Thursday, March 17, 2011

विरोधक चीत, सरकारची जीत


विरोधकांनी थॉमस प्रकरणी केलेला हंगामा बुधवारीही सुरू राहील, असे वातावरण निर्माण केले होते. परंतु, सत्तेचा भरपूर अनुभव असलेल्या सरकारने विरोधकांची चांगलीच दांडी गुल केली. विधानसभा अध्यक्षांनी एकीकडे शिस्तीचे धडे दिले तर संसदीय कार्यमंत्र्यांनी राजकीय डावपेच आखून विरोधकांचा असा ‘मामा’ केला की त्यांना शिस्तीत काम सुरू करावे लागले.

विरोधकांनी थॉमस प्रकरणी केलेला हंगामा बुधवारीही सुरू राहील, असे वातावरण निर्माण केले होते. परंतु, सत्तेचा भरपूर अनुभव असलेल्या सरकारने विरोधकांची चांगलीच दांडी गुल केली. विधानसभा अध्यक्षांनी एकीकडे शिस्तीचे धडे दिले तर संसदीय कार्यमंत्र्यांनी राजकीय डावपेच आखून विरोधकांचा असा‘मामा’ केला की त्यांना शिस्तीत काम सुरू करावे लागले.

विधानसभेचा अध्यक्ष म्हणजे सभागृहाचा हेडमास्तर असतो. दिलीप वळसे-पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून प्रत्येक वेळी आपल्या अधिकाराचा त्यानी योग्य वापर केल्याचे दिसले. ते तरुण असले तरी आपल्याला मिळालेले अधिकार,अनुभव आणि व्यासंग यांच्या बळावर त्यांनी कामकाजाचा ठसा पहिल्या वर्षातच सभागृहात उमटवला आहे. प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे पुढील कामकाज सुरळित पार पाडण्यात संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी विरोधकांना चर्चेत गुंतवून या प्रकरणी सभागृहात निर्माण झालेली कोंडी फोडली तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाशिवाय सभागृह चालू देणार नाही, अशा राणा भीमदेवी गर्जना करणा-या विरोधकांनाच या निवेदनासाठी काही दिवस सरकारला वेळ देण्यास राजीही केले. असे निवेदन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना पक्षश्रेष्ठींशीही सल्ला-मसलत करण्यास वेळ मिळाला. अनेक वर्षे संसदीय कार्यमंत्रिपदाचा अनुभव असल्याने राजकीय चाल चांगलीच यशस्वी झाली. त्यामुळे विरोधक चीत आणि सरकारची जीत, असे चित्र निर्माण झाले.

सरकार आणि विरोधकांची ही बैठक सुरू असतानाच विधानसभेत जीवनदायी योजनेतील 4 कोटी रुपये प्रलंबित असल्याचा प्रश्न चर्चेसाठी आला. ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी या प्रश्नावरून सार्वजनिक आरोग्यमंत्री शेट्टी यांना कोंडीत पकडले. देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी शेट्टी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो असे सांगू लागले. तेव्हा मनसे, शिवसेना, भाजप सदस्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. तेव्हाही वळसे-पाटील यांनीच आपली छडी दाखवून सर्वाना आधी आपल्या जागेवर जाण्यास सांगितले. त्यांनी इशारा देताच सदस्यही लगेच आपापल्या जागेवर बसले. मंत्री सुरेश शेट्टींना वाटले आपली सुटला झाली. मात्र वळसे-पाटलांच्या दांडपट्टय़ाने त्यांनाही सोडले नाही. शेट्टींना व्यवस्थित उत्तर देता आलेले नाही, असे सांगून त्यांनी हा प्रश्न राखून ठेवला. त्यावर विरोधी सदस्यांनी बाके वाजवून अध्यक्षांच्या समतोल भूमिकेचे स्वागत केले.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP