शिवसेनेची चंपी..
जैतापूर प्रकल्पावरून बिनबुडाचे आरोप करणा-या शिवसेनेची सोमवारी मुख्यमंत्र्यांनी चांगलीच चंपी केली. अनेक दिवस जैतापूर प्रकरणी वातावरण तापवण्याचा फुसका प्रयत्न करणा-या शिवसेनेचे विधानसभेत वस्त्रहरणच झाले.
जैतापूर प्रकल्पावरून बिनबुडाचे आरोप करणा-या शिवसेनेची सोमवारी मुख्यमंत्र्यांनी चांगलीच चंपी केली. अनेक दिवस जैतापूर प्रकरणी वातावरण तापवण्याचा फुसका प्रयत्न करणा-या शिवसेनेचे विधानसभेत वस्त्रहरणच झाले. जैतापूर येथे झालेल्या सभेच्या वेळी विरोधकांना उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दमदाटी केल्याचा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी अभिभाषणावरील चर्चेत केला होता. तसेच जैतापूर प्रकल्प घातक आहे, असा कांगावा त्यांनी केला. या दोन्ही मुद्यांचा मुख्यमंत्र्यांनी चोख समाचार घेतला तेव्हा शिवसेनच्या आमदारांचे तोंडच बंद झाले. ‘कुणालाही दमदाटी करण्यात आलेली नाही. मी तेथे उपस्थित होतो,’ असे त्यांनी ठणकावले. राणे यांची मुख्यमंत्र्यांनीच खंबीरपणे पाठराखण केल्यामुळे शिवसेना आमदारांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. मुख्यमंत्री आणि राणे यांच्यामध्ये ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करणा-या विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनाही परस्पर उत्तर मिळाले.
शिवसेनेचे मुखपत्र असणा-या ‘सामना’मधून बारमाही शिमगा सुरू असतो. जे दस-यासारख्या मंगल सणाला शिमगा करतात ते शिमग्याला कसे गप्प बसतील. काल धुळवड झाली आणि त्या मुहूर्तावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुलखात पगारी नेते संजय राऊत यांनी घेतली. ही मुलाखत कोणताही सुसंस्कृत माणूस आपल्या बायका-मुलांसमोर जाहीर वाचू शकत नाही. बीभत्स आणि अश्लील शब्दांचे प्रदर्शनच या मुलाखतीच्या प्रत्येक परिच्छेदात पहायला मिळतात. नेहमीप्रमाणेच गांधी-नेहरू घराण्यावर आगपाखड करण्याचा नतद्रष्टपणाही आहेच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ही मुलाखत प्रसिद्ध झालेली असली तरी यातील तथाकथित ज्वलंत विचार संजय राऊत यांच्याच मेंदू निघालेले असतात, हे आता शिवसैनिकांसह सर्वाना माहित झालेले आहे. म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या मुलाखती शिवसैनिक पूर्वी ज्या श्रद्धेने आणि आस्थेने वाचत होता, तशा तो आता वाचत नाही. कोणतेही औचित्य नसताना प्रसिद्ध झालेल्या मुलाखातीत लोकशाही आणि निवडणुकांवरच आपला विश्वास नसल्याचे शिवसेनाप्रमुखांच्या तोंडी घातलेले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविषयी तर अत्यंत हीन शब्दांचा वापर केलेला आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना ही मुलाखत प्रसिद्ध झाली असल्याने काँग्रेसचे विधान परिषद सदस्य हुसेन दलवाई आणि माणिकराव ठाकरे यांनी जोरदार आवाज उठवला. ही बाब औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे त्यांनी सभागृहात उपस्थित केली. ‘सामना’चा अंक सभागृहात फडकावत ते म्हणाले, ‘लोशाहीने दिलेल्या अधिकारामुळे आपण या सभागृहात आहोत. मात्र शिवसेनेला ही लोकशाहीच मान्य नाही.
शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीचे हेडिंगच इतके भयानक आहे की त्याची गंभीर दखल या सभागृहाने घेण्याची गरज आहे. ‘निवडणुका आणि लोकशाहीने या देशाचे वाटोळे’ केले, असे विधान या मुलाखतीत आहे. हा संपूर्ण लोकशाही व्यवस्थेचा अपमान आहे. मुख्य म्हणजे या मुलाखतीची भाषा अत्यंत बीभत्स आणि अश्लील आहे. आमच्या नेत्या माननीय सोनिया गांधी यांच्या विषयी या अंकात अत्यंत गलिच्छ शब्दांचा वापर आहे. शिवसेनाप्रमुखांची नेहमीचीच भाषा अशी राहिलेली आहे. त्यांचे आता वय झाले आहे, हे आपण समजू शकतो, परंतु कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांच्याकडून वदवून घेण्यासाठी जे गंभीर आणि गलिच्छ प्रश्न विचारले आहेत, ते अत्यंत आक्षेपार्ह आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे’
त्यानंतर प्रदेशाध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य माणिकराव ठाकरे यांनीही दलवाईच्या म्हणण्याला दुजोरा देत शिवसेनेला चांगलेच खडसावले. ‘तुमचा लोकशाहीवर, निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नाही, तर या सभागृहात कशाला बसता’ असा सवाल त्यांनी केला. ठाकरे बोलत असताना शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत यांच्यासह शिवसेना-भाजपचे सदस्य उभे राहिले. एकदा दलवाई यांनी औचित्याचा मुद्दा मांडलेला असताना ठाकरे यांना त्या विषयावर बोलताना येणार नाही,म्हणून गोंधळ घालायला सुरुवात केली. तेव्हा सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी ‘सोनिया गांधींचा अपमान करणा-यांचा धिक्कार असो, महिलांचा अपमान करणा-यांचा निषेध असो’ अशा घोषणा दिल्या.
0 comments:
Post a Comment