टाकता येणार नाही, अशी रास्त भूमिका घेऊन सरकारला खडे बोल सुनावले. कपिल पाटील यांनी सभापतींना एक पत्र लिहून आपल्या संतप्त भावना कळवल्या आहेत. विधान परिषदेचे नियम, अधिनियम आणि विधेयक मंजूर करण्याची कार्यपद्धती स्वयंस्पष्ट असून ती मोडता येणार नाही. त्यांना हरताळ फासता येणार नाही. ही केवळ नियमांची पायमल्ली नव्हे तर लोकशाहीची पायमल्ली आहे. हा सभागृहाचा अवमान आहे. सभागृहात विधेयकावर बोलण्याचा सदस्याचा अधिकार डावलता येणार नाही, असे नमूद करून सर्वोच्च पीठासनावर आपण अनेक उच्च परंपरा निर्माण केल्या आहेत. याबाबतही आपण ऐतिहासिक न्यायनिवाडा कराला, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. खासगी विद्यापीठ हे अनुसूचित जाती-जमाती आणि एकूणच मागासवर्गियांवर अन्याय करणारे आणि संविधानातील तरतूदींना हरताळ फासणारे कसे आहे याविषयी ते आपले विचार मांडत होते. परंतु, त्यांचा माइक बंद करण्यात आला असल्याचे आणि विधेयक गोंधळात मंजूर होत असल्याचे दृश्य दिसले.
आज विधानसभेतील भाजप सदस्य अधिक आक्रमक होते. ‘मावळ की गलियाँ सुनी है, आबा-दादा खूनी है’, ‘शेतक-यांची कुर्बानी, कसाबला बिर्याणी’ अशा जोरदार घोषणा देत त्यांनी सभागृह दणाणून सोडले होते. अध्यक्षाच्या आसनाजवळ व्यासपीठावर चढून ते घोषणा देत होते. पण शिवसेनेत ती आक्रमकता दिसली नाही. भाजप-शिवसेनेत गोंधळ ताणण्यावरून तणातणी झालेली दिसते. शिवसेनेचे काही आमदार खासगी बोलताना गोपीनाथ मुंडेंनी संसदेत मावळचा विषय लावून धरला म्हणून राज्यातील त्यांचे प्रतिस्पर्धी एकनाथ खडसे आणि सुधीर मुनगंटीवार जाणीवपूर्वक गोंधळ वाढवत आहेत, अशी चर्चा करत होते. तर भाजप आमदारही खासगीत तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारे आणि त्यांच्या नेत्यांना ‘जाणता राजा’ म्हणणारेच शेतक-यांना गोळय़ा घालीत आहेत, मावळच्या मावळय़ांना जमा करून महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शहाजी राजेंची ही जागीर अजितदादांची जागीर आहे का, असा प्रश्न विचारत होते.
राष्ट्रवादीचे नवाब मलिक हे तालिकेवर असताना सर्व सदस्यांनी त्यांना घेराव घातला. सुमारे 80 सदस्य आसनाजवळ चढले होते. परंतु काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत पुरके अध्यक्षस्थानी आले असता विरोधी सदस्यांनी त्यांना घेराव घातला नाही, हे प्रकर्षाने जाणवले. हाच गोंधळ उद्या पुनश्च चालू राहण्याची शक्यता दिसत आहे.
0 comments:
Post a Comment