Monday, December 12, 2011

राष्ट्रवादीने केला असंगाशी संग

पेराल तसे उगवेल, या म्हणीनुसार, मुंबईला मातोश्रीवर जे पेरले ते पुण्यात उगवले. मागील वेळी राष्ट्रवादी तसेच शिवसेना-भाजप अशी सत्ता पुणे महानगरपालिकेत होती. या अभद्र युतीला पुणे पॅटर्न असे संबोधले जाऊ लागले. या पॅटर्नची रोपटी यंदा महाराष्ट्रात सर्वत्र वाढू लागली आहेत.

महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकांची धूम सुरू झाली आहे.रविवारी पहिला टप्पा संपला. उर्वरित दोन टप्प्यातील निवडणुका 13 आणि 16 डिसेंबरला होत आहेत. राजकीय नेत्यांना आपले गड शाबूत राखण्यासाठी प्रचंड धावाधाव करावी लागत आहे. त्यासाठी झंझावाती प्रचार दौरे सुरू झाले. आजपर्यंत नगरपालिकांच्या निवडणुका एवढय़ा रंगतदार कधीच झाल्या नव्हत्या. या निवडणुका आल्या कधी आणि झाल्या कधी हेही कळत नव्हते. पण यंदा नगरपालिका निवडणुका आहेत की विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका, असा प्रश्न पडावा, असे राज्यातील वातावरण तापले आहे. स्थानिक पातळय़ांवर बहुतेक सर्वच ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडय़ा करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे केंद्रात आणि राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हादेखील आघाडय़ांमध्ये घुसला आहे. राजकारणातील लढा वैचारिक असला पाहिजे, पण वैचारिकता नाहीच,विश्वासार्हतादेखील नसलेल्या या पक्षाला काहीही करून आपले स्थान बळकट करायचे आहे. त्यामुळे कोणाशीही बिनदिक्कतपणे आघाडी केली जात आहे.


नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कन्या खा. सुप्रिया सुळे या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याकरिता ‘मातोश्री’ या ठाकरेंच्या बंगल्यावर गेल्या होत्या. त्या भेटीने तळागाळातील कार्यकर्त्यांकडे काय संदेश द्यायचा तो गेलाच.?जेव्हा-जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात,तेव्हा ठाकरे-पवार यांची भेट होतेच, हे आता लपून राहिलेले नाही. ‘तुम्ही पालिकेत आणि आम्ही राज्यात’ असे शिवसेना-राष्ट्रवादीचे समीकरण ठरले आहे असे दिसते.?त्याचप्रमाणे जेव्हा-जेव्हा काँग्रेसने पवारांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला?तेव्हादेखील काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी पवारांनी ठाकरेंशी असलेल्या मैत्रीचा वापर करून घेतला. जसे पेराल तसे उगवेल या म्हणीनुसार, मुंबईला मातोश्रीवर जे पेरले ते पुण्यात उगवले. मागील वेळी राष्ट्रवादी तसेच शिवसेना-भाजप अशी सत्ता पुणे महानगरपालिकेत आली होती.?त्यावरून या अभद्र युतीला पुणे पॅटर्न असे संबोधले जाऊ लागले. या पॅटर्नची रोपटी यंदा महाराष्ट्रात सर्वत्र वाढू लागली आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, ‘काँग्रेस पक्ष हा १९६ नगरपालिका निवडणुकांमध्ये 150 ठिकाणी स्वत:च्या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. मात्र राज्यभर दौरा करत असताना काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या पोस्टरवर शरद पवारांसोबत बाळासाहेब ठाकरेंचे छायाचित्र तर काही ठिकाणी घडय़ाळाबरोबर कमळ व धनुष्यबाणाचे चित्र पाहायला मिळाले. वैचारिक शुद्धताच आता राहिलेली नाही.’ यावरून महाराष्ट्राचे राजकारण राष्ट्रवादीने किती गढूळ केले आहे याचा प्रत्यय येतो.

