अंगणवाडीची साडी
अंगणवाडी सेविकांना देण्यात येणा-या साडय़ांतही घोळ होत असल्याचे उघड झाले असून त्यांना चांगल्या दर्जाच्या साडय़ा देण्याऐवजी त्यात घोळ आणि घोटाळे झाल्याचे प्रकरण विधानसभेत चांगलेच गाजले.
ग्रामीण भागातील बालक आपल्या जीवनातील पहिलं पाऊल टाकते ते अंगणवाडीमध्ये. तेथील अंगणवाडी सेविकांच्या हातात भारताचे भावी नागरिक जीवनातील पहिले धडे गिरवित असतात. अंगणवाडीतील ‘मावशी’ या बालकांच्या अत्यंत आवडत्या असतात. त्यांना मुळाक्षरे गिरवण्यास शिकविण्यापासून ते पोषण आहार देण्यापर्यंतची जबाबदारी या अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीसांकडेच असते. मात्र त्यांच्या समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचे दिसते. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनी यापूर्वी विधानभवनावर मोर्चेही आणले आहेत. असा संघर्ष केल्यानंतर त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या. मात्र त्यांना देण्याचे जे कबूल केले, ते त्यांच्यापर्यंत नीट पोहचतच नाही. अगदी त्यांना देण्यात येणा-या साडय़ांतही घोळ होत असल्याचे उघड झाले आहे. त्यांना चांगल्या दर्जाच्या साडय़ा देण्याऐवजी त्यात घोळ आणि घोटाळे झाल्याचे प्रकरण विधानसभेत चांगलेच गाजले.
खरं तर कोणत्याही महिलेला आपल्या पसंतीचीच साडी आवडते. अनेकदा नवऱ्याने आणलेली साडीही आवडत नाही. तिथे सरकारने घेतलेली साडी कशी आवडावी? अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना गणवेश म्हणून देण्यात येणा-या साडीचा रंग तरी किमान त्यांना विचारायला हवा होता. तोही विचारला नाही. गुणवत्ता नाही आणि रंगही नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष तर वाढलाच पण ज्या हातमाग महामंडळाने आणि आनंदी या खासगी संस्थेने साडय़ा पुरवल्या, त्यांनी त्यात घोळ केल्याचीही चर्चा सुरू झाली. हा खरोखरच घोटाळा होता, याचा पर्दाफाश सभागृहात झाला. महिला व बालविकासमंत्री वर्षा गायकवाड आणि राज्यमंत्री फौजिया खान या दोन्ही महिला असल्यामुळे त्यांनी त्यावर निर्णय दिला. साडीमागे दोनशे रुपये थेट अंगणवाडय़ांनाच देण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी पुरवणी मागण्यात तरतूद होणार की कोणत्या मार्गाने त्यांना पैसे मिळणार हे मात्र स्पष्ट झाले नाही.
0 comments:
Post a Comment