ये सादगी..!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आल्यापासून त्यांचा साधेपणा सर्वाच्या लक्षात आला आहे. सभागृहातही त्यांचा वावर अत्यंत साधा असतो. सभागृहातील वातावरण कितीही तापलेले असले तरी विरोधकांच्या कोणत्याही प्रश्नाला ते अत्यंत शांतपणे आणि सविस्तर उत्तरे देतात. वक्तव्यांमध्येही राजकीय विधाने येणार नाहीत याची ते कटाक्षाने काळजी घेतात. त्यामुळे विरोधी बाकांवरील सदस्यांचे त्यांच्याबद्दल अत्यंत चांगले मत बनले आहे.
विधानसभेतील प्रश्नोत्तराचा तास संपला. सर्व प्रश्नांवर होणारी चर्चा ऐकणारे मुख्यमंत्री उठले आणि टेबलावरील कागदपत्रांची फाइल घेऊन सभागृहाबाहेर निघाले. मधेच फाइलमधील काही कागदपत्रे निसटून खाली पडली. मुख्यमंत्र्यांनी शांतपणे सर्व कागदपत्रे उचलली उभ्या उभ्याच ती पुन्हा फाइलमध्ये लावली आणि ते सभागृहाबाहेर पडले. हे सर्व अत्यंत शांतपणे घडले. सभागृहात त्यावर प्रतिक्रिया उमटली नसली तरी पत्रकार कक्षातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण यांच्याऐवजी दुसरी व्यक्ती असती तर हाच प्रसंग कसा घडला असता? एक तर सभागृहाबाहेर पडताना त्या मुख्यमंत्र्याने फाइल स्वत: उचलली नसती. मुख्यमंत्री उठताच इकडून तिकडून कर्मचारी पुढे सरसावले असते. मुख्यमंत्री निघताच त्यांच्यामागे निमूटपणे फाइल घेऊन ते चालले असते. समजा मुख्यमंत्री स्वत: फाइल घेऊन निघाले असते आणि कागद खाली पडले असते, तर आजूबाजूचे आमदार लगबगीने पुढे सरसावले असते आणि कागद गोळा करण्यासाठी त्यांच्यात लगबग सुरू झाली असती. इथे मात्र तसे काहीही घडले नाही. कारण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी प्रतिमा निर्माण केली आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आल्यापासून त्यांचा साधेपणा सर्वाच्या लक्षात आला आहे. सभागृहातही त्यांचा वावर अत्यंत साधा असतो. सभागृहातील वातावरण कितीही तापलेले असले तरी विरोधकांच्या कोणत्याही प्रश्नाला ते अत्यंत शांतपणे आणि सविस्तर उत्तरे देतात. वक्तव्यांमध्येही राजकीय विधाने येणार नाहीत याची ते कटाक्षाने काळजी घेतात. त्यामुळे विरोधी बाकांवरील सदस्यांचे त्यांच्याबद्दल अत्यंत चांगले मत बनले आहे. सभागृहातील वातावरण तापलेच, तर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच हे आता स्पष्ट झाले आहे. कारण पवारच विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले आहेत. अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतानाही विरोधकांनी जोरदार हंगामा केला. मुख्यमंत्र्यांबाबत मात्र विरोधक सौम्य असल्याचे दिसते. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे तर मुख्यमंत्र्यांना सर्व कागदपत्रे देण्याची तयारी दर्शवत आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांकडून अद्याप त्यांना ठोस काहीच मिळालेले नाही. कोणत्याही प्रकरणाबाबत बघतो, करतो, चौकशी करून सांगतो, अशीच उत्तरे त्यांना मिळत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबतही चौकशी करतो एवढेच उत्तर मिळाले असल्याने त्या प्रकरणाची तीव्रताही कमी झाली आहे. विरोधकांच्या हाती मात्र मुख्यमंत्र्यांनी काहीही पडू दिलेले नाही.
0 comments:
Post a Comment