Thursday, December 22, 2011

आठवडा युवराजांचा


राज्यातील मातब्बर नेते आपापले कौशल्य पणाला लावून राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. राज्यातील मातब्बर नेते आपापले कौशल्य पणाला लावून राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाबरोबरच आपापल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवून घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. इथे केलेली चर्चा हेच आपल्या मतदारसंघातील लोकांसमोर ठेवायचे भांडवल असते. असे बडे नेते आपापल्या अस्तित्वासाठी धडपडत असताना विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या आठवडय़ात राज्यातील मातब्बर नेत्यांच्या युवराजांनी राज्याच्या राजकीय क्षितिजावर आपला ठसा उमटवला. काँग्रेस ज्येष्ठ नेते पंतगराव कदम यांचे पुत्र आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली नागपूर महापालिकेवर बुधवारी मोर्चा आयोजित केला होता.

महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात निघालेल्या या मोर्चात पंतगरावांच्या युवराजांबरोबरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल, नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल, रोजगार हमीमंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल हेही सहभागी झाले होते. राजकारणातील हे चारही युवराज इतके आक्रमक झाले की त्यांना पोलिसांना अटक करावी लागली. या मोर्चाच्या निमित्ताने या चारही युवराजांनी आपली राजकीय ताकद दाखवली.
 
हिवाळी अधिवेशनाचा हा आठवडा युवराजांचा म्हणूनच गाजत आहे. कालच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनीही नागपूरला भेट दिली होती. विधान भवनात येऊन नितेश यांनी कामकाजाची पाहणी केली. त्यांनी सभागृहाचे कामकाज इतक्या गांभीर्याने पाहिले की सभागृहात विरोधी पक्षांची झालेली केविलवाणी अवस्था त्यांनी अचूक टिपली. महत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या गॅलरीतून ते कामकाज पाहत होते तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनियोजन विधेयक सभागृहात मांडले. अत्यंत महत्त्वाच्या या विधेयकावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी चर्चेसाठी आग्रहच धरला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार चर्चेची मागणी करत होते. मात्र अजितदादांनी चर्चा होणार नाही. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा झाली आहे, असे सांगून त्यांना गप्प बसवले.
 
हा सगळा प्रसंग नितेश राणे यांनी अत्यंत बारकाईने पाहिला. सभागृहाचे कामकाज पाहून ते गॅलरीबाहेर पडले तेव्हा कार्यकर्ते आणि पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. विधानसभेतील कामकाजाबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता कसलेल्या राजकीय नेत्यांप्रमाणे त्यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, विरोधी पक्षाची भूमिका पाहता सत्ताधा-यांचे हे विस्तारीत कुटुंब आहे, असे वाटले. त्या टिप्पणीने पत्रकार-कार्यर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांने तर त्यांना इंदू मिलचा प्रश्न आपण हाती घ्यावा, अशी विनंती केली. तेव्हा त्यांनी तोही प्रश्न तितक्याच लीलया टोलवला. ते म्हणाले, सर्वाचे प्रयत्न होऊन जाऊ द्या, मग मी हा प्रश्न हातात घेईन. एकदा प्रश्न हाती घेतला की तो सुटेपर्यंत मी स्वस्थ बसत नाही, असे त्यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले.
 
आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य यांचेही विधान भवनात आगमन झाले होते. त्यांच्या आगमनानिमित्त शिवसेनेच्या सर्व आमदारांना पक्षाने खास आदेश दिले होते. पक्ष कार्यालयाच्या नोटिस बोर्डावरच युवा नेत्याच्या स्वागतासाठी सर्व आमदारांनी हजर राहावे, अशी तंबीच दिली होती. अनेकांनी आमदार म्हणून सभागृहात जितके वर्ष काम केले तितकेही वय नसणा-या आदित्यच्या स्वागतासाठी सर्वाची धावपळ सुरू होती.

जिकडे युवराज जातील, तिकडे आमदार त्यांच्या मागे धावत होते. सभागृहातील महत्त्वाच्या चर्चा सोडून चाललेला हा सगळा प्रकार प्रसारमाध्यमांतील प्रतिनिधींनीही आपल्या कॅमे-यात टिपून घेतला. एकंदर या आठवडय़ाचा पूर्वार्ध हा युवराजांनीच गाजवला.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP