Friday, December 16, 2011

अजितदादांचा शॉक


राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याचे ऊर्जा खातेही आहे. राज्यातील जनतेला वीजटंचाईचे झटके वारंवार बसत असतात. पण गुरुवारी विधानसभेत अजितदादांनी आमदारांना चांगलाच झटका दिला.

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याचे ऊर्जा खातेही आहे. राज्यातील जनतेला वीजटंचाईचे झटके वारंवार बसत असतात. पण गुरुवारी विधानसभेत अजितदादांनी आमदारांना चांगलाच झटका दिला. विजेचा शॉक बसला की माणूस सुन्न होऊन जातो. तसेच काहीसे दृश्य दिसले.

बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कापूस, सोयाबीन, धान या पिकांची भरपाई म्हणून शेतक-याना दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. पण त्यामुळे विरोधीच नव्हे तर सत्ताधारी सदस्यांचेही समाधान झाले नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सभागृहांचे कामकाज नीट झालेले नाही. तिस-या दिवशी राज्याच्या तिजोरीचा विचार करून जास्तीत जास्त मोठे पॅकेज देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आजपर्यंत कापसासाठी एवढे मोठे, दोन हजार कोटीचे पॅकेज एकदाही दिलेले नव्हते. पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम सरकार देणार आहे. पण दोन्ही बाजूंच्या आमदारांनी हेक्टरी किती पैसे मिळणार, असा हिशोब लावला आणि प्रत्यक्ष शेतक-यांच्या हाती फार मोठी मदत पडत नाही असा सूर लावला. त्यात सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आघाडीवर होते. काँग्रेस आमदारांनी पुढाकार घेऊन पाच हजार कोटी रुपये देण्याची मागणी केली. त्यात निलेश पारवेकर, गोपाळ अगरवाल, कल्याण नामदेव उथंडी,यशोमती ठाकूर, सुभाष झनक, सुनील केदार यांच्यासह शशिकांत शिंदे यांचाही समावेश होता. मनसेचे बाळा नांदगावकर,भाजपचे सुधीर मुनगंटीवार, शिवसेनेचे सुरेशदादा जैन, सुभाष देसाई, आशीष जैस्वाल, शेकापचे गणपतराव देशमुख,विवेक पाटील आदींचा समावेश होता. सत्ताधारी आमदारांनी पाच हजार कोटींची मागणी केली, म्हणून विरोधकांनी दहा हजार कोटींची केली. सुरेशदादांनी तर राज्यावर असलेल्या दोन लाख 85 हजार कोटींच्या कर्जात आणखी दहा हजारांची भर पडू द्या, पण 10 हजार कोटींचे पॅकेज द्या अशी मागणी केली.

दोन्ही बाजूंच्या सदस्यांचे म्हणणे शांतपणे ऐकत बसलेले अजितदादा अखेर उठले आणि त्यांनी सदस्यांना चांगलेच फैलावर घेतले. कर्ज घ्या असे सांगणे सोपे आहे, पण विकासकामांनाही पैसे लागतात, अनपेक्षित खर्च आले की, बजेटला कात्री लावावी लागते असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यापुढे जाऊन दादा म्हणाले, शेतक-यांना जास्त मदत द्यायची तर विकासकामांबरोबरच तुमच्या आमदार निधीलाही कात्री लावावी लागेल.

दादांनी असा शॉक देताच सभागृहात सर्वत्र शांतता पसरली. एकही आमदार उठून म्हणाला नाही की, शेतक-यांसाठी आमचा आमदार निधी घ्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अजितदादांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमचा सर्वाचा आमदार निधी घ्या पण शेतक-यांचे पॅकेज वाढवून द्या.

मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर करण्याआधी मंत्रिमंडळात चर्चा केली, पण पक्षात चर्चा केली नसावी. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनीच पाच हजार कोटी देण्याची मागणी केली. पक्षाची मागणी असल्याने काँग्रेस आमदारही पुढे सरसावले. आमदार निधीत वाढ करण्याच्या मागणीसाठी दोन्ही बाजूंचे आमदार एकजुटीने आवाज उठवत असतात. मात्र,आमदार निधीला कात्री लागू नये, याबाबतही त्यांचे एकमत असते, हेच गुरुवारी दिसून आले.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP