Tuesday, December 20, 2011

इंदू मिलसाठी चढाओढ..


मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेमाचे भरते आले आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेमाचे भरते आले आहे. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी जो-तो आपापल्या परीने संधी शोधू लागला आहे. ती संधी सर्वानाच दादर येथील इंदू मिलकडून मिळू लागली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात तर सभागृहामध्ये स्पर्धा लागली होती. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव दिल्याची कुणकुण लागताच सत्ताधारी आमदारांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाला मिळालीच पाहिजे, असे बॅनर सभागृहात फडकवले. बाबासाहेबांवरील आपला प्रेमाचा उमाळा व्यक्त करणा-या आमदारांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘चमकेश’ आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह नवाब मलिक आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश होता. तर काँग्रेसचे प्रशांत ठाकूर आणि चंद्रकांत हंडोरे हेही पुढे सरसावले होते. इंदू मिलच्या मागणीवरून त्यांनी जोरदार हंगामा केल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या या पाचही आमदारांना एक दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. निलंबनाची घोषणा होताच चमकेश बाहेर आले आणि थेट टीव्ही कॅमे-यांसमोर जाऊन उभे राहिले. तेव्हा ही तर मॅच फिक्सींग असल्याची चर्चा सोमवारी विधान भवन परिसरात होती. राज्यात आणि केंद्रात काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असूनही इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे विरोधक याचा फायदा घेत आहेत.
 
काँग्रेस हे वर्ष समता वर्ष म्हणून साजरे करत आहेत. या समता वर्षात दलित-मागासवर्गीयांसाठी अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. मागासवर्गीयांसाठी  101 मागण्या पक्षांच्या वतीने सरकारकडे सादर केल्या. त्यात इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी मिळावी, अशी मागणी केली. काँग्रेस मागासवर्गीयांसाठी काही करत असताना आपण मागे राहून कसे चालेल म्हणून मग राष्ट्रवादीने आपला स्थापना दिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला आणि त्यांनीही मग 101 मागण्यांची सनद तयार केली. त्यातही इंदू मिलच्या जागेचा विषय होता.
 
प्रत्येकालाच बाबासाहेबांप्रति आपल्या निष्ठा प्रकट करण्याची घाई झाली असल्याने रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी महापरिनिर्वाणदिनी इंदू मिलच्या जागेत प्रवेश करून तिथे गौतमबुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांची स्थापना केली. त्याची सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. आंबेडकरी जनतेमध्ये आनंदराज यांच्याविषयीचा आदर वाढतोय आणि त्यांच्याच नावाची चर्चा होते, असे लक्षात आल्यानंतर शिवसेना कार्याध्यक्षांचे नवनिर्वाचित मित्र रामदास आठवले यांना स्वस्थता कशी लाभेल. इंदू मिलच्या जागेसंदर्भात आपण आतापर्यंत काहीच केले नाही हे आठवले यांना आठवल्यानंतर मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी 7 डिसेंबर रोजी मंत्रालयात जाऊन घोषणाबाजी करून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या फुटकळ घोषणाबाजीची कुणीही दखल न घेतल्यामुळे गेल्या आठवडय़ात पुन्हा आठवले यांनी स्टंटबाजी करत इंदू मिलच्या जागेत प्रवेश करून जाळपोळ केली. काहीजणांनी इंदू मिलवर चढाई केली, तर काही जणांची सभागृहात चढाओढ सुरू झाली.

टोलवसुलीतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सोमवारी विधानसभेत गोंधळ झाल्यानंतर भाजपला श्रेय मिळू नये म्हणून सत्ताधा-यांनी असा आटापिटा केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. दोन्ही सभागृहांत पुरवणी मागण्यांचा उपचार उरकण्यात आला. पुरवणी मागण्यांच्या चर्चे दरम्यान विधान परिषदेत इंडिया बुल्सकडून घेतलेल्या देणगीचा भुजबळांचा मुद्दा दिवाकर रावते यांनी उकरून काढला. भुजबळांनी त्याला आपल्या स्टाइलमध्ये उत्तर देऊन त्यांचा आवाज बंद केला. तर विधानसभेतील गृहविभागाच्या चर्चेदरम्यान आर. आर. पाटील यांनी कसाबवर होणारा खर्च सभागृहात सादर केला. त्याला लवकरात लवकर फाशी मिळावी यासाठी सरकारने खटला गतीने चालवल्याचे त्यांनी सांगितले.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP