Sunday, December 18, 2011

ओढ घराची..


विधिमंडळाचे कामकाज लवकर उरकण्याची सर्वच पक्षांना घाई झालेली आहे.

विधिमंडळाचे कामकाज लवकर उरकण्याची सर्वच पक्षांना घाई झालेली आहे. पुढे येणा-या महानगरपालिका निवडणुकांची तयारी करता यावी, यासाठी अधिवेशन लवकर गुंडाळण्याचा सरकारचा विचार आहे आणि त्याला विरोधी पक्षाची संमती आहे. कामकाज दोनच आठवडय़ांत उरकायचे असल्याने शनिवारी सुट्टीच्या दिवशीही विधिमंडळाची विशेष बैठक बोलावली होती. आज सभागृह सुरू असले तरी विधान भवन परिसरात सुट्टीचा माहौल होता. शनिवारी सुट्टी असते, असे गृहीत धरून अनेक नेत्यांनी आपले सार्वजनिक कार्यक्रम निश्चित केले होते. त्यामुळे ते कार्यक्रमाला निघून गेले.

तर आठवडाभर घराबाहेर राहिलेल्या सदस्यांना घराची ओढ लागलेली असावी म्हणूनच अनेकांनी काल रात्रीच विमाने आणि रेल्वे गाडय़ा पकडल्या. जे थोडेफार आमदार मागे राहिले होते त्यांना विमानाची किंवा रेल्वेची तिकिटे मिळाली नाहीत किंवा आयत्या वेळी विमानाची तिकिटे महाग होत असल्याने काही जणांनी जाण्याचे टाळले. काही सदस्यांनीच ही बाब विधानसभेत बोलून दाखवली.

मनसेचे नाशिक येथील आमदार नितीन भोसले यांनी सभागृहातच आपली कैफियत मांडली. आम्ही आठवडाभर घरापासून दूर आहोत. आज सभागृह संपल्यानंतर पटकन विमानाने घरी जावे म्हटले तर विमानाचे भाडे 20 हजारांपर्यंत पोहोचले आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाकडे राज्य सरकारने याबाबत पत्रव्यवहार करावा, असे त्यांनी सुचवले. त्यावर कार्यसम्राट संसदीय कामकाजमंत्री हेही अधिक तत्पर झाले आणि त्यांनीही भोसले यांची मागणी लगेच उचलून धरली. याबाबत केवळ केंद्र सरकारशीच नव्हे तर त्या-त्या विमान कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशीही आपण सरकारच्या वतीने पत्रव्यवहार करू, असे आश्वासन त्यांनी दिले.



घराच्या या ओढीचा परिणाम दुपारनंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पाहायला मिळाला. उरल्या सुरल्या सदस्यांनीही दुपारनंतर कामकाजाला कल्टी मारून आपापल्या गावांचा रस्ता धरला. त्यामुळे सभागृहात अत्यंत कमी उपस्थिती होती. गमतीची गोष्ट म्हणजे सदस्यांचा अनुपस्थिती अहवाल आज सभागृहात सादर करण्यात येणार होता. उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी तसे कामकाजही पुकारले. मात्र, त्याच वेळी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी अनुपस्थिती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कांबळेच अनुपस्थितीत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सभागृहातील सदस्यांना आपले हसू आवरता आले नाही. दुपारनंतर अत्यंत महत्त्वाच्या दोन विधेयकांवर विधानसभेत चर्चा होती. मात्र,सभागृहातील उपस्थितीत अत्यंत दयनीय होती. कामकाज संपण्यापूर्वी अर्धा तास विधानसभेत भाजप 2, शिवसेना 1,मनसे 1 आणि इतर पक्षांचे एकूण 12 आमदार आणि तीन मंत्री सभागृहात होते. तरीही भाजपचे देवेंद्र फडणवीस तावातावाने आपली मते मांडत होते.

विधान परिषदेतही काही वेगळी स्थिती नव्हती. नेहमी सभागृहात उपस्थित असणारे शिवसेनेचे दिवाकर रावते, मावळते विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांच्यासह विरोधी बाकावर फारच थोडे सदस्य उपस्थित होते. दुपारनंतर तर परिस्थिती फारच नाजूक झाली. काँग्रेसचे सदस्य सुरेश नवले यांनी घरकूल योजनेवरील अशासकीय ठराव मांडला तेव्हा बरेच सदस्य आपल्या घरकुलाकडे परतले होतेनवले यांनी आपल्या भाषणात घराची ओढ कशी असते, याचे वर्णन करताना‘एक बंगला बने न्यारा’, ‘तेरे घर के सामने एक घर बनाऊंगा’, अशा घरांच्या आठवणींत रमणा-या गाण्यांचे दाखले देत आपले भाषण पूर्ण केलेपुढे उपस्थिती इतकी कमी झाली की, राष्ट्रवादीचे रमेश शेंडगे यांचा अशासकीय ठराव पुढे ढकलावा लागला. सर्वानाच घराची ओढ लागल्याचे पहिल्या आठवडय़ातच पाहायला मिळाले.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP