Wednesday, December 21, 2011

दादांच्या इशा-याने विरोधक घायाळ

आपल्या एका इशा-याने शिवसेना-भाजप आमदारांनी आवाज बंद केला पाहिजे, अशी दादागिरी अजिदादांनी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार तर दादांच्या धाकात असल्यासारखेच वाटतात. आज तर कमालंच झाली.

नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची शिवसेना-भाजपशी मोट बांधून जास्तीत जास्त जागा पटकावण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न यशस्वी झाल्यामुळे सभागृहातही विरोधकांवर आपला वचक वाढवण्यावर त्यांनी भर दिला आहे. आपल्या एका इशा-याने शिवसेना-भाजप आमदारांनी आवाज बंद केला पाहिजे, अशी दादागिरी अजिदादांनी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार तर दादांच्या धाकात असल्यासारखेच वाटतात. आज तर कमालंच झाली.

अजितदादांकडे वित्त व नियोजन खाते असून राज्याच्या अतिरिक्त खर्चाचे ‘महाराष्ट्र विनियोग विधेयक’ लवकरात लवकर मंजूर करुन घेण्याचे त्यांनी ठरवले. पण विधानसभेच्या कार्यक्रमपत्रिकेत अकरा क्रमांकावर असलेले विधेयक मंजूर होणार कधी आणि त्यानंतर विधान परिषदेत ते मंजूर करुन घेणार कसे असा प्रश्न त्यांना पडला. त्यावर दादांनी तात्काळ तोडगाही काढला. त्यांनी भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना विधानसभा अध्यक्ष दिलीप वळस- पाटील यांच्या दालनात बोलावून अकरा क्रमांकावरचे विधेयक सातव्या क्रमांकावर घेण्यासाठी पटवले.

खडसेंनी नेहमीप्रमाणे पटवून घेतले. त्यावेळी खडसे मात्र, सभागृहात उपस्थित नव्हते आणि विरोधी सदस्यांना या मांडवलीचा पत्ताच नव्हता. म्हणून भाजपचेच ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी कामकाज नियमानुसारचं चालले पाहिजे, असा आग्रह धरला. त्याशिवाय या विधेयकावर चर्चाही झाली पाहिजे आणि किती अतिरिक्त खर्च करणार आहात हेही सभागृहाला समजले पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर दादांनी गुगली टाकून म्हटले, ‘विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा झाली आहे’ अशाप्रकारे अजिदादांनी भाजप आमदारांची हवाच काढून घेतली. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना नाईलाजाने नमते घेणे भाग पडले आणि हताशपणे त्यांनी मागणी केली की, ‘विनियोजनासंबंधी अधिवेशनानंतर अधिका-यांसमवेत आमची बैठक बोलवा आणि त्यात राज्याच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घ्या’ ही मागणी अजितदादांनी तात्काळ मान्य केली आणि कोणत्याही चर्चेविना विधेयक मंजूर झाले.

असाच एक राज्याच्या हिताचा मुद्दा लोकलेखा समितीचा अहवाल मांडताना भाजपचे ज्येष्ठ आमदार गिरीश बापट यांनी उपस्थित केला. बापट जेव्हा इतरही काही मुद्दे मांडू लागले तेव्हा दादांनी त्यांना गप्प करण्यासाठी हळूच मिश्किलपणे, ‘पुणे पॅटर्न’ असे शब्द उच्चारले. तत्क्षणी बापटांचा आवाज बंद झाला. राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपची सत्ता अजित दादांनी पुणे महानगरपालिकेत आणली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात ‘पुणे पॅटर्न’ वाक्प्रचार रुढ झाला. त्याचा खुबीने वापर करत अजितदादा विरोधकांना खिजवत असतात.

पण, अजितदादांचे हे इशारे तात्पुरते दिसत नाहीत. त्यामध्ये भविष्याचे राजकारण दडले आहे. आज सकाळी राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात अजितदादांनी यापुढील काळात संयुक्त सरकारची निर्मिती अपरिहार्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केले. यापुढे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे अवघड आहे, असे मत त्यांनी मांडले. त्यामुळेच भविष्यात ‘पुणे पॅटर्न’ राज्यात आणण्यासाठी त्यांचे इशारे सुरू झाले असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP