Monday, December 30, 2013

राहुल गांधींच्या लाँचिंगने नेते घायाळ !

आदर्शचे भूत राज्य सरकारच्या मानगुटीवर बसले होतेच, आता तर राहुल गांधींनी राज्य सरकारने फेटाळलेल्या अहवालाला विरोध करून या भुताला अधिक बलशाली केले आहे. या सर्व प्रकारामुळे राहुल गांधींचे खर्‍या अर्थाने लाँचिंग होणार की नाही, हा प्रश्न निराळा;

Monday, December 23, 2013

देवयानीला दलित कार्ड ठरवताहेत..!


भारत-अमेरिका संबंधावर प्रकाश टाकणारे आणि सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेणारे देवयानी खोब्रागडे अटक प्रकरण गंभीर वळण घेत असताना देवयानीला जातीपातीच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवण्याचा आणि दलित कार्डमधून तिचा राजकारणासाठी वापर करण्याचा संकुचित आणि पोरकट प्रकार घडू लागला आहे. 

Monday, December 16, 2013

लोकपाल हा प्रेषित नव्हे!

देशातील भ्रष्टाचार निपटून काढून स्वच्छ प्रशासन देण्याचा एकमेव पर्याय म्हणजे लोकपाल, असा अट्टाहास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी धरला. त्यासाठी पुन्हा एकवार उपोषणाचे हत्यार उपसले. तिकडे नवी दिल्लीत संसदेने लोकपाल विधेयक संमत करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या असतानाही अण्णांनी राळेगणसिद्धीत उपोषण करण्याचा निर्णय घेऊन तो अमलात आणला. त्यांच्या उपोषणाला चांगला प्रतिसादही मिळाला आणि आंदोलनाच्या रेट्यामुळे संसदेच्या चालू अधिवेशनातच विधेयक मंजूर करण्याचे जाहीर करण्यात आले. आंदोलन यशस्वी झाल्याची पावतीच मिळाल्यामुळे अण्णांनी समाधान व्यक्त केले. 

Monday, December 9, 2013

महाराष्ट्रात चमत्कार होणार का?

शीला दीक्षित यांनी चांगला कारभार करूनही केंद्रातील धोरणांचा, घोटाळय़ांचा, भ्रष्टाचाराचा परिणाम त्यांच्या निवडणुकीवर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तीन टर्म पूर्ण झाल्यानंतर चौथ्या टर्मसाठी जनमताचा कौल मिळेल का की इथेही चमत्कार होईल, हा प्रश्न असून चार राज्यांच्या निवडणुकीने आघाडी सरकारला धोक्याचा इशारा दिला आहे.

Monday, December 2, 2013

उसाच्या फडात रंगले राजकारण

उसाची पहिली उचल प्रतिटन ३000 रुपये मिळाली पाहिजे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. विशेष म्हणजे ३000 रुपयांऐवजी २६५0 रुपयांवर तडजोड झाल्याने उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. तर आंदोनल मागे घेण्याचे श्रेय कोणाला यावरून वादावादी रंगू लागली. २६५0 रुपये ऊस दरापैकी २२00 रुपये पहिल्या टप्प्यात व उर्वरित ४५0 रुपयांची मदत केंद्र व राज्य पातळीवर देण्यात यावी, असे ठरवण्यात आले आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी होणार्‍या बैठकीत ४५0 रुपयांपेक्षा अधिक रक्कम किती मिळणार याची शेतकर्‍यांना उत्सुकता आहे. मात्र त्याचबरोबर २६५0 वर तडजोड होताना उसाच्या फडात जे राजकारण झाले, त्याचीही चर्चा होऊ लागली आहे.

Monday, November 25, 2013

लैंगिक शोषणाचा तहलका

समाजातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार, गैरवर्तणूक, अत्याचार, शोषण यांचा सबळ पुराव्यानिशी पर्दाफाश करून गैरकृत्य वेशीवर टांगणार्‍या आणि देशभर खळबळ उडवून देणार्‍या 'तहलका'कारावरच अशा प्रकारचा आरोप झाल्याचे प्रकरण सध्या गरमागरम चर्चेचे विषय बनले आहे. तहलका मासिकाच्या तरुण तेजपाल नामक संपादकाने आपल्या कार्यालयातील २३ वर्षीय महिला पत्रकारावर बलात्कार केल्याचे प्रकरण पुढे आले आणि एकच 'तहलका' माजला. महिलांवरील अन्याय-अत्याचार-बलात्काराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कालच्या रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांची सुरक्षितता, अन्याय-अत्याचार आणि माध्यमांची संवेदनशीलता यावर महिला पत्रकार संघाने आयोजित परिषदेमध्ये बरेच विचारमंथन झाले.

Monday, November 18, 2013

नाही मनोहर तरी..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे भवितव्य काय? असा प्रश्न उभा राहणे साहजिक आहे. बाळासाहेबांचा करिश्मा आणि त्यांचा जनमानसावर असलेला प्रभाव यामुळे संघटना मजबूत झाली होती. मित्रपक्ष भाजपाच्या सहकार्याने का होईना, पण महाराष्ट्रात प्रथमच विरोधी पक्षाचे सरकार आणण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. बाळासाहेबांसारखा वैयक्तिक प्रभाव शिवसेनेच्या अन्य कोणत्याही नेत्यांमध्ये नसल्यामुळे एकचालकानुवर्ती असलेली शिवसेना भविष्यकाळात टिकून राहू शकेल का? असा प्रश्न पडतो. बाळासाहेबांची आक्रमकता, परखडपणा आणि ठाकरी भाषा हे गुण राज यांच्यामध्ये असल्यामुळे शिवसैनिक आणि मोठय़ा प्रमाणात तरुण वर्ग मनसेकडे आकर्षित झाला. त्यामुळे शिवसेनेची घसरण होत राहिली, ती रोखण्याची ताकद उद्धव यांच्या शांत मवाळ व्यक्तिमत्त्वात नाही. ठोकशाहीवर उभ्या असलेल्या शिवसेनेचा कायापालट होऊन ती सत्तेनंतर लोकशाही पद्धतीनुसार टिकविण्याचा प्रय▪फारसा यशस्वी झाला आहे, असे दिसत नाही.

Monday, November 11, 2013

सत्ताधारी आघाडीत मुख्यमंत्र्यांची सरशी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात येऊन आज तीन वर्षे पूर्ण झाली. 'आदर्श'घोटाळ्याने राज्याची प्रतिष्ठा धोक्यात आल्यामुळे स्वच्छ प्रतिमा, शिस्त व अभ्यासू वृत्ती असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना येथे पाठवण्यात आले. दिल्लीच्या वातावरणात रुळलेल्या मुख्यमंत्र्यांचा सुरुवातीचा बराच वेळ काम समजून घेण्यात गेला, अभ्यासाने आकलन होत गेले आणि मुख्यमंत्र्यांनी कामाला सुरुवात केली. 

Monday, November 4, 2013

दिवाळीची निराळीच आतषबाजी!


देशभर दिवाळीची धूम सुरू आहे. दिव्यांच्या रोषणाईबरोबरच फटाक्यांच्या आतषबाजीने अवघा आसमंत प्रकाशमान झाला आहे. शुक्रवारी सेन्सेक्सने विक्रमी उसळी मारून रेकॉर्डब्रेक केला असताना रविवारच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी फटाक्यांनी उच्चांक गाठला. इकडे राजकारणात खास 'लक्ष्मीपूजन' आणि एका पाठोपाठ होणारे शाब्दिक स्फोट यामुळे वातावरण गरमागरम झाले आहे.

Monday, October 28, 2013

कांदा करणार आघाडीचा वांदा

'तुझे माझे जमेना; पण तुझ्यावाचून करमेना' या उक्तीनुसार एकत्र असलेल्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कांद्याने चांगलेच वांदे करून ठेवले आहेत. दिल्लीसह पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना कांद्याने केंद्र आणि राज्यातील आघाडी सरकारच्या नाकात दम आणला आहे. 

Monday, October 21, 2013

घरचं झालं थोडं..

शिवसेनेत अस्वस्थता आहे. निवडणुका समोर असतानाही दसरा मेळाव्यात नेहमीप्रमाणे भाजपा नेते गोपीनाथ मुंडे आणि रामदास आठवले यांना निमंत्रित केले नाही, यावरून रामदासांनी बोध घेतलेला बरा.

Monday, October 14, 2013

सुने सुने शिवतीर्थ.!

गर्व से कहो हम हिंदू है', 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व', 'हिंदूंच्या वाटेला जाल तर खबरदार', असा इशारा बाळासाहेबांनी शिवतीर्थावर दिला होता. मशीद पाडली तरी चालेल; पण देश वाचला पाहिजे, पाक क्रिकेटपटूंना हिंदुस्थानात पाय ठेवू देणार नाही, जे जे हिंदूंना विरोध करतील त्यांना गाडले जाईल, असे प्रक्षोभक शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले की, शिवसैनिकांचे रक्त सळसळत असे आणि 'जय भवानी, जय शिवाजी' अशा जोशपूर्ण घोषणा दिल्या जात.

Monday, October 7, 2013

महाराष्ट्रात लालू-चौटाला आहेत कुठे ?

राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांचे राजकियीकरण हा लोकांना आक्षेपार्ह वाटणारा राजकारणातील प्रकार सर्वच राजकीय पक्षांना मान्य झाला आहे. देशातील प्रस्थापित राजकारण्यांनीच या प्रकाराला राजमान्यता दिली आहे. भ्रष्टाचाराला आणि गुन्हेगारांना प्रतिष्ठा देण्याचे काम गेल्या २0-२५ वर्षांमध्ये अधिक जोमाने सुरू झाले. 

Monday, September 30, 2013

कॉमन मॅन हाच राहुल गांधींचा अजेंडा

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने कलंकित लोकप्रतिनिधींना अभय देणारा काढलेला वटहुकूम फाडून फेकून देण्याच्या लायकीचा असल्याचे आक्रमक वक्तव्य करणारे राहुल गांधी भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न पाहू लागले आहेत. तसेच गोरगरीबांना विश्‍वास देण्याचा प्रय▪करू लागले आहेत. कॉँग्रेचे ते भावी पंतप्रधान आहेत की नाही, हे स्पष्ट झालेले नाही आणि राहुल गांधींनाही कसली घाई झालेली नाही. याचा प्रयत्य गेल्या सप्ताहात आला.


Monday, September 23, 2013

राजकारण्यांना व्हायचंय क्रिकेटसम्राट!

महाराष्ट्रातील राजकारणात सहकारसम्राट, उद्योगसम्राट, साखरसम्राट, शिक्षणसम्राट यांची काही कमी नाही. त्यात आता क्रिकेटसम्राटांची भर पडू लागली आहे. सर्व राजकीय पक्षांमधील जो तो नेता क्रिकेटसम्राट होण्यासाठी धडपड करू लागला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे राजकीय खेळय़ा करण्यात तरबेज असल्यामुळे त्यांना खेळाचे कोणतेही क्षेत्र वज्र्य नाही. राजकारणातील खेळय़ांप्रमाणे सर्व खेळ क्षेत्रांमध्ये ते लिलया वावरत असतात. त्यामुळे त्यांनी क्रिकेटमध्ये रस घेणे समजू शकते; पण आज जो तो नेता उठतो आणि क्रीडा क्षेत्रातील संघटना ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. सर्व क्षेत्रांत राजकारणी असलेच पाहिजेत, असा अट्टाहास ते करू लागले आहेत. खो-खो, कबड्डी, कुस्ती यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त क्रिकेटप्रेम वाढू लागले आहे. क्रिकेटएवढा पैसा अन्य खेळांमध्ये नसल्यामुळे त्या खेळांना दुय्यम स्थान दिले जात आहे. कोणतेही क्षेत्र सर्वसामान्य क्रीडाप्रेमींसाठी मोकळे सोडायचे नाही, या निर्धाराने राजकारण्यांचा सर्वत्र संचार होऊ लागला आहे. भरपूर पैसा कमावण्याचा सोपा मार्ग क्रिकेटच्या मैदानातून जात असल्यामुळे या लोकांनी क्रिकेट संघटना ताब्यात घेण्याचा चंग बांधला आहे. क्रिकेट सेवा हीच जणू काही जनसेवा आणि क्रिकेटप्रेम हे राष्ट्रप्रेम असल्याच्या थाटात राजकारणी वावरू लागले आहेत.

Monday, September 16, 2013

बाबांचा चकवा, राष्ट्रवादीलाच लकवा

आपल्यावर टीका करणार्‍या नेत्यांना त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देण्याऐवजी कृतीने त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले असल्याने त्यांची प्रतिमा उजळून निघाली आहे हे निश्‍चित. राष्ट्रवादीला चकवा देत त्यांची नियमबाह्यकामे बाजूला सारण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीने राष्ट्रवादीलाच लकवा झाल्याचे चित्र दिसत आहे.

Monday, September 9, 2013

सरकारची प्रलोभने आणि आजोबाची गोष्ट


लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर सरकारविरोधी वातावरण तयार होऊ लागते. आघाडी सरकारला सत्तेत येऊन १४ वर्षे झाली. या १४ वर्षांत मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यात आले नाही.

Monday, September 2, 2013

'नाहीरें'साठी सोनियांची विधायक क्रांती

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्याची क्षमता असलेल्या या भागातील दुर्बल घटकांना जर योजनेबाहेर ठेवावे लागले, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था काय होईल, याची चिंता सत्ताधार्‍यांना लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री चव्हाण यांनी दीड कोटी जणांना अन्न सुरक्षा कवच देण्यासंदर्भात मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीने आढावा घेऊन निर्णयाप्रत येण्यास किमान दोन महिन्यांचा अवधी लागेल.

Monday, August 26, 2013

सावधान! सनातन 'शक्ती' वाढतेय..

बहुजन आणि अभिजन वारकरी अशा दोन वर्गांत वारकरी विभागले आहेत. बहुजन वारकर्‍यांनी संत तुकारामांच्या शिकवणुकीप्रमाणे कायम अंधश्रद्धेविरुद्ध भूमिका घेतली आहे. संत तुकाराम म्हणतात, 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, शेंदरी हेंदरी दैवते, कोणी ती पूजते भूतेखेते' या विचारांवर श्रद्धा असणारे वारकरी अंधश्रद्धा विधेयकाला विरोध करतील का?

Monday, August 19, 2013

दीडशे वर्षांपूर्वीचा पुरोगामी द्रष्टा

सयाजीराव महाराजांनी जर त्या वेळी उच्च शिक्षणासाठी मदत केली नसती तर बाबासाहेब महामानव घडलेच नसते आणि भारत देशाचे आजचे चित्र वेगळेच झाले असते. परंतु सयाजीराव महाराज हे द्रष्टे राजे होते. अस्पृश्यता निवारणावर त्यांचा सर्वाधिक भर होता.

Monday, August 12, 2013

महिलांनो, व्हावे स्वातंत्र्यासाठी दुर्गा!

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्याप्रमाणे महिलांना ५0 टक्के आरक्षण दिले, त्याचप्रमाणे विधिमंडळे व संसदेतही दिले पाहिजे. उत्तर प्रदेशातील दुर्गाशक्तींच्या मागे जशी सर्वांनी शक्ती उभी केली, तशी शक्ती सर्व महिलांच्या मागे उभी केली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर ६५-६६ वर्षांनीदेखील महिलांचा आवाज बुलंद होऊ शकत नाही, ही विषमता दूर करण्यासाठी आता महिलांनीच संघटितपणे दुर्गा बनून उभे राहिले पाहिजे.

Monday, August 5, 2013

शोभायात्रेत हरवले सर्वांचे भान

छोट्या राज्यांमध्ये गोरगरीब मागास समाज घटकांसाठी संघटनांनी आवाज उठवला तर त्याची दखल घेतली जाईल आणि त्यांना न्याय मिळवून देणे सोपे होईल; परंतु भावनिक राजकारण करणार्‍यांचे भान हरवले आहे, त्यांना वास्तवाची जाण करून देणे गरजेचे आहे.

Monday, July 29, 2013

बिल्डरशाहीचा दबाव झुगारून लोकाभिमुख कामांना प्राधान्य

पुणे/राही भिडेराजकारणी आणि बिल्डरांचा दबाव झुगारून देत लोकाभिमुख कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करतानाच आजपर्यंत करोडो रुपये खर्च करूनही महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला कसा नाही, असा रोखठोक सवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांना विकासाच्या मुद्दय़ांवर आव्हान देऊन त्यांचा पर्दाफाश करण्याचे सूतोवाचही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

एक तुतारी द्या मज आणूनि..

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि वेगवेगळय़ा राजकीय पक्षांत तुतार्‍या वाजू लागल्या. प्रत्येक राजकीय पक्षात तुतारी वाजवण्याची चढाओढ चालू झाली 'एक तुतारी मज आणूनि, फुंकीन जी मी स्वप्राणाने..' या केशवसुतांच्या कवितेच्या पंक्तींची आठवण व्हावी असा प्रकार प्रत्येक पक्षात सुरू झाला आहे. कधी स्वबळावर लढण्याची भाषा तर कधी आघाडी आणि युतीची भाषा कधी तुतारीचे संवादी सूर तर कधी विसंवादी कधी दोन विरोधी राजकीय पक्षांच्या तुतार्‍यांचे विसंवादी दूर तर कधी एकाच पक्षात असूनही विसंवादी सुरांच्या तुतार्‍या. गंमत म्हणजे प्रत्येकाला वाटते बाजी मीच मारणार कुस्तीगिराने शड्ड ठोकताना पूर्ण ताकद पणाला लावावी; पण कधी शड्ड ठोकण्यासाठी उतरले आणि दवाखान्यात दाखल झाले अशी परिस्थिती उद्भवू शकते. मात्र सध्या तरी प्राणपणाने तुतार्‍या फुंकण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत.


Saturday, July 27, 2013

मोदींचा बहुमताचा दावा फोल!

पुणे / राही भिडे : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला २५0 जागा मिळवून देतील, असा प्रचार सुरू असला तरी भाजपला बहुमत मिळवून देण्याचा मोदींचा दावा फोल असून, बहुमताजवळ त्यांना जाता येईल असे वाटत नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. सध्यातरी त्रिशंकू लोकसभेचे चित्र दिसत असल्याने चमत्काराची शक्यता वाटत असली तरी देशाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती पाहता स्थिर सरकार असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

Monday, July 22, 2013

बारबाला होणार सरकारच्या भारबाला

ज्या नैतिकतेच्या कारणास्तव आबांनी डान्स बारवर बंदी आणली त्याच्या मूळ उद्देशालाच पोलिसांनी हरताळ फासला. सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्यासाठी नैतिकतेला महत्त्व देणारी आदर्शवादी भूमिका आर. आर. पाटील यांनी घेतली; पण मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसर तसेच पूर्व द्रुतगती आणि पश्‍चिम द्रुतगती मार्गावर बेकायदेशीर डान्स बार सुरूच होते.

Monday, July 15, 2013

'मोदी' गणपतीच्या प्रतिष्ठापनेची घाई!

हिंदू राष्ट्रवादीच्या प्रचाराचा आलेख वर जाण्याऐवजी धप्कन खाली केव्हा घसरला हे मोदींनाही कळणार नाही. हिंदू राष्ट्रवादी हा गुजराती राष्ट्रवादी आणि नंतर ओबीसी राष्ट्रवादी एवढा संकुचित होऊ शकतो. अशा प्रकारची संकुचित प्रवृत्ती असलेली व्यक्ती जर पंतप्रधानपदावर जाण्याचा निर्धार करीत असेल तर धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभावाचे काय होणार?

Monday, July 8, 2013

सांगलीची तोंडपाटीलकी..

सांगलीच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल, तर कॉँग्रेसने मदन पाटील आणि प्रतिक पाटील या वसंतदादांच्या वारसदारांना ताकद दिली पाहिजे. कौटुंबिक मतभेद बाजूला सारून त्यांनी चांगले काम सुरू केले आहे. सांगलीत निवडणुकीच्या निमित्ताने जे तोंडपाटीलकीचे दर्शन घडले तशी तोंडपाटीलकी दादांच्या वारसदारांकडून होण्याची शक्यता नाही. आघाडीच्या नेत्यांचा ताल आणि तोल कसा गेला आहे, हे महाराष्ट्राने पाहिले. आता सावरासावरदेखील करमणूक प्रधान असेल, याबाबत शंका नाही.

Monday, July 1, 2013

'टाळी'ची टाळाटाळ अटळ.!

मोदींचे 'रामराज्य' आणि 'सुशासन' यामुळे धर्मनिरपेक्षता कशी टिकणार आणि सुशासन आणण्याइतके मोदींचे स्वत:चे राज्य तरी आदर्श आहे का? याचेही भाजपाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. शिवछत्रपतींचे रयतेचे राज्य आणि त्याआधारे हिंदवी स्वराज्याची संकल्पना मोदींनी मांडली असती तर गोष्ट निराळी; परंतु रामराज्याची कल्पना भारतीय राज्यघटनेलाच मान्य होणारी नसल्याने मोदींच्या कथित रामराज्यात धर्मनिरपेक्षतेची ऐशीतैशी होणार याबाबत शंका नाही.

Monday, June 24, 2013

शुकशुकाटात शुऽकशुऽक..

धर्मनिरपेक्ष कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सोडून आठवलेंनी हिंदुत्ववाद्यांना शिवशक्ती-भीमशक्तीच्या नावाखाली जवळ केले, मात्र कधी शिवसेनेचे हिंदुत्व मान्य असल्याचे सांगत आहेत, तर दुसर्‍याच दिवशी मान्य नसल्याचा खुलासा करत आहेत. स्वत:बरोबर कार्यकर्त्यांनाही संभ्रमात टाकण्याचे काम आठवले करत असल्यामुळे आता त्यांना बडबड बंद करा, असे सांगण्याची वेळ आली आहे.

Monday, June 17, 2013

बंधार्‍यात पाणी, प्रकल्पात माती..!

यंदा पावसाळा वेळेवर सुरू झाला असला तरी तो पूर्वीसारखा चार महिने पडेलच, अशी शक्यता नाही. ऋतुचक्र बदलले असल्यामुळे पाऊसदेखील लहरी झाला आहे. केव्हा पडेल आणि केव्हा गडप होईल, याचा काही नेम नाही. त्यामुळे जे पाणी पडेल त्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची काळजी सर्वांनाच घ्यावी लागेल. 

Monday, June 10, 2013

शरद पवारांची स्वच्छता मोहीम

मनी आणि मसल पॉवरच्या जोरावर राजकारणात यशस्वी होऊ शकतो, अशी राजकारण्यांची मनोधारणा बनली आहे. मतांसाठी जातींची गणिते जुळवायची, मतदारांसमोर पैसा ओतायचा आणि एकगठ्ठा मते निश्‍चित करून ठेवायची, त्यातून निवडून यायचे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दुष्टचक्र राजकारणात सुरू झाले आहे; परंतु त्यामुळे जे वैयक्तिक नुकसान होते ते न भरून निघणारे असेल. पवारांच्या पक्षात नेमके हेच झाले आहे. ते निस्तरण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे.

Monday, June 3, 2013

आंबेडकरांची महाआघाडी, आठवलेंची महाबिघाडी

दलित, शोषित, वंचित, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि सत्तेपासून कायम दूर ठेवलेल्या समाज घटकांना एकत्र करून भारिप-बहुजन महासंघ त्यांनी स्थापन केला. या पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष राजकीय ताकद मिळवून देऊ शकतो, हे त्यांनी अकोला पॅटर्नने सिद्ध केले आहे. इतर नेत्यांना कॉँग्रेसने वापरून घेतले आणि चळवळीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. आंबेडकर-आठवले वगळता अन्य गटातटांचे फारसे अस्तित्व उरलेले नाही.

Monday, May 27, 2013

शरद पवारांचा मुस्लीम नारा!


१९९५ सालची विधानसभा निवडणूक पवार यांच्या नेतृत्वाखाली झाली होती; पण मुस्लिमांनी त्यांना मते दिली नाहीत. उलट मुस्लिमांची वस्ती असलेल्या मुंबईतल्या अनेक मतदारसंघात शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार विजयी झाले होते. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी त्यांना विश्‍वास देणे गरजेचे आहे; पण विश्‍वास आणि शरद पवार हे समीकरण जुळत नाही, हे सर्वांना माहीत आहे.पुरोगामित्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारण करणार्‍या शरद पवारांनी मुस्लीम अल्पसंख्याकांचे तारणहार असल्याचा संदेश देण्यासाठी मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनचा आधार घेतला आहे. कठीणसमयी माणसे मिळेल तो आधार घेत असतात. मुस्लीमबहुल मुंब्रा येथे जाऊन नागरिकांना सर्वसमस्यामुक्त करण्याचे आश्‍वासन देऊन त्यांनी तेथून स्लो लोकल पकडली आणि कळवा गाठले. दलित मुस्लीम ही काँग्रेसची व्होट बँक असून ही व्होट बँक आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी सतत वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. 

Monday, May 20, 2013

आकाश फाटलंय, ठिगळं कुठे लावणार?

कोणत्याही नेत्यावर आरोप झाले की राजकारणातल्या शहकाटशहाचा हा परिणाम असल्याचे निगरगट्टपणे सांगितले जाते; परंतु समाजहितासाठी, लोकांच्या करांमधून जमा झालेला सरकारी पैसा हडप करून तो स्वत:च्या लॉकरमध्ये ठेवायचा. पत्नी, मुलांच्या, नातेवाइकांच्या नावावर ठेवायचा. दागदागिने, जमीनजुमल्यात गुंतवायचा. अशा भ्रष्टाचार्‍यांना कठोर शासन करण्याची भूमिका घेण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार होतो, तेव्हाच धूर निघतो आणि कुठेतरी आग असल्याचा संशय वाढतो.

Monday, May 13, 2013

मुख्यमंत्री महाराष्ट्रात स्वस्थ, विरोधक अस्वस्थ


कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाचा दणदणीत पराभव केला. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या भाजपा सरकारला खाली खेचून तेथील जनतेने काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मते टाकली. या निवडणूक निकालानंतर चार राज्यांच्या आगामी निवडणुका, लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये काय होईल, याची चर्चा सुरू झाली. सर्वच प्रसिद्धीमाध्यमे आणि राजकीय पंडितांनी कर्नाटकच्या निकालावरून पुढील निकालाचा अंदाज बांधणे योग्य नसल्याचा निर्वाळा दिला आहे. 

Monday, May 6, 2013

शासन-प्रशासन शीतयुद्ध सुरूच

मुख्यमंत्री चव्हाण यांना भ्रष्टाचार दूर करावयाचा असल्याने त्यांना कामाची एकूण पद्धत बदलायची आहे. भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही असे नियम करायचे आहेत. त्यामुळे कामांना विलंब होत असून, आपले काम सद्सद्बुद्धीने चालले असल्याने मुख्यमंत्री समाधानी असतीलही; पण सर्वत्र शीतयुद्ध सुरू आहे.


Monday, April 29, 2013

निवडणुकीत शरद पवारांची सत्त्वपरीक्षा

मागील लोकसभा निवडणुकीआधी शेतकर्‍यांना हजारो कोटींचे पॅकेज दिले. सवलती दिल्या पण मतांमध्ये परावर्तीत झाले नाही. या वेळी ऐन दुष्काळातही मागेल त्याला मदत करण्याचे धोरण ठेवले आहे. पण कुठेच चैतन्य दिसत नाही. त्या तुलनेत शांतपणे बसलेल्या काँग्रेसचा आलेख राष्ट्रवादीच्या पुढे गेला आहे. त्यामुळे काँग्रेसला मागे सारून राष्ट्रवादीला पुढे नेण्याची सत्त्वपरीक्षा पवारांना या वेळी द्यावी लागणार आहे. अपेक्षेप्रमाणे खासदार निवडून आले नाहीत तर तिसर्‍या, चौथ्या आघाडीचे प्रयोग करणार कसे.

Sunday, April 21, 2013

बेलगाम बिल्डरांना दाखवा कायद्याचा बडगा!

महाराष्ट्र सरकारने बिल्डरांच्या मनमानीला लगाम घालण्याकरिता महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. टेलिफोन नियामक प्राधिकरण, विमान नियामक प्राधिकरण, वीज नियामक प्राधिकरण अशा प्रकारांची सेवा पुरवठादारांवर निर्बंध आणणारी प्राधिकरणे आहेत. त्याप्रमाणे बिल्डरदेखील सेवा पुरवठादार असल्याने त्यांनाही स्वतंत्र प्राधिकरणाखाली आणले पाहिजे. 

Monday, April 15, 2013

मानेंनी ओलांडली लक्ष्मणरेषा

पहिली तक्रार होताच मानेंनी पोलीस ठाण्यात जायला हवे होते. तसे न करता त्यांनी स्वत:बद्दल संशय वाढवून ठेवला. सामाजिक भान न ठेवता त्यांनी असहाय्य महिलांशी अश्लाघ्य वर्तन करून सर्व र्मयादांचे उल्लंघन केले आहे. सार्वजनिक जीवनातील पद्मश्रीसह सर्व प्रकारचे मानसन्मान त्यांना मिळाले, पण ते लक्ष्मणरेषा विसरले. भटक्या-विमुक्त समाजातील मानेंचे जन्मगाव नेमके कुठले आहे, त्याचा पत्ता नाही. आज मात्र ते महाराष्ट्रात सगळीकडेच 'उपरा' ठरले आहेत.

Monday, April 8, 2013

कॉँग्रेसचे जनताजनार्दन चांदूरकर..



मुख्यमंत्री चव्हाण, मुंबई कॉँग्रेस अध्यक्ष चांदूरकर आणि महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व पाहता निवडणुकीच्या राजकारणात ते कसा काय प्रभाव पाडतील, हा प्रश्नच आहे. हे तीनही नेते कॉँग्रेससाठी उपयोगाचे नाहीत तर त्यांना आणले कशासाठी?सव्वाशे वर्षांची परंपरा आणि राजकारणाचा सर्वाधिक अनुभव असलेल्या कॉँग्रेसने अशी माणसे मोक्याच्या ठिकाणी कशासाठी बसवली आहेत.

Monday, April 1, 2013

सुरेशदादांच्या जामिनासाठी टाहो..


करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेले सुरेश कलमाडी, ए. राजा, कन्नीमोळी यांच्यासारखे मंत्री तुरुंगातून बाहेर येतात आणि सुरेश जैन हे बहिणीच्या अंत्यसंस्काराला बाहेर येऊ शकत नाहीत, याची खंत त्यांचे अनेक नातेवाईक बोलून दाखवत होते. सुरेशदादा दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्यांना हवी ती शिक्षा द्या; पण किमान जामिनावर सोडा. त्यांना जामिनावर सोडल्यावर महाराष्ट्रात राहू देऊ नका. दुसर्‍या राज्यात पाठवा; पण त्यांना सोडा!

Monday, March 25, 2013

गांधीगिरी.. लगे रहो

सर्वोच्च न्यायालयाने दिलेली शिक्षाही केवळ स्फोट घडवणार्‍या हातांना दिलेली आहे. मेंदू अद्यापि देशाबाहेरच आहे. त्याला अटक करण्यासाठी सर्वांनी आवाज उठविला पाहिजे. दबाव निर्माण केला पाहिजे. पण ते सोडून संजूबाबाची शिक्षा माफ करण्यासाठी आकांत सुरू आहे. त्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याने भोगावी, तावून-सुलाखून बाहेर यावे, गांधीगीरी सिनेमात नव्हे प्रत्यक्षात आचरणात आणावी, अशी लोकांची अपेक्षा आहे.

Monday, March 18, 2013

संमतीचं सोळावं.. मोक्याचं की धोक्याचं?

भारतीय संस्कृतीमध्ये सोळावं वरीस धोक्याचं असे सर्रास मानले जाते. या वयात मुलींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे याकरिता पालकांकडून आणि घरातील वडीलधार्‍यांकडून विशेष काळजी घेतली जाते. घरातली, नात्यागोत्याची, आजूबाजूची वडीलधारी मंडळी जास्त शिकलेली नसली, अशिक्षित असली अथवा आधुनिक विचारांची नसली तरी कुटुंब व्यवस्था चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवण्यासाठी लागणारे शहाणपण त्यांच्या ठायी निश्‍चितपणे असते. 

Monday, March 11, 2013

महिलादिनी उपेक्षित महिलांचा आक्रोश

जागतिक महिला दिनाचे निमित्त साधून विविध कार्यक्रमांची रेलचेल अजूनही सुरू आहे. सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, खास महिलांसाठी असलेल्या सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये यामध्ये महिला दिनाच्या कार्यक्रमांचा धुमधडाका सुरू आहे. 


Monday, March 4, 2013

पवार-ठाकरे फॅमिलीची सेकंड इनिंग

राज ठाकरेंना खरोखरच महाराष्ट्राची सत्ता घ्यायची असेल तर करमणुकीवर भर देऊन चालणार नाही. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उंचीवर टिप्पणी करून गृहमंत्री आले कुठे, गेले कुठे कळत नाही, अशा प्रकारे व्यक्तिगत टीकाटिप्पणी केली आणि खिल्ली उडवली तर लोक एक-दोन वेळा हसतील. कायम हसत राहणार नाही.

Monday, February 25, 2013

कदम, कदम बढाये जा..


राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. गावे ओसाड होऊ लागली आहेत. शहरांमध्ये स्थलांतर होऊ लागले आहे. मुंबई-पुणे शहरांमध्ये डोक्यावर गाठोडे घेतलेले, विसाव्याला रस्त्याच्या कडेला टेकलेले खेडूत दिसू लागले आहेत. बाया बापुडे, मुलंबाळे पाण्यासाठी वणवण करू लागले आहेत, पिण्याचे पाणी आणि उदरभरणासाठी चार घास कसे मिळतील याच्या विवंचनेत या लोकांची भ्रमंती चालू आहे. 

Tuesday, February 19, 2013

दुष्काळाचाही होतोय 'इव्हेंट'

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पिण्याचे पाणी 15-15 दिवस मिळत नाही, अशी भयावह परिस्थिती आज फेब्रुवारी महिन्यातच निर्माण झाली आहे. मार्च, एपिल्र, मे हे पुढील तीन महिने कडकडीत उन्हाळय़ाचे त्यातच 'नेमेचि येतो पावसाळा' हा वाक्प्रचार ग्लोबल वॉर्मिगने खोटा ठरवला आहे. त्यामुळे जून महिन्यातही नेहमीप्रमाणे पाऊस पडेल याची शाश्वती नाही. अशावेळी राजकारण्यांनी आणि विशेषत: राज्यकत्र्यांनी परिस्थिती अधिक गांभिर्याने हाताळण्याची गरज आहे. 

Monday, February 11, 2013

'ताईगिरी'ने केली आघाडीत बिघाडी!

महिलांनी पूर्वीच्या मराठी चित्रपटातील नटय़ांप्रमाणे सोज्वळ, विनम्र, रडूबाई राहावे, अशी अपेक्षा नाही. आज महिला बंडखोर, सक्षम, स्वाभिमानी बनल्या आहेत. त्याचबरोबर दुसर्‍यांचाही आदर केला पाहिजे. नेता बनू इच्छिणार्‍या महिलांवर तर जास्त जबाबदारी आहे; पण रेडीमेड नेत्यांना याचे भान राहत नाही.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना मिळालेले 50 टक्के आरक्षण, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मिळालेले बळ आणि शैक्षणिक प्रगतीमुळे महिलांची विविध क्षेत्रात सुरू असलेली घोडदौड यामुळे महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण आणि पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची क्षमता याचा सर्वत्र बोलबाला सुरू झाला आहे. 

Monday, February 4, 2013

आता राजकारण्यांचे वर्‍हाड लंडनला!

राजकारण्यांनी व्यक्तीकेंद्री किती व्हावे याचे भान राखले पाहिजे. इंग्लंड, अमेरिकेत जाऊन बेनामी मालमत्ता खरेदी करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. पुण्याचे नानासाहेब गोरे हे लंडनमध्ये उच्चायुक्त असतानाही तिथे पायीपायी फिरत असत, आजचे राजकारणी मतदारसंघात हेलिकॉप्टर शिवाय जात नाहीत.प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे 'वर्‍हाड निघलंय लंडनला' हे नाटक महाराष्ट्रातच नव्हे तर देश-परदेशात चांगलेच गाजले. ज्येष्ठ नाटककार आणि नाटय़संमेलनाचे माजी अध्यक्ष असलेल्या प्रा. देशपांडेंनी आपल्या हयातीत निर्माण केलेल्या अनेक नाटय़कृतींमध्ये 'वर्‍हाड.' सर्वाच्या कायम स्मरणात राहिले आहे. 

Monday, January 14, 2013

दोन दादा रोखठोक, काम चोख

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात वाद वाढत चालले आहेत. मंत्रिमंडळाची एकही बैठक वादविवाद, मतभेद आणि भांडणाशिवाय पार पडत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यापासून वादविवादाला तोंड फुटते आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लगेच वनमंत्री काँग्रेसचे डॉ. पतंगराव कदम पुढे सरसावतात. त्यापाठोपाठ इतरांना खुमखुमी आल्याशिवाय राहत नाही. 


Monday, January 7, 2013

सर्वाधिक बलात्कार भारतात, इंडियात नव्हे!


भारतीय संस्कृतीचे आपणच ठेकेदार असल्याचा आव आणणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पितळ उघडे करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सरसंघचालक मोहन भागवत यांनीच हाती घेतलेले दिसते. भारतीय संस्कृतीचे रक्षणकर्ते आपणच आहोत, अशी शेखी मिरवणार्‍या संघाला देशभरात नव्हे, आपल्या राज्यात आणि आपल्या मुख्यालयाच्या आसपास काय चालू आहे, कशा दुर्घटना घडत आहेत. याची जाणीव होत नाही. जुनाट परंपरेचे जोखड त्यांच्या मानेवर एवढे घट्ट बसले आहे की, डोळय़ावर झापड बांधून हवे तेवढेच पाहायचे, चौकटीबाहेर पडायचे नाही, आपले सोडून इतरांकडे दुर्लक्ष करायचे, त्यांना तुच्छ समजायचे या मानसिकतेतून हे लोक बाहेर पडू इच्छित नाहीत. 

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP