स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
स्त्री-भ्रूण हत्या या विषयावरील चर्चा हे गुरुवारचे वैशिष्टय़ होते. सुमारे पाच तास चर्चा झाली. पुरोगामी महाराष्ट्रात मुलींची संख्या कमी होत असून, तिची गर्भातच हत्या केली जाते, याबाबत सर्वच सदस्यांनी चिंता व्यक्त केली.
स्त्री-भ्रूण हत्या या विषयावरील चर्चा हे गुरुवारचे वैशिष्टय़ होते. सुमारे पाच तास चर्चा झाली. पुरोगामी महाराष्ट्रात मुलींची संख्या कमी होत असून, तिची गर्भातच हत्या केली जाते,याबाबत सर्वच सदस्यांनी चिंता व्यक्त केली. राज्याच्या महिला व बाल कल्याणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही चर्चा सामाजिक झाली असून, तिला राजकीय रंग न आल्याबद्दल सर्व सदस्यांना धन्यवाद दिले. विज्ञानाचा उपयोग अज्ञानासाठी होता कामा नये,अशा शब्दात सोनोग्राफी यंत्राच्या दुरूपयोगाबद्दल त्यांनी टिपणी केली. तर, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी स्त्री-भ्रूण हत्या हा सामाजिक गुन्हा असून, संपूर्ण ताकदीनिशी त्याचा सामना करण्याची ग्वाही दिली. या विषयावर महिला सदस्यांनी अत्यंत तळमळीने भाषणे केली. विशेष म्हणजे या विषयावर वेळेचे बंधन नसल्यामुळे सदस्यांना सविस्तर बोलता आले.
भाजपच्या पंकजा मुंडे-पालवे यांनी चर्चेची सुरुवात करताना स्त्री-भ्रूण हत्या आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व समस्यांचा ऊहापोह केला.
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
हृदयी पान्हा डोळय़ात पाणी
अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आणि संपूर्ण सभागृहाने बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले. सभागृहातील ज्येष्ठ महिला सदस्य शेकापच्या मीनाक्षीताई पाटील यांच्या अभ्यासपूर्ण आणि सखोल चिंतनातून केलेल्या भाषणालाही सभागृहाने उत्स्फूर्तपणे दाद दिली. मुलींची जन्माला येण्याआधीच हत्या कशाला करता असा प्रश्न करून पंडित नेहरू, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांना एकच मुलगी आहे तर, अमेरिकेसारख्या जगाच्या महासत्तेचे प्रमुख असलेल्या जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, बराक ओबामा यांना दोन मुली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्त्री-भ्रूण हत्या म्हणजे, वात्सल्याची हत्या, प्रगतीची हत्या, स्त्री-भ्रूण हत्या म्हणजे, रणरागिणीची हत्या, रणचंडिकेची हत्या. ज्याच्यावर श्रद्धा आहे अशा परमेश्वराची हत्या, अशा शब्दांत सुरुवात करून त्यांनी सुंदर कविताही म्हटली.
लक्ष्मीच्या पावलांनी दीपावली येते,
नवरात्रीच्या पावलांनी दुर्गा पावते,
वटपोर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते,
राखीचा धागा तर ताईच बांधते
पाडव्याचे औक्षण तर पत्नीच करते
तरीही गर्भातली चिमुकली गर्भातच मरते..
पुरोगामी महाराष्ट्रात महिलांची महती सांगितली जाते. मग मुलगी का नको, हा त्यांचा प्रश्न अंतर्मुख करणारा होता.
0 comments:
Post a Comment