राष्ट्रवादीचा असंगाशी संग बहुतांश ठिकाणी उघड-उघड तर उर्वरित अनेक ठिकाणी छुपा असल्याचे दिसून येते. याचे मासलेवाईक उदाहरण आपल्याला कोकणात दिसून येईल. कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे काँग्रेसचे पूर्णपणे वर्चस्व असल्याने तेथे राष्ट्रवादीने काँग्रेसशी आघाडी केली. कारण ती करणे अपरिहार्य होते. पण रत्नागिरीत केलेली आघाडी अगदीच तकलादू होती. रत्नागिरीत काँग्रेसशी राष्ट्रवादीने आघाडी केली खरी पण स्वत: या जिल्ह्याचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी बंडखोरी केली.काँग्रेस-राष्ट्रवादीने चिपळुणात आघाडी केली खरी पण आघाडीविरोधात असलेल्या शहर आघाडीत भास्कर जाधवांचा मुलगा सक्रिय होता. ज्या पॅनेलमध्ये स्वत:चा मुलगा आहे त्या पॅनेलमध्ये भास्कर जाधव नसले तरी त्यांची मदत मुलाला होणे हे उघड आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसने या बंडखोर पालकमंत्र्यावर काहीच कारवाई केली नाही, याचे आश्चर्य वाटते.
 सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नारायण राणे यांचे राजकीय वर्चस्व वाढल्यामुळे तेथील स्वकीयांनीच त्यांना विरोध करण्याचा पवित्रा घेतला. काँग्रेसचा खरा शत्रू घरातच असतो. बाहेर बघण्याची गरज नाही. तोच प्रकार सिंधुदुर्गात घडला. विजय सावंत आणि पुष्पसेन सावंत हे काँग्रेसमधील जुने कार्यकर्ते पण ते निष्ठावंत नव्हे. विजय सावंत हे शेकापमधून तर पुष्पसेन सावंत हे जनता दलातून आले आहेत. पण राणेंच्या आधी आलेले म्हणून त्यांनी विरोध करावा हे चुकीचे आहे. 


प्रसारमाध्यमांसमोर असंबद्ध आणि अविवेकी वक्तव्य करून त्यांनी वातावरण बिघडविले आहे. कार्यकर्ते संतापले. काहींनी सामानाची मोडतोड करण्यापर्यंत परिस्थिती चिघळली. राणेंच्या कार्यकर्त्यांनी अखेर संयम राखला.  मालवणमध्ये राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपशी छुपी युती केली. तर वेंगुर्ला आणि सावंतवाडीत राष्ट्रवादी, शिवसेना-भाजप एकत्र आले. नारायण राणे यांचे दिल्ली दरबारी राजकीय वजन वाढले की त्यांचे प्रतिस्पर्धी पाय खेचायला तयार असतात. त्यातूनच काँग्रेस अंतर्गत कलगीतुरे रंगतात. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आलेल्या नेत्यांकडून संदेश मिळतात, विरोधक सक्रिय होतात. या निवडणुकांमध्ये हाच प्रकार घडला आहे. अन्यथा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन आणि इतर उद्योगधंद्यांमध्ये पुढे येत असताना तसेच विकासकामात जिल्ह्याने आघाडी मारलेली असताना काँग्रेसमध्ये गटबाजीचे कारण नाही. तसेच पक्षविस्तारासाठी हापापलेल्या राष्ट्रवादीने राणोंच्या विरोधात कारस्थाने करण्याची गरज नव्हती. तरीदेखील राणे यांची विकासाची भूमिका आणि त्यांनी लोकांची आणि जिल्ह्याची केलेली कामे यामुळे  काँग्रेसची सरशी होण्याची शक्यता दिसते. 

3 comments:

Anonymous,  December 13, 2011 at 7:11 PM  

good Article

Daya Devil December 13, 2011 at 10:18 PM  

अतिउत्तम ......राही कोनाच्याबाजुने व कोनाच्याविरोधात लिहितात याचाच बोध होत नाही .....जय हो !

Daya Devil December 13, 2011 at 10:18 PM  

अतिउत्तम ......राही कोनाच्याबाजुने व कोनाच्याविरोधात लिहितात याचाच बोध होत नाही .....जय हो !

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP